Thursday, May 7, 2026

सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. प्रामाणिकपणे काम केले तरच सहकार टिकतो ; डॉ सुरेश भोसले;

वेध माझा ऑनलाइन।
सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. प्रामाणिकपणे काम केले तरच सहकार टिकतो, हे सूत्र समोर ठेवून आम्ही कृष्णा कारखान्यात नेहमी सभासद हिताचा कारभार केला, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. विंग (ता. कराड) येथे आयोजित शेतकरी सभासद संवाद मेळावा आणि कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. 

कृष्णा कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऐतिहासिक १४.१९ लाख मेट्रीक टन गाळप केल्याबद्दल आणि सभासदांना उच्चांकी ३५०० रुपयांचे ऊस बिल दिल्याबद्दल विंग परिसरातील सभासदांच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र प्रदान करुन डॉ. भोसले यांचा सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी व्यासपीठावर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, जि.प. सदस्या शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, कराड पं. स. सदस्य पैलवान धनंजय पाटील, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, अर्जुन कराळे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्या रेखाताई पवार, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, निवासराव थोरात, शिवाजी पाटील, जितेंद्र पाटील, विलास भंडारे, दीपक पाटील, जे. डी. मोरे, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, बबनराव शिंदे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की सभासदांना मोफत साखर देणारा आपला एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करताना, आम्ही ऊसदरामध्ये कधीही तडजोड केली नाही. तसेच याचा सभासदांवर कोणताही अतिरिक्त भार पडू दिला नाही. सहकारामुळेच या भागाची खरी प्रगती झाली आहे. एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. येत्या काळात ए.आय. तंत्रज्ञान व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करुन अनेक क्षेत्रांमध्ये सहज १०० टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेता येणार असून, यासाठी कारखाना शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकारी करेल. 

काटकसरीने कारखाना चालवणे हेच आमचे सूत्र राहिले आहे. सर्वाधिक एफआरपी आणि तीही सर्वात लवकर देणारा कारखाना म्हणून आपण ओळख निर्माण केली आहे. गेल्या ११ वर्षांतील यशस्वी कामगिरीची नोंद व्ही.एस.आय.सह इतर संस्थांनी घेत कृष्णा कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्यात आधुनिकीकरणासह अनेक ठोस कामे करता आली. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने १४.१९ लाख टन ऊस गाळपाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३५०० रुपये ऊसबिल वेळेत देण्यात आले. त्यामुळे सभासदांचा कारखान्यावरचा विश्वास अधिक ठाम झाला आहे. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा साखर कारखाना म्हणून कृष्णेची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या सांगली जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव यांनी सहकारात स्थिरता असणे अत्यंत आवश्यक असून, ही स्थिरता देण्याचे काम डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वातून झाले आहे. सहकार टिकविण्यासाठी आणि अधिक सक्षमपणे वाढविण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन केले.

संचालक श्रीरंग देसाई यांनी डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वात कृष्णा कारखाना सहकार क्षेत्रात देशातील क्रमांक एकचा कारखाना बनेल, असा विश्वास व्यक्त केला.  

यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले यांनीही मनोगत व्यक्त केले.  

कार्यक्रमाला बहे गावचे उपसरपंच मनोज पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक गिरीश पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील-घोणशीकर,  माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले,  राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या सांगली जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, पैलवान आनंदराव मोहिते, आर. टी. स्वामी, सचिन पाचपुते, हेमंत पाटील यांच्याशह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संचालक बबनराव शिंदे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. सचिन पाचपुते यांनी आभार मानले. 

कृष्णा सहकाराचा गोड आदर्श’चे प्रकाशन

जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या गेल्या ११ वर्षांतील गौरवशाली कार्यकाळाचा आढावा घेणाऱ्या ‘कृष्णा सहकाराचा गोड आदर्श’ या कार्यअहवाल पुस्तिकेच्या प्रकाशन ज्येष्ठ सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या ११ वर्षांत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने कृष्णा कारखान्यात केलेल्या विकासकामांचा, आधुनिकीकरणाचा, शेतकरी हिताच्या योजनांचा आणि सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा सविस्तर आढावा या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे.

Wednesday, May 6, 2026

नसरापूर अत्याचार प्रकरण ; मृत्यूनंतरही नराधमाने चिमुकलीला सोडलं नाही! नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात उघड ;

वेध माझा ऑनलाईन।
पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता या प्रकरणातून धक्कादायक माहिती उघड होत आहे. 

65 वर्षाच्या भीमराव कांबेळे या नराधमाने तोंड दाबून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा अमानुष अत्याचार केला होता. ज्या गोठ्यात तो गेली काही महिने राहत होता. तिथंच त्याने चिमुकलीला नरक यातना दिल्या. 
आरोपीने चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचं विच्छेदन अहवालात उघड झालं होतं. अशातच आता आणखी तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आलीये, 

चिमुकलीच्या छातीत जोरात बुक्की मारली...

तोंडाच पायमोजा कोंबल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला होता. पण खरंच ती मेली का हे तपासण्यासाठी नराधमाने असं काही केलं की, कुणी सामान्य वृत्तीचा माणूस विचारही करणार नाही. नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे.


सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदरकीचा राजीनामा ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता त्या विधानसभेच्या सदस्य बनल्या असल्याने त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार ?

महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतीली असून राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे.

4 मे 2026 रोजी बारामतीतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवला. या दणदणीत विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, म्हणून त्यांना खासदार हे पद सोडावं लागणार आहे. तर आता खासदार या पदावर छगन भुजबळ यांना जागा मिळणार का, या चर्चांनी जोर धरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे आता त्यांना ही रिक्त जागा मिळणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे

Tuesday, May 5, 2026

नसरापूर येथील घटनेविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कराडमध्ये निषेध रॅली ; शहरातील विविध संघटनांनी नोंदवला सहभाग ;

वेध माझा ऑनलाईन।
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कराड ब्राम्हण महासंंघाच्या वतीने आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली रॅली काढून पोलीस अधीक्षक दराडे यांना निवेदन देण्यात आले.कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ही घटना अत्यंत निंदनीय असून समाजमनाला हादरवणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. सरकारने प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला असला, तरी न्याय प्रक्रियेत होणारा विलंब टाळून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्र शासनाने "शक्ती कायदा" तात्काळ अंमलात आणून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. 
कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला रोटरी क्लब ,लायन्स क्लब ,इनरव्हील क्लब, सकल हिंदू समाज, जीवन विद्या मिशन, रणरागिणी महिला संस्था, समस्त ब्राह्मण संघटना, आस्था संस्था ,आदिवासी कल्याण आश्रम , अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या 


Monday, May 4, 2026

पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट ; आसाममध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर ; पुडूचेरीमध्ये भाजप आघाडीवर; केरळमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर; पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत ;,

वेध माझा ऑनलाईन।
पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. आसाममध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल केली आहे. आसाममध्ये भाजपचे उमेदवार 102 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार 21 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आसाममध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापण करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे पुडूचेरीमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पुडूचेरीमध्ये 30 जागांपैकी 21 जागांवर भाजपेच उमेदवार आघाडीवर आहेत. तर केरळमध्ये मात्र मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. केरळ हा डाव्या पक्षांचा गड मानला जातो आणि डाव्या पक्षांच्या गडाला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसचे उमेदवार तब्बल 102 जागांवर आघाडीवर आहेत. केरळमध्ये डाव्या पक्षांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 35 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये देखील मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, भाजप पश्चिम बंगालमध्ये तब्बल 204 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेसची यावेळी मोठी पिछेहाट झाल्याचं पहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार केवळ 83 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये आता भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले...मसूर पूर्व भागासाठी येत्या 7 तारखेला शेतकऱ्यांना अरफळ कॅनॉल मधून कण्हेर धरणाचे पाणी सोडणार ;

वेध माझा ऑनलाईन।
मसूर पूर्व भागासाठी आरफळ कॅनल मधून येत्या सात तारखेला पाणी सोडणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. चालू वर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.परंतु कोपर्डी लिंक कॅनॉल चालू झाल्यापासून मसूर पूर्व भागाला कधीही पाणी कमी पडलेले नाही परंतु यावर्षी जास्त प्रमाणात उन्हाची दाहकता व तारळी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पाण्यासाठी अडचण तयार होत आहे मात्र येत्या 7 तारखेला शेतकऱ्यांना अरफळ कॅनॉल मधून कण्हेर धरणाचे पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार घोरपडे यांनी दिली.

तारळी धरणाचे लिकेज काढण्याचे व आरफळ कालवा लायनींग करून पाणी गळती कमी करण्यासाठी उपयोजना केल्या जात आहेत.कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून आमदार मनोजदादा घोरपडे यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मसूर पूर्व भागाचा दुष्काळ मिटवण्यासाठी हणबरवाडी धनगरवाडी ही महत्वकांक्षी उपसा सिंचन योजना कार्याविनित केली असून त्याला कोपर्डी लिंक कॅनॉलच्या माध्यमातून तारळी धरणाचे पाणी घेण्यात येत आहे. परंतु चालू वर्षी सर्व ठिकाणाहून पाण्याची मागणी असून एकाच वेळी सर्वांना पाणी देता येत नाही त्यामुळे पाण्याच्या रोटेशन मध्ये थोडासा विलंब होत आहे. यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता आमदार मनोजदादा घोरपडे हे सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील असून येत्या सात तारखेला मसूर पूर्व भागासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. 

 शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून 90 नवीन डीपी बसवण्याचे काम चालू झालेले आहे. ज्या ठिकाणी 65 चे डीपी आहे तिथे 100 चे डीपी बसवून ज्या ठिकाणी 100 चा आहे त्या ठिकाणी अतिरिक्त 100 बसवल्यामुळे वारंवार डीपी जळणे,फ्युज उडणे, लोड शेडिंग यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.