Thursday, July 2, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे गूढ कायम; तपासणी अहवाल कुठे अडकला?अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून मौन; कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार का? परिसरात जोरदार चर्चा सुरू..

वेध माझा ऑनलाईन
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले आहेत. या काळात नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'नेही या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आजतागायत संबंधित विभागांकडून तपासणीचा अधिकृत अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अहवालाचे नेमके काय झाले, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला हा मुद्दा मांडणार का? ही चर्चा देखील परिसरात जोरदार सुरू आहे

सध्या पावसाळा सुरू असून नदीत गढूळ पाण्याचा प्रवाह वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते अशा काळात नदीत वाहून येणारे सांडपाणी, रासायनिक घटक किंवा इतर प्रदूषक मिसळल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी होणे अत्यावश्यक असताना संबंधित यंत्रणांची शांत भूमिका नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे.
कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. शेती, पशुपालन आणि विविध उद्योगही या नदीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या रंगबदलाचे कारण तातडीने शोधून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप अधिकृत निष्कर्ष जाहीर न झाल्याने प्रश्न अनुत्तरितच आहेत.

नदीकाठच्या काही भागांमध्ये आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. हा रंगबदल नैसर्गिक कारणांमुळे आहे की शैवालांची वाढ, रासायनिक प्रदूषण अथवा सांडपाण्यामुळे झाला आहे, याबाबत अधिकृत खुलासा नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब लक्षवेधी ठरत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयावर कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अद्याप ठोस सार्वजनिक भूमिका घेतलेली दिसून आलेली नाही. प्रशासनाकडून तपासणी अहवाल तातडीने जाहीर करण्यासाठी किंवा संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबतही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून संपूर्ण अहवाल जनतेसमोर ठेवावा. जर पाण्याची गुणवत्ता सुरक्षित असेल तर ते स्पष्ट करावे आणि प्रदूषण आढळल्यास त्यामागील कारणांसह जबाबदारांवर कारवाई करावी.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे—कृष्णा नदीच्या रंगबदलाचा तपास पूर्ण झाला आहे का? झाला असेल तर अहवाल सार्वजनिक का केला जात नाही? आणि झाला नसेल तर इतक्या संवेदनशील विषयात झालेल्या विलंबाला जबाबदार कोण? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांच्या मनातील संशय कायम राहणार, हे निश्चित आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा 'वेध माझा'  सातत्याने पाठपुरावा करणार असून, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे

Wednesday, July 1, 2026

कराड परिसरातील नागरिकांच्या संयमाची परीक्षा :पावसाळ्यात प्रदूषणाचा धोका वाढण्याची भीती; प्रशासनासह कराड दक्षिण - उत्तरचे लोकप्रतिनिधी अजूनही गप्प का ? ; कृष्णा नदीच्या रंगबदलाचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले असतानाही संबंधित यंत्रणांकडून अद्याप तपासणीचा अधिकृत अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण, त्याचा पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका कधी मांडली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, या विषयाचा 'वेध माझा' सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने नदीत गढूळ पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अशा परिस्थितीत नदीतील संभाव्य प्रदूषणाचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यासोबत विविध नाले, सांडपाणी आणि इतर घटक नदीत मिसळत असल्याने जलगुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. याच नदीवर शेती, पशुपालन आणि विविध उद्योग अवलंबून असल्याने या प्रश्नाकडे केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, नदीकाठच्या काही भागांमध्ये आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मात्र या रंगबदलामागे शैवालांची वाढ, रासायनिक प्रदूषण, सांडपाणी की अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अफवा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडून अद्याप ठोस भूमिका मांडण्यात आलेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या नदीच्या पाण्याचे नमुने तपासून सविस्तर वैज्ञानिक अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, तसेच आवश्यक असल्यास नागरिकांसाठी सावधगिरीच्या सूचना जारी कराव्यात, अशी मागणी पुन्हा केली आहे.
कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण, त्याचा पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका कधी मांडली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, या विषयाचा 'वेध माझा' सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

दरम्यान नदीच्या प्रश्नावर प्रशासनाकडून तातडीने उत्तरदायित्व निश्चित करून तपासणी अहवाल जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरउपशीर्षक :अनेक दिवस उलटूनही तपासणी अहवाल गुलदस्त्यात; 'वेध माझा'चा पाठपुरावा कायम

वेध माझा ऑनलाईन ।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले तरी संबंधित यंत्रणांकडून अद्याप कोणताही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या गढूळ पाणी पाण्यातील प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरण्याची शक्यता बोलली जात आहे तरीही या प्रकाराबाबत कराड दक्षिण आणि उत्तरच्या आमदारांचे मौन असणे ही बाब सध्या चर्चेत आहे

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. याच नदीवर शेती, पशुपालन आणि विविध उद्योगही अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्यानंतर तातडीने वैज्ञानिक तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जनतेसमोर येणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
नदीकाठच्या अनेक भागांत आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी पाणी निळसर-हिरव्या रंगाचे दिसत असल्याने जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण किंवा सांडपाण्याचा परिणाम अशा विविध शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र यापैकी नेमके कारण कोणते, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही.
विशेष म्हणजे, हा विषय सातत्याने चर्चेत असतानाही संबंधित विभागांकडून संयुक्त पाहणी, जनजागृती किंवा नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींनीही या विषयावर ठोस भूमिका घेऊन प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, तसेच नदीतील रंगबदलामागील नेमके कारण जाहीर करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर विषयाचा 'वेध माझा'कडून सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते आणि तपासणी अहवाल कधी जाहीर होतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

आज रविवारची बातमी🙏

Tuesday, June 30, 2026

शासनाकडून कराड नगरपरिषदेला जेटिंग मशीन व फायर व्हेईकलची भेट; नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

वेध माझा ऑनलाईन  : 
शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कराड नगरपरिषदेला शासनाकडून जेटिंग मशीन व लहान आकाराचे फायर व्हेईकल अशी दोन महत्त्वाची वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले की, शहरातील भुयारी गटारांची प्रभावी स्वच्छता करण्यासाठी नव्याने प्राप्त झालेली जेटिंग मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनची क्षमता ८ हजार लिटर असून तिची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. तसेच लहान रस्ते, बोळ आणि अरुंद भागांमध्ये आग लागल्यास तातडीने पोहोचून आग विझवण्यासाठी नव्याने मिळालेले फायर व्हेईकल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या वाहनाची किंमतही सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय भविष्यात ३ हजार लिटर क्षमतेची आणखी एक जेटिंग मशीन तसेच मोठ्या क्षमतेचे फायर व्हेईकलही नगरपरिषदेला उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी ही दोन्ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वासही नगराध्यक्ष यादव यांनी व्यक्त केला.
लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, June 28, 2026

राज्यात पुन्हा होणार राजकीय खळबळ!आता फुटणार 24 आमदार ?

वेध माझा ऑनलाईन -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडका सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती,  या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं

दरम्यान त्यानंतरची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते,  या आमदारांच्या मनात नक्की काय आहे?हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज आहेत,  स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू,  24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची नाराजी काय आहे ते जाणून घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Saturday, June 27, 2026

कराड उत्तरला 286 कोटींचा विकासनिधी मंजूर रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड काँक्रीट रस्त्याला ऐतिहासिक मंजुरी ;

वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल 286 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या या निधीमुळे कराड उत्तरमधील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सदर रस्ता काँक्रीट झाल्याने स्थानिक नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पाठपुरावा यशस्वी

कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.याबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातील दळणवळण वेगवान व्हावे, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. 286 कोटींच्या निधीमुळे कराड उत्तरच्या विकासाला नवी दिशा मिळेल.” तसेच उर्वरित रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्नशील आहेया काँक्रीट रस्त्यामुळे वेळेची बचत होणार असून अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी माल बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचल्याने शेतकण्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे.कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून यापुढेही विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;


वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झालीच तर त्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली
तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याचे चित्र आहे.
कृष्णा नदी ही नागरिकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने या पाण्याची तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु याबाबतची अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केलेली नाही 
त्यामुळे वेध-माझा ने हा विषय उचलून धरला आहे...
दरम्यान या संपूर्ण विषयावर बोलताना नगराध्यक्ष यादव यांनी कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते
त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही याबाबत बोलताना दिली आहे