Saturday, August 22, 2026

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी ; माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि वीरपत्नी विनिता कामटे यांचा ग्रामस्थांकडून गौरव

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक, ता. २२ : राजकीय क्षेत्रात, न्यायव्यवस्थेत आणि साहित्य क्षेत्रात आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा आज ग्रामस्थांनी भव्य नागरी सत्कार केला. या हृद्य सत्काराने रेठरे बुद्रुकच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका वीरपत्नी विनिता अशोक कामटे या तिघी बहिणी भारावून गेल्या. 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भावपूर्ण सोहळा पार पडला. फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा गौरव करण्यात आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त ॲड. चव्हाण यांच्यासह त्यांच्या भगिनी रेवती मोहिते-डेरे आणि विनिता कामटे आज कराड येथे आल्या होत्या. यानिमित्ताने रेठरे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 

या सत्काराला उत्तर देताना बालपणींच्या आठवणींना उजाळा देत ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, आमच्या मूळ गावात होत असलेला हा सत्कार आमच्यासाठी खूप विशेष आहे. रेठरे बुद्रुकला मोठी नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. अनेक थोर व्यक्ती या गावाला लाभल्या आणि त्यांनी गावाची ओळख देशभर निर्माण केली. आम्ही तिघी बहिणी अनेक वर्षांनी एकत्र गावी आलो. आज गावकऱ्यांनी दिलेला प्रेमाचा ओलावा अनुभवला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे वारंवार गावाला यावे लागेल. आम्ही पुण्यात वाढलो, तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो.

आजचा सत्कार हा केवळ आम्हा तिघींचा सत्कार नाही. तर ज्या पालकांनी आपल्या मुलींना स्वप्ने पाहायला शिकवले आणि ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी बळ दिले, त्या सर्व पालकांचा हा सत्कार आहे. आमच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळेच आम्ही या उंचीवर पोहचू शकलो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरातील मुलींना आणि महिलांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात या तिन्ही कर्तृत्वान भगिनींच्या कार्याचा विशेष गौरव करत, त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित घेण्यात आला आहे. मुली शिक्षणात पुढे जात असून, नवीन पिढीला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला प्रगत गाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा देशात आदर्श निर्माण करणे, हा आमचा संकल्प आहे. 

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तिन्ही बहिणींच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना, राजकारण, न्यायव्यवस्था, लेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला असून, चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षणामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. 

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



लहानपणीच्या आठवणींना उजाळा

रेठरे बुद्रुकमधील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, लहानपणी आम्ही चुलत भावंडांसोबत शेतात जायचो. शेजाऱ्यांकडे पोहे खायचो. आमचे वडील आम्हाला मंदिर आणि नदीजवळ घेऊन यायचे. आम्ही या निसर्गाचा आनंद लुटायचो. आमचे वडील या नदीत पोहले आहेत. ज्या नदीचा आम्ही लहानपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट बांधण्याचे भाग्य मला लाभले, याचा विशेष अभिमान आहे.


केस गावातील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील कैसे गावातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला असून, कारवाईसाठी आवश्यक साहित्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.

अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागा, रस्ते व नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने “अतिक्रमणावर कारवाई नेमकी कधी होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कारवाई रखडली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

जिल्हा बँकेवरून महायुतीत ठिणगी; सामंतांचा गोरे यांना प्रतिइशारा‘आम्ही तुम्हाला का चालत नाही, हे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजेंना विचारू’; साताऱ्यातील भाजप-शिवसेना वादावर सामंजस्याचा सल्ला ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सहकारी बरोबर आले तर विचार करू‘ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवू,’ असे सांगत ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कराडमध्येच त्याला जोरदार प्रतिइशारा दिला.
“आम्ही जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारू की, आम्ही तुम्हाला का चालत नाही? महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र नाही जमलं, तर आम्हीही काय गप्प बसणार आहोत का?” असा सवाल करत सामंत यांनी गोरे यांच्या भूमिकेला थेट प्रत्युत्तर दिले.

कराड येथील हॉटेल विट्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप-सेना वाद बाजूला ठेवा; अन्यथा विकासाला फटका
सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावरही सामंत यांनी भाष्य केले. “सातारा जिल्ह्यातील भाजप-सेना वादाचे राजकारण बाजूला ठेवले, तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगत, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सामंत यांनी नमूद केले.

धनुष्यबाणाच्या निकालाबाबत सामंत १०० टक्के आशावादी
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावर बोलताना सामंत यांनी बाहेर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर जोरदार टोला लगावला.“सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना बाहेर वेगवेगळे दावे आणि चर्चा सुरू आहेत. अ‍ॅक्टमध्ये काय आहे, याची मला माहिती आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू असल्याने त्यातील कायदेशीर बाबींवर मी बाहेर भाष्य करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी बाहेरून या प्रकरणावर सातत्याने भाष्य करणाऱ्यांवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. “जे बाहेर बोलतात, ते कदाचित सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल असा खोचक टोला सामंत यांनी लगावला.
धनुष्यबाणाच्या निकालाबाबत आपण १०० टक्के आशावादी असल्याचे सांगत सामंत म्हणाले, “आम्ही काही वावगं केलेलं नाही. आम्ही कोणाचा पक्ष बळकावलेला नाही. आम्ही ज्या पक्षात होतो, त्याच पक्षात असताना झालेल्या घडामोडींची संपूर्ण भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.”

जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे-पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उद्या चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण हाके हेही आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“दोन समाजांमध्ये कोणत्याही प्रकारची जातीय भिन्नता किंवा तेढ निर्माण होऊ नये, ही सरकारमधील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सामंत यांनी सांगितले.

एकूणच, 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणातील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. ‘महायुती म्हणून लढण्याची इच्छा; पण नाही जमले तर आम्हीही गप्प बसणार नाही,’ या सामंतांच्या वक्तव्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Friday, August 21, 2026

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांचे कराडात स्वागत ; यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखेंनी केले स्वागत ; लोकशाही आघाडीतर्फे त्यांचे अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाईन।
 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी कराड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कराड शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरातील पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या वतीनेही विशाल वाकडकर यांचे स्वागत करून प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, विशाल वाकडकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत नतमस्तक होऊन अभिवादन केले. त्यानंतर आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची मोठी संघटनात्मक फळी उभी राहील. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळून पक्ष संघटना अधिक मजबूत आणि गतिमान होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र प्रदेश शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते कराड शहरात त्यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कराड शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी केले

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरच्या पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. 

दरम्यान कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन ते त्याठिकाणी नतमस्तक झाले त्यानंतर आदरणीय स्व पि डी पाटीलसाहेबांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांची मोठी फळी उभी राहून पक्ष संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळेल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या...

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

"राजमाता जिजाऊ’ या नावाने पाच बसेसचा लोकार्पण सोहळा कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पडला पार ; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून बसेस प्रवाश्यांच्या सेवेत दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कराड आगाराच्या ताफ्यात नव्या पाच आरामदायी बसेस दाखल झाल्या आहेत. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविण्यात आलेल्या या पाचही बसेसचा लोकार्पण सोहळा आज कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून व विधिवत पूजन करून या बसेस प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या.

कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्यामुळे आगाराच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. विशेषतः कराड शहरासह तालुक्यातील तसेच विविध मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यास मदत होणार असून, जुन्या बसेसवरील वाहतुकीचा ताणही काही प्रमाणात कमी होण्यास हातभार लागणार आहे.
नव्या बसेस आगारात दाखल होताच त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविलेल्या या बसेसने आगार परिसराचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे विधिवत पूजन करून प्रवासी सेवेसाठी त्या रवाना करण्यात आल्या.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असून, प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेसची भर पडल्याने या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

या लोकार्पण सोहळ्यास कराड नगरपरिषदेचे नगरसेवक जयवंतराव पाटील, गणेश पवार, आशुतोष डुबल, शिवाजी पवार अतुल शिंदे,  शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने... यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कराड आगाराचे आगारप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नव्या बसेस नियमित प्रवासी सेवेत दाखल झाल्याने कराड आगारातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. नव्या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, आगाराच्या ताफ्यात आधुनिक व आरामदायी बसेसची भर पडल्याने प्रवाशांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Thursday, August 20, 2026

कराडचे भाजपचे नगरसेवक धावून आले नागरीकांच्या सुरक्षेसाठी ; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ;कराड पालिकेला दिले निवेदन :

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कराड नगरपरिषदेतील गटनेते विजय वाटेगावकर व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देत भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण तसेच आक्रमक स्वभावाच्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये भटक्या व आक्रमक श्वानांचा वावर वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या हल्ल्याच्या तसेच नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने नगरपरिषदेने या विषयावर तातडीने प्रभावी व शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कराड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्याबाबत विषय मंजूर झालेला आहे. तसेच भटक्या श्वानांच्या नियंत्रणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.
शहरातील सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने अंतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. लसीकरण व निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटण्यासाठी आवश्यक मार्किंग करून त्याची प्रभागनिहाय नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे आक्रमक व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद तयार करून, अशा श्वानांबाबत लागू नियम व न्यायालयीन निर्देशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा अधिकृत संस्थेची नियुक्ती करावी. त्याचबरोबर अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी, निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
भटक्या व आक्रमक श्वानांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी व कार्यवाही प्रणाली निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची आणि न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी या विषयावर विलंब न करता कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर व भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.