Tuesday, March 10, 2026

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार ; शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार ;

वेध माझा ऑनलाइन।
देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपयांच्या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
 
२ हजार रुपयांचा हप्ता  ; 
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. या दिवशी देशभरातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाईल. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू होत्या. अनेकांनी होळीपूर्वी हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आता कृषी विभागाकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून होळीनंतर हा हप्ता वितरित केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात साठा करू नये यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. घरगुती गॅस उपलब्ध असला तरी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

ESMA कायदा नेमका काय आहे? :

सरकारने लागू केलेला Essential Services Maintenance Act हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि इंधन यांसारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
या कायद्याअंतर्गत सरकारला काही आपत्कालीन अधिकार मिळतात. जर कोणत्याही कारणामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असेल तर सरकार थेट हस्तक्षेप करून आवश्यक आदेश जारी करू शकते. त्यामुळे गॅस, वीज किंवा वाहतूक यांसारख्या सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवता येतो.

.

संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा म्हणाले; .हे युद्ध केवळ नरेंद्र मोदीच थांबवू शकतात ;

वेध माझा ऑनलाइन।

गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.

हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”

Monday, March 9, 2026

राज्यात उन्हाचा कहर वाढतोय ; काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; .

वेध माझा ऑनलाइन
राज्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून काही भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढत असून नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट सांगितली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट नोंदवली गेली. याशिवाय सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी या भागांमध्येही तापमान जवळपास 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
हवामान खात्याने 10 मार्चसाठी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह अकोला, अमरावती आणि वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ञांच्या मते, बिहारपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इराण अमेरिका युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता! ; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत ;

वेध माझा ऑनलाईन।
10 दिवसांपासून संपूर्ण जगाच्या जीवाला घोर लावलेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी तसे संकेत दिले आहेत. इराणविरुद्धचे युद्ध लवकरच संपेल. इस्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु झाल्यापासून इराणमधील 5000 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. आपल्याला काही लोकांना समूळ नष्ट करायचे होते म्हणून आपण हे लहानसे युद्ध केले. आपण या युद्धात अगोदरच अनेक प्रकारे जिंकलो आहोत. मात्र, आपण आवश्यक तितके जिंकलेलो नाही, असेही ट्रम्प  यांनी म्हटले
मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की युद्ध आता जवळजवळ संपले आहे. त्यांनी इराणला पुढील कोणत्याही गैरप्रकारांचा प्रयत्न करण्याविरुद्ध कडक इशाराही दिला. सोमवारी सीबीएस न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युद्ध आता जवळजवळ संपले आहे. दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर लष्करी हल्ला केला. ही संयुक्त लष्करी कारवाई हळूहळू एका मोठ्या संघर्षात रूपांतरित झाली, ज्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देश प्रादेशिक युद्धाच्या उंबरठ्यावर आले. सीबीएस न्यूजच्या पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की संघर्ष आता मोठ्या प्रमाणात संपला आहे.

पुढे बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. ते म्हणाले, "त्यांच्याकडे आता नौदल राहिलेले नाही. त्यांची संपर्क यंत्रणा गेली आहे आणि त्यांची हवाई दल जवळजवळ संपली आहे. त्यांची क्षेपणास्त्र प्रणाली कोलमडली आहे. त्यांचे ड्रोन सर्वत्र पाडले जात आहेत आणि त्यांचे ड्रोन बनवण्याचे कारखाने नष्ट झाले आहेत." ट्रम्प यांनी दावा केला की तेहरानकडे आता लष्करी ताकदीच्या बाबतीत जवळजवळ काहीही शिल्लक नाही. युद्ध सुरू झाले तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, इराणविरुद्ध अमेरिकेची कारवाई किमान चार ते पाच आठवडे चालेल. परंतु सोमवारी त्यांनी सांगितले की अमेरिका त्यांच्या दिलेल्या मुदतीपेक्षा खूप पुढे गेली आहे आणि संघर्ष लवकरच संपू शकतो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणलाही कडक इशारा दिला. त्यांनी म्हटले की इस्लामिक रिपब्लिकने कोणत्याही युक्त्या किंवा नवीन युक्त्या वापरून पाहू नयेत. ट्रम्प म्हणाले, "त्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व वापरले आहे. आता, जर त्यांनी कोणत्याही युक्त्या वापरून पाहिल्या तर त्या देशाचा अंत होईल. जर त्यांनी काही चुकीचे केले तर इराण संपेल आणि त्याचे नाव पुन्हा कधीही ऐकू येणार नाही."
ट्रम्प यांनी असेही म्हटले की होर्मुझची सामुद्रधुनी आता उघडी आहे आणि जहाजे त्यातून जात आहेत. त्यांनी असा दावा केला की अमेरिका या महत्त्वाच्या सागरी मार्गाचा ताबा घेण्याचा विचार करत आहे.

 

साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमध्ये 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण केल्याची धक्कादायक घटना आली समोर ; संबंधित केअरटेकरला अटक; साताऱ्यात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमधील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण, मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित केअरटेकरला अटक केली आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित स्कूलमधील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित केअरटेकरवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याला अटकही करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मुलांचे लैगिंक शोषण आणि मारहाण करून पैसे उकळल्याचे समोर आले.
गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडून हा प्रकार सुरू होता यामुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


इराण युद्ध सुरु ; भारतात अनेक शहरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी ; एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ ;

वेध माझा ऑनलाईन।
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.
अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवले :

मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी लागणाऱ्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते, मात्र आता हे अंतर वाढवून 25 दिवस करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालय यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या बदलामागे मुख्य उद्देश म्हणजे बाजारात होणारी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखणे हा आहे. 
सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सध्या घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला नाही. तरीही भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या नियमामुळे ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 गॅस दरवाढीमुळे वाढला आर्थिक ताण 

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता 913 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी त्याची किंमत 853 रुपये होती. 

इतर शहरांमध्येही दरवाढ दिसून येत आहे. 

मुंबई येथे नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकाता  येथे हा दर 939 रुपये असून चेन्नई मध्ये 14 किलोच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून आता 1,883 रुपये झाली आहे. या बदलांमुळे घरगुती बजेटवर तसेच व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.