वेध माझा ऑनलाइन - स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वती... अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला. सहस्त्रकातून एखाद्या कलाकाराला लाभतो असा आवाज, असा मान या गानसम्राज्ञीला मिळाला होता.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती.
अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. भावोत्कट स्वर, प्रसंगानुरूपच नव्हे तर पडद्यावर ज्या नायिकेसाठी आपला आवाज असणार आहे त्या भूमिकेनुसार लता मंगेशकरांनी पार्श्वगायनातले बारकावे टिपले. सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाज या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं. पण इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता.
28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची पाठराखण करत आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत गायनाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्य नवयुग सिनेमासाठी त्यांचं गाणं सुरू झालं, ते अगदी नव्वदीपर्यंत अविरत सुरू होतं. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली.
2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.
No comments:
Post a Comment