Tuesday, April 29, 2025

पहलगाम पीडितांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय|

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करून सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासोबतच, पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना ५० लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रिमंडळाने ईव्ही आणि जहाज बांधणी उद्योगासाठीही नवीन धोरणे मंजूर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, पूर्वीच्या एक रुपयात पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आणि घोटाळे निदर्शनास आले होते. लाखो बोगस अर्ज दाखल झाले, ज्यामुळे हजारो कोटींचा निधी वाया जात होता. गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नव्हता.
हे टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने फायदा व्हावा, यासाठी आता केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे. या नवीन योजनेत विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. तसेच, शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वतंत्र योजनाही मंजूर करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याशिवाय, पीडित कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची जबाबदारी सरकार घेणार असून, जगदाळे कुटुंबातील एका मुलीला मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

No comments:

Post a Comment