Friday, May 29, 2026

महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर ; 17 जागांसाठी निवडणूक ; भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चांना आता अंतिम टप्पा आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागावाटपावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या फॉर्म्युल्यात भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवल्यामुळे या जागांवर भाजपचा वरचष्मा राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गटानेही आपल्या वाट्याच्या जागांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे चर्चेत पेच निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 
भाजप सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

तर 
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर दावा ठोकणार असल्याचं समोर आलं आहे.

विषारी दारू प्रकरणात 14 जणांचा मृत्यू रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर धडक देत केली तोडफोड ;

वेध माझा ऑनलाइन।
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. विषारी दारू प्रकरणात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू अड्ड्यावर तोडफोड करत निषेध व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकल्या गेलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार स्वतः संबंधित दारू अड्ड्यावर पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी लावलेले पत्रे उखडून टाकत काऊंटरची तोडफोड केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गरीब माणूस मेल्यानंतर आम्ही शांत बसलो तर राजकारणात आम्ही फक्त टाईमपास करायला आलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अशा वेळी सिस्टीम कमी पडते, त्यामुळे आम्हालाच आक्रमक व्हावं लागतं. लहान मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण सिस्टीम वेळेवर मदत करत नाही,” असंही ते म्हणाले.
विषारी दारू प्रकरणानंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक ; पडद्यामागून हालचाली सुरू !

वेध माझा -
 राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळ यांनी अधिकृतपणे आपली इच्छा व्यक्त केली नसली, तरी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीसोबतच पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठीही भुजबळ आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना पक्षाकडून आता केंद्रात संधी दिली जाणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जात असल्यामुळे त्यांना डावलणं पक्षासाठी सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे-सातारा प्रवास होणार फक्त 1 तासाचा ! ;

वेध माझा ऑनलाइन।
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी पुणे ते सातारा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी पाहून या भागांत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI च्या या उपाययोजनांमुळे पुणे ते सातारा कॉरिडोरवरील वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुणे ते सातारादरम्यान पाच ते सहा उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. सध्या पुणे ते सातारा प्रवासा 1.30 ते 2 तास वेळ जातो. वाहतूक कोंडी असली तर सव्वा दोन तास तर हमखास जातात. त्यात साताऱ्यातून पुढे गावात जाणाऱ्या वाहनांना तर आणखी वेळ लागतो. हाच प्रवासाचा वेळ अवघ्या 1 तासावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

पुण्यात मृत्यूचे तांडव… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, एकाही आरोपीला न सोडण्याचे थेट आदेश... चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू...

वेध माझा ऑनलाईन
चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार माजवला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि एकाही आरोपीला न सोडण्याचे आदेश दिले आहेत

गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. दोन्ही पोलीस आयुक्तांना समन्वयाने काम करतानाच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. कोणाचीही हयगय करू नका. कठोर कारवाई करा, असे आदेशच दोन्ही पोलीस आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घ्यायलाही सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Wednesday, May 27, 2026

कृष्णा कारखाना निवडणुकीत ऍड. उदयसिह पाटीलांचा भोसलेंना पाठिंबा...

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा समूह आणि रयत  समूह सहकारात एकत्रितपणे काम करू लागली तर भागातील शेतकऱ्यांचे कल्याण होईल त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आपण सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्याचमुळे होणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघटना भोसलेंच्या सहकार पॅनेलला मदत करेल असे ऍड उदयसिह पाटील उंडाळकर यांनी स्पष्ट केले

कोयना दूध संघावर रयत संघटनेच्या वतीने कृष्णा कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात ऍड पाटील बोलत होते

यावेळी डॉ सुरेश भोसले म्हणाले स्व विलासकाका पाटील व स्व जयवंतराव भोसले यांनी सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले सहकाराच्या माध्यमातून भागाला प्रगतीपथावर नेण्यासाठी देखील यातून प्रयत्न झाले ऍड उदयसिह पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणूकित आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे त्यांनाही जिल्हा बँकेसह सर्वच ठिकाणी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही  डॉ भोसले यांनी दिली

Tuesday, May 26, 2026

डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले...अविनाश मोहिते कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
मंगळवारी (दि 26 रोजी) डॉ इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलला होणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला...
दरम्यान...सुरेश भोसलेंच्या सहकार पॅनेललाच पाठिंबा का?... अविनाश मोहितेना पाठिंबा न देण्याचे कारण काय ?...असे पत्रकारांनी यावेळी विचारले असता... 
कारखाना चालवण्यासाठी  चांगले नेतृत्व असावे लागते,त्या नेतृत्वाची प्रवृत्ती, प्रकृती, तसेच त्याची कार्यक्षमता, अनुभव, प्रशासकावर नियंत्रण, आर्थिक शिस्त, कायद्याची समज, अशा क्षमता व असे गुण त्या नेतृत्वात असावे लागतात आणि हे गुण आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत नाहीत असे डॉ इंद्रजित मोहिते यावेळी म्हणाले.

एकूणच संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यामधील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे देखील डॉ इंद्रजित मोहिते यांनी यानिमित्ताने सांगितले...ते म्हणाले “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत राहणार आहोत, 

ते पुढे म्हणाले 
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंचाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. “संघर्षासाठी संघर्ष करून कारखाना कमकुवत करण्यापेक्षा, आम्ही सहकार पॅनेलला साथ देत आहोत,” असे सांगत डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आमचा हा पाठिंबा अटींसह देत आहोत. सभासदांचे हित डावलले गेले तर भविष्यात निवडणुकीच्या संघर्षात उतरू, कारखाना टिकवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हीच खरी जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले आर्थिक ताण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. अशा वेळी केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी संघर्ष करणे योग्य नाही,” असे सांगत संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यातील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले  “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत असेही त्यांनी स्पष्टपणे आज  सांगितले