Wednesday, July 8, 2026

फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा वीजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना : एकमेकांना वाचवताना झाला मृत्यू!

वेध माझा ऑनलाईन।
- फलटण तालुक्यातील खामगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना विजेचा धक्का लागून कुटुंबातील चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीसानी दिली 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे यांना शॉक लागला. ही बाब लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आणि मुलांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड ; वाळवा तालुक्यातील जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष


वेध माझा ऑनलाईन ।
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कृष्णा कारखाना कार्यस्थळावर आज (बुधवारी) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेवेळी चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक जगदीश जगताप हे सूचक; तर संचालक दयानंद पाटील अनुमोदक होते. तसेच  व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांनी दाखल केलेल्या अर्जासाठी संचालक सुनील पाटील हे सूचक; तर संचालक सत्यजीत पाटील हे अनुमोदक होते. यानंतर सर्वानुमते चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात सभासदांनी सलग तिसऱ्यांदा संधी देत आमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. येत्या ५ वर्षात अधिकाधिक ऊसदर देण्यासाठी आणि चांगल्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कृष्णा कारखान्याला राज्यातील पथदर्शी आदर्श कारखाना घडविण्याचा आमचा संकल्प असून, यासाठी सभासदांची आम्हाला निश्चित साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, आनंदा खबाले, अरविंद पाटील, बाजीराव थोरात, छबन कांबळे, दत्तात्रय देसाई, संभाजीराव पाटील, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, संग्राम पाटील, बाबासो शिंदे, अविनाश खरात, बाजीराव निकम, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आप्पासाहेबांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ अशी सलग २८ वर्षे कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनीही १९९९ ते २००५ अशी ६ वर्षे आणि २०१५ ते २०२६ अशी ११ वर्षे असे एकूण १७ वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. त्यानंतर आता २०२६ ते २०३१ या ५ वर्षांसाठी त्यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यामुळे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा, तसेच सर्वाधिक वेळा चेअरमनपदी निवड होण्याचा मान डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होण्याची ऐतिहासिक हॅट्रिकही त्यांनी साधली आहे.


Monday, July 6, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य का दडवल जातंय? कराड दक्षिण आणि उत्तरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजूनही गप्प का? याप्रकरणी 'वेध माझा' चा पाठपुरावा सुरूच राहील ;कारण हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवस निळसर-हिरवा होत असताना आता पावसामुळे नदी गढूळ होऊन प्रदूषण अधिकच वाढेल की काय अशी भीती आहे? दरम्यान संबंधित यंत्रणांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की सत्य दडपण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आणि कराड उत्तर आणि दक्षिण चे लोकप्रतिनिधी अजूनही याविषयी गप्प का आहेत... हाही जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे...

या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या 'वेध माझा' मुळे हा विषय लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला असून, प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांच्या मते, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीशी आणि पर्यावरणाशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागांचे मौन अत्यंत संशयास्पद आहे. पाण्याचे नमुने नमुने घेतले का ? ते  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले का? अहवाल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो जनतेपासून का लपवला जात आहे? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
'वेध माझा' ने सातत्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून हा विषय जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहणारा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. "हा पाठपुरावा थांबवू नका; सत्य बाहेर येईपर्यंत आवाज उठवत राहा," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवून अहवाल प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे, अशी भूमिका पुढे येत आहे.

याशिवाय, हजारो नागरिकांच्या सहभागातून सही मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता जनआंदोलनात रूपांतरित करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
स्थानिक महाविद्यालये, पर्यावरण अभ्यासक आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी होत आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र परीक्षणाची तुलना झाल्यास सत्य अधिक स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.

प्रशासनाला थेट सवाल...
पाण्याचा रंग बदलून अनेक दिवस झाले, तरी अधिकृत अहवाल का नाही?
पाण्याचे नमुने तपासले की नाही?
तपासणी झाली असेल तर निष्कर्ष जनतेपासून लपवले का जात आहेत?
नदी प्रदूषित नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे सांगण्यास का टाळाटाळ करत आहे?
आणि प्रदूषण झाले असेल, तर जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत नागरिक शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

'वेध माझा'चा निर्धार
कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य, अधिकृत तपासणी अहवाल आणि जबाबदारांवरील कारवाई जनतेसमोर येईपर्यंत 'वेध माझा' चा पाठपुरावा आणखी तीव्रपणे सुरू राहील. 
कारण हा केवळ एका नदीचा प्रश्न नाही तर हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

कोयना धरणात एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीने वाढला ; मुसळधार सुरूच ! या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण ;

वेध माझा ऑनलाईन।
झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन सुरळित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून एक तुकडी कराडमध्ये दाखल झाली आहे.दरम्यान पश्चिम घाटमाथ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं पाच तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आजदेखील सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे.

Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,? तो जनतेपासून का लपविला जात आहे? "लोकप्रतिनिधी' या प्रश्नावर गप्प का? जनतेत चर्चा; वेध माझा चा पाठपुरावा चालूच राहणार...

 वेध माझा ऑनलाईन।
: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक आठवडे उलटले. या काळात नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, संबंधित विभागांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा विलंब नेमका कशामुळे होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?

त्या पाण्याचा तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,?

तो जनतेपासून का लपविला जात आहे? 

आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? 

 लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का?

या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.

आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

दरम्यान या प्रकरणात संबंधित विभागांना नदीच्या पाण्याचे नमुने घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 
मात्र, ती तपासणी करण्यात आली का? 
आली असेल तर त्या नमुन्यांचे निष्कर्ष काय आले? 
तपासणी पूर्ण झाली की नाही ? 
कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली? 
आणि अहवाल कोणाकडे प्रलंबित आहे?  याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांसमोर अद्यापही ठेवण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयात प्रशासनाची ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

सध्या पावसाळा सुरू असून नदीत विविध नाले, सांडपाणी आणि शेतीमधून वाहून येणारे पाणी मिसळत आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना अधिकृत माहितीचा अभाव चिंतेत भर घालत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नदीबाबत पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या काही नागरिकांनी अद्यापही काही ठिकाणी पाण्यावर हिरवट थर किंवा रंगातील बदल दिसत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची शासकीय स्तरावर पडताळणी झाली आहे का, याचाही खुलासा झालेला नसल्यामुळे रंगबदलाची कारणे नैसर्गिक आहेत की प्रदूषणाशी संबंधित आहेत?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कराड परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जीवन कृष्णा नदीवर अवलंबून असताना या विषयावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून संयुक्त पत्रकार परिषद किंवा अधिकृत निवेदनही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माहितीच्या अभावातून अफवा आणि संभ्रम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियमित परीक्षण करून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही पुढे येत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय, तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे, तो जनतेपासून का लपविला जात आहे आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

कराडच्या मुख्य रस्त्यावरील भाजी मंडई उठवा... अन्यथा पालिकेच्या आवारात बसून भाजी विक्री करु ; सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले यांचा पालिका प्रशासनाला निवेदन देऊन इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
कराडमधील बुधवार पेठेतील साठे इमारत मुख्य रस्त्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट या परिसरात रस्त्यावर भाजी मंडई बसूदेऊ नये या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अभिषेक भोसले यांनी नुकतेच पालिका मुख्याधिकारी याना दिले यावेळी त्या परिसरातील असंख्य रहिवासी उपस्थित होते........

सदर निवेदनात म्हटले आहे की
आम्ही सर्व रहिवासी अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.
कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषदेच्या आवारात भाजी विक्री करण्यासाठी आम्ही बसू असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे