वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिणमधील सुमारे २५ गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. आ.डॉ. भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाकुर्डे योजना येत्या काळात सोलर फिडरवर आणण्याची घोषणा सभागृहात केली.
दरम्यान वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळच्या सत्रातील कामकाजावेळी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे राज्याचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत असून, या योजनेला १९ डिसेंबर १९९८ रोजी मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये पहिली सुधारित मान्यता, तर २०२१ मध्ये दुसरी सुधारित मान्यता शासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत या योजनेवर सुमारे १,३४९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या योजनेमुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कराड तालुक्यातील सुमारे २५ गावांतील हजारो ग्रामस्थ शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वाकुर्डे योजनेवर अवलंबून आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने, हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
या योजनेतील विजेच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ८१-१९ टक्क्यांचे सूत्र लागू करुन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ज्यामध्ये वीज बिलातील ८१ टक्के खर्च शासनाकडून आणि १९ टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरण्याची व्यवस्था केली. मात्र १९ टक्के हा खर्चदेखील अनेक लहान व गरीब शेतकऱ्यांना पेलवणे कठीण जाते. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांच्या वीज बिलातील काही हिस्सा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरला जात असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले.
या योजनेसाठी एकूण १६.३३ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, १४ पंपांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याचे धोरण लक्षात घेता, वाकुर्डे उपसा सिंचन योजना सोलर फीडर आणावी, अशी आग्रही मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. ही योजना सोलर फिडरवर आणल्यास विजेवरील खर्च कमी होऊन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडलेल्या या लक्षवेधीची तत्काळ दखल घेत, याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्व वीजपंप सोलरवर आणण्याचे धोरण घेत असल्याचे सांगितले. तसेच येत्या काळात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्याची घोषणा करत, त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही भार पडणार नसल्याची ग्वाही दिली.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे व भाजपा- महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
चौकट
४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ
वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात २८ हजार हेक्टर क्षेत्र येते. तसेच येत्या काळात शासनाच्या प्रस्तावित शिराळा उपसा जलसिंचन योजनेत १३ हजार हेक्टर लाभक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.