Monday, February 23, 2026

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल ; गृह विभागाने लक्ष देण्याची केली मागणी ; चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू असल्याचा केला आरोप ;


वेध माझा ऑनलाइन।
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी दोन गटात जोरदार राडा झाला होता. सध्या यावरून गावात वातावरण चांगलंच तापलं आहे. गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

संजीवनी वाघ जरांगे पाटलांच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगे हेच असे कट रचू शकतात. अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक करून जसा दंगलीचा प्रकार केला, तसाच या ठिकाणी दंगलीचं प्रकरण शिजत आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच  चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू आहे, असा आरोप यावेळी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
  वाघमारे म्हणाले
बुलढाण्याची जी घटना आहे ते एखादं कटकारस्थान आहे का? याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण संजीवनी वाघ जरांगेच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगेच असे कट करू शकतात. जरांगेंची प्रसिद्धी संपलेली आहे, टीआरपी राहिला नाही, लोक येत नाही, समाजातील लोकांनी आता बाजूला केलंय. परंतु गर्दीची सवय आता लागलेली आहे. आम्ही त्या गावांमध्ये नेमकं काय घडलं त्याबद्दल माहिती घेतली आहे. सगळ्या गावाने ठरवलं होतं, फक्त पुतळ्याची जागा बदलायची होती. परंतु मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले. त्यांची भाषा अतिशय चुकीची होती, असं यावेळी वाघमारे यांनी म्हटलं आहे.

जरांगेंच्या डोक्यात फक्त आमचं आणि तुमचंच आहे, असं करून त्यांना फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे. माझी गृह विभागाला विनंती आहे, जरांगे यांचे सीडीआर तपासा, त्या भागातील कोणत्या लोकांसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला, यातून काही कट शिजत होता का? याकडे देखील गृह विभागाने लक्ष दिलं पाहिजे. या कटामध्ये जर मनोज जरांगे पाटलांचा सहभाग असेल तर त्यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा येणारा काळ वाईट असेल, असं वाघमारे यांनी यावेळी म्हटलं आहे.

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांचा सरकारला गंभीर इशारा ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. अजित दादांच्या विमान अपघातानंतर मिळालेला ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता यावरून रोहित पवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 

ब्लॅक बॉक्सच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, 
‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे. अजित पवार यांच्या विषयी दोन दिवसांपूर्वी सिविल एव्हियेशियने स्पष्ट स्वरुपात प्रसिद्धीपत्रक जारी केले असून त्यात माहिती दिली आहे.’ त्यामुळे आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुठे होणार पाऊस...? हवामान विभागाने 23 आणि 24 फ्रेब्रुवारी रोजी राज्यात अनके ठिकाणी पाऊस होण्याची वर्तवली शक्यता !

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील इतरही काही राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
कुठे होणार पाऊस?
हवामान विभागाने 23 तसेच 24 फ्रेब्रुवारी अशा दोन दिवसात राज्यात अने ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पासवाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आज सकाळी उंब्रज येथे घडली धाडसी चोरीची घटना ; सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ किलो चांदीच्या वस्तू लंपास ;

वेध माझा ऑनलाइन
 कराड तालुक्यातील उंब्रज येथे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोरच अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सोन्या-चांदीचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.चोरे रोड परिसरातील ‘श्री वाग्देवी ज्वेलर्स’ चे मालक गणेश यादव (चोरेकर) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला सोनं, चांदी आणि रोकडने भरलेली बॅग लावली होती. त्यांनी दुकानाचं शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता, एका कुलपामध्ये जाणीवपूर्वक ‘मेन’ भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कुलूप उघडण्यास त्यांना विलंब झाला.ते कुलूप उघडण्यात व्यस्त असल्याची संधी साधून, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाला. गणेश यादव यांनी तातडीने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग केला, मात्र चोरटा वेगाने निसटून जाण्यात यशस्वी झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 
लंपास केलेल्या बॅगेत सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ किलो चांदीच्या वस्तू होत्या. या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वान पथकाला पाचारण केलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, संशयित दुचाकीस्वाराचा माग काढला जात आहे.

एकनाथराव उशिरापर्यंत काम करु नका! अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

वेध माझा ऑनलाइन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अजित पवार यांच्या कार्यशैलीचे आणि प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले आहे. शिंदे यांच्या मते, अजित पवार यांनी महाराष्ट्राचा आर्थिक गाडा योग्य प्रकारे सांभाळला. ते प्रत्येक बैठकीत अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करण्याचा सल्ला देत असत. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांचा प्रदीर्घ अनुभव मोलाचा ठरला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.अधिवेशनाच्या काळात अजित पवार सभागृहात पूर्णवेळ थांबायचे  विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे. त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचे आणि कामाच्या गुणवत्तेत ते कधीच तडजोड करत नसत. प्रशासकीय कौशल्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख होती. सामान्य नागरिकांविषयी त्यांना कळकळ होती आणि नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते, असेही शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना अजित पवारांनी उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि तब्येतीची काळजी घेण्याचा वडीलकीचा सल्ला अनेकदा दिला होता.

फडणवीसांचे अजितदादांच्या बाबतीत मोठे विधान ; म्हणाले...राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला.
आज, 23 फेब्रुवारी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अजित दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी अजितदादा जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा काय म्हणाले हे देखील सांगितले आहे.
अजित दादांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांना एखादा निर्णय पटला नाही तर स्पष्ट सांगयचे. मंत्रीमंडळातील प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास दादा करायचे. राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवला. मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दादा मला मुख्यमंत्री बोलायचे. 12 वाजता कार्यक्रम असेल तर दादा 11.59ला हजर असायचे
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला एक जो चांगला मुख्यमंत्री मिळाला असता तो अजित दादांच्या रुपाने. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं असतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणीतं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व अजित दादांचे होते. खरं तर मी असं म्हणेल की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत अनेक दादा आहेत, सगळ्याच दादांनी चांगले काम केले. पण महाराष्ट्रामध्ये वसंत दादा आणि अजित दादा ही दोन नाव अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता याठिकाणी लक्षात ठेवेल.
बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहातो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे कोणत्याही नेत्याकरीता त्यापेक्षा मोठा दुसराही ठेवा असू शकत नाही” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता...जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मोठी शंका ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात अशी शंका अनेकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका व्यक्त केली आहे.आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अजित पवारांच्या विमान अपघातांच्या मुद्द्यावर गाजणार आहे. आता याच मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती. त्या विमानाने ५००० तासापेक्षा जास्त उडू नये, असे असतानाही ते विमान ८ हजारपेक्षा जास्त उडून झालं होतं, असा धक्कादायक खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केला.