Friday, July 10, 2026

कराड शहरातील रस्ते, स्वच्छता आणि रखडलेल्या विकासकामांवर भाजपचे नगरसेवक आक्रमक; तोडगा न निघाल्यास पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांचे वर्क ऑर्डरही निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा गाड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के तसेच अतुल शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामालाही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कामांसाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीएलओ संदर्भातील कॅम्पबाबत प्रश्न उपस्थित केला. राजकीय नेत्यांना अशा प्रकारचे कॅम्प घेण्यास परवानगी नसताना काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्प आयोजित केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या कॅम्पला परवानगी नसून, असे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.


प्रितीसंगम बागेतील अव्यवस्थेचाही मुद्दा बैठकीत गाजला. नगरसेवक अजय पावसकर यांनी बागेत गाढवे फिरत असल्याची बाब उपस्थित करत मंदिर परिसरात खाद्यपदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. तसेच शहरातील तीनही बागांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढवे फिरल्याच्या घटनेबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी एकमुखी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.

नगरसेवक आशुतोष डुबल यांनी मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याची मागणी केली.

नगरसेवक शिवाजी पवार आक्रमक ; 
नगरसेवक शिवाजी पवार हे यावेळी आक्रमक झाले त्यांनी बैलबाजार रोडच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून ८ एप्रिल २०२६ रोजी कामाचे वर्क ऑर्डरही देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन व केबल टाकण्याच्या कारणामुळे काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कंपन्यांसोबत बैठक घेण्याची मागणी
बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यास नेमका विलंब का होत आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे कराड शहरातील विकासकामे रखडत असतील तर त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला. येत्या आठवड्यात बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी न लावल्यास पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिला.

Thursday, July 9, 2026

'वेध माझा'च्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाची चौकशी सुरू ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश

वेध माझा ऑनलाईन 
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवसांपासून हिरवा-निळा होत असल्याच्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर वेध माझाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनाची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा प्रश्न थेट राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा-निळा का झाला? त्यामागील नेमके कारण काय आहे? नदीचे पाणी सुरक्षित आहे का? प्रदूषणामुळे हा बदल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वेध माझाने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती.
या वृत्तांची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आणि सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा-निळा होण्यामागील नेमके वैज्ञानिक कारण आता अधिकृतपणे स्पष्ट होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ रंगबदल म्हणून न पाहता पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय शासन स्तरावर पोहोचवल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आता अधिकृत तपासणी अहवालातून वस्तुस्थिती समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.

वेध माझाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे अखेर शासन यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, आता तपासणी अहवालात काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Wednesday, July 8, 2026

फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा वीजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना : एकमेकांना वाचवताना झाला मृत्यू!

वेध माझा ऑनलाईन।
- फलटण तालुक्यातील खामगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना विजेचा धक्का लागून कुटुंबातील चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीसानी दिली 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे यांना शॉक लागला. ही बाब लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आणि मुलांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड ; वाळवा तालुक्यातील जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष


वेध माझा ऑनलाईन ।
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कृष्णा कारखाना कार्यस्थळावर आज (बुधवारी) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेवेळी चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक जगदीश जगताप हे सूचक; तर संचालक दयानंद पाटील अनुमोदक होते. तसेच  व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांनी दाखल केलेल्या अर्जासाठी संचालक सुनील पाटील हे सूचक; तर संचालक सत्यजीत पाटील हे अनुमोदक होते. यानंतर सर्वानुमते चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात सभासदांनी सलग तिसऱ्यांदा संधी देत आमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. येत्या ५ वर्षात अधिकाधिक ऊसदर देण्यासाठी आणि चांगल्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कृष्णा कारखान्याला राज्यातील पथदर्शी आदर्श कारखाना घडविण्याचा आमचा संकल्प असून, यासाठी सभासदांची आम्हाला निश्चित साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, आनंदा खबाले, अरविंद पाटील, बाजीराव थोरात, छबन कांबळे, दत्तात्रय देसाई, संभाजीराव पाटील, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, संग्राम पाटील, बाबासो शिंदे, अविनाश खरात, बाजीराव निकम, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आप्पासाहेबांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ अशी सलग २८ वर्षे कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनीही १९९९ ते २००५ अशी ६ वर्षे आणि २०१५ ते २०२६ अशी ११ वर्षे असे एकूण १७ वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. त्यानंतर आता २०२६ ते २०३१ या ५ वर्षांसाठी त्यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यामुळे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा, तसेच सर्वाधिक वेळा चेअरमनपदी निवड होण्याचा मान डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होण्याची ऐतिहासिक हॅट्रिकही त्यांनी साधली आहे.


Monday, July 6, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य का दडवल जातंय? कराड दक्षिण आणि उत्तरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजूनही गप्प का? याप्रकरणी 'वेध माझा' चा पाठपुरावा सुरूच राहील ;कारण हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवस निळसर-हिरवा होत असताना आता पावसामुळे नदी गढूळ होऊन प्रदूषण अधिकच वाढेल की काय अशी भीती आहे? दरम्यान संबंधित यंत्रणांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की सत्य दडपण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आणि कराड उत्तर आणि दक्षिण चे लोकप्रतिनिधी अजूनही याविषयी गप्प का आहेत... हाही जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे...

या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या 'वेध माझा' मुळे हा विषय लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला असून, प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांच्या मते, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीशी आणि पर्यावरणाशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागांचे मौन अत्यंत संशयास्पद आहे. पाण्याचे नमुने नमुने घेतले का ? ते  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले का? अहवाल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो जनतेपासून का लपवला जात आहे? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
'वेध माझा' ने सातत्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून हा विषय जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहणारा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. "हा पाठपुरावा थांबवू नका; सत्य बाहेर येईपर्यंत आवाज उठवत राहा," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवून अहवाल प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे, अशी भूमिका पुढे येत आहे.

याशिवाय, हजारो नागरिकांच्या सहभागातून सही मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता जनआंदोलनात रूपांतरित करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
स्थानिक महाविद्यालये, पर्यावरण अभ्यासक आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी होत आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र परीक्षणाची तुलना झाल्यास सत्य अधिक स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.

प्रशासनाला थेट सवाल...
पाण्याचा रंग बदलून अनेक दिवस झाले, तरी अधिकृत अहवाल का नाही?
पाण्याचे नमुने तपासले की नाही?
तपासणी झाली असेल तर निष्कर्ष जनतेपासून लपवले का जात आहेत?
नदी प्रदूषित नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे सांगण्यास का टाळाटाळ करत आहे?
आणि प्रदूषण झाले असेल, तर जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत नागरिक शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

'वेध माझा'चा निर्धार
कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य, अधिकृत तपासणी अहवाल आणि जबाबदारांवरील कारवाई जनतेसमोर येईपर्यंत 'वेध माझा' चा पाठपुरावा आणखी तीव्रपणे सुरू राहील. 
कारण हा केवळ एका नदीचा प्रश्न नाही तर हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

कोयना धरणात एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीने वाढला ; मुसळधार सुरूच ! या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण ;

वेध माझा ऑनलाईन।
झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन सुरळित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून एक तुकडी कराडमध्ये दाखल झाली आहे.दरम्यान पश्चिम घाटमाथ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं पाच तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आजदेखील सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे.

Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.