Wednesday, July 22, 2026

लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र : अध्यक्षपदी डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी जयश्री साने तर खजिनदारपदी विद्या मोरे

वेध माझा ऑनलाईन।
लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वर्षासाठी अध्यक्षपदी लायन डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी लायन जयश्री साने आणि खजिनदारपदी लायन विद्या मोरे यांनी पदभार स्वीकारला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (VDG-2) लायन मंगेश दोशी यांच्या हस्ते पद व शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लायन , लायन जगदीश पुरोहित होते त्यांचे मार्गदर्शन लाभले.

या सोहळ्यास रिजन चेअरमन लायन महेंद्र कदम, झोन चेअरमन लायन गौरी चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात लायन्स चळवळीची सेवा, समर्पण आणि मानवतेची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवा विकास, रक्तदान, नेत्रदान जनजागृती तसेच गरजूंसाठी विविध सेवाभावी उपक्रम नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजश्री पालकर यांनी क्लबच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन समाजहिताला प्राधान्य देत नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सचिव जयश्री साने यांनी संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान व नियोजनबद्ध करण्याची भूमिका मांडली, तर खजिनदार विद्या मोरे यांनी आर्थिक पारदर्शकता, शिस्त आणि सेवाभावी प्रकल्पांना सक्षम पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन नेटके व आकर्षक पद्धतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र समाजसेवेची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला.

Tuesday, July 21, 2026

" ती ' विकासकामे का झाली नाहीत? अतुलबाबांनी पत्रव्यवहार करून कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारला होता जाब, अद्याप उत्तर आलेच नाही; आता पुन्हा फोन करून विचारणार जाब ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. मंजूर करून आणल्यानंतरही अनेक कामे प्रत्यक्षात सुरू न झाल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुन्हा एकदा पालिका प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.पत्रकारांशी बोलताना आमदार भोसले म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कराड नगरपरिषदेकडे विशेष लक्ष आहे. शहराची प्रगती व्हावी यासाठी त्यांचे आणि माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावासाठी जो निधी आला आहे, तो गावासाठीच खर्च झाला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मंजूर झालेला निधी वर्क ऑर्डर निघालेल्या विकासकामांवर का खर्च झाला नाही, कोणत्या अडचणी आहेत, याबाबत मी मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे विचारणा केली होती. मात्र अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही. आता मी त्यांना पुन्हा फोन करून विचारणा करणार आहे. काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही सहकार्य करू; पण विकासकामे थांबता कामा नयेत."असे अतुलबाबा म्हणाले आहेत

कराडच्या सर्किट हाऊस येथे ते पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी पालिकेत भाजपच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की याच विषयाच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार आहेत... आणि काल पत्रकारांशी बोलताना अतुलबाबांनी कराडच्या मुख्याधिकारी व्हटकर याना पहिल्यांदा पत्रव्यवहार करून याविषयी जाब विचारला असता अजूनही त्याचे उत्तर आले नाही, त्यामुळे आता पुन्हा व्हटकर त्यांना फोन करून जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे गटनेते वाटेगावकर म्हटल्याप्रमाणे अतुलबाबांनी यानिमित्ताने पालिकेत आता लक्ष घातले आहे असे स्पष्ट झाले आहे

आधी नगरसेवक, आता आमदारही आक्रमक
दरम्यान अतुलबाबांच्या या वक्तव्यामागे गेल्या काही दिवसांतील घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या दालनात जाऊन शहरातील मंजूर विकासकामे अद्याप सुरू का झाली नाहीत, याचा जाब विचारला होता. रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाची भूमिका समाधानकारक नसल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आमदार भोसले यांनीही स्वतंत्रपणे मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबतची कारणे विचारली होती. मात्र त्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नसल्याने आता त्यांनी थेट दूरध्वनीद्वारेही प्रशासनाकडे खुलासा मागण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

प्रशासन काय उत्तर देणार?
मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर अद्याप न मिळाल्याची आमदारांची सार्वजनिक नाराजी आणि आता पुन्हा थेट विचारणा करण्याची घोषणा यामुळे कराड पालिका प्रशासनावर दबाव वाढला आहे. मंजूर असूनही कामे न होण्यामागे अडथळे नेमके कोणते आहेत, कामे का रखडली आहेत... आणि ती कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाला आता स्पष्ट भूमिका मांडावी लागणार असल्याचे दिसत आहे.

याचनिमित्ताने कराडच्या विकासाच्या प्रश्नावर राजकीय नेतृत्व आणि पालिका प्रशासन यांच्यातील ही रस्सीखेच पुढील काही दिवसांत कोणते वळण घेते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका ;

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्या पोलीस ठाण्यात सोनिया गांधी देखील पोहोचल्या . प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर सोनिया गांधी देखील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या . शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तब्बल तीन तास आंदोलन केलं.  त्यानंतर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना देखील ताब्यात घेतलं होतं.  यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं

वेध माझा ऑनलाईन।
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. मात्र अचानक आता राहुल गांधींचं आंदोलन चिघळल्याचं सांगितलं जात आहे.
आंदोलनस्थळी आता पोलीस दाखल झाले आहेत . 

एकूणच हे आंदोलन चिघळलं असून आंदोलन करणारे काही खासदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलन स्थळी सुप्रिया सुळे तसेच अखिलेश यादव देखील उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.

राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर भाजप घेणार मोठा निर्णय ?;

वेध माझा ऑनलाईन।
राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता या भेटीनंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 
राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान एकूण 5 प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी पहिली मागणी करण्यात आली. तसेच NEET पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत निवेदन द्यावे आणि संबंधित प्रकरणात पारदर्शक कारवाई करावी, अशाही मागण्या त्यांनी मांडल्या.

दरम्यान, जितेंद्र सिंह आता अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. दरम्यान, या आंदोलनात आता विरोधी पक्षदेखील सहभागी होत आहेत. एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील सामिल झाले आहेत. गांधी हे पंतप्रधांनाच्या निवासस्थान परिसरात ठिय्या आंदोलन करत असून आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचले आहेत. या चर्चेत नेमकं काय घडणार या कडे देशाचे लक्ष लागून आहे.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी या मुंबई बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आवाहन करत सांगितले की, नागरिकांनी स्वेच्छेने सेवा आणि कामकाजातून दूर राहावे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, तर टॅक्सी, ओला आणि उबेर सेवा देखील त्या दिवशी बंद ठेवाव्यात, असे त्यांनी म्हटले. तसेच बेस्टच्या बसेस डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.