Tuesday, July 28, 2026

कराड पालिकेची सभा वादळी; नेकलेस रोड, बागेसह रस्ता रुंदीवरून खडाजंगी ; प्रेक्षक गॅलरी खुली करण्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक; ‘फालतू’ शब्दावरून सभागृहात शाब्दिक चकमक, साडेसहा कोटींचा नेकलेस रोड व १.२० कोटींच्या बागेचा विषय तहकूब ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांवरून मंगळवारी झालेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सोमवार पेठेतील रस्त्याची रुंदी कमी करण्यापासून ते साडेसहा कोटी रुपयांच्या नेकलेस रोड प्रकल्पापर्यंत विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आल्याने भाजप नगरसेवकांनी ती नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा पार पडली. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच सोमवार पेठेतील रस्त्याची रुंदी कमी करण्याचा विषय भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी मांडला. प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीमुळे काही नागरिकांची घरे बाधित होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांची घरे वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्ष यादव यांनी संबंधित रस्त्यांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, सभेची प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. कराडच्या नागरिकांना सभा पाहण्यासाठी गॅलरी खुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी नगरसेवकांनी बराच वेळ आग्रह धरला.

‘फालतू’ शब्दावरून सभागृहात गोंधळ
एका विषयावर चर्चा करताना नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी ‘फालतू’ हा शब्द वापरल्याने भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ‘शब्द मागे घ्या,’ अशी मागणी करत भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ जोरदार वादावादी झाली.
यावेळी शिस्त न पाळल्यास निलंबन करण्याचा इशारा नगराध्यक्ष यादव यांनी दिला

नेकलेस रोडवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो साडेसहा कोटी रुपयांच्या नेकलेस रोड प्रकल्पाचा. या प्रकल्पाला विरोध करण्यामागचे कारण काय, असा सवाल भाजप नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला केला. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी, ‘आमदार अतुलबाबा भोसले यांनी आणलेली विकासकामे तुम्हाला करायची नाहीत का?’ असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून खुलासा मागितला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
नेकलेस रोड व पर्यटन विकास प्रकल्पाबाबत अधिकृत शासकीय विभागाकडून अद्याप स्पष्टता झालेली नसल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले. पालिकेने वारंवार मागणी करूनही संबंधित प्रकल्पाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा विषय सध्या तहकूब करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर वाटेगावकर यांनी, ‘आमदारांनी दिलेले प्रकल्प आणि निधी वापरायचाच नाही, असे काही ठरले आहे का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावरून पुन्हा दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद रंगला.
नगराध्यक्ष यादव यांनी हस्तक्षेप करत हा साडेसहा कोटी रुपयांचा प्रकल्प असून संवेदनशील विषय असल्याने सध्या तो तहकूब करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी प्रकल्पाला आपली मंजुरी असल्याचे सांगितले. मात्र सत्ताधारी गटाने विषय तहकूब केला.

१.२० कोटींच्या बागेचा विषयही तहकूब
मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्चून बाग विकसित करण्याच्या प्रस्तावावरही सभेत चर्चा झाली. भाजप नगरसेवकांनी बाग विकसित करण्यास कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट करत विषयाला समर्थन दिले.
मात्र, संबंधित जागेवर भविष्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, अशी भूमिका सत्ताधारी गटाने मांडली. त्यामुळे या विषयावर अधिक विचारविनिमय करण्यासाठी तो तहकूब करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण स्मृती सदनासाठी साडेतीन कोटी
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदनातील सुधारणा कामाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. या कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
दरम्यान, पालिकेच्या प्रशासकीय कालावधीत झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते तसेच अन्य विकासकामांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सभेत स्पष्ट करण्यात आले.

प्रभागनिहाय सीसीटीव्ही आणि 
‘नो फ्लेक्स झोन’
सभेच्या शेवटी शहरातील विविध प्रभागांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत तसेच शहरातील ‘नो फ्लेक्स झोन’ निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. लवकरच प्रभागनिहाय सीसीटीव्ही व्यवस्था आणि शहरातील नो फ्लेक्स झोनची ठिकाणे जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कराड पालिकेची जनरल मिटिंग ठरली वादळी ; नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी एका विषयावर बोलताना "फालतू' असा शब्द वापरल्याने... भाजप नगरसेवक झाले आक्रमक ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील महत्वाच्या असलेल्या विषयांवर मंगळवारी घेण्यात आलेली नगरपालिकेची मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. विविध विषयांवरील चर्चा व त्यावरून झालेली वादावादी सध्या शहरात चर्चेत असतानाच सोमवार पेठेमध्ये रस्ता कमी करण्यावरून यावेळी सुरुवातीलाच जोरदार चर्चा झाली भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी तो विषय मांडला. त्यावेळी लोकांची घरे त्या रस्त्यात जात आहेत. त्यामुळे ती घरे जाऊ नये यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षांनी या रस्त्यांचा अभ्यास करून अधिकार्‍यांनी अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान यावेळी प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते...कराडच्या नागरिकांना ही गॅलरी खुली करून द्या अशी मागणी करत बराचवेळ याठिकाणी या नगरसेवकांनी आग्रह धरून ठेवला होता...
याचदरम्यान नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी एका विषयावर बोलताना फालतू असा शब्द वापरला त्यामुळे सभागृहात भाजप नगरसेवकांनी त्यांना शब्द मागे घ्या अस म्हणत त्याठिकाणी मोठी वादावादी झालेली पहायला मिळाली 
सदर सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. 
दरम्यान यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नेकलेस रोडला विरोध होण्यामागचे कारण विचारत सत्ताधार्‍यांवर आरोप केले. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी अतुलबाबा यांची आणलेली कामे तुम्हाला करायची नाहीत का... असा सवाल सत्ताधार्यांना विचारत याबाबतचा खुलासा विचारला असता... त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली... नेकलेस रस्ता आणि पर्यटन विकास काय होणार... याबाबत कोणताही खुलासा अधिकृत शासकीय विभागाकडून झालेला नाही. पालिकेने वारंवार मागणी करूनही त्याचे प्रेझेंटेशन दिले नसल्यामुळे हा ठराव तहकूब करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले. 

विरोधी पक्ष नेते वाटेगावकर यांनी आमदारांनी दिलेले प्रकल्प व निधी वापरायचेच नाही असं काही ठरलं आहे का? असा प्रति प्रश्न केल्यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार चकमक उडाली
नगराध्यक्ष यादव यांनी त्यात तोडगा काढत हा साडेसहा कोटींचा प्रकल्प आहे. हा संवेदनशील विषय असल्यामुळे आपण तो सध्या तहकूब करत आहोत असे सांगितले. यावर भाजपच्या नगरसेवकांनी याला आमची मंजुरी आहे असे स्पष्ट केले. सत्ताधारी गटाकडुन विषय तहकूब करण्यात आला. 

मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर एक कोटी वीस लाखांची बाग विकसित करण्याचा विषयही या सभेत तहकूब करण्यात आला. त्यावरही भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत बाग होण्यास काही हरकत नाही अशी भूमिका घेतली. त्यावर सत्ताधारी गटात बागेला विरोध नाही मात्र तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करायचे आहे त्यातून नगरपालिकेला उत्पन्नाचा सोर्स चालू होईल त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात येत आहे अशी भूमिका मांडली. 

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये सुधारणा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाल्याची घोषणा केली. दरम्यान प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते आणि अन्य कामाची चौकशी होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. 
तसेच सभेच्या शेवटी शहरातील प्रभाग निहाय बसवण्यात येणारे सीसीटीव्ही तसेच शहरातील नो फ्लेक्स झोन एरिया लवकरच
जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

४१ वर्षे रखडलेला खोडशी बंधाऱ्याच्या कामाचा प्रश्न अतुलबाबांनी मार्गी लावला ; २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी खोडशी (ता. कराड) येथे कृष्णा नदीवर असलेल्या नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित बांधकामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  तसेच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी रविवारी (ता. २६) कराड दौऱ्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे तब्बल ४१ वर्षे रखडलेला खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामाचा प्रश्न आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यामुळे मार्गी लागला आहे. 

खोडशी (ता. कराड) गावाजवळ कृष्णा नदीवर ब्रिटीश कालखंडात सन १८६७ मध्ये जुन्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठा जलसाठा होऊन, या ठिकाणापासून निघणाऱ्या ६४ कि.मी. लांबीच्या कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील सुमारे ८,९७२ हेक्टर एवढे शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. कृष्णा कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. पण जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्यामुळे १९८५ च्या सुमारास याच नदीपात्रात एका नवीन गेटेड बंधाऱ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. ४१ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटून देखील हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच असून, या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. या निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही मागणी केली होती. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न त्यांनी विधीमंडळात उपस्थित केला होता. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी वेळोवेळी मांडलेल्या या प्रश्नाची गंभीर दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. २७) थेट कराड दौऱ्यावर येत खोडशी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी आ.डॉ. अतुलबाबांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करत, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होऊन, त्याचा लाभ कराडसह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात उठविला होता आवाज!
कृष्णा कालव्याद्वारे कराडसह, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने, खोडशी बंधाऱ्यांचे विशेष महत्व आहे. पण गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या बंधाऱ्याच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला होता. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी हा निधी मंजूर झाला आहे.

सिंचनासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २.६४ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लवकरच या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबविला गेल्यास भविष्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे. 
आ डॉ. अतुलबाबा भोसले .


Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच सोमन वांगचुक यांचं मोठं विधान, काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल दाखवला आहे.

सोनम वांगचुक एक्सवर लिहिले की, ‘
हा लोकशाहीचा विजय आहे. हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचाही विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो.’

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका सीजेपीची होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीने सांगितलं होतं. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे, अस मानले जात होते. परंतु सीजेपीने आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरील उपस्थित हजारो तरुण आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सीजेपीच्या पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असे म्हटले जात होते. परंतु तरुणांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावे लागले. आपण करून दाखवले, असे म्हणत सीजेपीच्या आंदोलनला यश मिळाले, असे दीपके म्हणाले.

तसेच, आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहित धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, असंही ते म्हणाले.  ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, आता दीपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

Friday, July 24, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा ;

वेध माझा ऑनलाईन।
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे.

कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांची यंदाच्या मानाच्या वारकऱ्यांमध्ये निवड करण्यात आली होती. या मानामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची अभूतपूर्व आणि विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून सुरक्षेसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.