Monday, June 16, 2025

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार ; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे.  अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यासाठी, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे  ४ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीतून कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर व कसे वस्तीमध्ये सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करणे (४५ लाख), चचेगाव येथील सिद्धार्थनगर, संत रोहिदास नगर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर (५० लाख), गोटे (३० लाख), गोळेश्वर येथील गणेश नगर, थोरात वस्ती, दुपटे वस्ती, झिमरे वस्ती व झिमरे-साळुंखे वस्ती (६५ लाख), गोवारे (३५ लाख), घोणशी येथील जय मल्हार कॉलनी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (२० लाख), कार्वे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, संत रोहिदास नगर (५५ लाख), वारुंजी येथील लक्ष्मी वॉर्ड, जिजामाता नगर व सिद्धनाथ कॉलनी (५० लाख), विंग येथील समता नगर, संत रोहिदास नगर व पंचशील नगर (४५ लाख), ओंड (२५ लाख), वहागाव येथील पंचशील नगर, जय मल्हार नगर, संत रोहिदास नगर, अहिल्यानगर (५० लाख) येथे सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.

याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, या विकासकामांसाठी तातडीने आराखडा सादर करुन, निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मूलभूत सोयीसुविधांचे काम मार्गी लागून, कराड दक्षिणमधील ११ गावांमधील विविध अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहती हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहेत. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Sunday, June 15, 2025

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मोठा गौप्यस्फोट ; ...म्हणाले...आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. ..महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते,...

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी ही झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.   

भरत गोगावले म्हणाले की, मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.  मविआतील काही आमदार एअरपोर्टला गेले होते, त्यांना घेऊन आले होते, असा दावा त्यांनी केलाय. 
बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नाही, ते देखील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्यावेळी पद घेऊ शकले असते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव साहेब हे पद घेणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी पद स्वीकारले, त्यासोबतच आदित्य ठाकरेंना देखील मंत्रिपद दिले. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर केंद्रात आता श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिले असते, आम्ही देखील बोललो द्या. पण, त्यांनी तसे केले नाही, असे देखील गोगावले यांनी स्पष्ट केले.

मालवणमधील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली ; पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाडही पडले! ; चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट झाल्याचं स्पष्ट

वेध माझा ऑनलाइन।
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या  चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपला साथ देणार ? गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांची घेतली भेट.

वेध माझा ऑनलाइन
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे अरुण गवळींचा पक्ष महापालिका निवडणुकीत भाजपची साथ देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

गीता गवळी या अरुण गवळीची कन्या असून त्या 2017 ला मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीला गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाने त्यांना तिकीट न दिल्याने गीता गवळी निवडणूक लढल्या नाहीत.

भाजपच्या एका आमदाराच्या निवासस्थानावर शेतकऱ्याचा पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानावर एका शेतकऱ्याने पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेवर प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील विशाल मुरुड या शेतकऱ्याने हातात पेट्रोलचा कॅन घेऊन कुटे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो ओरडत होता की, "माझ्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला पेटवतो."
यावेळी आ. कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने तत्काळ हस्तक्षेप करून मुरुड याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी BNS 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारकडून मदतीचा मोबदला वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे, आणि याचेच परिणाम म्हणून लोक आता थेट
लोकप्रतिनिधींवर तुटून पडताना दिसत आहेत.
संजय कुटे हे 2004 पासून सलग विधानसभेवर निवडून येत असून, भाजपचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  

पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीने हत्या ; मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केला...

वेध माझा ऑनलाइन
पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीचा मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. यशवंत मोहन ठाकरे असे या मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत ठाकरे हे 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होते. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी पत्नी प्रभा ठाकरे हिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी यशवंत हे गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे पत्नीने आई-वडिलांना सांगितले. मात्र, पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली.
यानंतर त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराची ओसरी खड्डा करून शेण आणि मातीने सारवलेला कुटुंबियांना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली.  पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी महसूल विभागासमवेत पंचनामा करीत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. मात्र तिथे मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आणि ती काही झालेच नाही, अशी वावरत होती. लहान भावाच्या पत्नीला संशय आला अन्...दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवली. त्यामुळे उत्तमच्या पत्नीला संशय आला आणि तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली दिली.  




तळेगाव दाभाडे जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला ; 25 जण वाहून गेल्याची भीती ;

वेध माझा ऑनलाइन
मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.