Tuesday, May 26, 2026

डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले...अविनाश मोहिते कारखाना चालवू शकत नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यामधील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते आज म्हणाले  ते म्हणाले “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत, 

तर दुसरीकडे डॉ इंद्रजित मोहिते यांनी अविनाश मोहितेच्या अकार्यक्षमतेचा या पत्रकार परिषदेत पाढाच वाचला... 
कारखाना चालवण्यासाठी  चांगले नेतृत्व असावे लागते,त्या नेतृत्वाची प्रवृत्ती, प्रकृती, तसेच त्याची कार्यक्षमता, अनुभव, प्रशासकावर नियंत्रण, आर्थिक शिस्त, कायद्याची समज, अशा क्षमता व गुण त्या नेतृत्वात असाव्या लागतात आणि हे गुण अविनाश मोहितेंमध्ये नाहीत असे त्यांनी आज स्पष्टच बोलून दाखवले 
य. मो. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी चेअरमन डॉ. मोहिते बोलत होते

ते म्हणाले 
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंचाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. “संघर्षासाठी संघर्ष करून कारखाना कमकुवत करण्यापेक्षा, आम्ही सहकार पॅनेलला साथ देत आहोत,” असे सांगत डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आमचा हा पाठिंबा अटींसह देत आहोत. सभासदांचे हित डावलले गेले तर भविष्यात निवडणुकीच्या संघर्षात उतरू, कारखाना टिकवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हीच खरी जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले आर्थिक ताण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. अशा वेळी केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी संघर्ष करणे योग्य नाही,” असे सांगत संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यातील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले  “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत असेही त्यांनी स्पष्टपणे आज  सांगितले 

Monday, May 25, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा मागितला राजीनामा ? काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाईन।
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर आला होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात एक पत्र देण्यात आलं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव होतं, मात्र त्या पत्रात त्यांच्या पदाचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. यावरून प्रफुल पटेल हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते.

दरम्यान या भेटीवेळी प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. परंतु यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही असंही समोर आलं. या सर्व घडामोडींनंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा राजीनामा मागण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजीनामा द्यावा अशी पक्षाकडून सूचना असल्याचं इद्रीस नायकवडी यांना सांगितलं होतं.
मात्र दुसरीकडे  इद्रीस नायकवडी यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची सूचना आपल्याला कधी देण्यात आली नव्हती, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका यावर इद्रीस नायकवडी यांनी घेतली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न ; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी भवनात झाली.
सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन करताना सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पूर्णनिरीक्षण कार्यक्रम बाबत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातील बुथवर मतदार यादी पूर्णनिरीक्षण काम फार बारकाईने करावे, आणि जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून संघटन वाढविण्यावर भर द्यावा, तसेच जनतेशी संपर्क वाढवा. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम पक्ष नेतृत्वाकडून आगामी काळात होईल, असे सांगून सक्षम विरोधक म्हणून यापुढे आक्रमक पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असेही  प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सातारा जिल्हा विविध संघटनाच्या निवडी केल्या. यामध्ये प्रामुख्याने युवक अध्यक्षपदी समीर घाटगे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी सचिन जाधव, युवती अध्यक्षपदी कोमल घोरपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी शफिक शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्षपदी बाळासाहेब घोरपडे, वाहतूक विभाग सेलचे अध्यक्षपदी संजय पिसाळ, इतर मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदी अनिल लोहार तसेच कामगार सेलचे अध्यक्षपदी किरण राऊत यांच्या निवडी प्रामुख्याने केल्या तसेच काही जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी निवडी यावेळी झाल्या. उर्वरित निवडी येत्या आठ दिवसात करण्यात येणार आहेत असे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. येऊ घातलेल्या सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पक्षाने भूमिका घेण्याबाबत विषय मांडले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सौ.संगीता साळुंखे (माई), सौ.समिंद्रा जाधव, सौ.सुवर्णाताई पाटील, सतीश चव्हाण, नरेश देसाई, प्रवीण दसके, घनश्याम शिंदे, रमेश धायगुडे पाटील, ॲड.निलेश डेरे, संतोष पवार, नितीन शिंदे, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, सचिन जाधव, शफिक शेख, सागर झणझणे, अनिल लोहार, शंभू खलाटे, समीर घाटगे, नंदकुमार मोरे, डॉ.सतीश बाबर, उमेश देशमुख, नलिनी जाधव, शैलजा कदम, पूजा काळे, कोमल घोरपडे, तेजस्विनी केसरकर, बाळासाहेब खलाटे, निलेश जगदाळे, बाळासाहेब फडतरे, पूजा बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडात शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा ; ज्या शाळा व्यावसायिक हेतूने वह्या, पुस्तके, स्टेशनरी, बूट, ड्रेस विकत आहेत, पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करत आहेत अशा शाळांवर कारवाईची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
ज्या शाळा व्यावसायिक हेतूने वह्या, पुस्तके, स्टेशनरी, बूट, ड्रेस विकत आहेत, पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करत आहेत अशा शाळांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम आणि सीबीएसइ, स्टेट बोर्डाच्या नियमानुसार त्वरीत कारवाई करावी, आदींसह विविध मागण्यासाठी कराड येथील शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने सोमवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. 
कराड शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने  सोमवारी सकाळी अकरा वाजता दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तेथे उपोषणास सुरुवात करण्यात आली. 
तत्पूर्वी  पदाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार (महसूल) महेश उबारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
 व्यावसायिक हेतूने शैक्षणिक साहित्याची विक्री करणाऱ्या दोषी शाळांवर कठोर कारवाई करावी. पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. शाळांनी कमिशनसाठी लावलेली महागडी खासगी प्रकाशनाची पुस्तके त्वरीत बंद करावीत सीबीएसईसाठी एनसीईआरटी बोर्डाचीच पुस्तके तसेच स्टेट बोर्डासाठी बालभारतीचीच पुस्तके लावणे बंधनकारक करावीत. प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी किमान दोन महिने आधी आवश्यक पुस्तके आणि वह्यांची यादी जाहीर करावी. पालकांना शैक्षणिक साहित्य खुल्या बाजारातून कोठेही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे परिपत्रक शाळेने पालकांना लेखी स्वरुपात द्यावे. बेकायदेशीर विक्री करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द किंवा दंड करण्याची कारवाई व्हावी. शाळा आणि विशिष्ठ पुस्तक विक्रेते यांच्यातील आर्थिक व्यवहाराची शिक्षण विभागातर्फे चौकशी व्हावी. पालकांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन नंबर किंवा तक्रार निवारण केंद्र कायमस्वरुपी सुरु करावे आदी मागण्यासाठीभे आंदोलन करण्यात आले.

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार !वडेट्टीवार म्हणाले ...विधान परिषदेची ही 100 कोटींची निवडणूक आहे , सामान्य माणूस ही निवडणूक लढू शकत नाही;

वेध माझा ऑनलाइन 
आगामी विधानपरिषद निवडणुकीत चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन भाजपकडून सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुप्रिया सुळे  यांनी रविवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या लेकीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. त्यानंतर भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत अरुण लखानी यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे. याबाबत सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 

अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार म्हणाले,...

अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. अशाने या विधानपरिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधानपरिषदेत दिसणार नाही. 
विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देऊन उचलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे योग्य माणसाची निवड होणे दूरच राहिले आहे. 

एकनाथ शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; महत्वाची माहिती आली समोर! भाजपला बसणार धक्का !

वेध माझा ऑनलाईन।
जळगावमध्ये शिंदे गटातील आमदारांची एक गुप्त बैठक झाली आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक झाली असून तिला मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्जा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु जळगावची जागा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जागेवरून ते आपल्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळेच आता भाजपा आणि शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असताना आता जळगावात झालेली ही गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे माहिती...
जळगाव विधान परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटलांसह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं एकमत झालं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा ही शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, यावर शिवसेनेचे आमदार ठाम आहेत. महायुतीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देऊ, असा निर्णय या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी घेतला आहे.
भाजपप्रमाणेच जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची देखील ताकद, त्यामुळे कुठलीही तडजोड करणार नसल्याची भूमिका या बैठकीमध्ये आमदारांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आता जागा शिवसेनेला द्यावी, अथवा मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देण्याबाबतची आग्रही भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एलपीजी गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय ; नवा नियम लागू, …

वेध माझा ऑनलाइन।
अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जणावत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅस सिलिंडरबाबत सरकारकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता ज्या लोकांच्या घरात पाइपलाइनच्या माध्यमातून नॅचरल गॅसचा पुरवठा होतो, त्या लोकांना एलपीजी गॅसचं सिलिंडर मिळणार नाहीये.सोमवारीच यासंदर्भात सरकारच्या वतीने आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश जारी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने या निर्णयाची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार आता ज्यांच्या नावावर पीएनजीचं कनेक्शन आहे, अशा लोकांना आता एलपीजीचा पुरवठा करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ आता एकाच व्यक्तीला एलपीजी आणि पीएनजी असे दोन कनेक्शन मिळणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी  सरकारकडून काही अत्यावश्यक पाऊलं उचलली जात आहेत, त्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.