Saturday, May 30, 2026

कराडमध्ये 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त ; कराड शहर पोलिसांची ड्रग्ज विरोधी जोरदार कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन
कराड शहर पोलिसांनी 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण अंदाजे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.
अशी माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
तसेच ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

विधान परिषद निवडणूक ; सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ! माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी मिळणार ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधानपरिषद जागांसाठी महाविकास आघाडीचे  १५ जागांवर एकमत झाले असून काँग्रेस ८, ठाकरे गट ४ तर राष्ट्रवादी ३ जागांवर लढणार आहे; नांदेड आणि नाशिकाचा तिढा कायम आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादी च्या वाट्याला आला आहे असे समजते त्यामुळे माजी आमदार आणि राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना याठिकाणी संधी मिळणार असेही बोलले जात आहे काँग्रेसकडे यापूर्वी हा मतदारसंघ होता त्यावेळी मोहनराव कदम हे याठिकाणी निवडून आले होते 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकासआघाडीने या सर्व १७ जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १७ जागांपैकी १५ जागांवर जागावाटपाचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित
मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस 
(०८ जागा): 
चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूरची पोटनिवडणूक.

शिवसेना – 
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०४ जागा): रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर.

राष्ट्रवादी काँग्रेस –
 शरदचंद्र पवार गट (०३ जागा): पुणे, ठाणे, आणि सातारा-सांगली.

या १५ जागांवर एकमत झाले असले तरी नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवर मविआतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपला दावा ठोकला आहे. यामुळे या दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर पुन्हा एक बैठक घेऊन यावर सर्वसंमतीने अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

“विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. आजची जागावाटपाची चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन जागा वगळता इतर सर्व जागांवर एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आम्ही सर्व जण पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.




Friday, May 29, 2026

महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर ; 17 जागांसाठी निवडणूक ; भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चांना आता अंतिम टप्पा आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागावाटपावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या फॉर्म्युल्यात भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवल्यामुळे या जागांवर भाजपचा वरचष्मा राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गटानेही आपल्या वाट्याच्या जागांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे चर्चेत पेच निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 
भाजप सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

तर 
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर दावा ठोकणार असल्याचं समोर आलं आहे.

विषारी दारू प्रकरणात 14 जणांचा मृत्यू रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर धडक देत केली तोडफोड ;

वेध माझा ऑनलाइन।
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. विषारी दारू प्रकरणात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू अड्ड्यावर तोडफोड करत निषेध व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकल्या गेलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार स्वतः संबंधित दारू अड्ड्यावर पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी लावलेले पत्रे उखडून टाकत काऊंटरची तोडफोड केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गरीब माणूस मेल्यानंतर आम्ही शांत बसलो तर राजकारणात आम्ही फक्त टाईमपास करायला आलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अशा वेळी सिस्टीम कमी पडते, त्यामुळे आम्हालाच आक्रमक व्हावं लागतं. लहान मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण सिस्टीम वेळेवर मदत करत नाही,” असंही ते म्हणाले.
विषारी दारू प्रकरणानंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक ; पडद्यामागून हालचाली सुरू !

वेध माझा -
 राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळ यांनी अधिकृतपणे आपली इच्छा व्यक्त केली नसली, तरी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीसोबतच पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठीही भुजबळ आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना पक्षाकडून आता केंद्रात संधी दिली जाणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जात असल्यामुळे त्यांना डावलणं पक्षासाठी सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे-सातारा प्रवास होणार फक्त 1 तासाचा ! ;

वेध माझा ऑनलाइन।
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी पुणे ते सातारा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी पाहून या भागांत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI च्या या उपाययोजनांमुळे पुणे ते सातारा कॉरिडोरवरील वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुणे ते सातारादरम्यान पाच ते सहा उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. सध्या पुणे ते सातारा प्रवासा 1.30 ते 2 तास वेळ जातो. वाहतूक कोंडी असली तर सव्वा दोन तास तर हमखास जातात. त्यात साताऱ्यातून पुढे गावात जाणाऱ्या वाहनांना तर आणखी वेळ लागतो. हाच प्रवासाचा वेळ अवघ्या 1 तासावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

पुण्यात मृत्यूचे तांडव… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, एकाही आरोपीला न सोडण्याचे थेट आदेश... चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू...

वेध माझा ऑनलाईन
चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार माजवला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि एकाही आरोपीला न सोडण्याचे आदेश दिले आहेत

गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. दोन्ही पोलीस आयुक्तांना समन्वयाने काम करतानाच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. कोणाचीही हयगय करू नका. कठोर कारवाई करा, असे आदेशच दोन्ही पोलीस आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घ्यायलाही सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.