Monday, March 9, 2026

साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमध्ये 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण केल्याची धक्कादायक घटना आली समोर ; संबंधित केअरटेकरला अटक; साताऱ्यात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमधील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण, मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित केअरटेकरला अटक केली आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित स्कूलमधील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित केअरटेकरवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याला अटकही करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मुलांचे लैगिंक शोषण आणि मारहाण करून पैसे उकळल्याचे समोर आले.
गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडून हा प्रकार सुरू होता यामुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


इराण युद्ध सुरु ; भारतात अनेक शहरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी ; एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ ;

वेध माझा ऑनलाईन।
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.
अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवले :

मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी लागणाऱ्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते, मात्र आता हे अंतर वाढवून 25 दिवस करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालय यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या बदलामागे मुख्य उद्देश म्हणजे बाजारात होणारी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखणे हा आहे. 
सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सध्या घरगुती गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला नाही. तरीही भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या नियमामुळे ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 गॅस दरवाढीमुळे वाढला आर्थिक ताण 

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता 913 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी त्याची किंमत 853 रुपये होती. 

इतर शहरांमध्येही दरवाढ दिसून येत आहे. 

मुंबई येथे नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकाता  येथे हा दर 939 रुपये असून चेन्नई मध्ये 14 किलोच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून आता 1,883 रुपये झाली आहे. या बदलांमुळे घरगुती बजेटवर तसेच व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कराड दक्षिणमधील ३३.६७ कोटींच्या विकासकामांना राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी ; आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश

वेध माझा ऑनलाइन
राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कराड दक्षिणमधील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांसाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातात्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत ना. फडणवीस यांनी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी ३३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. 
यामध्ये कराड दक्षिणमधील रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी – नांदलापूर -  पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. १६/९०० ते १९/४०० (भाग - जाधव मळा ते रा. मा. १४८) रस्त्याची नवीन रिटेनिंग वॉल बांधण्यासह रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी - नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कोयना वसाहत ते नांदलापूर)ची सुधारणा करणे (३ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पाचवडेश्वर - कोडोली - दुशेरे - शेणोली स्टेशन रस्ता प्रजिमा ६५ किमी ७/०० ते १२/०० ची सुधारणा करणे (१ कोटी), येणके - आणे - कोळे - कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी प्रजिमा-७६ कि.मी. १०/५०० ते १३/३०० (कोळेवाडी ते बामणवाडी)ची सुधारणा करणे (२ कोटी), आटके टप्पा ते आटके जाधव मळा - रेठरे बु. व्हाया डंगारे वस्ती – पवार मळा - खुबी रस्ता प्रजिमा- ७७ कि.मी. ६/०० ते ८/००० व १८/७०० ते १९/३०० रस्त्याची सुधारणा करणे (१.५० कोटी), कालेटेक - काले - संजयनगर - कालवडे - नांदगाव - साळशिरंबे - पाचुंब्री रस्ता प्रजिमा-७३ कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कालेटेक ते कालवडे) रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), वाखाण वस्ती कराड - ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. १४/०० ते १७/०० (भाग - विंग ते घारेवाडी)मध्ये रस्त्याची सुधारणा व दुतर्फा बंदिस्त गटर बांधकाम करणे (१.५० कोटी), वाखाण वस्ती कराड ते ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. ७/२०० ते ८/०० (भाग बैलबाजार रस्ता (रा. मा. १४४) ते ढेबेवाडी फाटा)मध्ये काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण बांधकाम करणे (१० कोटी), नांदगाव दक्षिण मांड नदीवर कि.मी. १/४०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (६.७३ कोटी), कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे (१.९३ कोटी) अशा एकूण ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड दक्षिणमधील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत. 


Sunday, March 8, 2026

पुण्यात दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन ; या पुलाला अजितदादांचे नाव देणार ;

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेला दुमजली उड्डाणपूल हा शहरातील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जात आहे. या पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष मागणी मांडली. त्यांच्या मते या प्रकल्पाची संकल्पना आणि त्यासाठीचा पाठपुरावा अजित पवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केला होता. 
मोहोळ यांनी सांगितले की, या पुलाच्या उभारणीमागे अजित पवार यांची दूरदृष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा अनेकांची आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शवले. त्यांनी स्पष्ट केले की, पुलाच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचे नाव देण्यास ते सहमत आहेत.


इराण भारताला कोणती मदत करणार ? घेतला मोठा निर्णय; काय आहे बातमी-?

वेध माझा ऑनलाइन।
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता अनेक देशांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर इराणने काही दिवसांपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली होती. चीन वगळता इतर देशांच्या तेलवाहू जहाजांना या मार्गातून जाण्यास बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला होता. या घोषणेमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती.
मात्र आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने आपला निर्णय बदलत होर्मुज सामुद्रधुनीचा वापर काही देशांसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार अमेरिका, इस्त्रायल, युरोपियन देश आणि त्यांचे सहयोगी राष्ट्र यांच्यासाठीच हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे भारतासारख्या देशांना या मार्गाने तेलाची वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील संभाव्य इंधन टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

१ एप्रिल पासून कोणते नियम होणार लागू? ; अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता ; राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पात्रतेचे निकष कडक करत नवीन नियम जाहीर केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होणार असून अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर अनेक कुटुंबांची नावे रेशन यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेशन कार्ड योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने पात्रतेचे नियम अधिक कठोर केले आहेत. ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या संकल्पनेला प्रभावी बनवण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. सरकारने उत्पन्न आणि मालमत्तेच्या आधारे लाभार्थ्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांनुसार शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते रेशन योजनेसाठी अपात्र ठरतील. ग्रामीण भागात ही मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन जसे की कार किंवा ट्रॅक्टर आहे, अशा कुटुंबांनाही आता स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय १०० चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर असलेल्या कुटुंबांनाही या यादीतून वगळले जाईल.
नवीन नियमांबरोबरच प्रशासकीय प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत. सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार पडताळणी करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तीचे रेशन कार्ड तात्काळ बंद केले जाऊ शकते.
याशिवाय घरात एसी  किंवा जनरेटरसारख्या सुविधा असलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असल्यास त्या संपूर्ण कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कोणी आपली खरी आर्थिक स्थिती लपवून लाभ घेत असल्याचे तपासात आढळले, तर त्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावानुसार वसुली केली जाईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. 
या नव्या छाननी मोहिमेमुळे देशभरातील सुमारे ७० लाख अपात्र रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्यक्षात गरिबी रेषेखालील आणि गरजू कुटुंबांना धान्याचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील कोणता आरोपी आता येणार जेलबाहेर ?

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आरोपी जयराम चाटे याला न्यायालयाने मर्यादित स्वरूपात दिलासा दिला असून काही तासांसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

धार्मिक विधीसाठी न्यायालयाची मुभा :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जयराम चाटे हा आरोपी म्हणून अटकेत आहे आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध अनेक महिन्यांपासून घेतला जात असला तरी अद्याप तो सापडलेला नाही. 
दरम्यान जयराम चाटे याने आपल्या दिवंगत भावाच्या धार्मिक विधीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गावात उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्याला मर्यादित कालावधीसाठी बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. १३ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तो पोलिस बंदोबस्तात या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार आहे.
या निर्णयाबाबत सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीला बाहेर सोडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद केला होता. मात्र आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर सर्व अटींचे पालन करण्याची तयारी दर्शवली. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लागणारा खर्चही भरण्याची जबाबदारी स्वीकारली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय दिला. त्यामुळे जवळपास १४ महिन्यांनंतर जयराम चाटे काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. मात्र त्याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात गावी नेले जाईल आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात आणण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यापासून कोणताही आरोपी इतक्या कालावधीनंतर बाहेर आला नव्हता, त्यामुळे ही घटना या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.