Friday, June 26, 2026

कराडच्या प्रीतिसंगम बागेत...लोकांचा वावर कमी...गाढवांचा वावर जास्त झालाय...बागेतील कालपासूनची परिस्थीती !


वेध माझा ऑनलाईन।
काल पासून कराडच्या प्रीतिसंगम बागेत गाढवांचा वावर अचानक वाढलेला दिसला.हा वावर वाढल्याने शहरातील नागरिकांनी असचर्य व्यक्त करत बागेच्या व्यवस्थापनेबाबत चिंता व्यक्त केली आहे असे चालू राहिल्यास शहरातील लोकांसाठी ही बाग आहे की गाढवांसाठी?  असा प्रश्न यानिमित्ताने लोकांना पडला आहे

प्रीतिसंगम बाग हा शहराच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याठिकाणी स्व यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्याठिकाणी पावित्र्य राखणे जितके गरजेचे आहे तितकेच त्याठिकाणी चोख व्यवस्थापन असणे देखील  गरजेचे आहे 
दुपारपासून तेथे अनेकजण जेवणासाठी डबे घेऊन सहकुटुंब येत असतात... असे बऱ्यापैकी रोजचेच चित्र असते...सकाळी देखील लोकांची त्याठिकाणी फिरण्यासाठी गर्दी असते. ...संध्याकाळी तर पाय ठेवायला जागा उरत नाही इतकी त्याठिकाणी गर्दी होत असते...त्यामुळे त्याठिकाणचे व्यवस्थापन व्यवस्थित व चोख असणे गरजेचे आहे... जेणेकरून त्याठिकाणी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी वाटेल... पण तसे होताना दिसत नाही...

येथील प्रीतिसंगम बाग ,टाऊन हॉल, आणि स्व पी डी पाटील उद्यान या एकूण 3 ठिकाणचे व्यवस्थापन पालिकेकडून दिले गेले आहे...त्यापैकी प्रीतिसंगम बाग येथे काल अचानकपणे कळपाने गाढवं जमल्याचे दिसल्याने त्याठिकाणचे व्यवस्थापन ढिसाळ का असावे? अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
याविषयी विरोधी गट आपला आवाज उठवेल तेव्हा उठवू दे...पण...कराडकर नागरिक वेध माझा शी संपर्क करून या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि  याठिकाणचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत...

ही परिस्थिती यापुढे बदलली गेली पाहिजे जेणेकरून त्याठिकाणी असलेले ढिसाळ व्यवस्थापनाचे चित्र संपूर्ण शहरासमोर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे...कारण प्रीतिसंगम बाग शहराचे नाक आहे...अनेक परिसरातून त्याठिकाणी विविध सहली तसेच अभ्यास दौऱ्यासाठी अनेक लोक विविध भागातून येत त्याठिकाणी असतात...याचे भान प्रशासनाला असले पाहिजे... 
त्यामुळे  पालिका प्रशासन यापुढे अशा चुका येथे होऊ देणार नाही आणि बागेमधील माणसांचा वावर कमी...आणि गाढवांचा वावर जास्त...अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी लोकांना अपेक्षा आहे...

कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे अजूनही दुर्लक्ष; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : बातमी प्रसिद्ध होऊनही ना पाहणी, ना अहवाल; नागरिकांमध्ये वाढत चालली चिंता ; वेध माझा हा विषय लावून धरणारच;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु अनेक दिवस उलटूनही अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे वेध माझा ने हा विषय उचलून धरला आहे...कारण, प्रश्न नागरीकांच्या जीवाचा आहे...

नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसून येत असून काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. या प्रकारामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण वाढणे किंवा सांडपाण्याचे मिश्रण अशा विविध शक्यतांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत तपासणी अहवाल नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
विशेष म्हणजे, हा विषय सार्वजनिक चर्चेत आल्यानंतरही स्थानिक आमदार, खासदार किंवा इतर प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "नदीच्या आरोग्याचा प्रश्न हा राजकारणापलीकडचा आहे. या विषयावर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. तसेच नदीच्या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत स्पष्ट माहिती देण्याचीही मागणी होत आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित यंत्रणांची शांतता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होऊन या विषयावर ठोस भूमिका घेणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Thursday, June 25, 2026

कृष्णा’तील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन ; कृष्णा कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत अभूतपूर्व यश मिळविले. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मुंबईत विशेष अभिनंदन केले. 

कृष्णा कारखान्यातील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर आ.डॉ. अतुलबाबा भोसले पावसाळी अधिवेशनासाठी पुन्हा मुंबईत पोहचले. यावेळी विधान भवनातील दालनात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत कृष्णा कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्व सभासदांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तसेच सहकार क्षेत्रात कृष्णा कारखान्याने केलेली वाटचाल उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनीही आ.डॉ. अतुलबाबांचे अभिनंदन केले. तसेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनीदेखील आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची मूर्ती आणि मानाचे उपरणे देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, पंढरपूर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, निळोबाराय देवस्थानचे विश्वस्त अशोक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, June 24, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलची विजयाची हॅट्रिक ; १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय;

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्टाचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. या देदीप्यमान विजयामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले  यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कृष्णा कारखान्याच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या निकालात चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधी संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक यशानंतर कारखाना परिसरात कार्यकर्ते, सभासद आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, आज सकाळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या वर्षावात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, हा विजय कारखान्याच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासद आणि कार्यकर्त्यांचा आहे. येत्या काळात कृष्णा कारखान्याला आणखी प्रगतीपथावर नेऊन राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी नवनिर्वाचित संचालक बाबासो शिंदे, छबन कांबळे, संग्राम पाटील, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, बाळासो जगताप, माजी संचालक संजय पाटील, विलास भंडारे, दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, शिवाजीराव थोरात, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, धनाजी जाधव, रमेश मोहिते, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर यांच्यासह कराड, वाळवा व कडेगाव परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप,; अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली नसल्याची खंत ; तातडीच्या कारवाईची मागणी

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र या गंभीर प्रश्नावर अद्यापही स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. शेती, पिण्याचे पाणी, उद्योगधंदे आणि दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर या नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब मानली जात असतानाही प्रशासन आणिलोकप्रतिनिधींकडून अपेक्षित गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, नदीच्या रंगबदलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केलेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. "नदीचे आरोग्य धोक्यात आले तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होणार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसत असून, काही ठिकाणी पाण्याचा रंग पूर्णपणे निळसर-हिरवा झाल्याचे चित्र आहे. यामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ किंवा सांडपाण्याचे मिश्रण याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र अद्याप अधिकृत तपासणी अहवाल समोर आलेला नाही.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी केली आहे. तसेच तपासणी अहवाल सार्वजनिक करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही या विषयात लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

आता प्रशासनाची तपासणी, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि पुढील उपाययोजना याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून आपण लवकरच ही अडचण दूर करू... वेध माझा शी बोलताना दिले आश्वासन ; वेध माझाच्या बातमीची दखल ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक निळसर-हिरवा दिसू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यात झालेल्या या अनपेक्षित बदलामुळे प्रदूषणाची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान आमदार अतुलबाबांनी वेध माझा च्या या बातमीची दखल घेत... याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून ही अडचण दूर करू... असे वेध माझा शी बोलताना त्यांनी सांगितले आहे.

कृष्णा कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असता त्याठिकाणी गर्दी असूनही त्यांनी हा पाण्याचा विषय जाणून घेत स्वतःहून याविषयी लक्ष घालून संबंधित यंत्रणेशी बोलून ही अडचण लवकर दूर करू असे आश्वासन वेध माझा ला दिले

दरम्यान नदीच्या विविध घाटांवर आणि किनारी भागांमध्ये पाण्याचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा दिसतोय काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थरही दिसून येत असल्याने जलचरांवर तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान "कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, पाण्यातील शैवालांची वाढ, औद्योगिक किंवा सांडपाण्याचे मिश्रण, तसेच पाण्याच्या गुणवत्तेतील बदल यांसारख्या कारणांमुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलू शकतो. 
मात्र याबाबत अधिकृत तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.
दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागाने त्वरित पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी व अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्यामागील कारण काय, याबाबत आता प्रशासनाच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासणी अहवालानंतरच या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचे संभाव्य परिणाम स्पष्ट होणार आहेत.


विधानपरिषद निवडणुकीत जरी धैर्यशील कदमांचा विजय, तरी अभयसिंह जगतापांनी वाढवली राजकीय उत्सुकता ; धैर्यशील कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मते! महायुतीत चिंतन होणार का? ;

वेध माझा ऑनलाईन।
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला, तरी निकालाने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. संख्याबळाच्या तुलनेत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याने महायुतीची सुमारे १०० मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीपूर्वी उपलब्ध असलेल्या पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपकडे ३२५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६ अशी महायुतीची एकूण ६४६ मते होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२०, काँग्रेस ७४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १ असे मिळून महाविकास आघाडीकडे १९५ मते होती.
याशिवाय स्थानिक आघाड्या आणि अपक्षांची ५४ मते होती. यापैकी बहुतांश मते महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला सहज विजय मिळेल, असा अंदाज होता.

निकालात मात्र वेगळे चित्र दिसून आले. अभयसिंह जगताप यांना मिळालेली २९२ मते ही महाविकास आघाडीच्या मूळ संख्याबळापेक्षा लक्षणीय अधिक आहेत. त्यामुळे महायुतीतील काही सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाजे ९० ते १०० मते महायुतीतून फुटल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
धैर्यशील कदम यांचा विजय झाला असला तरी अपेक्षित मतांपेक्षा कमी मते मिळाल्याने महायुतीसमोर अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि मतदारांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे पराभव होऊनही अभयसिंह जगताप यांनी मिळवलेली अतिरिक्त मते महायुतीला विचार करायला लावणारी आहेत.

हा निकाल केवळ जय-पराभवाचा नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचा संकेत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाची ठरतील, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.