Wednesday, April 22, 2026

सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारची मंजुरी ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती प्रसिद्ध ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा ; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार ;

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
यामध्ये सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 

पुणे-बंगळुरू महामार्गावर नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढी शासकीय जमीन ‘आयटी पार्क’ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठा पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

सातारा जिल्ह्यातील ‘आयटी’ क्षेत्राशी निगडित इंजिनियर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यांसह अन्य राज्यातील शहरात नोकरीसाठी जावे लागू नये यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत ‘आयटी पार्क’उभारण्यात यावा, यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच या जागेची पाहणी ‘एमआयडीसी’ विभागामार्फत करण्यात आली होती.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे क्षेत्र ‘आयटी पार्क’साठी आरक्षित करण्यात आले होते. ‘आयटी पार्क’विकसित करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करणे आवश्यक होते. यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता.

त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागेवाडी येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे शासकीय क्षेत्र ‘आयटी पार्क’ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.



Tuesday, April 21, 2026

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर ,तर... शंभूराज देसाईंना शिवेंद्रसिंहराजे यांचा टोला ;

वेध माझा ऑनलाइन
आम्ही युती म्हणून एकत्र काम करतो आहे. जिल्हा परिषदेला जे झालं ते स्थानिक राजकारण होतं. जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत मिळालं होते. मात्र, जाणून बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकत्र काम करू, असं आमचे म्हणणे होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 
रायगडमध्ये टोकाचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलीच ना, असे सांगत साताऱ्यात एवढा टोकाचा विरोध तरी नव्हता, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. हा जिल्ह्याचा विषय होता आणि तो विषय आता संपला आहे, असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. 
दरम्यान शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना तुम्ही सांभाळू शकला नाही, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्या भाजपच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना ते सांभाळू शकले नाहीत, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे. 
शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का? हे त्यांना विचारले पाहिजे, अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली. 
आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्याचे काम चांगले सुरू आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे, असे देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

शंभूराज देसाई यांचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य ; म्हणाले ; मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या युतीलाच ;

वेध माझा ऑनलाइन।
शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा  साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले साताऱ्याचं जनमत मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढत असून त्याचं कारण एकनाथ शिंदे असल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले.

मंत्री देसाई पुढे म्हणाले...
गेल्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही म्हणून विजय पवार आघाडी करुन उभा राहिला. शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आज आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतो, जिल्हा परिषद सदस्यसंख्या तीन वरुन पंधरावर गेले आहेत. 29 पंचायत समिती सदस्य आहेत, जवळपास 30-32 नगरसेवक आहेत. एक पंचायत समिती सभापती, तीन पंचायत समित्यांमध्ये उपसभापती, एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकांच्या आशीर्वादानं निवडून आणला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडून आणलेला आहे,आज जिल्ह्यात आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं वाटतं, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

Monday, April 20, 2026

आजच्या सभेचे मला निमंत्रण नाही, फ्लेक्सवरही माझे फोटो नाहीत; मंत्री शंभूराज देसाई यांची ही पहिल्यापासूनची सवय ; आमदार महेश शिंदे यांची शेलक्या शब्दात मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टीका ;

वेध माझा ऑनलाईन।
आज साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या झेड पी पंचायत समिती सदस्यांचे सत्कार देखील यावेळी होणार आहेत दरम्यान आजच्या या सभेचे फ्लेक्स जिल्हाभर लागले असताना त्यावर कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये... 
याबाबत महेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत मंत्री देसाई   यांची ही पहिल्यापासूनची सवय असल्याचे सांगीतले तर मला असल्या गोष्टीचा काही फरक पडत नाही कारण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री देसाई हे जिल्ह्याचे मुख्य आहेत त्यामुळे जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे निर्णय तेच घेत असतात असेही ते म्हणाले, ज्यावेळी मला बोलावले गेले तेव्हा मी गेलो , मात्र मला निमंत्रण नसेल तर मी जात नाही, आजच्या सभेलाही आपल्याला बोलावले नसल्याचे त्यांनी सांगितले मधल्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीकीदरम्यान भाजप-सेनेमध्ये झालेल्या ताणतणावाच्या प्रकारामुळे नाराज असल्याने त्यांनी मला आमंत्रण दिले नसावे... मला ते वेगळी वागणूक देत असावेत...असेही आमदार शिंदे यावेळी म्हणाले

ते पुढे म्हणाले
मंत्री शंभूराज देसाई यांचा पहिल्यापासून स्वभावच तसा आहे महाबळेश्वर येथे पर्यटन महोत्सव झाला तसेच पाटण, सातारा, कराडमध्ये कार्यक्रम झाले त्यावेळी देखील मंत्री देसाई यांनी मला बोलावले नव्हते त्यावेळी देखील माझे बॅनर वर फोटोही नव्हते त्यामुळे त्यांच्या या स्वभावाची आम्हाला सवय आहे त्यामुळे याचा मला काही फरक पडत नाही असंही आमदार शिंदे म्हणाले आहेत

माझी बायको 2011 पासून भाजप मध्येच आहे आणि ती भाजपमधूनच झेड पी ला  निवडून आली आहे त्यामुळे याबाबत कोणी नाराज असायचे कारण नाही
मी पण स्वतःच्या जोरावर निवडून येतो त्यामुळे मी कोणाला त्रास द्यायला जात नाही आणि मलाही कोणी त्रास द्यायचा नाही असेही ते यावेळी म्हणाले ज्यावेळी साहेबांशी बोलेन त्यावेळी जे सत्य आहे ते मी साहेबांना सांगणार आहे असेही ते म्हणाले

Friday, April 17, 2026

तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा आणखी एक घोटाळा उघड! ; सोमवार पेठेत बिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता वाढवला ; अजय पावसकर यांचा आरोप ; शहरातील 2 ठिकाणच्या हाकर्सझोनला भाजपचा विरोध ; कराड पालिका सभा ;

वेध माझा ऑनलाईन
कराड पालिकेचे तत्कालीन वादग्रस्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा आणखी एक रस्ता घोटाळा पालिकेचा शुक्रवारी झालेल्या सभेत समोर आला. सोमवार पेठेत ६ मीटरचा रस्ता हा ९ मीटर करण्याचा ठराव तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी मंजूर केल्याची धक्कादायक माहिती नगरसेवक अजय पावसकर यांनी पालिका सभेत दिली. तसेच सोमवार पेठेतील सुमारे ५० ते ५५ घरे बाधित होणार असून खंदारे यांचा तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. 
दरम्यान शहरातील होकर झोन चा विषय पालिकेत सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला 

कराड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १७ रोजी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस दुखवट्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष सभेस सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीसच नगरसेवक अजय पावसकर यांनी सोमवार पेठ येथील रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सोमवार पेठेतील रस्ता हा सहा मीटरचा असताना देखील तो नऊ मीटरचा करून त्याचा ठराव मंजूर केला आहे. यात ५० ते ५५ घरे बाधित होत आहेत. नागरिकांनी रस्त्याचा ठराव रद्द करावा, अशी देखील मागणी केली आहे.  तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेऊन रस्त्याचे काम केले असल्याचा आरोप पावसकर यांनी केला. यावर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मला याबाबत कालच समजले असून याची योग्य ती चौकशी केली जाईल, असे सांगितले.
त्यानंतर उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शहरातील ड्रेनेजचा विषय मांडला असता  विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी ड्रेनेजच्या कामांवर आक्षेप घेतला. रस्त्याची जी अपूर्ण कामे आहेत ती कॉन्ट्रॅक्टर नक्की स्वतः काम करणार आहेत की दुसऱ्याकडून करणार आहेत? आणि वारंवार निकृष्ट दर्जाची कामे करून ते  नगरपालिकेचे आणखी किती नुकसान करणार आहेत? असा सवाल करीत अशा पालिकेचे नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे,
कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण शहरात ड्रेनेज स्वच्छता करण्याचे काम पूर्ण केले नसून ड्रेनेज जाम होत आहे. काम नक्की केलं आहे का हे तपासले पाहिजे. ड्रेनज पाईप चौकप होत आहे.
मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी ड्रेनेज, नाल्याद्वारे कराडच्या कृष्णा, कोयना नदीत मिसळत असल्याने नदीप्रदूषण होत असून याबाबत कठोर भूमिका पालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. रस्त्यावरील खोदकाम, हॉकर्स झोन, भाजी मंडईतील प्रश्न आदींसह सुमारे १५६ विषयांवर चर्चा करण्यात आली.
भाजी मंडईतील कट्टे नव्याने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार यांनी दिली. 
मुंडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून मंडई परिसरातील आकर्षेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नगरसेवकांनी रस्त्यावरील मंडई लवकरात लवकर मंडईच्या आत न्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या. 
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी वाराणसीतील कचरा प्रकल्पाची माहिती देत हा प्रकल्प कराड नगरपालिकेने राबवावा यासाठी त्या प्रकल्पाची भेट देऊन पाहणी करावी असे सुचवले नगराध्यक्ष राजेंद्र श्री यादव यांनी कराड शहरातील सर्व नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले.
कराडच्या मुख्य बाजारपेठेत हायटेक टॉयलेट्स चार ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग यादव यांनी सांगितले शहरातील होकर जून चा विषय पालिकेस सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला गजानन हाउसिंग सोसायटीची वाढीव पानेपट्टी रद्द करून ती पूर्वीप्रमाणे आकारण्याचा विषय ही एकमताने मंजूर झाला

लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांची मिश्किल टिप्पणी .. म्हणाले... मलाही पत्नी नाही आणि पंतप्रधानांनाही नाही,”...

वेध माझा ऑनलाईन।
लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पणी करत सभागृहातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर लगेचच विधेयकातील तांत्रिक त्रुटींवरून केंद्र सरकारवर बोचरी टीकाही केली. या चर्चेत महिलांचे महत्त्व, कौटुंबिक संस्कार आणि राजकीय आरक्षणातील जातनिहाय वाटा हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.
विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी महिलांच्या प्रभावाचा उल्लेख केला आणि हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली. “मलाही पत्नी नाही आणि पंतप्रधानांनाही नाही,” असे विधान त्यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला. 

राहुल गांधींनी आपली बहीण प्रियांका गांधी  हिच्या संसदेतील प्रभावी भाषणाचे जाहीर कौतुक केले. प्रियांकाने अवघ्या पाच मिनिटांत जे साध्य केले, ते आपल्याला २० वर्षांत जमले नाही, असे म्हणत त्यांनी दाद दिली. त्यांच्या या कौतुकामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक खासदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. आपल्या आजी इंदिरा गांधी  यांच्याकडून मिळालेल्या सत्याच्या आणि निर्भीडपणाच्या शिकवणीचा उल्लेख करत त्यांनी राजकीय जीवनातील संघर्षावर भाष्य केले.
भाषणाच्या उत्तरार्धात राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत हे विधेयक म्हणजे महिला सक्षमीकरण नसून ‘निवडणूक नकाशा’ बदलण्याचा कट असल्याचा आरोप केला. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  आणि विशेषतः इतर मागासवर्गीय समुदायांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद नसल्यामुळे हे विधेयक अपूर्ण असल्याची टीका त्यांनी केली

Thursday, April 16, 2026

चांगली बातमी ; आता युद्धविराम ; डोनाल्ड ट्रम्प यांनि केली मोठी घोषणा:

वेध माझा ऑनलाईन
युद्धाने पोळलेल्या पश्चिम आशियातून आणखी एक चांगली बातमी आली आहे. लेबनॉन आणि इस्रायलने १० दिवसांचा युद्धविराम घोषीत केला आहे. या सीजफायरची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सीजफायरची घोषणा करताना सांगितले की आताच माझी लेबनॉनचे अत्यंत सन्मानित राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चांगली बोलणी झाली आहेत. या दोघांनी दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी औपचारिक रुपाने १० दिवसांचा युद्धविरामाची सुरुवात करण्यास होकार दिला आहे. अमेरिकन वेळेनुसार युद्धविराम सायंकाळी ५ वाजल्यापासून लागू होईल. इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लेबनॉनींची संख्या २,१९६ इतकी झाल्यानंतर हा युद्धविराम घोषीत झाला आहे.