Saturday, September 5, 2026

आयजींच्या वाहनाची नंबरप्लेट चर्चेत ; आय. जी. म्हणाले... करून घेतो... ; गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर कराडातील शांतता समितीच्या बैठकीसाठी आलेल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी रंजनकुमार शर्मा यांच्या वाहनाच्या नंबरप्लेट पत्रकारांच्या नजरेत ;

वेध माझा ऑनलाइन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापासून ते वाहतूक नियमांचे पालन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक शांतता राखण्यापर्यंत नागरिकांना नियमांची आठवण करून देणारे पोलीस प्रशासन स्वतःच्या बाबतीत किती काटेकोर आहे? हा सवाल कराडातील एका घटनेने ऐरणीवर आणला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा हे शहर व परिसरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीसाठी आज कराडात आले होते. बैठकीच्या निमित्ताने प्रशासनाकडून गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचे धडे दिले जात असतानाच, त्यांच्या वाहनावरील नंबरप्लेटनेच उपस्थित पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले.

वाहनाच्या नंबरप्लेटकडे बारकाईने पाहिल्यानंतर ती सध्या अपेक्षित असलेल्या विहित स्वरूपाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे, वाहन नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च स्तरावरील अधिकाऱ्याच्या वाहनाबाबतच असा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकाराची चर्चा होणे स्वाभाविक ठरले.

सवाल थेट आयजींना; उत्तरही स्पष्ट!

पत्रकारांनी याबाबत थेट आयजी रंजनकुमार शर्मा यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी “नंबरप्लेट आवश्यक त्या प्रोसेसमध्ये आहे. लवकरच करून घेऊ,” असे स्पष्ट केले.
आयजींच्या या उत्तरामुळे एक बाब स्पष्ट झाली—नंबरप्लेटबाबतची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ नंबरप्लेटचा राहत नाही; नियम सर्वांसाठी समान आहेत का आणि नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतही त्याच निकषांचा अवलंब केला जातो का? हा मूलभूत प्रश्न पुढे आला आहे.

सामान्य नागरिकांकडून नियमांची अपेक्षा; मग वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काय?
गणेशोत्सव काळात एखाद्या नागरिकाच्या वाहनावर नियमबाह्य नंबरप्लेट आढळल्यास त्याच्यावर कारवाईची शक्यता असते. वाहनचालकांकडून कागदपत्रे, नंबरप्लेट, वाहतूक नियम आणि इतर बाबींचे काटेकोर पालन अपेक्षित केले जाते. मग याच नियमांच्या चौकटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनांकडे पाहिले जाते का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या वाहनांबाबतही त्याच कायदेशीर निकषांचे पालन करणे अपेक्षित असते. कारण कायद्याची ताकद केवळ कारवाई करण्यात नसते; तर तो कायदा स्वतःपासून लागू करण्याच्या नैतिक भूमिकेतही असते.

प्रोसेसमध्ये आहे’... पण प्रक्रिया कधी पूर्ण होणार?

आयजी शर्मा यांनी नंबरप्लेट आवश्यक प्रक्रियेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. संबंधित नंबरप्लेट बदलण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली? ती कोणत्या टप्प्यावर आहे? आणि विहित नंबरप्लेट वाहनावर नेमकी कधी बसविण्यात येणार? या प्रश्नांची उत्तरेही महत्त्वाची ठरणार आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडात शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन याचा संदेश देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनामुळेच ‘नियम आधी कोणासाठी?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे.
दरम्यान आयजी शर्मा यांनी स्वतः “लवकरच करून घेऊ” असे आश्वासन दिल्याने आता त्यांच्या वाहनावर नियमानुसार नंबरप्लेट कधी झळकते, याकडे कराडातील पत्रकारांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

Friday, September 4, 2026

जखिणवाडी व कालवडे येथे ८८.५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन ;

वेध माझा ऑनलाईन:
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जखिणवाडी (ता. कराड) येथे ५६.५० लाख; तर कालवडे येथे ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

जखिणवाडी येथे २५ लाखांच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच ९.५० लाख खर्चून संत रोहिदास नगर येथे काँक्रीटीकरण व पेव्हर्स बसविण्याचे काम आणि ७ लाखांच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. याचबरोबर १५ व्या वित्त आयोगातून ८ लाखांच्या निधीतून रस्ता काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामांचे भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावात ७ लाखांच्या निधीतून करण्यात आलेल्या अंतर्गत रस्ता सुधारणाचे कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

तसेच कालवडे येथे २५ लाखांच्या निधीतून ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम केले जाणार आहेत. तसेच ७ लाखांच्या निधीतून गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामांचेही भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, सदस्य ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, माजी उपसभापती पै. दादासाहेब थोरात, सरपंच सुदाम मोटे, उपसरपंच शुभम थोरात, बालिश थोरात, जखिणवाडीच्या सरपंच शोभा नलवडे, उपसरपंच शंकर झिंब्रे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर थोरात, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तडाखे, पै. आप्पासो पाटील, हिंदुराव पाटील, सचिन मोहिते, अशोक पाटील, भास्करराव पाटील, महेश गुरव, अधिकराव पवार, शिवाजी कणसे, पै. श्रीकांत थोरात, हरिश शेठ, शंकर थोरात, पै. धनाजी थोरात, पै. मनोहर थोरात व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कराडात "मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर' वर पोलिसांनी फिरवला बुलडोझर...कराडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक कारवाई ;

वेध माझा ऑनलाईन ।
मॉडिफाईड सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना आता वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधत एकाच वेळी कारवाईचा धडाका लावला. जप्त केलेले मॉडिफाईड सायलेन्सर कराडच्या विद्यानगर येथे बुलडोझरखाली अक्षरशः चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आले.

या विशेष कारवाईत मॉडिफाईड सायलेन्सरचे २८१, फॅन्सी नंबर प्लेटचे १७०, प्रेशर हॉर्नचे १८३ आणि सायरनचे ४३ अशी एकूण 677 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे तसेच सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
मॉडिफाय सायलेन्सरमुळे निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटमुळे होणारे नियमांचे उल्लंघन याविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

कारवाई करून सोडणार नाही, तर जप्त केलेले सायलेन्सरच नष्ट करू असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. यापुढेही मॉडिफाय सायलेन्सर बसविणे, नियमबाह्य आवाजाचे हॉर्न अथवा सायरन वापरणे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरूच ठेवल्यास संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

विशेष म्हणजे सातारा आणि कराडसह जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Thursday, September 3, 2026

कराडच्या नवीन उड्डाणपुलाखाली प्रवेश-निर्गमन मार्गाची पाहणी ; प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग सुचवला; ‘ब्लॅक स्पॉट’ टाळण्यासाठी नियोजन करण्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे संकेत

वेध माझा ऑनलाईन।
 : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड शहरातील नवीन उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश आणि शहरातून बाहेर जाण्यासाठी प्रस्तावित मार्गाची कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी केली. वाहतुकीची सुरक्षितता आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग तयार करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला.

उड्डाणपुलाच्या कामामुळे कराड शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीत बदल होणार असून, प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, तसेच वाहनचालकांना सुरक्षितपणे मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी नगराध्यक्ष यादव यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली.
दरम्यान, नवीन प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाचे नियोजन करताना या ठिकाणी पुन्हा ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. 
वाहतुकीचा प्रत्यक्ष प्रवाह लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात येतील, तसेच प्रायोगिक तत्त्वावर मार्गाची अंमलबजावणी करून त्याचा परिणाम पाहिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीला अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित दिशा मिळण्याची अपेक्षा असून, प्रवेश-निर्गमन मार्गाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या मार्गाची रचना करताना वाहनांची संख्या, वळणांची रचना, दृश्यमानता आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा विचार करून अंतिम आराखडा निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

कराड नगरपरिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून साहित्य चोरीस गेल्याची बातमी-

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून नगरपरिषदेच्या मालकीचे साहित्य चोरीस गेल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे कराड नगरपालिकेतील गटनेते विजय वाटेगावकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन चोरीस गेलेल्या साहित्याची सविस्तर माहिती, आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कराड नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी नवीन जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जिथे चोरी झाली आहे तेथील पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना भेटून वाटेगावकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीबाबत निवेदन दिले.

नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे वाटेगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून नेमके कोणते व किती साहित्य चोरीस गेले आहे, याची वस्तूनिहाय सविस्तर यादी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या प्रत्येक साहित्याची खरेदी किंमत, लेखा मूल्य आणि सद्य अंदाजे बाजारभाव याबाबत स्वतंत्र माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या साहित्याची नोंद नगरपरिषदेच्या मालमत्ता नोंदवही, स्टॉक रजिस्टर किंवा अन्य संबंधित अभिलेखांमध्ये करण्यात आली होती का, याची माहिती तसेच संबंधित नोंदींच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर साहित्य कधीपासून उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आणि चोरीची घटना कोणत्या कालावधीत घडली असण्याची शक्यता आहे, याचीही माहिती मागण्यात आली आहे
या घटनेबाबत नगरपरिषदेच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार अथवा FIR दाखल करण्यात आली आहे का, असल्यास त्याची प्रत, गुन्हा क्रमांक आणि दिनांक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय अथवा अंतर्गत चौकशी झाली असल्यास चौकशी अधिकारी कोण होते, चौकशीचा अहवाल काय आहे आणि त्यामध्ये कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील नगरपरिषदेच्या साहित्याच्या सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी कोणत्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अथवा सुरक्षा यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे, याची माहिती देण्याबरोबरच संबंधित कालावधीतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, ड्युटी चार्ट, हजेरीपत्रक आणि शिफ्टनिहाय नियुक्तीची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात CCTV कॅमेरे कार्यरत आहेत का, असल्यास संबंधित कालावधीतील CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात आले आहे का, याची माहितीही मागण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत आणि त्यामुळे नगरपरिषदेचे झालेले आर्थिक नुकसान याचा स्वतंत्र अहवाल देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, चोरीच्या घटनेबाबत प्राथमिकदृष्ट्या कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा कंत्राटदारावर कोणती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी वाटेगावकर यांनी केली आहे. भविष्यात नगरपरिषदेच्या मालमत्तेची अशा प्रकारे चोरी किंवा नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या अथवा प्रस्तावित आहेत, हेही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नगरपरिषदेची मालमत्ता ही सार्वजनिक मालमत्ता असून ती नागरिकांच्या करातून निर्माण झालेल्या निधीशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणतीही बाब दडपली जाऊ नये, चोरीस गेलेल्या साहित्याची वस्तुनिष्ठ तपासणी करून आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर यांनी केली आहे.

Wednesday, September 2, 2026

यामदर अतुलबाबा जिल्हा बँकेचे उमेदवार असणार? अतुलबाबांची उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; पण संकेत मात्र बोलके?

वेध माझा ऑनलाईन।
: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या एका रोखठोक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल, असे सांगतानाच, “जर तसे झाले नाही तर भाजप जो उमेदवार देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट करून आमदार भोसले यांनी जिल्हा बँक निवडणुकीतील आपल्या भूमिकेबाबत नवा राजकीय संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असताना ते भाजपच्या चिन्हावर किंवा भाजपच्या माध्यमातून कसे निवडणूक लढवणार, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार भोसले यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, “उदयदादा भाजपमधून लढणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण?” या प्रश्नाभोवती आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण फिरू लागले आहे.

भाजप जो उमेदवार देईल त्याचे काम करू’... विधानात दडलेला संकेत?
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अतुलबाबांनी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचाही संदर्भ घेतला. भाजप ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटल्याचा अर्थ “आम्ही सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढणार” असा असल्याचे अतुलबाबांनी स्पष्ट केले.मात्र, याच चर्चेत ‘जर-तर’च्या भाषेत बोलताना त्यांनी उदयसिंह पाटील यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आणि भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करावे लागेल, असे सांगितले.याच एका वाक्याने राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
कारण, जर उदयसिंह पाटील भाजपकडून निवडणूक लढवणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण? आणि त्या उमेदवारासाठी कराडसह जिल्ह्यातील भाजपची ताकद कोणाच्या मागे उभी राहणार? या प्रश्नांची उत्तरे 
शोधण्यास वेध माझा ने सुरुवात केली आहे.

उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; 
पण संकेत मात्र बोलके!
आमदार अतुलबाबा भोसले यांनी मात्र अद्याप “मीच भाजपचा उमेदवार” अशी आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून होईपर्यंत स्वतःचे नाव पुढे न आणता योग्य वेळ साधण्याची ही रणनीती असू शकते. पक्षाने निर्णय जाहीर केल्यानंतरच स्वतःची उमेदवारी अधिकृतपणे समोर आणण्याचा त्यांचा मानस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे अतुलबाबांच्या या विधानाकडे केवळ एक साधे राजकीय वक्तव्य म्हणून न पाहता, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीबाबतचा सूचक संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.


बॉम्ब’ फुटला; 
आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही भाजपची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र, अतुलबाबांच्या एका विधानाने या निवडणुकीतील राजकीय गणितांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.उदयसिंह पाटील नसतील तर मग भाजपचा दुसरा उमेदवार कोण? का भाजपचा तो दुसरा उमेदवार अतुलबाबाच असणार का?या प्रश्नाचे उत्तर अद्याप अधिकृतपणे मिळालेले नसले, तरी अतुलबाबांच्या विधानाने त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेला पुन्हा जोरदार हवा मिळाली आहे... पाहूया पुढे काय होते ते...


पुण्यात गणेशोत्सवा अगोदरच DJ वरून वाद पेटला!

वेध माझा ऑनलाईन।
पुण्यात आगामी गणेशोत्सवामध्ये डीजेच्या वापरावरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. सध्या काही जण डीजेच्या समर्थनात असले तरी, शहराच्या मोठ्या लोकसंख्येचा डीजेला तीव्र विरोध आहे. सरकारनं या संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यास, डीजे विरोधात मोठं आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी विद्यानंद बापट यांनी आवाज उचलला असून, गणेशोत्सव लाऊडस्पीकर आणि कर्कश्य वाद्यांशिवाय साजरा व्हावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पुणे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते आणि अशा शहरांनी या अगोदरच हे पाऊल उचलणे अपेक्षित होते असे बापट यांचे म्हणणे आहे. डीजेसारखी कर्कश्य वाद्ये ही कोणत्याही संस्कृतीचा किंवा धर्माचा भाग नाहीत, असे ते स्पष्ट करतात.

बापट यांच्या मते, संसदेने केलेल्या कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे आणि उच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या ५५ आणि ४५ डेसिबलच्या ध्वनी मर्यादेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जर याची अंमलबजावणी झाली नाही, तर पोलीस प्रशासनच याला जबाबदार असेल. लाखो लोकांना या घातक आवाजांमुळे वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतो आहे, तर काही जणांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे, रणकर्कश आवाज बंद करून सामान्य नागरिकांना सुखाने जगता यावे यासाठी ही लढाई आवश्यक असल्याचे बापट यांनी नमूद केले.