कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या वादळी सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे.सत्ताधारी नगरसेवक आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आणलेल्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप विरोधी भाजपकडून केला जात असताना, आता नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
यादव म्हणाले...
भाजप नगरसेवकच आमदारांच्या कामांना विरोध करत आहेत त्यांनी आणलेल्या कामांच्या निविदा थांबवून हेच नगरसेवक त्यांच्या कामाना विरोध करत आहेत आणि आम्ही विरोध करतो असे म्हणत आहेत खरंतर शहराला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागतच करतो असे सांगत भाजपचे नगरसेवकच आमदारांना चुकीची माहिती देत आहेत,’ असाही थेट आरोप यादव यांनी यावेळी केला आहे.
पालिकेच्या सभेतील गोंधळाबाबत बोलताना यादव म्हणाले, ‘पालिकेला काही परंपरा आहेत. त्या परंपरा मोडण्याचे काम सभेच्या दिवशी भाजप नगरसेवकांनी केले, याचे आम्हाला वाईट वाटते.’ सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत नागरिकांना बसवून सभेच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता आधीच लक्षात आल्याने गॅलरीत नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
‘आमदारांच्या कामांना विरोध करतो, हा गैरसमज पसरवला जातोय’
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून आणलेल्या विकासकामांना पालिका मंजुरी देत नाही, असा आरोप चुकीचा असल्याचे सांगत यादव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आमदारांच्या कामांना करण्याची आमची मानसिकता नाही, हा पूर्णपणे खोटा आणि गैरसमज पसरवणारा प्रकार आहे. तसे असते तर विरोधकांनी सांगितलेली कामे आम्ही सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करून घेतली असती का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी भाजपचे नगरसेवक आमदार अतुल भोसले यांना पालिकेच्या कामकाजाबाबत चुकीची माहिती देत असल्याचा गंभीर आरोपही यादव यांनी केला.
घनकचरा प्रकल्पावरूनही पलटवार
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत विरोधकांकडून शहरात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप यादव यांनी केला. हा प्रकल्प तत्कालीन प्रशासनाच्या काळातील असल्याने त्याचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या विषयावरून विरोधकांकडून केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘नेकलेस रोडची संपूर्ण माहिती द्या,
नेकलेस रोड प्रकल्पावरूनही नगराध्यक्ष यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘स्टेडियम उभारणीसाठी संबंधित खात्याकडून जसे प्रेझेन्टेशन देण्यात आले, तसेच प्रेझेन्टेशन आम्हालाही दिले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही,’ असे ते म्हणाले.
‘यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीलगत हा प्रकल्प होणार आहे. मात्र या प्रकल्पाची संपूर्ण माहितीच आम्हाला नाही. मग आम्ही मंजुरी कशासाठी द्यायची?’ असा सवाल त्यांनी केला.
यशवंतराव चव्हाण हे कराडची अस्मिता असल्याचे सांगत यादव म्हणाले, ‘समाधीस्थळालगत होणाऱ्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पालिकेला होणे गरजेचे आहे. भविष्यात या ठिकाणच्या अस्मितेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य होता कामा नये. अन्यथा भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही.’
‘ त्यावेळी खंदारे यांच्या गाडीत बसून कोण फिरत होते?’;
सुरेश पाटील यांच्या वक्तव्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ...
घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी बाग झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात काम न करताही बिले काढल्याचा आरोप भाजप नगरसेवकांकडून करण्यात आला होता. या आरोपावर सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाना पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला.
‘तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या काळात हे प्रकरण घडल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी खंदारे यांच्या गाडीतून कोण फिरत होते? तेव्हा हा आरोप का केला नाही? आता तेच लोक याबाबत आरोप करत आहेत, हे हास्यास्पद आहे,’ असे पाटील म्हणाले.
यावर पत्रकारांनी,
‘त्यावेळी आरोग्य विभागा संबंधित कोण नगरसेवक खंदारे यांच्या गाडीतून फिरत होते, त्यांचे नाव सांगा,’ असा थेट सवाल केला.
त्यावर पाटील यांनी, ‘नाव कशाला घ्यायला पाहिजे? सगळ्यांना माहिती आहे कोण होते ते,’ असे उत्तर दिले.
त्यांच्या या उत्तरानंतर त्याठिकाणी पत्रकारांसाहित सगळेच हसायला लागले
दरम्यान पत्रकार परिषदेत झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे कराड पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक भाजप नगरसेवकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.