Friday, March 28, 2025

उज्वल भविष्य असणारे उमदे नेतृत्व : आमदार अतुलबाबा भोसले ;

वेध माझा ऑनलाइन।
कऱ्हाड दक्षिणचे आमदार अतुलबाबा यांच्याविषयी लिहिताना या मतदार संघाच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करणे गरजेचे आहे. (स्व.) यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी २७ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले. व्यासंग पूर्ण अभ्यासू वृत्ती व बाणेदारपणा त्यांनी नेहमी जपला. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कापूस एकाधिकार योजना, कोयना धरण, एस. टी महामंडळ यासारखे त्यांनी केलेले १६ कायदे महाराष्ट्राच्या विधीमंडळात बघावयास मिळतात. निषकलंक या स्वच्छ चारित्र्यच्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली असती, तर अजून महाराष्ट्र प्रगतीपथावर दिसला असता. त्यांच्यानंतर ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिणचे नेतृत्व करणारे विलासकाका पाटील यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी कौटुंबिकरित्या संबंध जोडले गेले. सर्किट हाऊस, मंत्रालय यांचे दरवाजे काकांनी सामान्य लोकांसाठी खुले केले. त्यांच्यात स्वाभिमान जागवला हे करत असताना सातारा जिल्ह्याच्या राजकारणात, जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा परिषद, जिल्ह्यातील पंचायत समिती इतर संस्था याच्यावर अभूतपूर्व पकड होती. त्यामुळे ते नेहमी आदरणीय राहिले. 

त्यानंतर २०१० ते २०१४ या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत असणारे मा. पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईला यावे लागले. २०१० ते २०१४ या त्यांच्या चार वर्षाच्या मुख्यमंत्री काळात कराड दक्षिणसाठी झुकते माफ राहिले. मा. आनंदराव नाना यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून मिळालेली संधी त्यांनी पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्री पदाचा संपुर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांना ताकद देण्यासाठी उपयोग केला. या प्रत्येक नेत्याचे आपले राजकिय, सामाजिक स्थान उल्लेखनीय आहे.

आमदार अतुलबाबांचा विधानसभेत जाणेचा प्रयत्न सुरुवातीपासून होता. त्यासाठी त्यांनी २००९ मध्ये मा. विलासराव काकांचे स्नेहाचे संबंध लक्षात घेऊन कराड उत्तरमधून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हावर प्रस्थापित आमदारांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (साहेब) व ३५ वर्षे मतदार संघाचे नेतृत्व करणारे विलासकाका पाटील या दोघांच्या विरोधात भाजपच्या चिन्हावर ना. देवेंद्र फडणवीस (साहेब) यांच्या शब्दाला मान देऊन निवडणूक लढवली ही लढत अतिशय लक्षणीय ठरली. २०१९ ला पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (साहेब) व विलासकाकांचे वारस अॅड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. २०१९ नंतर झालेल्या मार्केट कमेटीच्या निवडणूकीत बाबांच्या पॅनेलचा झालेला पराभव ह्या चारही पराभावाची गोष्ट लक्षात घेतली असता, कोणत्याही अपयशाला न खचणारा नेता, प्रत्येक पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून जनतेमध्ये उतरला. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी अनेक जेष्ठ कार्यकर्ते, हितचिंतक, कुटुंबिय यांचा सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रभारीपद अतुलबाबांनी स्विकारु नये असा कल होता.

सातारच्या उदयनराजेंना स्विकारावा लागलेला पराभव अतुल बाबांच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी तन, मन, धन खर्च करुन सातारा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला. व कऱ्हाड दक्षिणमधील राजेंच्या विरोधात मागील निवडणूकीत असणारे ३२ हजार मताचे मताधिक्य ओलांडून ७०० मतांनी कऱ्हाड दक्षिण आघाडीवर नेला. आणि हिच खरी उदयनराजेंच्या विजयाची प्रमुख गोष्ट ठरली.

भारतामध्ये भाजप मायनोरिटी असतात २४० खासदारामध्ये उदयनराजेंचा समावेश ही पक्षश्रेष्टीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट ठरली. ना. देवेंद्र फडणवीस साहेबांची असणारी विशेष मर्जी व कऱ्हाड दक्षिणमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून केलेली ७०० कोटीची विकासकामे २०२४च्या निवडणूकीमध्ये अतुलबाबांचे जनतेशी निर्माण झालेले नाते, डॉ. सुरेशबाबा, आनंदराव पाटील व बाबांचे कुटुंबिय यांच्या अथक प्रयत्नातून डॉ. अतुलबाबांचा ३९००० मतांनी विजयी झाला.

कऱ्हाड तालुक्याचा राजकीय सामाजिक वारसा (स्व.) यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या विचारांनी चालतो. हा वारसा जपत असताना आमदार म्हणून निवडून आलेल्या अतुलबाबांनी माजी लोकप्रतिनिधी यांच्यावरती टिका टिप्पन्नी न करता आपली वाटचाल सुरु केली आहे. अतुलबाबांचे वय असणारा उमदेपणा व उत्साह लक्षात घेता त्यांनी केलेला संकल्प मला माझ्या १,३९,००० मतदारांच्या विकासासाठी व त्याच्याबरोबर विरोधात पडलेल्या १ लाख मतासाठी कोणतीही कटुता न बाळगता मी कार्यरत राहीन, हीच गोष्ट त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस कौतुकास्पद ठरुन लोकभावनेचा आदर करुन केलेली वाटचाल कऱ्हाड दक्षिण, सातारा जिल्हा व महाराष्ट्र यामध्ये उज्वल भविष्याचा उमदे नेतृत्व म्हणून मान्यता पावेल. या सर्व आशावादासह मा. अतुलबाबांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.

लेखन...
श्रीरंग देसाई संचालक, 
य. मो. कृष्णा कारखाना लि, रेठरे. रा. आणे, ता. कऱ्हाड

Wednesday, March 26, 2025

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २८ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत कराड शहर व ग्रामीण भागात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २८) कोयना वसाहत (ता. कराड) येथील कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणावर शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी दुपारी ४.३० वाजता आ.डॉ. भोसले यांचे मुंबईहून कराड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, ते सायंकाळी ६ वाजलेपासून कृष्णा स्कूलच्या प्रांगणात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) कराड येथील रिमांड होम आणि कोळे येथील जिजाऊ अनाथाश्रम येथे फळे व खाऊवाटप केले जाणार आहे. शनिवारी (ता. २९) रेठरे बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्यावतीने सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ३१) सायंकाळी ८ वाजता कराड येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी वडगाव हवेली येथे भव्य बैलगाडी शर्यती, आगाशिवनगर-मलकापूर येथे सायंकाळी ६ वाजता खेळ पैठणीचा आणि वारुंजी येथे सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. 

२ एप्रिल रोजी रेठरे बुद्रुक येथे शिवशक्ती क्रिकेट क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धा, तसेच पाचवड येथील श्री पाचवडेश्वर मंदिराजवळ भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. ३ एप्रिल रोजी विंग येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ४ एप्रिल रोजी विंग येथे सकाळी १० वाजता श्वान स्पर्धा, तर टाळगाव येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मनव येथे ५ एप्रिल रोजी भव्य धनगरी ढोल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 


कराडमध्ये अतुलपर्व कृष्णा महोत्सव 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील प्रीतिसंगम घाटावर ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान अतुलपर्व कृष्णा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिनेस्टार क्रांती (नाना) मळेगावकर यांचा होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा कार्यक्रम, ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘झी टीव्ही’ फेम शाहीर देवानंद माळी यांचा ‘शाहिरी गर्जना’ हा पोवाडा, भारुड, गोंधळ व लोकगीतांचा कार्यक्रम आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वरांजली’ हा जुन्या नव्या हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Tuesday, March 25, 2025

बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रूपये लाच मागितली ; कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे व कनिष्ठ लिपिक तौफीक शेख यांच्यावर कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करत त्यातील पाच लाख रूपयाचा पहिला हप्ता खासगी इसमाच्या सांगणेवरून स्वीकारताना कराड नगरपरिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेसह, नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार, बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली.

कराड नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (वय 40, रा. कार्वे नाका, कराड), खासगी इसम अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कराड शहरातील सोमवार पेठ येथे पार्किंग व पाच मजली इमारतीचे काम प्रास्ताविक आहे. तक्रारदार यांनी इमारत बांधकाम परवानगी मिळणेबाबत 2017 मध्ये नगरपरिषद येथे प्रकरण दिल होते. त्याची मुदतवाढ 2019 पर्यंत घेण्यात आली होती. सदरचे काम सुरू न झाल्याचे पुन्हा 2021 मध्ये सुधारीत परवानगी मिळाली. परंतु दरम्यानच्या काळात नियमावलीत बदल झाल्याने सुधारीत बांधकाम परवाना मिळणेबाबत पुन्हा 2023 मध्ये अर्ज दाखल केला होता. सदरील परवानगी करीता तक्रारदार यांनी सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदार यांना भेटून त्यांचे कामात 2000 स्केअर फूट वाढीव एफएसआय इतकी मिळकत असल्याने बाझार भावाप्रमाणे मिळकत किमत अंदाज 80 लाखापैकी दहा ते बारा टक्के रक्कम म्हणजे 10 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. अजिंक्य देव याचेकडून प्राप्त झाले फाईलवरून स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख याच्या मदतीने बांधकाम परवाना करीता आवश्यक असले चलन स्वानंद शिरगुप्पे याचे व्हॉटस्‌‍ॲप वरून स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर घेऊन मागील तारखेच्या चलनावर आज रोजी सह्या करून पुन्हा स्वानंद शिरगुप्पेच्या मोबाईलवरती परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार करून लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिले. तसेच शिरगुप्पे याने अजिंक्य देव याच्या मार्फतीने तक्रारदार यांचेकडे लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच तौसिफ शेख याने शिरगुप्पे याचे सांगणेवरून मुख्याधिकारी कार्यमुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या नावाचे स्वाक्षरी करीता चलन तयार करून ते पाठीमागील तारखेस जावक करून अजिंक्य देव याचे सांगणेवरून दहा लाख रूपये लाचेच्या मागणीतील त्याचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रूपये रक्कम स्वीकारली. अजिंक्य देव याने तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे व स्वानंद शिरगुप्पे यांचे करीता लाचेची मागणी करून शिरगुप्पे याचे सांगणेवरून तक्रारदार यांना वेळोवेळी लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. या चौघांनी तक्रारदार यांना त्यांच प्रलंबित कामा करीता आपल्या पदाचा गैरवापर करीत लाच मागणी करून, प्रोत्साहन दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.

कराडच्या उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीला राजेंद्रसिंह यादव यांचा दणका : संबंधित अधिकारी जागेवरच पदमुक्त ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपजिल्हा रूग्णालयात जावून याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यावर संबधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या अधिकार्‍यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही. असा आक्रमक पवित्रा राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, मनोज माळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामधील वैद्यकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार, रूग्णालयात असणार्‍या असुविधा, अस्वच्छता याबाबत राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी करून आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्क साधला असून आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसमवेत याबाबतची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
कराड येथील एका युवकास रविवारी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याने तात्काळ येथील  स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये उपचारासाठी गेला. त्याठिकाणी त्यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रेबिज लस देण्याची गरज असल्याचे सांगितले यानुसार त्यांनी वैद्यकीय अधिकारी जडगे  यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी रेबिज लस शिल्लक नसल्याचे सांगून उपचारास टाळाटाळ केली असल्याचा आरोप युवकाने केला व याबाबतची तक्रार केली. रेबिज लस कुत्र्याने चावा घेतल्यापासून 24 तासांच्या आत रूग्णाला देणे गरजेचे असतानाही लस दिली गेली नाही. याबाबतची माहिती मिळताच राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली व माहिती घेतली. त्यावेळी डॉ. जडगे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिला लाळे यांच्याशी त्यांनी  संपर्क साधला असता रेबिज लस शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली. रूग्णांवर उपचार करण्यात येणारी दिरंगाई व त्याबाबत जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे रूग्णांच्या उपचारात दिरंगाई होत असल्यामुळे यादव यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. तसेच नगरपालिकेतील एका कर्मचार्‍यालाही तात्काळ उपचाराची गरज असताना त्यांनाही व्यवस्थित उपचार दिला नसल्याचाही आरोप यादव यांनी केला.  त्यामुळे संबंधित डॉ. जडगे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येवून त्यांना जागेवरच पदमुक्त करण्यात आले.

यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी रूग्णालयाची पाहणी केली. यावेळी अस्वच्छ पाण्याची टाकी, किचनची दुरावस्था दिसून आली. तसेच प्रसूती झालेल्या मातांना पोषण आहार दिला जात नाही हेही निदर्शनास आले. औषधांची कमतरताही निदर्शनास आली. रूग्णालयातील स्टाफची कमतरता, गार्डचे 6 महिन्यांपासून रखडलेले पगार, एमआयआरची मशिनही उपलब्ध नाही. 100 बेडचे उपजिल्हा रूग्णालय असूनही याठिकाणी असणार्‍या असुविधांमुळे याबाबत लवकरच पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.

राजेंद्रसिंह यादव यांची प्रतिक्रिया : 
100 बेड असणारे असे हे मोठे रूग्णालय आहे. कराडसह परिसरातील तालुक्यातील रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र रूग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. असुविधा आणि अस्वच्छता रूग्णालयात मोठ्या प्रमाणात आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून रूग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉक्टरांबाबत तसेच रूग्णालयातील असुविधेबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासमवेत आढावा बैठक घेणार आहे.

Tuesday, March 18, 2025

नागपूर हिंसाचार ; ओवेसी म्हणाले...मी त्या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, मंत्र्‍यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे,

वेध माझा ऑनलाइन
सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटविण्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे. मात्र, नागपुरातील याच आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळल्याचे पाहायला मिळाले. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परीसरात जाळपोळ व दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. त्यातच, मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले जात असल्याचा दाखला देत सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवर आज विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी निवेदन सादर करत घटनेची माहिती दिली. आता, एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी नागपूर घटनेवर प्रतिक्रिया देताना नाव न घेता मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्र्‍यांना लक्ष्य केले.

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्‍यांकडून हे वक्तव्य केलं जात आहे, ते पाहायला हवं. सर्वात मोठं भडकाऊ वक्तव्य सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्‍यांकडून केलं जात आहे. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचीही त्यांना जाणीव नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काही बादशहांचे फोटो जाळण्यात आले. मात्र, त्याचा कुठेही परिणाम झाला नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला. जो हिंसाचार घडला. मी त्या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, मंत्र्‍यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे, असे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले. 

नागपूरमध्ये जी घटना घडली तो परिसर केंद्रीयमंत्र्यांच्या घराजवळ असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील याच शहरातून येतात. त्यामुळे, हे इंजेलिजन्सचं फेल्युअर आहे. असेही औवेसी यांनी मुख्यमंत्र्‍यांना उद्देशून म्हटले.

मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार / निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

वेध माझा ऑनलाइन
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.  आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरू होणार आहे. मतदार नोंदणी क्रमांकसोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांसोबत सल्लामसलत होईल. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची माहिती आयोगाने दिली आहे. आधार कार्ड फक्त ओळख प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, त्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही.

Monday, March 17, 2025

दंगलखोर बाहेरहून आले ! :आधारकार्ड आणि वाहने सापडली

वेध माझा ऑनलाइन।
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. 

दंगलखोर बाहेरुन आले...!
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.