Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच सोमन वांगचुक यांचं मोठं विधान, काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल दाखवला आहे.

सोनम वांगचुक एक्सवर लिहिले की, ‘
हा लोकशाहीचा विजय आहे. हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचाही विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो.’

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका सीजेपीची होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीने सांगितलं होतं. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे, अस मानले जात होते. परंतु सीजेपीने आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरील उपस्थित हजारो तरुण आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सीजेपीच्या पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असे म्हटले जात होते. परंतु तरुणांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावे लागले. आपण करून दाखवले, असे म्हणत सीजेपीच्या आंदोलनला यश मिळाले, असे दीपके म्हणाले.

तसेच, आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहित धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, असंही ते म्हणाले.  ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, आता दीपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

Friday, July 24, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा ;

वेध माझा ऑनलाईन।
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे.

कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांची यंदाच्या मानाच्या वारकऱ्यांमध्ये निवड करण्यात आली होती. या मानामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची अभूतपूर्व आणि विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून सुरक्षेसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Thursday, July 23, 2026

ठाकरे बंधूंचं 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि संताप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “26 तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसह शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या मनातील राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल. हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.”

या मोर्चाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. सिद्धिविनायक येथे सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि ठाकरे बंधूंनी दिलेल्या या घोषणेमुळे 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

कराडमध्ये भर पावसात काँग्रेसचे NEET पेपर घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

वेध माझा ऑनलाईन।
 देशभर गाजत असलेल्या NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने आज दत्त चौक येथे भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आले. "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", "मोदी सरकारचा निषेध असो", "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.

 *यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले,* "देशातील विद्यार्थी आणि युवकांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीत मोर्चा काढला असताना त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून केंद्र सरकारची हुकूमशाही वृत्ती देशाला अराजकतेकडे नेत आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होत नाही तोपर्यंत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांवरील अन्याय थांबणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष न्याय आणि हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील."

 *यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की,* "NEET पेपर घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. देशातील युवकांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या सरकारविरोधात युवक काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन उभारेल."

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, अमित जाधव, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 विद्यार्थिनीच्या फलकाने वेधले लक्ष 

आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने "आमचे भविष्य सुरक्षित करा" असा फलक हातात घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले 

Wednesday, July 22, 2026

लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र : अध्यक्षपदी डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी जयश्री साने तर खजिनदारपदी विद्या मोरे

वेध माझा ऑनलाईन।
लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वर्षासाठी अध्यक्षपदी लायन डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी लायन जयश्री साने आणि खजिनदारपदी लायन विद्या मोरे यांनी पदभार स्वीकारला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (VDG-2) लायन मंगेश दोशी यांच्या हस्ते पद व शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लायन , लायन जगदीश पुरोहित होते त्यांचे मार्गदर्शन लाभले.

या सोहळ्यास रिजन चेअरमन लायन महेंद्र कदम, झोन चेअरमन लायन गौरी चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात लायन्स चळवळीची सेवा, समर्पण आणि मानवतेची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवा विकास, रक्तदान, नेत्रदान जनजागृती तसेच गरजूंसाठी विविध सेवाभावी उपक्रम नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजश्री पालकर यांनी क्लबच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन समाजहिताला प्राधान्य देत नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सचिव जयश्री साने यांनी संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान व नियोजनबद्ध करण्याची भूमिका मांडली, तर खजिनदार विद्या मोरे यांनी आर्थिक पारदर्शकता, शिस्त आणि सेवाभावी प्रकल्पांना सक्षम पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन नेटके व आकर्षक पद्धतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र समाजसेवेची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला.