Friday, March 20, 2026

मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद केली काबीज ; राज्यभरात झाला चर्चेचा विषय ;

वेध माझा ऑनलाइन
32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. कोणालाही बहुमत नसल्याने अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना भाजपने शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष केला. त्यामुळे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद काबीज केली आहे. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत दिसून आला. 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संख्याबळ 31 दाखवू शकले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते 35 चे बहुमत असतानाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.

जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार ; झटापटीत मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला लागलं!

वेध माझा  ऑनलाइन
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आले होता. 

या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं. सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील लागले. मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला. 
कामेस कांबळे, अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना टार्गेट केल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपली संपूर्ण ताकद लावून सर्व सदस्यांना सुखरूप सभागृहात पोहोचवलं. त्यामुळे भाजपाचा डाव फसल्याचं चित्र त्यावेळीतरी स्पष्ट दिसून आले. 



Thursday, March 19, 2026

विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक अतिशय लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉलेजमधील प्रोफेसरवर आपल्या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रोफेसरला अटक केली असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?
हा प्रकार कराड तालुक्यातील उंब्रज परिसरातील एका कॉलेजशी संबंधित आहे. आरोपानुसार, कॉलेजमध्ये शिकवणारा प्रोफेसरने १२ मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थिनीला आपत्तिजनक आणि अश्लील संदेश पाठवले. त्याचबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला. या मेसेजमुळे विद्यार्थिनी खूप त्रस्त झाली. तिने ताबडतोब ही बाब कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी गंभीरतेने घेत विद्यार्थिनीला घेऊन उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता आरोपी प्रोफेसरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने यापूर्वी अशा प्रकारच्या हरकती केल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. विद्यार्थिनीने दिलेले पुरावे आणि डिजिटल साक्ष्यांचाही तपास करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

गॅस तुटवड्यावर भारत सरकारचा मोठा निर्णय ; तेल कंपन्यांना आदेश !;

वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे.  इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून सर्व तेल आणि गॅस कंपन्यांना थेट आदेश जारी केला आहे.
या निर्णयामुळे आता देशातील ऊर्जा उत्पादन आणि पुरवठ्याची अचूक माहिती सरकारकडे उपलब्ध होणार आहे. संभाव्य ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारने घेतलेल्या या पावलामुळे भविष्यात इंधन आणि गॅस पुरवठ्यावरील नियंत्रण अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

सरकारने काय दिला आदेश? :
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने Essential Commodities Act 1955 अंतर्गत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार देशातील सर्व तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन तसेच पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादन, साठा आणि वितरणाबाबतची माहिती सरकारला देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आता सरकारला देशात किती कच्चे तेल उत्पादन होते, किती निर्यात होते, तसेच नैसर्गिक वायूचा किती पुरवठा केला जातो याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये गॅस उत्पादक कंपन्या, LNG आयातदार, गॅस पाइपलाइन ऑपरेटर, सिटी गॅस वितरण कंपन्या आणि पेट्रोकेमिकल उद्योगांचाही समावेश असेल.
सरकारच्या या आदेशामुळे ऊर्जा क्षेत्रातील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गॅस किंवा इंधन तुटवड्याच्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.


वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल ; सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट ! राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्याला अजून काही महिने बाकी असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या हालचाली वाढल्या आहेत
हवामान खात्याने गुरुवार, 19 मार्च रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे

दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य प्रदेश परिसरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे. वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये ताशी सुमारे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः नाशिक जिल्हा आणि घाटमाथ्यावरील भागांसाठी गुरुवारचा दिवस अधिक संवेदनशील मानला जात आहे.
राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्येही हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच नागपूर, अकोला, अमरावती आणि गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ विभागातही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या भागांत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.



माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल; भीती दाखवून अशोक खरातने केले कांड; प्रत्येकाला चीड येईल अशी बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, अंकशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारे 'कॅप्टन' अशोक खरात यांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाने नाशिकबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरात यांचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार २०१९ ते २०२५ या कालावधीत घडला. २०१९ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील खरात यांच्या कार्यालयात तिची त्यांच्याशी ओळख झाली. खरात यांनी स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलेचा विश्वास संपादन केला. तिच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचे, समस्या सुटण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी विविध विधी करण्याचे सांगितले.
खरात यांनी महिलेला वारंवार कार्यालयात बोलावले. काही बदल दिसल्यास ते आपल्या 'शक्ती'चे फलित असल्याचे सांगितले. या काळात महिलेचा २०२१ मध्ये ठरलेला साखरपुडा मोडला. खरात यांनी सगळे सुरळीत होईल असे सांगून ५० हजार रुपये घेतले आणि 'पुष्कराज' खडा देऊन कल्याणाचे आश्वासन दिले. 
 नोव्हेंबर २०२२ मध्ये खरात यांनी महिलेला कार्यालयात बोलावले. प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर महिलेला गुंगी आली. भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नंतर महिलेचे लग्न ठरले आणि ते यशस्वीपणे पार पडले. खरात यांनी हे आपल्या 'कृपे'मुळे झाल्याचा दावा केला. लग्नानंतरही आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले आणि पुन्हा त्याच पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर खरात यांनी महिलेला धमकावले. "प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होईल, नवऱ्याचा मृत्यू होईल" अशा भीती दाखवल्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि भीतीमुळे महिलेला अखेर सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली.


Tuesday, March 17, 2026

शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला ; कुठे घडली घटना ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
शिर्डीतील लोणी गावात संतापजनक घटना घडली असून शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं अहिल्यानगर जिल्हा हादरला असून थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिर्डीतील घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. आता, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. 
 
शिर्डीतील अॅसिड हल्ला प्ररकणाची मी माहिती घेतली आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, रस्त्यावर थांबून त्या मुलाने तिच्यावर अॅसिड फेकलं. खरंतर ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जवळपास सीसीटीव्ही नाहीत. पण हा मुलगा गावातलाच असू शकतो, त्यामुळे पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, आजच आरोपी पकडला जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.