Wednesday, February 25, 2026

आमदार डॉ अतुलबाबांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहासमोर मांडत वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष :

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या पायथ्याशी नवीन रिटेन्ड बंधारा उभारण्याचे गेली ४१ वर्षे सुरु आहे. आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. दरम्यान, या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित २० टक्के कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत अधोरेखित केली. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशात राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. तालिका अध्यक्षपदी आ. समाधान आवताडे होते. 

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आ.डॉ. भोसले यांनी राज्य सरकारच्या प्रगतीशील वाटचालीचे कौतुक करत, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहासमोर मांडत, या प्रश्नांकडे राज्याचे लक्ष वेधून घेतले. 

आ. डॉ. भोसले म्हणाले, कराड तालुक्यात १८६७ साली ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला खोडशी बंधारा आजही कार्यरत आहे. हा बंधारा कृष्णा नदी परिसरात असून त्याच्याशी संलग्न ८७ किलोमीटर लांबीचा कृष्णा कालवा कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांना पाणीपुरवठा करतो. या कालव्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांची शेती हिरवीगार राहते. या बंधाऱ्याच्या पायथ्याशी १९८५ साली नवीन रिटेन्ड बंधारा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या ४१ वर्षांच्या कालावधीत याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवल्यास सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास 
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून कराडची ओळख आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, औद्योगिक मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील दैनंदिन ये-जा यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाढले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र ‘नेकलेस रोड’ची मागणी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुन्हा एकदा सभागृहासमोर आग्रहाने मांडली. याअंतर्गत कृष्णा–कोयना प्रीतिसंगम परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास, पूरसंरक्षण भिंत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पांना तातडीने प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी देण्याची आग्रही मांडणी त्यांनी केली. या प्रकल्पांमुळे केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर शहरातील व्यवसाय वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि कराडची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येवती-म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनवर भर
येवती-म्हासोली मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचा उल्लेख करत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले की, या योजनेतून पाण्याची विल्हेवाट योग्यप्रकारे होत नाही. पर्यायाने शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर बंदिस्त पाईपलाईन व्यवस्था राबविणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, यामुळे पाण्याची गळती जवळपास शून्यावर येईल. शेवटच्या शेतापर्यंत समान दाबाने पाणी पोहोचेल, वितरणावर नियंत्रण राहील तसेच विजेचा व देखभालीचा खर्च कमी होईल. या प्रकल्पासाठी बंदिस्त पाईपलाईन योजनेस तातडीने मान्यता देऊन टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

मलकापूर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत पूर्ण करण्याची मागणी
मलकापूर शहरातील अपूर्ण प्रशासकीय इमारतीचा प्रश्न कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभागृहात उपस्थित केला. गेली सात वर्षे निधीअभावी ही इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. अत्यल्प आणि किरकोळ काम बाकी असताना केवळ निधीअभावी हा प्रकल्प रखडलेला आहे, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. हा निधी तातडीने उपलब्ध झाल्यास मलकापूर शहराला एक सुसज्ज प्रशासकीय मुख्यालय मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत राहिल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि पारदर्शक बनेल. ही इमारत पूर्ण करताना या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तसेच हरित पट्टा व सुशोभीकरण करण्याचा प्रस्तावही त्यांनी सुचवला.

१० हजार घरांना सूर्यघर योजनेचा लाभ मिळवून देणार
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीबाबत आग्रही मांडणी करताना आ.डॉ. भोसले म्हणाले, कराड दक्षिणमध्ये आतापर्यंत १००० घरांवर ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ ते ३ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवण्याची सुविधा असून, शासनाकडून १ किलोवॅटसाठी सुमारे २६ हजार आणि ३ किलोवॅटसाठी सुमारे ७८ हजार इतके अनुदान दिले जाते. सुरुवातीला नागरिकांना यासाठी १.७० ते १.८० लाखांपर्यंत खर्च येत होता. पण आम्ही आमच्या मतदारसंघात पुढाकार घेऊन, बँकेची हमी उपलब्ध करून देत ३ किलोवॅट संचाची किंमत १.०५ लाखांपर्यंत खाली आणली. ज्यामुळे शासनाच्या ७८ हजार रुपयांच्या अनुदानानंतर नागरिकांना फक्त २७ हजार रुपयांत या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले असून, या उपक्रमामुळे अनेक घरांचे वीजबिल शून्यावर आले आहे. कराड दक्षिणमध्ये येत्या वर्षभरात १० हजार घरांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे आ.डॉ. भोसले सांगितले. 

अतुलबाबांची आणखी महत्वाची मागणी;
सोलर पॅनल बसविण्यासाठी अलीकडील शासन निर्णयानुसार “जितकी गरज तितकाच किलोवॅट” अशी अट घालण्यात आल्याचे आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पूर्वी ३ किलोवॅटपर्यंत परवानगी असल्याने भविष्यातील वाढती वीज गरज लक्षात घेऊन नागरिक जास्त क्षमतेचा संच बसवत होते. नवीन नियमामुळे भविष्यात अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ३ किलोवॅटपर्यंतचा पूर्वीचा पर्याय कायम ठेवण्यासाठी शासनाने सकारात्मक पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.


बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड : अजित पवार यांच्या निधनानंतर आता होणार पोटनिवडणूक : या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर : काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. दीर्घकाळ मतदारसंघाचे नेतृत्व करणारे अजित पवार यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक होणार असून, या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळेच बारामतीतून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचे म्हणणे आहे.
बारामती मतदारसंघ हा अनेक वर्षे अजित पवार  यांच्या नेतृत्वाखाली राहिला. त्यांच्या काळात विविध विकासकामे झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या पोटनिवडणुकीबाबत आणखी एक मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. प्रारूप मतदारयादी 10 मार्च रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष लढत होणार की बिनविरोध पार पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काही दिवसांत बारामतीच्या राजकारणात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात बँका एकूण किती दिवस राहणार बंद ? ; काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन।

आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या उंबरठ्यावर असताना मार्च महिना काही दिवसांवर आला आहे. या काळात बँकांमध्ये व्यवहारांची मोठी गर्दी असते. मात्र सण आणि सार्वजनिक उत्सवांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक कामांचे नियोजन आधीच करणे आवश्यक ठरणार आहे.

 RBI ने जाहीर केलेल्या अधिकृत कॅलेंडरनुसार मार्च 2026 मध्ये विविध राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नसून स्थानिक सणांनुसार बदलतात. काही दिवशी देशभर बँका बंद राहतील, तर काही ठिकाणीच कामकाज थांबेल. 1 मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 2 मार्चला होलिका दहनानिमित्त अनेक राज्यांत कामकाज बंद राहील, तर 3 मार्चला धुलिवंदनामुळे व्यवहार होणार नाहीत. 4 मार्चला होळीच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्ली, चंदीगड, कानपूर आणि अहमदाबादसह काही शहरांमध्ये बँका बंद असतील. 13 मार्चला चपचार कुटमुळे ऐझवालमध्ये सुट्टी जाहीर आहे.17 मार्चला शब-ए-कद्र निमित्त काही राज्यांत बँक सेवा उपलब्ध राहणार नाही. 19 मार्चला गुढीपाडवा, तेलगू नववर्ष आणि पहिली नवरात्री असल्याने महाराष्ट्र, नागपूर, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे बँका बंद राहतील. 20 मार्चला ईद-उल-फित्र (रमजान) आणि जुमात-उल-विदा निमित्त जम्मू, श्रीनगर आणि केरळमध्ये सुट्टी असेल. 21 मार्चला रमजान-ईदनिमित्त देशभर सुट्टी असण्याची शक्यता वर्तवली आहे. 26 मार्चला रामनवमीमुळे अनेक राज्यांत कामकाज थांबेल, तर 27 मार्चला रामनवमीच्या उत्तरार्धात भोपाळ, पाटणा आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद असतील. 31 मार्चला महावीर जयंतीनिमित्त नवी दिल्ली, मुंबई (बेलापूर), जयपूर आणि कानपूर येथे बँका बंद राहतील.

आरबीआयच्या नियमांनुसार सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यात लागू होत नाहीत. स्थानिक सणांनुसार सुट्टीची अंमलबजावणी केली जाते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टनुसार या सुट्टीच्या दिवशी चेक क्लिअरिंग, ओव्हर-द-काउंटर व्यवहार, रोख रक्कम भरणे किंवा काढणे यांसारखी कामे करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे . शाखा बंद असल्या तरी डिजिटल सेवा सुरळीत सुरू राहतील. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि यूपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करता येईल. बँकेचे अधिकृत अॅप नेहमीप्रमाणे कार्यरत असेल. रोख रकमेची गरज असल्यास एटीएममधून पैसे काढता येतील, तसेच सीडीएमच्या माध्यमातून रोख जमा करता येईल. कोणत्याही अनपेक्षित बदलांसाठी बँकेकडून येणाऱ्या सूचनांवर आणि संदेशांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

उद्योगपती अनिल अंबानींना ईडी चा झटका ; 3 हजार कोटीचे घर केले जप्त ;

वेध माझा ऑनलाईन।
मुंबईतून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानावर ईडीने कारवाई केली आहे. ‘Abode’ नावाच्या आलिशान घरावर तात्पुरती जप्तीची प्रक्रिया राबवण्यात आली असून, या मालमत्तेची किंमत हजारो कोटींमध्ये असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार या संपत्तीचे अंदाजित मूल्य सुमारे 3,716 कोटी रुपये आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासाच्या अनुषंगाने करण्यात आल्याचे सांगितले जाते.
ईडीच्या माहितीनुसार, अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहाशी संबंधित कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई झाली आहे. संबंधित प्रकरणांच्या तपासाचा भाग म्हणून विविध मालमत्तांवर ही प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईपूर्वी सोमवारी मुंबई हाय कोर्ट नेही संबंधित प्रकरणात महत्त्वाचा आदेश दिला होता. न्यायालयाने एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला अंतरिम आदेश रद्द केला. यापूर्वी  च्या बँक खात्यांना ‘फसवे’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

मात्र उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर ती स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना पुढील कारवाईसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे उद्योगक्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील कायदेशीर पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


यशवन्त बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक ; न्यायालयाने सुनावली 6 दिवसाची पोलीस कोठडी ;

वेध माझा ऑनलाइन।
अंदाजे 112 कोटीचा आर्थिक घोटाळा झालेल्या कराडच्या यशवन्त बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर याना आज सातारा गुन्हे अनवेशन शाखेने अटक केली 
न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे
शेखर चरेगावकर हे यशवन्त बँकेचे अध्यक्ष म्हणून सुरुवातीला कार्यरत होते आजपर्यंत या बँकेत 112 कोटीहून अधिक रुपयेचा घोटाळा झाल्याचे बोलले गेले 
दरम्यान हा घोटाळा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा झाला होता 
मधल्या काळात या प्रकरणी बँकेच्या फलटण शाखेवर तसेच चरेगावकर यांच्या कराडच्या बंगल्यावर धाडी पडल्या होत्या 
चरेगावकर तेव्हापासून फरार असल्याच्या शहरात चर्चा सुरू होत्या 
आज विंग गावातून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे
त्यांना 2 मार्च पर्यंत म्हणजेच 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Tuesday, February 24, 2026

"केरळ' चे नाव बदलले - केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय- केरळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार ?

वेध माझा ऑनलाईन।
केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. यापुढे हे राज्य “केरळम” या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य विधानसभेने मंजूर केलेला ठराव केंद्राकडे पाठवण्यात आला होता आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावबदलाला औपचारिक मान्यता मिळाली आहे.
केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी एकमताने ठराव मंजूर करत राज्याचे नाव “केरळ” वरून “केरळम” असे करण्याची शिफारस केली होती. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्येही असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने काही तांत्रिक बाबींचा उल्लेख करत सुधारणा सुचवल्या होत्या.त्या सूचनांनुसार सुधारित ठराव पुन्हा मंजूर करून केंद्राकडे पाठवण्यात आला. मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर झाला. राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीचा सन्मान राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्याचे मूळ आणि स्थानिक उच्चार प्रतिबिंबित करणारे “केरळम” हे नाव अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव “केरळम” असे नमूद व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यासाठी नावबदल आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. 

विधान परिषदेत राडा ! प्रज्ञा सातव यांचा राजीनामा;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत प्रज्ञा राजीव सातव  यांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या आणि अजून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत त्या भारतीय जनता पक्षात आल्या आहेत.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे  यांनी सभागृहाला सातव यांच्या राजीनाम्याची माहिती दिल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे  यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण मागितले. कार्यकाळ उर्वरित असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामागील कारणांबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा पुढे आला. त्यावर उत्तर देताना सभापतींनी सातव यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा त्याग केल्याचे सांगितले. अधिक तपशील जाणून घ्यायचा असल्यास खासगीत भेटण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मात्र या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही आणि काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली
विरोधी पक्षनेते पदाची निवड होऊ नये म्हणून सातव यांना राजीनामा देण्यास भाग पाडले का, असा थेट सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्यांच्या सुरात शशिकांत शिंदे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. सातव यांच्यावर कोणताही राजकीय दबाव होता का, याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर सभापती राम शिंदे  यांनी आक्षेप नोंदवत सांगितले की, राजीनामा दिल्यानंतर अडीच महिने उलटून गेल्यावर हरकती घेणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याकडे राजीनामा सादर केला होता आणि तो त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात स्वीकारला आहे. विरोधकांनी पुन्हा आक्षेप घेतल्यानंतर सभापतींनी स्मितहास्य करत खासगीत भेटल्यास अधिक माहिती देण्याचे सांगितले.