Tuesday, April 28, 2026

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं...पण...एकनाथ शिंदेंची एक अट आहे ! ...

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. विधान परिषदेसाठी 28 मतांचा कोटा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात. एकाजागेवर निलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं. तशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. यामुळे बच्चू कडू यांचं एकप्रकारे राजकीय पूनर्वसन होणार आहे. सध्या बच्चू कडू आमदार नाहीयत.

बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देताना त्यांच्यासमोर पक्ष विलीनीकरणाची अट ठेवली आहे. बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते विलीन करावा लागेल, तरच बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागले अशी माहिती आहे. प्रहार हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. विदर्भात या पक्षाचं चांगलं नेटवर्क आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार पक्षाची क्षमता नाहीय. पण कार्यकर्त्यांचं चांगलं जाळं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढू शकतं.

Monday, April 27, 2026

डॉ सुरेश भोसले म्हणाले...कृष्णा बँकेची शेड्युल बँकेकडे वाटचाल ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा बँकेचा १९७१ मध्ये सुरू झालेल्या प्रवासाने आज भक्कम टप्पा गाठला आहे. १९८४ मध्ये अवघ्या १५-२० कोटी ठेवी असलेल्या संस्थेने २०२६ मध्ये ३१०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा आकडा म्हणजे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि संस्थेची विश्वासार्हता याचीच साक्ष आहे. या यशामागे कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. संस्थेची खरी ताकद कर्मचारी असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेची ओळख निर्माण होते, सर्वांच्या साथीने पुढील वर्षात बँकेने ४२५० कोटींचे नवे लक्ष्य ठेवले असून, सर्व निकषांची पूर्तता करीत कृष्णाची शेड्युल बँकेकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले व संचालकांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले बोलत होते.

यावेळी कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कृष्णा बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या युगात सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात असून, ग्राहककेंद्री सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णा स्कूलचे विद्यापीठ करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून यशस्वीपणे साकार झाले. त्याच प्रेरणेतून आता कृष्णा बँकेला ‘शेड्युल बँक’ बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करूया. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष गाठणे आवश्यक आहे. त्यामध्ये १००० कोटींपर्यंत इतर ठेवी, शून्य एनपीए आणि विविध क्षेत्रांना व्यापक कर्जपुरवठा यांचा समावेश आहे. सध्या ३० शाखांमधून बँक सेवा देत असून, भविष्यात विस्ताराची दिशा अधिक ठोस करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जेच्या वाढत्या गरजा आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता सौरऊर्जा हा सर्वात प्रभावी आणि किफायतशीर पर्याय आमदार अतुल भोसले यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. युद्धासारख्या जागतिक घडामोडींमुळे ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सूर्यघर योजना लोकांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी संस्थेच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. कोविडपूर्वी ८३५ कोटी असलेला व्यवसाय अवघ्या सहा वर्षांत ३१०० कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सहकारी बँकांवरील विश्वास कमी होत असताना पारदर्शकता आणि शिस्त यावर भर देत आहोत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचे काटेकोर पालन करून ‘ए प्लस’ दर्जा आणि २०० टक्के कव्हरेज रेशो मिळवला आहे. पुढील वर्षासाठी ४२५० कोटींचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांसाठी मेरिट बेस प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगत कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तसेच जयवंतराव भोसले आणि सुरेश भोसले यांच्या विचारांवर आधारित शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे कृष्णा आर्थिक परिवार मजबूतपणे उभा आहे. सर्व संस्थांचा एनपीए शून्यावर ठेवण्यात यश मिळाले असून, भविष्यातही हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आभार शिवाजीराव थोरात यांनी मानले. यावेळी कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार भोसले म्हणाले...
१० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविणार 

पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट आहे. ३ किलोवॅटपर्यंतची प्रणाली सुमारे १.२० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर दरमहा सुमारे ३ कोटी रुपये आणि वर्षाला ३६ कोटी रुपयांची वीजबिल बचत होणार असून, मतदारसंघ ‘वीजबिलमुक्त’ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान ; श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिष्ठित पुरस्कारांनी केला सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन
समाजातील सकारात्मक कार्याची दखल घेत श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी यंदा साहित्य, सामाजिक सेवा आणि आदिवासी क्षेत्रातील कार्याला विशेष सन्मान मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या तिघांच्या कार्याचा गौरव करत, ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने समाजरत्ने आहेत, असे उद्गार काढले. साहित्य, मनोरुग्ण व अनाथांसाठी सेवा, तसेच वनवासी भागातील शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील चांगल्या विचारांना चालना देणाऱ्या संस्थांची गरज आज अधिक आहे. गेली १३ वर्षे सातत्याने हा विचार जपण्याचे कार्य या संस्थेने केले आहे, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी, आपल्या मनोगतात साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर भाष्य केले. लेखन करताना इतिहास आणि समाजाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांनीही आपल्या कार्यातील अनुभव मांडले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी, गेली २४ वर्षे मनोरुग्ण, अनाथ बालके आणि वृद्धांसाठी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख केला, तर डॉ. अंजनी शहा यांनी, वनवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि कार्याचा प्रवास उलगडला.
या समारंभात विश्वासराव पाटील व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, तर डॉ. अंजनी शहा यांना ‘स्व. सौ. वेणुताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याशिवाय, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. अनिल शहा आणि स्नेहा फडणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. म.सा.प. शाखा शहापुरीच्या वतीने मुनीर बागवान सावकार आणि विवेक वेळापुरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले, विवेक वेळापुरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. संतोष मोहिरे यांनी मानले. या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, साहित्यिक, कवी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला : काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
मुंबईतील पायधुनी भागात एका अत्यंत धक्कादायक घटनेत एकाच घरातील चार सदस्यांना आपले प्राण अकारण गमवावे लागले आहेत. रात्रीचे जेवण आणि फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भयंकर प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या मृत्यूंमागील खऱ्या कारणाचा कसून शोध घेत आहेत.

नेमकी बातमी काय ?
रविवारी रात्रीच्या वेळी डोकाडिया कुटुंबाने आपल्या इतर नातेवाईकांसोबत मिळून बिर्याणीवर ताव मारला होता. त्यानंतर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. यानंतर काही क्षणांतच या कुटुंबातील सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्रास इतका वाढला की घरातील चारही जण अचानक बेशुद्ध अवस्थेत कोसळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने तेथील स्थानिक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञ तिथे पोहोचले तेव्हा सर्वांचीच अवस्था अतिशय चिंताजनक बनली होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान चौघांनीही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया तसेच त्यांच्या आयशा आणि झैनब  या दोन मुलींचा समावेश आहे.
दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून आता अन्नाचे तसेच त्या फळाचे काही नमुने जप्त करण्यात आले आहेत.

Sunday, April 26, 2026

सौ सोनल भोसेकर " रेणुकाई पुरस्काराने” सन्मानित.; नांदेड येथे परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात झाला सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन।
नांदेड येथे आयोजित भव्य परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात उद्योजिका व उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सोनल भोसेकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “रेणुकाई पुरस्कार” देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
 
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, राज्यमंत्री कॅप्टन आशिष दामले, डॉ. गोविंदजी कुलकर्णी , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, निखिल लातूरकर यांच्या हस्ते सौ भोसेकर यांचा हा  सन्मान करण्यात आला.

सौ. सोनल भोसेकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले  

Saturday, April 25, 2026

आता आमदार अतुलबाबा कराड दक्षिण मतदारसंघाला "वीजबिलमुक्त' करण्यासाठी प्रयत्न करणार ; ... अतुलबाबांनी केला संकल्प आणि निर्धार ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड तालुक्यातील नांदगाव आणि विंग या गावांमध्ये उभारण्यात आलेल्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर प्रकल्पांचे लोकार्पण आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उपक्रमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरगुती वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघाला ‘वीजबिलमुक्त’ बनवण्याचा संकल्प करताना, हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास आमदार भोसले यांनी व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील एक कोटी घरांपर्यंत पीएम सूर्यघर योजना पोहोचवण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठे योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता स्वप्नील जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गोविंद गावडे, मंडल अध्यक्ष सीमा साबणे, सरपंच हंबीरराव पाटील, योगेश पाटील, अवधूत इनामदार, हर्षवर्धन मोहिते, सागर पाटील, सर्जेराव थोरात, शंकरराव थोरात, सचिन पाटील, सुशांत मोहिते, अभिजीत कोठावळे, दीपक हजारे, दत्तात्रय माने, तानाजी चौरे, दत्तात्रय थोरात, मारुती मोहिते यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार भोसले यांनी योजनेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, मतदारसंघात सध्या सुमारे १० हजार घरांवर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यात ३० एप्रिलपर्यंत सुमारे दीड हजार घरांवर सोलार यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पूर्वी प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या सोलार प्रकल्पांमुळे नागरिकांना दरमहा येणारे १३०० ते २५०० रुपयांचे वीजबिल पूर्णपणे शून्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाची पीएम सूर्यघर योजना कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात असून, राज्याच्या ऊर्जा विभागाच्या सहकार्याने नागरिकांना कोणतीही अडचण न येता प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दर्जेदार पद्धतीने राबवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


आमदार रोहित पवार व युवा नेते सौरभ पाटील यांची कराडात अचानक भेट...एकत्र येत खाल्ली मिसळ ...काय म्हणाले रोहित पवार?

वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना कराडमध्ये आमदार रोहित पवार येणार असल्याचा अचानक फोन आला...ते पुण्याहून कराडात आले...थांबले... त्यांनी येथे येऊन मिसळ देखील खाल्ली... आणि ते पुढे कोल्हापूरला निघून गेले...    

काय आहे नेमकी बातमी?

काल शुक्रवारी दुपारी अचानक कराडचे माजी नगरसेवक  सौरभ पाटील यांना आमदार रोहित पवार कराडमध्ये येणार असल्याचा फोन आला... वेळ दुपारची... म्हणजे...जेवायचीच वेळ...त्यामुळे रोहित पवार यांनी सौरभ पाटील यांना मिसळ खायची इच्छा व्यक्त केली... मग, ...दत्त चौकातील एका हॉटेलमध्ये सौरभ तात्यांनी त्यांना मिसळ खाण्यासाठी आमंत्रण दिले... ...आमदार रोहित पवार आणि युवा नेते सौरभतात्या या दोघांसह कराडचे नगरसेवक अल्ताफ शिकलगार, उद्योजक तनय जाधव, सामाजिक कार्यकर्ते समीर कुडची राकेश शाह जीवन पाटील तसेच काही कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत मिसळीचा आस्वाद घेतला...

सौरभतात्यांसारखा उमदा अभ्यासू दिलदार युवक आपल्याबरोबर राजकीय प्रवाहात सक्रिय असावा...अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांनी कराडमध्ये चालू असणाऱ्या एकूणच राजकीय घडामोडी जाणून घेतल्या...  निवांत तुमच्याकडे येईन त्यावेळी भेटून बोलू, असे सांगत... त्यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले...
आमदार रोहित पवार व कराडचे युवा नेते सौरभ पाटील यांच्या या कराडमध्ये झालेल्या अचानक भेटीची चर्चा शहर व परिसरात आजही जोरदार सुरू आहे...