Monday, March 17, 2025

दंगलखोर बाहेरहून आले ! :आधारकार्ड आणि वाहने सापडली

वेध माझा ऑनलाइन।
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. 

दंगलखोर बाहेरुन आले...!
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागतय : देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली खंत ;

वेध माझा ऑनलाइन।
क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलंय. याप्रकणावरुन राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, असं वचनही त्यांनी दिलं.

धक्कादायक बातमी ! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत विविध कारणास्तव या योजनेतील 9 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिलेनं पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. पत्नीच्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला. पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले. त्यामुळे, पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. माढा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूवर आरोप करण्यात आले आहेत. 

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले...राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येणार :

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. यासंदर्भात अधिवेशनात आज विधानसभेत चर्चा झाली. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत वाळू न दिल्यास कारवाई करणार का? रेती संदर्भात अनेक अधिकारी हे ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे जे लोक गाडी पकडून देतील, त्यांना वाहन बक्षीस देईल का? याबाबत आपण पोर्टल करणार आहात का?, असे अनेक प्रश्न भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारले होते. मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. पुढील 8 दिवसांत राज्यात वाळू धोणार येणार आहे. त्यानुसार, अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

आजची मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे आदेश;

वेध माझा ऑनलाइन। 
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून आता शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य शासनाचा यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, आता न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवार कुटुंबावर शोककळा - सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन-

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. 18) दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगाआ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सक्त सूचना

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथे कोल्हापूर नाक्याजवळ सुरू असलेल्या महामार्ग उड्डाणपुलाचा सेगमेंट बसविताना अचानक निसटल्याने २ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन उड्डाणपूल उभारणीच्या कामाची पाहणी केली. तसेच उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगण्याच्या सक्त सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या.

यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत कराड येथे उड्डाणपूल उभारला जात असून, याठिकाणी १२२३ सेगमेंट बसविले जात आहेत. आत्तापर्यंत १०९० सेगमेंट बसविले गेले असून, फक्त १३३ सेगमेंट बसवायचे राहिले आहेत. अशावेळी शनिवारी (ता. १५) रात्री सेगमेंट बसविताना क्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे सेगमेंट अचानक निसटल्याने मोठा आवाज झाला. याठिकाणी काम करणारे मजूर बाजूला   पळून जाताना त्यांना ईजा झाली. या मजुरांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारणीच्या कामात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सावधानता बाळगावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीत उड्डाणपूलाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्ताने जो एरिया प्रतिबंधित करण्यात आला आहे, अशा एरियात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पायी अथवा वाहनाने जाऊ नये, असे आवाहनही आ. डॉ. भोसले यांनी केले.