Tuesday, March 17, 2026

शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला ; कुठे घडली घटना ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
शिर्डीतील लोणी गावात संतापजनक घटना घडली असून शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं अहिल्यानगर जिल्हा हादरला असून थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिर्डीतील घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. आता, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. 
 
शिर्डीतील अॅसिड हल्ला प्ररकणाची मी माहिती घेतली आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, रस्त्यावर थांबून त्या मुलाने तिच्यावर अॅसिड फेकलं. खरंतर ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जवळपास सीसीटीव्ही नाहीत. पण हा मुलगा गावातलाच असू शकतो, त्यामुळे पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, आजच आरोपी पकडला जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महिन्याभरात कार्यान्वित करा ; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश ;

वेध माझा ऑनलाईन।
: उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आज मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेतली. यावेळी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करुन, ही योजना येत्या महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी १० मार्च रोजी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अधिवेशन संपण्यापूर्वी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली होती. 

त्यानुसार आज मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ.डॉ. भोसले, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व पं.स. सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

बैठकीत प्रारंभी आ.डॉ. भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबतचे वास्तव चित्र पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर सादर केले. ते म्हणाले, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झाला आहे. पण दरम्यानच्या काळात या योजनेअंतर्गत समाविष्ट १७ गावांपैकी काही गावांनी स्वतःच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे, त्या गावांना आता या प्रादेशिक योजनेतील पाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे योजनेच्या मूळ आराखड्यात आवश्यक बदल करून, प्रत्यक्षात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना या योजनेतील पाण्याचा लाभ देणे आवश्यक आहे. उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध झाल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. तसेच याचा लाभ कराड दक्षिणमधील कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागालाही करुन देता येईल. 

यानंतर पाणीपुरवठा मंत्री ना. पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या कामाचा आढावा घेऊन, अपूर्ण कामे ताबडतोब पूर्ण करण्याचे आदेश बजाविले. तसेच येत्या महिन्याभरात ही योजना कार्यान्वित करावी, अशी स्पष्ट सूचना केली. यासाठी आवश्यक निधीची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच योजना कार्यान्वित झाल्यानंतर कोयना वसाहत, नांदलापूर या गावांसह मलकापूर शहराच्या विस्तारित भागाला या पाण्याचा लाभ मिळवून देण्याबाबतचा आराखडाही तातडीने सादर करावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मंत्रालय स्तरावर पाणीपुरवठा मंत्र्यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, कार्यवाहीच्या सूचना दिल्याने उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. तसेच या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

यावेळी माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणीपुरठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



महिन्याभरात योजना कार्यान्वित करा; उद्‌घाटनाला मी येणार..!

उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करुन, ही योजना महिन्याभरात कार्यान्वित करा, असे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा मंत्री. ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या योजनेच्या उद्‌घाटनासाठी स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून प्रतिक्रिया काय ?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघात काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला. आता, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी भूमिका मांडली आहे.  

अजित पवारांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाकेंच्या या भूमिकेवर आता पवार कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

बारामती पोटनिवडणुकीसंदर्भाने बोलताना, याबाबत सुप्रियाताईंनी भूमिका मांडली आहे, बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार. आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, बारामतीचे प्रश्न काकींच्या साथीने सोडवू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. तर, लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.  प्रत्येकाला निवडणुकी लढण्याचा अधिकार आहे, कोणी कुठेही निवडणूक लढू शकतो, ही लोकशाही आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड पंचायत समितीत प्रथमच भाजपाची सत्ता आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि नूतन सभापती सौ. नंदाताई यादव यांचे विशेष अभिनंदन केले. कराड तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कराड पंचायत समितीवर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. सोमवारी (ता. १६) झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपाच्या सौ. नंदाताई यादव यांची नूतन सभापती म्हणून निवड झाली. या निवडीमुळे कराड तालुक्यात भाजपाला नवे बळ मिळाले आहे.

या निवडीनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सौ. नंदाताई यादव यांनी मुंबई येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ. भोसले यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, कराड तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.

नूतन सभापती सौ. यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जनतेने आणि पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आ.डॉ. अतुलबाबांच्यामुळे मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असून, या पदाला न्याय देत, कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे नमूद केले.

दरम्यान, सौ. यादव यांनी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांची भेट घेतली. या मान्यवरांनी सभापती निवडीबद्दल सौ. यादव यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, सचिन पाचपुते, अरुण यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Sunday, March 15, 2026

5 राज्याच्या निवडणुकीसाठी तारीख ठरली ; बिगुल वाजलं ;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय निवडणूक आयोगाने  आज, 15 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता ऐतिहासिक घोषणा करत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. 2021 च्या तुलनेत यावेळी अत्यंत कमी टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यावर आयोगाने भर दिला आहे.

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ बंगालमध्येच एप्रिल महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला असे दोन टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. दुसरीकडे, उर्वरित सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये 23 एप्रिलला तमिळनाडूतील मतदार आपला हक्क बजावतील, तर 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पडतील.

गेल्या 2021 च्या विधानसभा रणधुमाळीत तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या असल्या तरी, आसाममध्ये तीन तर बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत ही प्रक्रिया राबवावी लागली होती. मात्र, यंदा राजकीय हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, बंगालसारख्या संवेदनशील राज्यात मतदानाचे टप्पे कमी करून केंद्रीय सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या पाचही राज्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारांची मुदत आगामी मे आणि जून 2026 मध्ये संपुष्टात येत आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी, तर तमिळनाडूचा 10 मे रोजी पूर्ण होत आहे. याव्यतिरिक्त आसामची मुदत 20 मे ला आणि केरळ विधानसभेची मुदत 23 मे रोजी संपणार आहे.

बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? ; काय आहे बातमी?

 वेध माझा ऑनलाइन।
बारामती विधानसभा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी  विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन आणि इशारा दोन्हीही दिलं आहे. 
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात पुढील महिन्यातच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील मतदारसंघात निवडणुकांच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील निवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे, आता या जागेवर पोटनिवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीची लवकरच घोषणा करु शकते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच दोन्ही जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे.  

 उमेदवार कोण?

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होईल. बारामती मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झालं असून सध्या त्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर, राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली होती. त्यामुळे, येथील उमेदवार कोण, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 


सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
मध्य महाराष्ट्रात  हवामानाचा वेगळाच चित्र दिसण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे  आणि अहिल्यानगर परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच कारणामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात  मात्र सध्या उन्हाची तीव्रता कायम आहे. नाशिक धुळे  नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमान 37 ते 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो. मात्र 15 मार्चपासून या भागात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.
मराठवाडा भागातही उष्णतेचा प्रभाव कमी होत असताना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीड आणि धाराशिव येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान 36 ते 39 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.