Wednesday, April 29, 2026

सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर !

सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. गायत्रीदेवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Tuesday, April 28, 2026

कराडच्या मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त... गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; आयोजकांचे भाविकांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन
कराड  येथील मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी ६.३० ते ७.०० – पवमानसूक्त तसेच पंचसूक्त अभिषेक (नारायण सूक्त, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त व आमभृणी सूक्त) वेदशास्त्र संपन्न वरद वामन कुलकर्णी गुरुजी व मल्हारी उमराणी गुरुजी यांच्या उपस्थितीत

सकाळी ७.३० ते ८.०० – विष्णुसहस्रनाम पठण
सकाळी ८.३० ते ९.०० – वेदशास्त्र 
पाठशाळेच्या वतीने मंत्रजागर
सकाळी ९.३० ते १०.०० – श्री नृसिंह बीज मंत्र जागर

सायंकाळी ४.०० ते ५.०० – शारदा भजनी मंडळ, कऱ्हाड यांचा भजन कार्यक्रम
सायंकाळी ५.३० ते ७.०० – सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री. पित्रे गुरुजी, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांचे सुमधुर कीर्तन (साथ: श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, कऱ्हाड)

सायंकाळी ७.०० ते ७.३० – श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा
रात्री ८.०० ते ८.३० – हळदीकुंकू व तीर्थप्रसाद
रात्री ९.०० ते ९.३० – विष्णुसहस्रनाम मंत्रजागर

ज्या भाविकांना श्रीस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक जवळ, संत सखु मंदिराचे पुढीलबाजूस, मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे करण्यात आले असून ॲड. विराग अरुण जांभळे यांचे वतीने धार्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क: मो. ९४२२६०३३९१ / ८६६८६७००९.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक संजय भेंडे यांची नावे आघाडीवर ; प्रत्येकाने पक्षासाठी केलंय मोठं काम ;

वेध माझा ऑनलाइन ।
राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या 5 नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.


विवेक कोल्हे... 
यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वाढदिवसानिमित्ताने ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती होती. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानले जाते.  विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. अहिल्यानगरमधील कोपरगावात काळे-कोल्हे असा जुना संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसनं कोपरगावमधून संधी दिल्यानंतर भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागेवर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे.




बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार, ?...बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट...

वेध माझा ऑनलाइन
सध्या राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या-त्या पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराचा शोध आणि निवड केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना थेट विधानपरिषदेची आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मंत्रिपद घेऊन बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, असाही प्रस्ताव शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यापुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट समोर ठेवल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत एक बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिलेली आहे. सोबतच शिंदे यांनी कडू यांना मंत्रिपदही देण्यात येईल, असा प्रस्वात दिलेला आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी अद्याप कोणतेही उघड भाष्य केलेले नाही. परंतु बच्चू कडू हे शिंदे गटाच्या ऑफरबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सल्लामसलत करत असल्याचे बोलले जात आहे.

पक्ष शिवसेनेत विलीन करा... पण...
सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांनी मंत्रिपद दिले जाईल, अशी ऑफर देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी सध्या विधानपरिषदेची आमदारकी घ्यावी. परंतु लगेच पक्षाचे विलिनीकरण करू नये. सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलिनीकरण करावे, अशी भूमिका बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची आहे.

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं...पण...एकनाथ शिंदेंची एक अट आहे ! ...

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. विधान परिषदेसाठी 28 मतांचा कोटा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात. एकाजागेवर निलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं. तशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. यामुळे बच्चू कडू यांचं एकप्रकारे राजकीय पूनर्वसन होणार आहे. सध्या बच्चू कडू आमदार नाहीयत.

बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देताना त्यांच्यासमोर पक्ष विलीनीकरणाची अट ठेवली आहे. बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते विलीन करावा लागेल, तरच बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागले अशी माहिती आहे. प्रहार हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. विदर्भात या पक्षाचं चांगलं नेटवर्क आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार पक्षाची क्षमता नाहीय. पण कार्यकर्त्यांचं चांगलं जाळं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढू शकतं.

Monday, April 27, 2026

डॉ सुरेश भोसले म्हणाले...कृष्णा बँकेची शेड्युल बँकेकडे वाटचाल ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा बँकेचा १९७१ मध्ये सुरू झालेल्या प्रवासाने आज भक्कम टप्पा गाठला आहे. १९८४ मध्ये अवघ्या १५-२० कोटी ठेवी असलेल्या संस्थेने २०२६ मध्ये ३१०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा आकडा म्हणजे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि संस्थेची विश्वासार्हता याचीच साक्ष आहे. या यशामागे कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. संस्थेची खरी ताकद कर्मचारी असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेची ओळख निर्माण होते, सर्वांच्या साथीने पुढील वर्षात बँकेने ४२५० कोटींचे नवे लक्ष्य ठेवले असून, सर्व निकषांची पूर्तता करीत कृष्णाची शेड्युल बँकेकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले व संचालकांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले बोलत होते.

यावेळी कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कृष्णा बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या युगात सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात असून, ग्राहककेंद्री सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णा स्कूलचे विद्यापीठ करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून यशस्वीपणे साकार झाले. त्याच प्रेरणेतून आता कृष्णा बँकेला ‘शेड्युल बँक’ बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करूया. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष गाठणे आवश्यक आहे. त्यामध्ये १००० कोटींपर्यंत इतर ठेवी, शून्य एनपीए आणि विविध क्षेत्रांना व्यापक कर्जपुरवठा यांचा समावेश आहे. सध्या ३० शाखांमधून बँक सेवा देत असून, भविष्यात विस्ताराची दिशा अधिक ठोस करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जेच्या वाढत्या गरजा आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता सौरऊर्जा हा सर्वात प्रभावी आणि किफायतशीर पर्याय आमदार अतुल भोसले यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. युद्धासारख्या जागतिक घडामोडींमुळे ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सूर्यघर योजना लोकांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी संस्थेच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. कोविडपूर्वी ८३५ कोटी असलेला व्यवसाय अवघ्या सहा वर्षांत ३१०० कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सहकारी बँकांवरील विश्वास कमी होत असताना पारदर्शकता आणि शिस्त यावर भर देत आहोत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचे काटेकोर पालन करून ‘ए प्लस’ दर्जा आणि २०० टक्के कव्हरेज रेशो मिळवला आहे. पुढील वर्षासाठी ४२५० कोटींचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांसाठी मेरिट बेस प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगत कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तसेच जयवंतराव भोसले आणि सुरेश भोसले यांच्या विचारांवर आधारित शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे कृष्णा आर्थिक परिवार मजबूतपणे उभा आहे. सर्व संस्थांचा एनपीए शून्यावर ठेवण्यात यश मिळाले असून, भविष्यातही हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आभार शिवाजीराव थोरात यांनी मानले. यावेळी कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार भोसले म्हणाले...
१० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविणार 

पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट आहे. ३ किलोवॅटपर्यंतची प्रणाली सुमारे १.२० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर दरमहा सुमारे ३ कोटी रुपये आणि वर्षाला ३६ कोटी रुपयांची वीजबिल बचत होणार असून, मतदारसंघ ‘वीजबिलमुक्त’ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान ; श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिष्ठित पुरस्कारांनी केला सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन
समाजातील सकारात्मक कार्याची दखल घेत श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी यंदा साहित्य, सामाजिक सेवा आणि आदिवासी क्षेत्रातील कार्याला विशेष सन्मान मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या तिघांच्या कार्याचा गौरव करत, ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने समाजरत्ने आहेत, असे उद्गार काढले. साहित्य, मनोरुग्ण व अनाथांसाठी सेवा, तसेच वनवासी भागातील शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील चांगल्या विचारांना चालना देणाऱ्या संस्थांची गरज आज अधिक आहे. गेली १३ वर्षे सातत्याने हा विचार जपण्याचे कार्य या संस्थेने केले आहे, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी, आपल्या मनोगतात साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर भाष्य केले. लेखन करताना इतिहास आणि समाजाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांनीही आपल्या कार्यातील अनुभव मांडले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी, गेली २४ वर्षे मनोरुग्ण, अनाथ बालके आणि वृद्धांसाठी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख केला, तर डॉ. अंजनी शहा यांनी, वनवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि कार्याचा प्रवास उलगडला.
या समारंभात विश्वासराव पाटील व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, तर डॉ. अंजनी शहा यांना ‘स्व. सौ. वेणुताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याशिवाय, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. अनिल शहा आणि स्नेहा फडणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. म.सा.प. शाखा शहापुरीच्या वतीने मुनीर बागवान सावकार आणि विवेक वेळापुरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले, विवेक वेळापुरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. संतोष मोहिरे यांनी मानले. या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, साहित्यिक, कवी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.