: कराड नगरपालिकेतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. विरोधी गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडीवर टीका करत, शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेतील राजकारण घडवून आणले जात असल्याचा आरोप केला. तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे चुकीची उत्तरे देऊन कराडकर नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाटेगावकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे दैवत असून त्यांच्या समाधीलगत होणाऱ्या नेकलेस रोडसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा मार्ग शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल. शहरातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होत असतानाही सत्ताधारी खोटे आरोप करून त्या निधीचा उपयोग टाळत आहेत. यामध्ये विकासापेक्षा राजकारणच अधिक दिसत असून त्यामुळे शहराचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेच्या विकासाची तुलना आजूबाजूच्या पालिकांशी केली असता कराड विकासाच्या बाबतीत मागे पडल्याचेही त्यांनी नमूद केले. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराचा पुनरुच्चार करत, सध्या सुरू असलेल्या कामकाजातही त्याच प्रकारच्या अनियमितता सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्यावर खंदारे यांच्या वाहनातून प्रवास केल्याचा करण्यात आलेला आरोप फेटाळून लावत वाटेगावकर म्हणाले, "हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मी त्यांच्या गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही."
नगराध्यक्षांकडून आमदार डॉ. अतुल भोसले यांना चुकीची माहिती दिली जात असल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "नगराध्यक्ष आरोप करत असले तरी स्वतः आमदारांनी कधीही असे आरोप केलेले नाहीत. खोटे आरोप करून शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे."
उर्दू शाळा, ४० फुटी रस्ता तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजप सातत्याने आवाज उठवत राहील. शहराच्या विकासासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा आम्ही ठामपणे भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक अजय पावसकर म्हणाले, सोमवार पेठेतील वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र, चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आला
नगरसेवक शिवाजी पवार आणि आशुतोष डूबल तसेच अतुल शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळून लावत, भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शेवटी अतुल शिंदे म्हणाले...आमदार साहेबांच्या गुडबुक मध्ये आम्ही सगळे नगरसेवक आहोतच शिवाय आम्ही सगळे लोकांच्या गुडबुकमध्येही आहोत त्यामुळेच लोकांनी मोठ्या मतांनी आम्हाला निवडून देत पालिकेत पाठवलं आहे त्यामुळे आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत
पत्रकार परिषदेचे आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment