Friday, March 13, 2026

कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार / आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

वेध माझा ऑनलाइन।
 कराड दक्षिणमधील सुमारे २५ गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी  विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. आ.डॉ. भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाकुर्डे योजना येत्या काळात सोलर फिडरवर आणण्याची घोषणा सभागृहात केली.
दरम्यान वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळच्या सत्रातील कामकाजावेळी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे राज्याचे लक्ष वेधले. 

ते म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत असून, या योजनेला १९ डिसेंबर १९९८ रोजी मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये पहिली सुधारित मान्यता, तर २०२१ मध्ये दुसरी सुधारित मान्यता शासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत या योजनेवर सुमारे १,३४९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या योजनेमुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कराड तालुक्यातील सुमारे २५ गावांतील हजारो ग्रामस्थ शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वाकुर्डे योजनेवर अवलंबून आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने, हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 

या योजनेतील विजेच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ८१-१९ टक्क्यांचे सूत्र लागू करुन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ज्यामध्ये वीज बिलातील ८१ टक्के खर्च शासनाकडून आणि १९ टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरण्याची व्यवस्था केली. मात्र १९ टक्के हा खर्चदेखील अनेक लहान व गरीब शेतकऱ्यांना पेलवणे कठीण जाते. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांच्या वीज बिलातील काही हिस्सा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरला जात असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले. 

या योजनेसाठी एकूण १६.३३ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, १४ पंपांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याचे धोरण लक्षात घेता, वाकुर्डे उपसा सिंचन योजना सोलर फीडर आणावी, अशी आग्रही मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. ही योजना सोलर फिडरवर आणल्यास विजेवरील खर्च कमी होऊन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडलेल्या या लक्षवेधीची तत्काळ दखल घेत, याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्व वीजपंप सोलरवर आणण्याचे धोरण घेत असल्याचे सांगितले. तसेच येत्या काळात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्याची घोषणा करत, त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही भार पडणार नसल्याची ग्वाही दिली.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे व भाजपा- महायुती सरकारचे आभार मानले आहेत. 

चौकट 

४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ
वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात २८ हजार हेक्टर क्षेत्र येते. तसेच येत्या काळात शासनाच्या प्रस्तावित शिराळा उपसा जलसिंचन योजनेत १३ हजार हेक्टर लाभक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 


सर्वात मोठी बातमी ! आता चीनकडून मोठ्या युद्धाची तयारी सुरू? ;जगभरात खळबळ ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
एकीकडे अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. जग सध्या वेगळ्याच तणावात असातना आता चीनने जगाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. आता चीनकडून आशिया खंडात मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली आहे. इस्ट चायनाच्या एका सॅटेलाइट इमेजमुळे हा मोठा खुलासा झाला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या इमेजमध्ये चीनचे एकाचवेळी तब्बल दोन हजार मासे पकडणारे जहाजं सोबत दिसत आहेत. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे.

वृत्तसंस्था एएफपीने नासाच्या हवाल्यानं हे सॅटेलाईट चित्र प्रसारित केलं आहे. हे चित्र समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे. युद्धाच्या वेळी जपान, फिलिपाइन्स आणि तैवान यांचा मार्ग एकाच वेळी या ठिकाणावरून रोखता यावा यासाठी ही चीनची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व चीनी समुद्रात 400 किलोमीटरपर्यंत या जहाजांची अशा पद्धतीने रचना केली आहे की, कोणत्याही दिशेनं शत्रू राष्ट्रांवर सहज हल्ला केला जाऊ शकतो. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, चीन सध्या एका मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. हे युद्ध भविष्यात तैवान, जपान किंवा फिलिफिन्सविरोधात होऊ शकतं.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची चव्हाण साहेबांना आदरांजली ; समाधीस्थळी येऊन झाल्या नतमस्तक...म्हणाल्या...समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते : चव्हाण साहेबांच्या आदर्शांवर राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”

वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगमावर श्रद्धेचा अनोखा संगमअनुभवायला मिळाला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी समाधीसमोर नतमस्तक होऊन पुष्पचक्र अर्पण केले, काही क्षण शांत उभ्या राहून महान नेत्याच्या स्मृतींना विनम्र वंदन केले आणि त्यांच्या आदर्शांच्या मार्गावर चालण्याचे संकल्प व्यक्त केला. 

यावेळी प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच श्रद्धा, आदर आणि भावनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले होते.उपस्थितांनी , यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर एकत्र येऊन भावपूर्ण अभिवादन करताना दिसले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य महाराष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यांच्या आदर्शांवर चालत राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली ठरेल.”

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार ; राज्यभरात पुरवठा विभागाची धडाधड कारवाई सुरू;

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे  घरगुती गॅस सिलेंडर मिळवा यासाठी नागरीक लांबच लांब रांगामध्ये उभे ठाकले आहे. भर उन्हात अबालवृद्ध आणि महिलांना गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर नोंदणीसाठी उभे राहावे लागत आहेत. तीन चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलेंडर मिळत असल्याची ओरड नागरीक करत आहेत. त्यातच एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी राज्यभरात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.



घरगुती ते व्यावसायिक गॅसबाबत सरकारची मोठी कारवाई ; घेतले 10 सर्वात मोठे निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
गॅसच्या अभूतपूर्व टंचाईने राष्ट्र आणि राज्य होरपळले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला. तर कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच सर्वसामान्यांची दोन वेळच्या जेवणासाठीची कसरत लांबच लांब रांगामधून दिसली. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने त्यासाठी दहा दमदार निर्णय घेतले आहे.

 गेल्या दोन दिवसांपासून एका गॅस सिलेंडरसाठी जे काही महाभारत सुरू आहे, ते उभा देश पाहत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, चहा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणारे छोटे व्यावसायिक, खानावळ चालक हे तर मेटाकुटीला आले आहे. गॅसच उपलब्ध नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. त्यामुळे कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सर्वसामान्यांच्या रोजच्या कटकटीत अजून एकीची वाढ झाली. त्यांना काम सोडून सिलेंडर बुकिंगसाठी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहेत. तहानभूक विसरून कुटुंबासाठी अनेकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तर या धामधुमीत काळाबाजार आणि हेराफेरी करणाऱ्यांनी हात धुवून घेतले आहे. पण मोदी सरकारने या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी जालीम उपाय केले आहेत.


सरकारचे 10 निर्णय

1). देशभरातली रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले. खासगी आणि सरकारी तेल उत्पादक कंपन्यांना घरगुती LPG उत्पादन वाढवण्यास सांगितले. उत्पादन क्षमता वाढवण्यात आली. लवकरच पुरवठा सुरळीत होईल.

2). साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी बुकिंगमध्ये अंतर वाढवले. गॅस बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केले. त्यामुळे एकाच व्यक्तीला अधिक वेळा गॅस बुकिंग करता येणार नाही. गरजूंना गॅस मिळेल.

3). घरगुती LPG, PNG आणि वाहनांसाठीच्या CNG ला सरकारने प्राथमिकता दिली. रुग्णालये, शाळा, आश्रम, वसतिगृह आणि सर्वसामान्यांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य दिले.

4). व्यावसायिक गॅस पुरवठा पण लवकरच सुरळीत होणार आहे. सध्याच्या पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात आली आहे. तोडगा काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत केली.

5). अतिरिक्त उत्पादन झालेले LPG केवळ IOCL, BPCL आणि HPCL कंपन्यांना देण्याचा आदेश दिला. त्यामुळे सर्वसामान्यांना अगोदर गॅस सिलेंडर पुरवठा होईल.

6). देशभरात काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी ESMA लागू केला. धाडसत्र सुरू केले. संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले.

7). आखातातील पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर पर्यायी मार्ग शोधले. नवीन देशाशी गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले. लवकरच गॅसच्या नवीन खेपा भारतात येतील.

8). रशियाकडून खरेदी वाढवली. या मार्च महिन्यातील सुरुवातीच्या या 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवली. आयात वाढवून 15 लाख बॅरल प्रति दिवसावर पोहचले. IOC आणि रिलायन्सने 3 कोटी बॅरलसाठी करार केला.

9). LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार केला. GAIL ने LNG साठी अमेरिकेसोबत सौदा केला.

10). लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देशाशी इंधन खरेदीसाठी नवीन करार केला. गुयानासोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी केली. याशिवाय नायजेरिया आणि अंगोला देशाकडून इंधन मागवण्यात आले आहे. ते लवकरच देशात पोहचेल.
मोदी सरकारने हे दहा दमदार निर्णय घेतले आहे.

मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका ; ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, अशा संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, त्यांची मान्यता रद्द केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. मुंबईतील अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी भाषा डावलली जात असल्याच्या मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरकारकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हारूण खान यांनी मुंबईतील इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवले जात नसल्याचे सांगितले होते. तसेच अनेक इंटरनॅशनल शाळा मराठीला केवळ तिसरी भाषा म्हणून दुय्यम स्थान देत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही. आगामी शैक्षणिक वर्षात अशा शाळांची पुन्हा तपासणी केली जाईल. तसेच दोषी संस्थांवर कडक कारवाई होईल, असे दादा भुसे यांनी म्हटले

Wednesday, March 11, 2026

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या ( 12 मार्च ) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार ;

वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (12 मार्च) 113 वी जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार आहेत. 
यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्रे (जि. सांगली) येथे झाला. कातांतराने त्यांचे कुटुंब कराडला आले. कराडच्या मातीत त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेतच ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांची सामाजिक, राजकीय जडणघडण कराडमध्येच झाली.