सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटविण्याची मागणी करत आंदोलन केले जात आहे. मात्र, नागपुरातील याच आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळल्याचे पाहायला मिळाले. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परीसरात जाळपोळ व दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. त्यातच, मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले जात असल्याचा दाखला देत सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवर आज विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करत घटनेची माहिती दिली. आता, एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी नागपूर घटनेवर प्रतिक्रिया देताना नाव न घेता मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून हे वक्तव्य केलं जात आहे, ते पाहायला हवं. सर्वात मोठं भडकाऊ वक्तव्य सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून केलं जात आहे. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचीही त्यांना जाणीव नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काही बादशहांचे फोटो जाळण्यात आले. मात्र, त्याचा कुठेही परिणाम झाला नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला. जो हिंसाचार घडला. मी त्या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, मंत्र्यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे, असे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले.
नागपूरमध्ये जी घटना घडली तो परिसर केंद्रीयमंत्र्यांच्या घराजवळ असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील याच शहरातून येतात. त्यामुळे, हे इंजेलिजन्सचं फेल्युअर आहे. असेही औवेसी यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले.
No comments:
Post a Comment