Saturday, July 11, 2026

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक ; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे हस्तगत : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;

वेध माझा ऑनलाईन।
 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
डीवायएसपी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड शहर व परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरीता थांबले आहेत. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे अफताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील व ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चौघांकडे चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा 3 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.

Friday, July 10, 2026

राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला यश ; आमदार अतुलबाबांनी केला पाठपुरावा;


वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंञी एकनाथ शिंदे,  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे अर्जुन कोळी यांनी  आभार व्यक्त केले आहेत.

कृष्णा साखर कारखान्याच्या यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते सत्कार -

वेध माझा ऑनलाईन।
आज कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद (भाऊ) देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. धनश्रीताई मकरंद देशपांडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, श्री.सिद्धू गेजगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले, "मतदारांनी दाखवलेला विश्वास हीच खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरत सभासदांच्या हिताचे निर्णय आणि विकासाभिमुख कामे पुढील काळातही सातत्याने व्हावीत," अशा शब्दांत त्यांनी डॉ. सुरेशबाबा भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत, सभासदांचा विश्वास कायम राखत कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कराड शहरातील रस्ते, स्वच्छता आणि रखडलेल्या विकासकामांवर भाजपचे नगरसेवक आक्रमक; तोडगा न निघाल्यास पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांचे वर्क ऑर्डरही निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा गाड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन छेडण्याचा इशारा  भाजपच्या नगरसेवकांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के तसेच अतुल शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामालाही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कामांसाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीएलओ संदर्भातील कॅम्पबाबत प्रश्न उपस्थित केला. राजकीय नेत्यांना अशा प्रकारचे कॅम्प घेण्यास परवानगी नसताना काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्प आयोजित केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या कॅम्पला परवानगी नसून, असे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.


प्रितीसंगम बागेतील अव्यवस्थेचाही मुद्दा बैठकीत गाजला. नगरसेवक अजय पावसकर यांनी बागेत गाढवे फिरत असल्याची बाब उपस्थित करत मंदिर परिसरात खाद्यपदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. देवस्थान असणारा तो परिसर आहे याचे भान त्याठिकाणी ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले तसेच शहरातील तीनही बागांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढवे फिरल्याच्या घटनेबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी एकमुखी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.

नगरसेवक आशुतोष डुबल यांनी मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याची मागणी केली.


कंपन्यांसोबत बैठक घेण्याची मागणी
बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यास नेमका विलंब का होत आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे कराड शहरातील विकासकामे रखडत असतील तर त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला. 

नगरसेवक शिवाजी पवार आक्रमक ; 
नगरसेवक शिवाजी पवार हे यावेळी आक्रमक झाले त्यांनी बैलबाजार रोडच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून ८ एप्रिल २०२६ रोजी कामाचे वर्क ऑर्डरही देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन व केबल टाकण्याच्या कारणामुळे काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.




Thursday, July 9, 2026

'वेध माझा'च्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाची चौकशी सुरू ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश

वेध माझा ऑनलाईन 
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवसांपासून हिरवा-निळा होत असल्याच्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर वेध माझाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनाची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा प्रश्न थेट राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा-निळा का झाला? त्यामागील नेमके कारण काय आहे? नदीचे पाणी सुरक्षित आहे का? प्रदूषणामुळे हा बदल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वेध माझाने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती.
या वृत्तांची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आणि सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा-निळा होण्यामागील नेमके वैज्ञानिक कारण आता अधिकृतपणे स्पष्ट होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ रंगबदल म्हणून न पाहता पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय शासन स्तरावर पोहोचवल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आता अधिकृत तपासणी अहवालातून वस्तुस्थिती समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.

वेध माझाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे अखेर शासन यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, आता तपासणी अहवालात काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Wednesday, July 8, 2026

फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा वीजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना : एकमेकांना वाचवताना झाला मृत्यू!

वेध माझा ऑनलाईन।
- फलटण तालुक्यातील खामगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना विजेचा धक्का लागून कुटुंबातील चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीसानी दिली 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे यांना शॉक लागला. ही बाब लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आणि मुलांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड ; वाळवा तालुक्यातील जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष


वेध माझा ऑनलाईन ।
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कृष्णा कारखाना कार्यस्थळावर आज (बुधवारी) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेवेळी चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक जगदीश जगताप हे सूचक; तर संचालक दयानंद पाटील अनुमोदक होते. तसेच  व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांनी दाखल केलेल्या अर्जासाठी संचालक सुनील पाटील हे सूचक; तर संचालक सत्यजीत पाटील हे अनुमोदक होते. यानंतर सर्वानुमते चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात सभासदांनी सलग तिसऱ्यांदा संधी देत आमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. येत्या ५ वर्षात अधिकाधिक ऊसदर देण्यासाठी आणि चांगल्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कृष्णा कारखान्याला राज्यातील पथदर्शी आदर्श कारखाना घडविण्याचा आमचा संकल्प असून, यासाठी सभासदांची आम्हाला निश्चित साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, आनंदा खबाले, अरविंद पाटील, बाजीराव थोरात, छबन कांबळे, दत्तात्रय देसाई, संभाजीराव पाटील, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, संग्राम पाटील, बाबासो शिंदे, अविनाश खरात, बाजीराव निकम, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आप्पासाहेबांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ अशी सलग २८ वर्षे कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनीही १९९९ ते २००५ अशी ६ वर्षे आणि २०१५ ते २०२६ अशी ११ वर्षे असे एकूण १७ वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. त्यानंतर आता २०२६ ते २०३१ या ५ वर्षांसाठी त्यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यामुळे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा, तसेच सर्वाधिक वेळा चेअरमनपदी निवड होण्याचा मान डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होण्याची ऐतिहासिक हॅट्रिकही त्यांनी साधली आहे.