Saturday, April 25, 2026

आमदार रोहित पवार व युवा नेते सौरभ पाटील यांची कराडात अचानक भेट...एकत्र येत खाल्ली मिसळ ...काय म्हणाले रोहित पवार?

वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना कराडमध्ये आमदार रोहित पवार येणार असल्याचा अचानक फोन आला...ते पुण्याहून कराडात आले...थांबले... त्यांनी येथे येऊन मिसळ देखील खाल्ली... आणि ते पुढे कोल्हापूरला निघून गेले...    

काय आहे नेमकी बातमी?

काल शुक्रवारी दुपारी अचानक कराडचे माजी नगरसेवक  सौरभ पाटील यांना आमदार रोहित पवार कराडमध्ये येणार असल्याचा फोन आला... वेळ दुपारची... म्हणजे...जेवायचीच वेळ...त्यामुळे रोहित पवार यांनी सौरभ पाटील यांना मिसळ खायची इच्छा व्यक्त केली... मग, ...दत्त चौकातील एका हॉटेलमध्ये सौरभ तात्यांनी त्यांना मिसळ खाण्यासाठी आमंत्रण दिले... ...आमदार रोहित पवार आणि युवा नेते सौरभतात्या या दोघांसह कराडचे नगरसेवक अल्ताफ शिकलगार, उद्योजक तनय जाधव, सामाजिक कार्यकर्ते समीर कुडची राकेश शाह जीवन पाटील तसेच काही कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत मिसळीचा आस्वाद घेतला...

सौरभतात्यांसारखा उमदा अभ्यासू दिलदार युवक आपल्याबरोबर राजकीय प्रवाहात सक्रिय असावा...अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांनी कराडमध्ये चालू असणाऱ्या एकूणच राजकीय घडामोडी जाणून घेतल्या...  निवांत तुमच्याकडे येईन त्यावेळी भेटून बोलू, असे सांगत... त्यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले...
आमदार रोहित पवार व कराडचे युवा नेते सौरभ पाटील यांच्या या कराडमध्ये झालेल्या अचानक भेटीची चर्चा शहर व परिसरात आजही जोरदार सुरू आहे...

Friday, April 24, 2026

दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला; आम आदमी पक्षात मोठी फूट ; केजरीवाल यांना मोठा धक्का ;

वेध माझा ऑनलाईन।
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपच्या त्या सातही खासदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली आहे.

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक तसेच एकूण सात खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा यांनी तशी माहिती दिली आहे. या अपडेटनंतर आपचे ७ खासदार भाजप अध्यक्ष नीतीन नबीन यांना भेटण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद चालू होते. पक्षाच्या धोरणांबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल 28 रुपयांनी महागणार ? सोशल मीडियावर चर्चा!

वेध माझा ऑनलाईन
आज, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असतानाही, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही मोठी दरवाढ केलेली नाही. ब्रेंट क्रूड ऑईलने प्रति बॅरल १०३ डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे इंधन दरवाढीची भीती व्यक्त केली जात होती, मात्र तूर्तास भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल २८ रुपयांनी महागणार?

सोशल मीडियावर सध्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २५ ते २८ रुपयांची प्रचंड वाढ होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

हवामान विभागाचे राज्यासाठी दोन भिन्न प्रकारचे यलो अलर्ट जारी ;

वेध माझा ऑनलाईन।
सध्या संपूर्ण राज्यामध्ये निसर्गाचे एक अत्यंत दुर्मिळ आणि विसंगत रूप पाहायला मिळत आहे. एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी कडक उन्हे तापत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. हवामान खात्याने नागरिकांना या बदलत्या आणि अत्यंत विचित्र हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यासाठी दोन भिन्न प्रकारचे यलो अलर्ट जारी केले आहेत. त्यानुसार, कोकण आणि विदर्भ  प्रांतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. याउलट, मराठवाडा विभागात मात्र वादळी वाऱ्यांसह आणि भयंकर गारपिटीसह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. आगामी तीन तासांसाठी प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला असून, यादरम्यान आकाशात विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वेगवान वारे वाहतील. या पार्श्वभूमीवर, अत्यंत तातडीचे काम असल्याशिवाय दुपारी  घराबाहेर पडू नये, असा सक्त सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

1 मे पासून पैसे काढण्याच्या नियमात बदल ;

वेध माझा ऑनलाईन।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक अतिशय आनंददायी आणि क्रांतिकारी बातमी आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी करावी लागणारी अनेक दिवसांची प्रतीक्षा आता कायमची संपणार आहे. आगामी १ मे २०२६ पासून खातेदारांना त्यांच्या हक्काची रक्कम थेट यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून त्वरित स्वतःच्या बँक खात्यात वळती करण्याची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे.
सध्याच्या प्रचलित प्रक्रियेनुसार, सदस्यांना त्यांचे पीएफचे पैसे हातात मिळण्यासाठी किमान ७ ते १५ दिवसांचा प्रदीर्घ कालावधी लागतो. मात्र, आता नवीन यूपीआय पेमेंट पद्धतीच्या समावेशामुळे हे काम अत्यंत वेगाने पार पडेल. विशेषतः वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही तातडीच्या प्रसंगी कामगारांना अगदी काही तासांतच त्यांची हक्काची रक्कम उपलब्ध करून देणे, हा या महत्त्वपूर्ण बदलामागचा सरकारचा मुख्य हेतू आहे.
नव्या सुविधेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दररोज पैसे काढण्यावर काही विशिष्ट मर्यादा लागू केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, शिक्षण किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासारख्या तातडीच्या कारणांसाठी सदस्य ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा आगाऊ निधी यूपीआयचा वापर करून लगेचच काढू शकतील. यामुळे अत्यंत निकडीच्या वेळी पैशांची तत्काळ सोय होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

बीडच्या तरुंगातील कैद्यांचे वाल्मिक कराड बाबतचे "ते' संभाषण व्हायरल;

वेध माझा ऑनलाईन।
 गेल्या काही दिवसांपासून बीडच्या  तरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलेच व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असंही तोच म्हणत आहे. आता, बीड कारागृहातील कैदी सनी आठवलेची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.  

बीड कारागृहात कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा असल्याचे त्याने म्हटले. तसेच, अजहर पठाणवर दबाव आणत आहेत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे, असेही तो सांगतो. या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंगमधून केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप ; खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी;सुनेत्रा पवार राज्यभर फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार ;

वेध माझा ऑनलाईन
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह पक्षातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांची सूत्रं आणि अधिकार स्वत:च्या हाती घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहतील.  खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल. तर अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी असेल. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बाजुला सारुन पक्षाची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी भविष्यात कोणताही दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेतला असू शकतो, अशी चर्चा आहे