वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट निर्माण होत असून, सभासदांनी अर्चनाताई मोहिते यांना चेअरमनपदी निवडून देत नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. बोरगाव येथे कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी अर्चनाताई मोहिते, माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील, उमेदवार महेश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, २०१५ च्या निवडणुकीत प्रशासनाचा प्रभाव पडला नसता तर संस्थापक पॅनेलचा विजय निश्चित होता. सध्या विविध राजकीय पक्ष व गट एकत्र येत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये परिवर्तनाची भीती निर्माण झाल्याचे दिसून येते. अर्चनाताई मोहिते या सक्षम महिला नेतृत्व असून त्यांना संधी देण्याची वेळ आता आली आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्यांनी महिला उमेदवाराला बिनविरोध संधी द्यायला हवी होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली. कृष्णा कारखाना आणि विधान परिषद निवडणुकीचे निकाल सातारा-सांगलीच्या राजकीय ताकदीचा संदेश राज्यभर पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्चनाताई मोहिते यांनी सभासदांना भावनिक साद घालत आपण सामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्री म्हणून त्यांच्यासमोर उभे असल्याचे सांगितले. कारखान्याची आर्थिक व सहकारी परंपरा मजबूत ठेवण्यासाठी न्याय्य व पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या पाच वर्षांच्या कामकाजाची तुलना सध्याच्या अकरा वर्षांच्या कारभाराशी करण्याचे आवाहन केले. सभासदांसाठी दरवर्षी १२० किलो मोफत साखर, एकरी ७५०० रुपये पाणीपट्टी, ऊस बियाणे उपलब्धता, मयत सभासदांच्या शेअर्सचे जलद हस्तांतरण, बैठी पाणीपट्टी माफी आणि एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर देण्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.
बंडानाना जगताप यांनी कृष्णा कारखान्यावरील कर्जाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राजारामबापू समूहाने विविध संस्था उभारल्या असताना कृष्णा कारखान्यावर मोठे कर्ज का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच जयवंत शुगर कारखान्याचे उदाहरण देत विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वाती मदने यांनी ही निवडणूक जनशक्ती आणि धनशक्ती यांच्यातील संघर्ष असल्याचे सांगितले. बालाजी जगताप यांनी महिला चेअरमन निवडून देण्याची ऐतिहासिक संधी सभासदांसमोर असल्याचे नमूद केले. प्रमोद पाटील यांनी सभासदांमध्ये वाढत्या असंतोषाचा उल्लेख केला, तर सचिन कदम यांनी जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार महेश पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच लवंडमाची परिसरातील अनेक सभासदांनी पॅनेलमध्ये प्रवेश केला.
यावेळी उदय शिंदे यांनी कारखान्याच्या कारभारावर टीका करत सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच जयंतराव पाटील यांनी उघड पाठिंबा दिला नसला तरी त्यांची भूमिका सभासदांना समजल्याचे सूचक वक्तव्य केले. आगामी राजकीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू वाळवा तालुका ठरेल, असा दावा त्यांनी केला.
महेश पवार यांनी वाळवा तालुक्यातील सभासद मतदानातून परिवर्तन घडवून आणतील आणि कारखान्यातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त केला.