Saturday, August 29, 2026

नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारले ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ ;

वेध माझा ऑनलाईन।
भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण कराड येथील रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी यंदा आगळ्यावेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. कराड नगरपरिषदेचे नगरसेवक व भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनी एकमेकींना औक्षण करून राख्या बांधल्या आणि सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

रक्षाबंधन म्हटले की बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, अशी आपली पारंपरिक भावना आहे. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक कुटुंबांतील सदस्य नोकरी, व्यवसाय, शिक्षण अथवा अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या शहरांत किंवा परदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहीण प्रत्यक्ष भेटू शकतीलच असे नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही परिस्थिती अधिक जाणवते.
याच भावनेतून रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक स्नेहाचा नवा अर्थ देण्याचा प्रयत्न रामकृष्ण गीता मंडळाच्या महिलांनी केला. ‘आपणच एकमेकींच्या बहिणी आणि एकमेकींच्या आधारस्तंभ’ अशी भावना व्यक्त करत ज्येष्ठ महिलांनी एकमेकींना राखी बांधली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. एकमेकींना शुभेच्छा देत आनंद, समाधान आणि आपुलकीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
नात्यांच्या पलीकडे जपला माणुसकीचा धागा
रक्षाबंधनाचा धागा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता मैत्री, स्नेह, आपुलकी आणि परस्पर सहकार्याशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ज्येष्ठावस्थेत एकटेपणा जाणवू नये, महिलांना एकमेकांचा भावनिक आधार मिळावा आणि सामाजिक जीवनातील त्यांचा सहभाग कायम राहावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
 रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारलेले हे ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ कराडकरांसाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Friday, August 28, 2026

आता दूध महागणार...!;


वेध माझा ऑनलाइन
मुंबईत 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 9 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार आहे. जनावरांच्या वाढत्या किमती आणि पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. यामुळे दुग्ध उत्पादक संघाला दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे संघाने स्पष्ट केले आहे.

सध्या मुंबईत दुधाचा घाऊक दर प्रति लिटर 93 रुपये आहे. 1 सप्टेंबरपासून ही वाढ लागू झाल्यानंतर, तो 102 रुपये प्रति लिटर इतका होईल. ही दरवाढ 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होऊन 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत वैध राहील. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागतील, हे निश्चित आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आशियाई पदकविजेत्या श्रीशा जाधवचे कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन।
आशियाई स्तरावर कांस्यपदक पटकावत कराड, सातारा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारी कु. श्रीशा सागर जाधव ही राज्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या श्रीशाने आपल्या कुटुंबीयांसह आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्यासमवेत कराड येथील निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीशाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडसारख्या शहरातील एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा नसतानाही श्रीशाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा खेळाडूंना शासन, क्रीडा संस्था आणि समाजाने अधिकाधिक पाठबळ देण्याची गरज आहे. भविष्यात श्रीशा आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा उंचावेल, असा मला विश्वास आहे.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात केलेल्या श्रीशाने कराड येथील योगेश स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. रोलर स्केटिंग आणि रोलबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर तिची वाटचाल आईस स्केटिंगकडे वळली. महाराष्ट्रात या खेळासाठी आवश्यक सुविधा नसतानाही तिने देहरादून येथे प्रशिक्षण घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

श्रीशाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. नियमित सरावाचे मैदान बंद झाल्यानंतर तिने कराडमधील डांबरी रस्त्यांवर सराव सुरू ठेवला. कब्रस्तान परिसरातील रस्ता आणि वॉटर हाऊस परिसरातील रस्त्यांवर दररोज तासन्तास सराव करत तिने आपली तयारी कायम ठेवली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले आणि त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले.

१७ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत ११ वर्षांखालील ३३३ मीटर गटात कांस्यपदक पटकावत श्रीशाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या यशामागे आई कल्याणी जाधव, वडील सागर जाधव, आजी अरुणाताई जाधव यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
डांबरी रस्त्यावरच्या सरावातून आशियाई पदकापर्यंत पोहोचलेली श्रीशा जाधव आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.

Wednesday, August 26, 2026

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंसाठी मोठा झटका ; मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई ; राज्याच्या गृह विभागाचे तातडीचे आदेश :

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसला आहे. राज्याच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदानातही एका दिवसाच्यावर आंदोलन करता येणार नाही. तसेच आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. त्यामुळे जरांगे आणि हाकेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनाबाबतचे आदेश काढले आहेत. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल. त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार! तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; त्यामध्ये 105 भारतीयांचा समावेश ; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त ;

वेध माझा ऑनलाइन।
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणांतच रौद्र रूप धारण करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत.

105 भारतीयांसह 400 लोक बेपत्ता
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 31 तीर्थयात्रींचा समावेश असून ते मानसरोवर यात्रेसाठी जात होते. ही माहिती नेपाळ टुरिझम बोर्डाने दिली आहे. बोर्डाकडून बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार, पुरात एकूण सुमारे 400 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 291 परदेशी पर्यटक आहेत, तर 90 हून अधिक पर्यटक नेपाळचे नागरिक आहेत. नेपाळ न्यूजच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण भारतीय वंशाचे एनआरआय आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे.

Tuesday, August 25, 2026

मलकापूर रस्ता : भूसंपादनाआधीच टेंडर; उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या भूमिकेवर जागेचे मिळकतदार वसीम सय्यद यांचे प्रश्नचिन्ह ; न्यायिक लढा देण्याचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर नगरपरिषद हद्दीतील वाखानवस्ती ते कराड-ढेबेवाडी रस्ता (एमडीआर-५५, किमी ७/२०० ते ८/०००) या प्रस्तावित रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असताना संबंधित जमिनींचे भूसंपादन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे ७ कोटी ८२ लाख ८४ हजार ७७८ रुपयांच्या या कामासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. मात्र, बाधित शेतकरी व मिळकतधारकांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असताना प्रक्रिया पुढे नेण्याऐवजी प्रथम संबंधित जमिनींचे मालकी हक्क व कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले...
मलकापूर रस्त्याच्या प्रस्ताव व प्रक्रियेबाबत २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास चार वर्षे उलटूनही या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचेही सय्यद यांनी सांगितले. 
दरम्यान, मलकापूरचे तत्कालीन व विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ठराविक मिळकतधारकांसोबत बैठका घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी मलकापूर नगरपरिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या बैठकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भूसंपादन व मिळकतधारकांच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटल्यानंतरही एकही बैठक झाली नसल्याचे सय्यद यांनी नमूद केले.
या प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर रस्ता, भूसंपादन, जमिनींचे मालकी हक्क, ट्रस्टची भूमिका तसेच बाधित शेतकरी व मिळकतधारकांच्या अडचणी याबाबत माहिती देण्यात आल्याचेही सय्यद यांनी सांगितले.
गट क्रमांक २७६ वरून वाद
मलकापूर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या गट क्रमांक २७६ मधील जमिनीच्या मोबदल्यावरूनही वाद असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये १७०/२०२२ क्रमांकाने जुम्मा मस्जिद (मनोरे) ट्रस्ट, कराड यांनी भूसंपादनातून मिळणारा मोबदला ट्रस्टला मिळावा, असा दावा दाखल केल्याचे नमूद करण्यात आले.
याच काळात वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन गट क्रमांक २७६ ही संपूर्ण मिळकत वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा केला आणि भूसंपादनाचा मोबदला वक्फ बोर्डाकडे जमा करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
संबंधित मिळकत सुमारे १७ ते १८ एकर असून ती देवस्थान इनाम वर्ग-३ची आहे. ही जमीन सेवेकरी यांना मुलाणकी म्हणून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे जुन्या महसूल नोंदी, मालकी हक्क आणि त्यानंतर झालेले जमीन व्यवहार यांची अधिकृत अभिलेखांच्या आधारे सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्न
मलकापूर रस्त्याच्या कामाच्या संपूर्ण प्रक्रियेशी नगरपरिषदेचा थेट संबंध नसल्याचे मुख्याधिकारी जितेंद्र जगताप यांनी सांगितल्याचा दावा सय्यद यांनी केला. मात्र, रस्ता नगरपरिषद हद्दीतून जात असल्याने नगरपरिषद संबंधित प्रक्रियेत उपस्थित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याकडून संबंधित व्यक्तींसोबत बैठका घेतल्या जात असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपल्यानंतरही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ट्रस्टच्या काही व्यक्तींमध्ये बैठक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकृत बैठक संपल्यानंतर अशा बैठका कशासाठी झाल्या, त्यामध्ये कोणती चर्चा झाली, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

जुन्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी
१९२० पासून विविध व्यवहार झाल्याने सध्याच्या मालकी हक्काचा गुंता निर्माण झाल्याचे वसीम सय्यद यांनी सांगितले. पूर्वीच्या हक्कदारांनी केलेल्या जमीन विक्री व्यवहारांसह त्यानंतर झालेल्या हस्तांतरणांची महसूल अभिलेखांच्या आधारे तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२८ डिसेंबर २०१७ रोजी मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या करारात जुम्मा मशीद ट्रस्टने संबंधित जमिनीचे बागायती पीक घेत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. त्याच ट्रस्टने २०१९ मध्ये वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दावा दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले.
गट क्रमांक २७६, वक्फ बोर्ड व ट्रिब्युनलमधील प्रकरणे तसेच संबंधित विश्वस्तांची कायदेशीर पात्रता यांची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘आपले सरकार’वर तक्रार
सातारा जिल्हा वक्फ अधिकारी म्हणून काम पाहणारे इम्रान अस्लम मुलाणी यांच्या नियुक्तीच्या अधिकृततेबाबत ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केल्याचे सय्यद यांनी सांगितले. या तक्रारीवर आवश्यक कार्यवाहीसाठी वक्फ बोर्डाला आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यानंतर नेमकी काय कार्यवाही झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा त्यांनी केला.
वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रश्न सोडविण्याऐवजी कार्यपद्धतीमुळे अनेक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचा आरोप त्यांनी केला.असेही वसीम सय्यद म्हणाले...

विकासाला विरोध नाही’
मलकापूर रस्त्याच्या कामाला विरोध नाही. मात्र, शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा आणि कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रथम मालकी हक्क व भूसंपादनाची कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी. बाधितांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि कायदेशीर मालक निश्चित करून नियमानुसार त्यांनाच मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“रस्ता झाला पाहिजे; विकासकामाला विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकाच्या मालकी हक्कावर गदा येता कामा नये. संबंधित कागदपत्रांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय पुढील भूसंपादन व रस्त्याचे काम सुरू करू नये. विकास हवा; मात्र हक्क अबाधित ठेवूनच,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वसीम सय्यद यांनी मांडली.
या प्रकरणात मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या कराराची कायदेशीरता, संबंधित ट्रस्टची अधिकृतता, वक्फ बोर्डाचे दावे, गट क्रमांक २७६ची मालकी तसेच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची भूमिका या सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन मार्गाने लढा देणार असल्याचेही वसीम सय्यद यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या मनातला "आपला माणूस' ; सतीश भोंगाळे ; सतीश भोंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणारे सतीश भोंगाळे यांनी पद नसतानाही जनसेवेची आपली वाटचाल कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची "आपला माणूस' म्हणून ओळख  निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लोकशाही आघाडीच्या माध्यमातून, विशेषतः मार्केट यार्ड परिसरातील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भोंगाळे सातत्याने उपलब्ध राहिले आहेत. 
परिसरातील नागरी समस्या, छोट्या-मोठ्या विकासकामांचे प्रश्न किंवा एखाद्या नागरिकाची वैयक्तिक अडचण असो, त्यासाठी ते संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात.
नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांच्या प्रश्नांसाठी पद नसतानाही उपलब्ध राहणाऱ्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्र ओळख निर्माण होते. सतीश भोंगाळे हे त्याचे उदाहरण ठरत आहेत. नगरसेवक पदावर नसतानाही नागरिक स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडतात, ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती मानली जात आहे.
गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, निवडणुकीतील पराभवाने भोंगाळे यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झालेली नाही. पद गेले, मात्र जनसेवेची भावना कायम राहिली, अशीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
दरम्यान, सतीश भोंगाळे यांची मित्रपरिवारातही स्वतंत्र ओळख आहे अनेक मित्रांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि चित्रपटांविषयीची आवड या माध्यमातून या मित्रपरिवाराची वीण अधिक घट्ट झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंध जपत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून सतीश भोंगाळे यांची आपला माणूस ओळख निर्माण झाली आहे. 
निवडणुकीचा निकाल बदलला, पण नागरिकांशी असलेले नाते बदलले नाही, हे त्यांच्या आजवरच्या कार्यातून अधोरेखित होते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.