वेध माझा ऑनलाईन।
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी आतापर्यंत 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. ईकेवयासी योजनेनंतर लाखो महिलांना योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्याने आता केवळ 1 कोटी 66 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र यावरून आताविरोधकांनी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं असून लाखो लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. आधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी लाजकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
X या सोशल मीडिया अकाऊंटवरून जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे असं जयंत पाटील म्हणाले.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहेशासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.