Monday, July 13, 2026

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सात महिने उलटले आहेत. या योजनांतील ४४ विकासकामांसाठी निधी उपलब्ध असूनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे.
एकूणच मंजूर कामे सात महिने उलटूनही का सुरू नाहीत? याबाबत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून जाब विचारल्याच्या कारणाने यापुढे... अतुलबाबा पालिकेत थेट लक्ष घालणार हे निश्चितच आहे... आणि  याचनिमित्ताने कराड पालिकेचे राजकारण तापणार अशीही शक्यता आहे

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
दरम्यान पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नगरसेवकांचा पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की... 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.

शहरातील कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्याच्या कामासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही रस्त्याची अवस्था अद्यापही खराब असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मंजूर कामे रखडण्यामागील कारणे, त्यासाठी जबाबदार बाबी आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी आमदार भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनीही रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदारांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाकडे खुलासा मागितल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

No comments:

Post a Comment