Thursday, May 21, 2026

मोठी बातमी ; रोहित पवार म्हणाले...जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडणार , भाजपसोबत जाणार नाही,;

वेध माझा ऑनलाईन।
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती, मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

विलिनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये, तुम्ही एकटे सोडले तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील इतर कोणताही नेता सरकारवर फार काही टीका करताना दिसत नाहीये, त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न यावेळी रोहित पवार यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल पण भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.  रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, मात्र या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मी बघेल दुसरा पर्याय निवडेल परंतु मी भाजपसोबत जाणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


कृष्णे ची निवडणूक वन- साईड जिंकणार ; डॉ सुरेश भोसलेंना विश्वास ; म्हणाले... कृष्णा कारखान्याचे विस्तारीकरण व नूतनीकरण केले ;उच्चांकी दर दिला; कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगारवाढ दिली ; सभासदांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या 5 वर्षात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले उच्चांकी ऊसदर आम्ही दिला कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली अशा अनेकबाबी यशस्वीपणे करत आम्ही सभासदांना देखील सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील आम्ही कारखान्यात केलेलं आहे या व अशा बाबींमुळे कारखाना राज्यात अववल क्रमांकावर आहे त्यामुळे यावेळच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही मागच्या वेळेप्रमाणे वन-साइड निवडून येऊ... असा विश्वास डॉ सुरेश भोसले यांनी आज व्यक्त केला

आज गुरुवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते  यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांच्यासह कराडचे भाजपचे नगरसेवक आजी माजी पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले डॉ सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याची वेगळी अशी ओळख राज्यात निर्माण झाली आहे राज्यात साखर कारखानदारीत उच्चांकी दर देणारा आपला कारखाना आहे  कृष्णा कारखान्याची राज्यात अव्वल साखर कारखाना म्हणून देखील ओळख आहे यावेळच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा मोठा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत, जे कोणी कृष्णेच्या विजयात वाटेकरी राहण्यासाठी प्रयत्न करतील त्या सर्वांना कृष्णेच्या प्रवाहात सन्मानाने कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी देण्याचा आमचा मानस आहे सुरेशबाबांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलच्या विजयाची घौडदौड कायम राहणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

Tuesday, May 19, 2026

सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी सुरू ;

वेध माझा ऑनलाइन
सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे

लोकसभा निवडणुकीपासून छगन भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जाण्यास इच्छुक होते. स्वत: भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले होते. मात्र, त्यावेळी महायुतीच्या वाटाघाटीचा घोळ सुरु होता, त्यातून जास्त उशीर झाल्याने भुजबळांनीच उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता याही वेळेला त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, सध्या ते राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत मंत्रीपद सोडून ते राज्यसभेचा पर्याय स्वीकारतील का, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतल्यास भुजबळांना दिल्लीला जावे लागेल अशी शक्यता आहे. परंतु भुजबळांना पक्षाकडून विचारणा न झाल्यास भुजबळ स्वत:हुन राज्यसभेवर जाण्याची मागणी करण्याची शक्यता यावेळी जवळपास नाही. कारण त्यांच्यासाठी मंत्रिपद अधिक महत्वाचं आहे.

Monday, May 18, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. 
आज पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचा घेतला समाचार ; सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्याच्या केल्या सूचना ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा पालिकेच्‍या सभागृहात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत त्‍यांनी नगरसेवकांना सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच बैठकीदरम्‍यान त्‍यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍याशी चर्चा करण्‍याचे संकेत दिले.दरम्यान यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला


सातारा पालिकेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्‍यात वाद झाला होता. या वादामुळे पालिकेतील बेबनाव, कुरघोड्या, जिरवाजिरवीच्‍या राजकारणाच्‍या चर्चेला उधाण आले होते. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेत मते जाणून घेतली होती
या बैठकीत देखील उदयनराजेंसमोर मोठ्या प्रमाणात खदखद समोर आली होती. याच अनुषंगाने रविवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठक घेत नगरसेवक, पदाधिकारी तसेच इतरांची मते जाणून घेत वादामागील नेमक्‍या मुद्द्यांची माहिती करून घेतली. यानंतर त्‍यांनी नगरसेवकांचे कान टोचत त्‍यांना सभागृहात शिस्‍त बाळगण्‍यासह सर्वांचा आदर राखण्‍याचा सल्‍ला देत झालेला प्रकार चुकीचा असल्‍याचे सांगितले.
याचवेळी त्‍यांनी सर्व नगरसेवक भाजपाच्‍या चिन्‍हावर निवडून आले असल्‍याने आघाडी किंवा इतर भेद बाळगणे चुकीचे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्‍पष्‍ट करत शहरातील विकासकामांवर भर देण्‍याचे तसेच टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला. बैठकीत नगरसेवकांनी प्रशासन सहकार्य करत नसल्‍याचा उपस्‍थित केलेल्‍या मुद्द्यावर लवकरच तशा सूचना देत प्रशासनासमवेत बैठक घेण्‍याचेही जाहीर केले

Saturday, May 16, 2026

कृष्णा कारखाना निवडणुक कार्यक्रम जाहीर ; 21 जूनला मतदान; 23 जूनला मतमोजणी ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा- सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे 

सोमवार (दि 18 ) पासून
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे 21 जूनला मतदान होणार आहे तसेच
23 जूनला मतमोजणी होईल,अशी माहिती  निवडणूक अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली आहे

Wednesday, May 13, 2026

वेध माझा ऑनलाईन
साहित्य, संस्कृती आणि लोककलेचा संगम अनुभवण्याची संधी कराडकरांना २४ मे रोजी मिळणार आहे. येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार पेठेतील नव्या श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनावणे, संचालक अरुण जाधव, संजीव मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, तसेच समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण उपस्थित होते.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून कराड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सूरज जमदाडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार साळुंखे सहभागी होणार आहेत.

संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन रंगणार आहे. त्यानंतर रेडिओ व दूरदर्शनवरील लोकप्रिय शाहीर कळसकर भेदीक शाहीर मंडळ, कवठे यांचा शाहिरी कार्यक्रम सादर होईल. पुढील सत्रात प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांचा ‘गझल रंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर समारोपानंतर प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार दंगल कवितांनी संमेलनाची सांगता होणार आहे. कराड, पाटण आणि परिसरातील सुमारे ४०० साहित्यप्रेमी या संमेलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ८.३० ते १० या वेळेत संमेलनस्थळी नोंदणी करावी. नोंदणीनंतर उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस संचालक डॉ. संतोष मोहिरे, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, निरंजन मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, जयाराणी जाधव, सीमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.