Wednesday, March 11, 2026

कराड शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार, मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगराध्यक्ष यादव यांच्या पाठपुराव्याने शहराच्या वाढीव भागासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेंतर्गत १०.५ एमएलडी क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटरच्या पाणी टाकीच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, जयवंत पाटील, पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, नगरसेवक जयंत पाटील, प्रवीण पवार, सुहास जगताप, सुप्रिया खराडे, योगिता जगताप आदी उपस्थित होते.

शहरात भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याचे सांगत नगराध्यक्ष यादव म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भविष्यातील सुमारे तीन लाख लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून हद्दवाढ भागात ११ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी आणि मलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे दरडोई १४० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. वारुंजी जॅकवेल येथे चार मोटर बसविण्यात येणार आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. अतिरिक्त वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याची बचत होणार आहे. सौरऊर्जेमुळे सुमारे साडेचार कोटी रुपयांची आर्थिक बचत होणार आहे. बाहेरचे नागरिकही शहरातील पाणी पिण्यास येतील. मलप्रक्रिया केंद्र आणि ११ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची योजना २०२३ मध्येच तयार केली होती. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाण्याच्या टाक्यांचेही पुनर्बाधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील ४० वर्षे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहील. शुद्धीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.

माजी मंत्री पाटील म्हणाले, "शहराला कृष्णा आणि कोयना नद्यांचे पाणी उपलब्ध असल्याने शहरवासीय नशिबवान आहेत. नागरीकरण वेगाने वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे."

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर म्हणाले, "उपलब्ध निधीतून शहरातील आवश्यक ठिकाणी ड्रेनेज पंपिंग स्टेशन उभारणे, नवीन यंत्रसामग्री बसविणे आदी कामे करण्यात येतील." नगरसेवक प्रवीण पवार यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया खराडे यांनी आभार मानले.

अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक घेऊन उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावणार ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीवर पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही ;

वेध माझा ऑनलाइन।
: उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विधानसभेत दिली.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, उंडाळे योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, केवळ २० टक्के खर्च शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. या योजनेअंतर्गत १८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.

यावर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागांची विशेष बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल व ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

यामुळे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत मंत्रालयात केव्हा बैठक होते, याकडे या भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. 


Tuesday, March 10, 2026

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार ; शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार ;

वेध माझा ऑनलाइन।
देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
 
२ हजार रुपयांचा हप्ता  ; 
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. या दिवशी देशभरातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाईल. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. अनेकांनी होळीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आता कृषी विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून होळीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात साठा करू नये यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. घरगुती गॅस उपलब्ध असला तरी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ESMA कायदा नेमका काय आहे? :

सरकारने लागू केलेला Essential Services Maintenance Act हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि इंधन यांसारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
या कायद्याअंतर्गत सरकारला काही आपत्कालीन अधिकार मिळतात. जर कोणत्याही कारणामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असेल तर सरकार थेट हस्तक्षेप करून आवश्यक आदेश जारी करू शकते. त्यामुळे गॅस, वीज किंवा वाहतूक यांसारख्या सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवता येतो.

.

संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा म्हणाले; .हे युद्ध केवळ नरेंद्र मोदीच थांबवू शकतात ;

वेध माझा ऑनलाइन।

गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.

हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”

Monday, March 9, 2026

राज्यात उन्हाचा कहर वाढतोय ; काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; .

वेध माझा ऑनलाइन
राज्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून काही भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढत असून नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट सांगितली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली. याशिवाय सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी या भागांमध्येही तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
हवामान खात्याने 10 मार्चसाठी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह अकोला, अमरावती आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ञांच्या मते, बिहारपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इराण अमेरिका युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता! ; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत ;

वेध माझा ऑनलाईन।
10 दिवसांपासून संपूर्ण जगाच्या जीवाला घोर लावलेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी तसे संकेत दिले आहेत. इराणविरुद्धचे युद्ध लवकरच संपेल. इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु झाल्यापासून इराणमधील 5000 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. आपल्याला काही लोकांना समूळ नष्ट करायचे होते म्हणून आपण हे लहानसे युद्ध केले. आपण या युद्धात अगोदरच अनेक प्रकारे जिंकलो आहोत. मात्र, आपण आवश्यक तितके जिंकलेलो नाही, असेही ट्रम्प  यांनी म्हटले
मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की युद्ध आता जवळजवळ संपले आहे. त्यांनी इराणला पुढील कोणत्याही गैरप्रकारांचा प्रयत्न करण्याविरुद्ध कडक इशाराही दिला. सोमवारी सीबीएस न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युद्ध आता जवळजवळ संपले आहे. दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला. ही संयुक्त लष्करी कारवाई हळूहळू एका मोठ्या संघर्षात रूपांतरित झाली, ज्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देश प्रादेशिक युद्धाच्या उंबरठ्यावर आले. सीबीएस न्यूजच्या पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की संघर्ष आता मोठ्या प्रमाणात संपला आहे.

पुढे बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. ते म्हणाले, "त्यांच्याकडे आता नौदल राहिलेले नाही. त्यांची संपर्क यंत्रणा गेली आहे आणि त्यांची हवाई दल जवळजवळ संपली आहे. त्यांची क्षेपणास्त्र प्रणाली कोलमडली आहे. त्यांचे ड्रोन सर्वत्र पाडले जात आहेत आणि त्यांचे ड्रोन बनवण्याचे कारखाने नष्ट झाले आहेत." ट्रम्प यांनी दावा केला की तेहरानकडे आता लष्करी ताकदीच्या बाबतीत जवळजवळ काहीही शिल्लक नाही. युद्ध सुरू झाले तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, इराणविरुद्ध अमेरिकेची कारवाई किमान चार ते पाच आठवडे चालेल. परंतु सोमवारी त्यांनी सांगितले की अमेरिका त्यांच्या दिलेल्या मुदतीपेक्षा खूप पुढे गेली आहे आणि संघर्ष लवकरच संपू शकतो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणलाही कडक इशारा दिला. त्यांनी म्हटले की इस्लामिक रिपब्लिकने कोणत्याही युक्त्या किंवा नवीन युक्त्या वापरून पाहू नयेत. ट्रम्प म्हणाले, "त्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व वापरले आहे. आता, जर त्यांनी कोणत्याही युक्त्या वापरून पाहिल्या तर त्या देशाचा अंत होईल. जर त्यांनी काही चुकीचे केले तर इराण संपेल आणि त्याचे नाव पुन्हा कधीही ऐकू येणार नाही."
ट्रम्प यांनी असेही म्हटले की होर्मुझची सामुद्रधुनी आता उघडी आहे आणि जहाजे त्यातून जात आहेत. त्यांनी असा दावा केला की अमेरिका या महत्त्वाच्या सागरी मार्गाचा ताबा घेण्याचा विचार करत आहे.