Monday, July 13, 2026

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल सात महिने उलटले. ४४ विकासकामांना मंजुरी, निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी थेट हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून रखडलेल्या कामांचा खुलासा मागितला आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.राजकीय वर्तुळात याकडे केवळ विकासकामांचा प्रश्न म्हणून नव्हे, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. 

पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रशासनाला वेळ देणारे नगरसेवक आता थेट उत्तराची मागणी करत असल्याने पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. म्हणजेच एकूण ४४ कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्यासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीचा वाढता धोका आणि नागरिकांचा रोजचा मनस्ताप यामुळे मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आमदार भोसले यांनी आपल्या पत्रात प्रशासनाकडे तीन स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत—
मंजूर कामे नेमकी का रखडली? विलंबामागील जबाबदार कारणे कोणती? आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार? 
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे कराडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांचा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट राजकीय जबाबदारीचा विषय बनला आहे. मंजूर निधी असूनही विकासकामे रखडणे हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की त्यामागे अन्य कारणे आहेत, याकडे आता नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सात महिने उलटले आहेत. या योजनांतील ४४ विकासकामांसाठी निधी उपलब्ध असूनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे.
एकूणच मंजूर कामे सात महिने उलटूनही का सुरू नाहीत? याबाबत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून जाब विचारल्याच्या कारणाने यापुढे... अतुलबाबा पालिकेत थेट लक्ष घालणार हे निश्चितच आहे... आणि  याचनिमित्ताने कराड पालिकेचे राजकारण तापणार अशीही शक्यता आहे

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
दरम्यान पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नगरसेवकांचा पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की... 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.

शहरातील कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्याच्या कामासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही रस्त्याची अवस्था अद्यापही खराब असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मंजूर कामे रखडण्यामागील कारणे, त्यासाठी जबाबदार बाबी आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी आमदार भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनीही रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदारांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाकडे खुलासा मागितल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Saturday, July 11, 2026

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक ; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे हस्तगत : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;

वेध माझा ऑनलाईन।
 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
डीवायएसपी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड शहर व परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरीता थांबले आहेत. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे अफताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील व ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चौघांकडे चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा 3 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.

Friday, July 10, 2026

राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला यश ; आमदार अतुलबाबांनी केला पाठपुरावा;


वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंञी एकनाथ शिंदे,  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे अर्जुन कोळी यांनी  आभार व्यक्त केले आहेत.

कृष्णा साखर कारखान्याच्या यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते सत्कार -

वेध माझा ऑनलाईन।
आज कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद (भाऊ) देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. धनश्रीताई मकरंद देशपांडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, श्री.सिद्धू गेजगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले, "मतदारांनी दाखवलेला विश्वास हीच खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरत सभासदांच्या हिताचे निर्णय आणि विकासाभिमुख कामे पुढील काळातही सातत्याने व्हावीत," अशा शब्दांत त्यांनी डॉ. सुरेशबाबा भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत, सभासदांचा विश्वास कायम राखत कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कराड शहरातील रस्ते, स्वच्छता आणि रखडलेल्या विकासकामांवर भाजपचे नगरसेवक आक्रमक; तोडगा न निघाल्यास पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांचे वर्क ऑर्डरही निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा गाड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन छेडण्याचा इशारा  भाजपच्या नगरसेवकांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के तसेच अतुल शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामालाही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कामांसाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीएलओ संदर्भातील कॅम्पबाबत प्रश्न उपस्थित केला. राजकीय नेत्यांना अशा प्रकारचे कॅम्प घेण्यास परवानगी नसताना काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्प आयोजित केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या कॅम्पला परवानगी नसून, असे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.


प्रितीसंगम बागेतील अव्यवस्थेचाही मुद्दा बैठकीत गाजला. नगरसेवक अजय पावसकर यांनी बागेत गाढवे फिरत असल्याची बाब उपस्थित करत मंदिर परिसरात खाद्यपदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. देवस्थान असणारा तो परिसर आहे याचे भान त्याठिकाणी ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले तसेच शहरातील तीनही बागांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढवे फिरल्याच्या घटनेबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी एकमुखी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.

नगरसेवक आशुतोष डुबल यांनी मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याची मागणी केली.


कंपन्यांसोबत बैठक घेण्याची मागणी
बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यास नेमका विलंब का होत आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे कराड शहरातील विकासकामे रखडत असतील तर त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला. 

नगरसेवक शिवाजी पवार आक्रमक ; 
नगरसेवक शिवाजी पवार हे यावेळी आक्रमक झाले त्यांनी बैलबाजार रोडच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून ८ एप्रिल २०२६ रोजी कामाचे वर्क ऑर्डरही देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन व केबल टाकण्याच्या कारणामुळे काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.




Thursday, July 9, 2026

'वेध माझा'च्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाची चौकशी सुरू ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश

वेध माझा ऑनलाईन 
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवसांपासून हिरवा-निळा होत असल्याच्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर वेध माझाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनाची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा प्रश्न थेट राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा-निळा का झाला? त्यामागील नेमके कारण काय आहे? नदीचे पाणी सुरक्षित आहे का? प्रदूषणामुळे हा बदल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वेध माझाने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती.
या वृत्तांची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आणि सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा-निळा होण्यामागील नेमके वैज्ञानिक कारण आता अधिकृतपणे स्पष्ट होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ रंगबदल म्हणून न पाहता पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय शासन स्तरावर पोहोचवल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आता अधिकृत तपासणी अहवालातून वस्तुस्थिती समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.

वेध माझाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे अखेर शासन यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, आता तपासणी अहवालात काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.