भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही…
दरम्यान मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले.
त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.