Sunday, September 20, 2026

श्री गणेश फार्मा प्रो हब एलएलपी होलसेल औषधांच्या दुकानात विविध पदांवर भरती सुरू ; आकर्षक पगारासह सुविधा मिळणार ; कोणकोणत्या पदांसाठी ही नोकर भरती सुरू आहे... त्यासाठी वाचा बातमी...आणि करा एक फोन... दिलेल्या नंबरवर...

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर येथील इंगवले नगर नाकोडा स्टील शेजारी असलेल्या श्री गणेश फार्मा प्रो हब या होलसेल मेडिकल व्यवसायामध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी मुला-मुलींसह कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

        
        या जॉबसाठी खालील               लोकेशनवर भेटा.. माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करा...

याठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढे यावे, असे आवाहन फर्मच्या वतीने करण्यात आले आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामाची क्षमता व पदानुसार योग्यतेचा विचार करून आकर्षक पगार देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भरतीबाबत माहिती देताना फर्मचे संचालक म्हणाले की, 
संस्थेच्या वाढत्या कामकाजासाठी विविध पदांवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मेहनती, जबाबदार आणि काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या तरुण-तरुणींना तसेच अनुभवी कामगारांना येथे रोजगाराची संधी दिली जाणार आहे.रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, 

अधिक माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करावा असे आवाहन फर्मच्या संचालकानी केले आहे.


या फर्ममध्ये खालील पोस्टसाठी...
अर्जंट जागा भरायच्या आहेत...

Saturday, September 19, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा'(king) माझे जिवलग मित्र लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे हे माझे पत्र...

वेध माझा ऑनलाईन।

प्रिय राजू... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा वाढदिवस...

पण माझ्यासाठी आजचा दिवस केवळ नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसाचा नाही;
तर माझ्या गेल्या ३५ वर्षांपासूनच्या अतिशय जिवलग मित्राचा, माझ्या भावाचा वाढदिवस आहे...!

राजू म्हणजे...
पहिल्यापासूनच राजासारखं मन असलेला माझा मित्र!

आपण दोघेही दहावी उत्तीर्ण झालो. तू शिवाजी हायस्कूलमधून आणि मी टिळक हायस्कूलमधून. त्यानंतर अकरावीच्या वर्गात आपण एकत्र आलो. त्यावेळी कुठे माहीत होतं, की वर्गात सुरू झालेली ही ओळख पुढे आयुष्यभराच्या मैत्रीत आणि अक्षरशः भावाच्या नात्यात रूपांतरित होईल!

पण ती झाली... आणि अशी झाली की गेली ३५ वर्षे आमच्यातील मैत्री, आपुलकी आणि वैचारिक नातं आजही तितकंच घट्ट आहे.

या नात्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कधीही अपेक्षा नव्हती... हिशोब नव्हता... स्वार्थ नव्हता. होती ती फक्त निरपेक्ष मैत्री!

माझ्या आयुष्यात एक काळ असा आला, जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या एका कठीण टप्प्यातून जात होतो. त्या काळात तू केवळ माझ्या सोबत नव्हतास, तर माझी सावली बनून उभा होतास.

माझी ताकद माझ्यात टिकवून ठेवण्यासाठी तू जे केलंस, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

आम्ही अक्षरशः एका ताटात जेवलोय...
मी माझ्या घरापेक्षा तुझ्या घरीच अधिक असायचो. तुझे बंधू संजय, विजय आणि प्रशांत यांच्या सोबत मला कधीच वेगळं मानलं गेलं नाही. उलट, लोक मला तुमच्या घरचा आणखी एक भाऊ म्हणूनच ओळखायचे.

तुझी मोठी बहीण रंजना सणस आणि तुझी वहिनी, स्व. उज्वला विजय यादव... या दोघींच्या राख्या माझ्या मनगटावर कधीच चुकल्या नाहीत.

मला बहीण नाही, ही भावना माझ्या मनात कधी निर्माणच झाली नाही... कारण ज्या दिवशी माझ्या हातावर राखी बांधली जात नव्हती, त्या दिवशी तुमच्या घरच्या बहिणींनी आणि वहिनीने माझ्या मनगटावर भावाचं नातं बांधलं होतं.

राजू सातारला शिकायला असताना तर आमची मैत्री आणखीच रंगली होती. मी कराडहून त्याच्याकडे वारंवार जायचो. तो आमच्या दोघांसाठी डबा आणायचा आणि आम्ही दोघे त्याच डब्यात जेवायचो.

त्या डब्यात फक्त अन्न नव्हतं...
त्या डब्यात आमच्या मैत्रीची चव होती!

आणि मग आला तो काळ...

वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी राजू पहिल्यांदा पोस्ट ऑफिस परिसरातून कराड पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरला. तेव्हा अख्खं गाव त्याच्या पाठीशी उभं राहिलं.

कदाचित नियतीने त्याच दिवशी लिहून ठेवलं असावं—

“हा २३ वर्षांचा युवक एक दिवस कराडचा राजा नव्हे, तर कराडकरांच्या विश्वासाचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होईल!”

आज ते स्वप्न सत्यात उतरलेलं पाहताना मित्र म्हणून माझ्या मनात जी भावना आहे, ती शब्दांत मावणारी नाही.

गेली तीन दशके नगरपालिका आणि कराड शहराच्या विकासाशी जोडलेला तुझा प्रवास आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कराडच्या बदलत्या गरजा ओळखून तू ‘कराड फेज टू’ या नवनिर्माणाच्या संकल्पनेचा ध्यास घेतलास. विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि मोठ्या निधीच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा देण्याचे प्रयत्न केलेस.

नगराध्यक्ष झाल्यानंतरही तुझ्या निर्णयांमध्ये तुझ्या संस्कारांची झलक दिसली. नगराध्यक्षपदाचे मानधन आणि बैठकीचे भत्ते स्वीकारून ते स्वतःकडे न ठेवता जनरल फंडात जमा करण्याचा निर्णय असो किंवा नगराध्यक्षांचे वाहन न वापरण्याचा निर्णय असो—पदापेक्षा जबाबदारी मोठी मानणारा माझा मित्र राजू मला त्यातून पुन्हा दिसला.

तुझ्या वडिलांचा, शिक्षणतज्ञ व शाहीर आत्माराम यादव यांचा शैक्षणिक वारसा तू पुढे नेत आहेस, याचा मला विशेष अभिमान वाटतो.

कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ साठी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून संगणक कक्ष, गणवेश, बांधकाम आणि रंगरंगोटी करून देण्यापासून ते पालिकेच्या शाळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यापर्यंतचा तुझा प्रवास हा केवळ राजकीय नाही; तो एका संवेदनशील माणसाचा प्रवास आहे.

आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुझ्याकडे पाहताना मला अभिमान वाटतो...

पण खरं सांगू?

मला सर्वाधिक अभिमान वाटतो तो ‘
आजही माझ्यासाठी तितकाच जिवलग असलेल्या  ‘राजू’चा!

कारण पदं येतात... जातात...
सत्ता बदलते... काळ बदलतो...
पण काही नाती काळाच्या पलीकडे जातात.

आपली ३५ वर्षांची मैत्री हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.

राजू...

तू आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेस. हजारो लोकांच्या अपेक्षा तुझ्याशी जोडल्या आहेत. शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे.

पण माझ्यासाठी तू आजही तोच आहेस...

अकरावीच्या वर्गात माझ्यासोबत बसलेला,
सातारला दोघांसाठी डबा आणणारा,
एका ताटात माझ्यासोबत जेवणारा,
माझ्या वाईट काळात माझी सावली बनून उभा राहणारा,
आणि सुख-दुःखात कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्या सोबत राहणारा माझा मित्र ‘राजू’!

तुझं मन असंच मोठं राहो...
तुझ्या हातून कराडच्या विकासाची मोठी कामं घडोत...
तुझ्या नेतृत्वाला यश मिळो...
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

आज पदामुळे तुझी ओळख मोठी झाली असली, तरी माणूस म्हणून तू जसा आहेस, तसाच कायम राहा...

कारण माझ्यासाठी...

“राजेंद्रसिंह यादव” आणि “राजू” हे माझ्या आयुष्यातील एका अतूट, निरपेक्ष आणि भावासारख्या नात्याचं नाव आहे!

माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक, मनापासून आणि अनंत शुभेच्छा!

तुला उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि कराडच्या विकासासाठी तुझ्या मनात असलेली प्रत्येक स्वप्नं पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


तुझा मित्र

अजिंक्य गोवेकर-संपादक/ पत्रकार/वेध-माझा...


Friday, September 18, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा' ; लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इतिहास घडला आणि लोकप्रिय, तरुण तडफदार व धडाडीचे नेतृत्व असणारे राजेंद्रसिंह यादव यांनी थेट नगराध्यक्षपदी विजय मिळवला. लोकप्रिय नेता ते लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी झेप घेणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांच्या रूपाने कराडकरांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीतून आपला नेता निवडला आहे. कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प घेऊन राजेंद्रसिंह यादव विकासाची फेज टू ही संकल्पना राबवत आहेत.
कराड शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन विकासाची नवी संकल्पना आखण्याची गरज होती. गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराची गरज ओळखून ‘कराड फेज टू’ या कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प सोडला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हजारो कराडकरांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कराडच्या विकासासाठी 100 कोटींपेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द दिला. प्रत्यक्षात यादव यांनी जिद्दीने प्रयत्न करून 325 कोटी रूपयांचा निधी कराडसाठी खेचून आणला. यातून कराडच्या भुयारी गटर योजनेचे अद्ययावतीकरण व पाणी योजनेचे अद्ययावतीकरण अशी महत्वाची कामे मार्गी लागली. याबरोबरच शहरात स्मारक सुशोभीकरण, रस्ते, गटर्स अशा विविध कामांच्या माध्यमातून शहराचा मेकओव्हर होऊ लागला.
या दरम्यानच्या काळात नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुमारे 10 हजारांच्या मताधिक्याने राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले. याबरोबरच त्यांच्या यशवंत आघाडी व लोकशाही आघाडीची नगरपालिकेमध्ये बहुमताने सत्ता आली. नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना राजेंद्रसिंह यादव यांनी आर्थिक शिस्तीचा धडा घालून देत नगराध्यक्ष पदाचे मानधन, जनरल मिटींगचे भत्ते न स्वीकारता ते जनरल फंडात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षांचे वाहनही न वापरण्याचा निर्णय घेतला.
गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना राजेंद्रसिंह यादव यांना पालिका कामकाजाची खडान्खडा माहिती झाली आहे. याविषयावर ते तासन्तास बोलतात. त्यावेळी त्यांच्या अभ्यासूपणाची झलकही नागरिकांना दिसते. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमितपणे मिळावे, यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणात हे बदल दिसणार आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलावा, शहर सुशोभित दिसावे, यासाठी स्मारक सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, स्वच्छता या विषयांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. शहर विकासाच्या त्यांच्या स्वत:च्या संकल्पना असून त्या राबवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलध व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत.
वडील शिक्षणतज्ञ, शाहीर आत्माराम यादव यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे  नेताना त्यांनी आपल्या प्रभागातील कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 साठी स्वत:च्या खिशातून दहा लाखांहून अधिक रुपये खर्च करून संगणक कक्ष, विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेचे बांधकाम आणि संपूर्ण रंगरंगोटी करून दिली. आज ही शाळा त्यांच्या छत्रछायेखाली देशभर नावलौकिक मिळवू शकली. आज या शाळेला पीएम श्री मानांकन, नवीन इमारतीसाठी 10.55 कोटीचा निधी मिळाला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर पालिकेच्या दहाही शाळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सुविधांमुळे पालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा गरीब घरचा विद्यार्थी देखील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यां समोर स्पर्धा करू लागला आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘जय जवान’चा तिरुपती बालाजी अवतरला! मंदिर प्रतिकृती ठरतेय कराडकरांचे आकर्षण; देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या शुक्रवार पेठेतील जय जवान श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भव्य आणि आकर्षक देखाव्यामुळे हा देखावा गणेशभक्तांसह कराडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, दर्शन व देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

जय जवान श्री गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून कराडच्या गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक देखाव्यांची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यंदा मंडळाचे ५० वे वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विशेष आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
मंडळाच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या देखाव्यांमध्ये इच्छापूर्ती कलश, भुताची गुहा, चालता-बोलता प्रश्नमंजुषा, अष्टविनायक दर्शन, अक्षरधाम मंदिर, एड्स जनजागृती सजीव देखावा आणि गंगोत्री मंदिर यांचा समावेश आहे. या देखाव्यांना कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
सुवर्ण महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेविका किशोरी शिंदे, नगरसेवक आशुतोष डुबल तसेच भाजप युवा नेते अतुल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी जय जवान श्री गणेश मंडळ उत्सव समिती २०२६चे अध्यक्ष सचिन औंधकर, उपाध्यक्ष अमोल पोकळे, खजिनदार संदीप कालेकर, सचिव प्रसाद तोडकर, तसेच ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष शंतनू कालेकर, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, खजिनदार उमेश बाचल, सचिव आकाश बाचल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक परंपरा आणि कलात्मक देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या जय जवान मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीने यंदाच्या गणेशोत्सवात विशेष रंग भरला आहे.

गणेश मंडळाच्या आरतीतून जनतेशी नाळ जोडणारे अतुलबाबा-शिवेंद्रसिंहराजे! कराडच्या गणेश मंडळांना दुचाकीवरून भेटी; सामान्यांमध्ये मिसळत नेत्यांनी साधला थेट संवाद ;कराडमध्ये चर्चेला उधाण!

वेध माझा ऑनलाइन।
गणेशोत्सवाच्या उत्साहाने कराड शहर आणि परिसर भक्तिमय झाला असताना सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या, दर्शन आणि विविध कार्यक्रमांना राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही पाहायला मिळत आहे. आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये आरतीचे कार्यक्रम सुरू असतानाच, आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही कराड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणरायाची आरती केली.

विशेष म्हणजे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना दुचाकीवरून फिरत भेटी देत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. मोठा ताफा किंवा औपचारिक स्वागतापेक्षा गणेशोत्सवाच्या वातावरणात सामान्य नागरिकांमध्ये मिसळण्याच्या या पद्धतीची सध्या शहरातील गणेश मंडळांमध्ये चर्चा रंगली आहे.

गणेश मंडळात पोहोचल्यानंतर आरतीमध्ये सहभागी होणे, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणे, गणेशभक्तांच्या शुभेच्छा स्वीकारणे आणि त्यांच्यासोबत काही क्षण घालवणे, यामुळे दोन्ही नेत्यांनी आपुलकीचा संदेश दिल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपचे प्रमुख नेते म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अतुलबाबा भोसले यांची स्वतंत्र राजकीय ओळख आहे. सातारा परिसरात शिवेंद्रसिंहराजे तर कराडमध्ये अतुलबाबा भोसले, अशी स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मात्र गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक आणि धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही नेते नागरिकांमध्ये प्रत्यक्ष मिसळताना दिसल्याने त्यांच्या या शैलीची चर्चा आता गणेश मंडळांमध्येही होत आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, आपुलकी आणि नागरिकांशी संवाद साधण्याचे माध्यम ठरतो. त्याच पार्श्वभूमीवर नेते आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कराडच्या गणेश मंडळांमध्ये सध्या आरतीसोबतच या दोन्ही नेत्यांच्या साधेपणाच्या शैलीचीही चर्चा रंगताना दिसत आहे.

सह्याद्री साखर कारखान्याच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; सभास्थळी राडा५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप; आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांची प्रतिसभा

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सत्ताधारी व विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे चर्चेत आली. सभेच्या ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि विधान परिषद आमदार धैर्यशील कदम हे कार्यकर्त्यांसह सभास्थळी उपस्थित झाले. यावेळी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले; मात्र काही काळ कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे चित्र होते.
दरम्यान, मुख्य सभा गुंडाळल्यानंतर आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी त्याच ठिकाणी प्रतिसभा घेत सत्ताधारी गटावर प्रश्नांची सरबत्ती केली. "बाळासाहेब पाटील यांनी सभा का गुंडाळली? ६५० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी घेतले? या कर्जाची परतफेड कशी करणार?" असे सवाल उपस्थित करण्यात आले.

सह्याद्री साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा असून सभासदांना कारखान्याच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याचा आणि त्याची उत्तरे मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, सभा अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळण्यामागचे कारण काय, असा सवालही आमदार घोरपडे व कदम यांनी प्रतिसभेत उपस्थित केला.

"कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांसह ६५० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत सरकार दरबारी चौकशी लावणार," असे आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांसाठी महत्त्वाचा असून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा कायम टिकला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही दोन्ही आमदारांनी यावेळी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकारामुळे सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी गटातील संघर्ष चव्हाट्यावर आला असून, ६५० कोटींच्या कर्जाचा मुद्दा तसेच मोफत साखर देण्याचे जाहीर करूनही ती साखर मोफत का दिली जात नाही... या मुद्यांसह अवघ्या १५ मिनिटांत सभा गुंडाळल्याचा आरोप देखील चर्चेत असल्याने कारखान्याच्या कारभाराबाबत आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी विरोधक आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले 

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा ; भाजप आमदार धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांची सभेत एन्ट्री ; सभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण मोठा पोलीस बंदोबस्त ; मोफत साखरेच्या मुद्यावरून सत्ताधारी - विरोधक आमनेसामने ; कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्याकडून मध्यस्थीची भूमिका ;


वेध माझा ऑनलाईन।
आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी गटात राडा झाला यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

दरम्यान या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाजप आमदार मनोज घोरपडे, विधान परिषद आमदार धैर्यशील कदम सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत उपस्थित झाले. यावेळी  कार्यकर्त्यांची सभास्थळी हामरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले. 
सभेठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभा ठिकाणी राडा झाला त्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन करण्यात आले. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते

यानंतर भाजप चे आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी त्याच ठिकाणी दुसरी प्रतिसभा घेत बाळासाहेब पाटील यांनी सभा का गुंडाळली?650 कोटींच कर्ज कशासाठी घेतलं?त्याची परतफेड कशी करणार याबाबत प्रश्न विचारून आम्ही या कारखान्याची सरकार दरबारी चौकशी लावणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले
साखर कारखाना हा शेतकरी सभासदांसाठी महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत मात्र सभा केवळ 15 मिनिटात गुंडालायच कारण काय?असा सवालही या प्रतिसभेत दोन्ही आमदारांकडून विचारण्यात आला
सह्याद्री कारखाना शेतकरी सभासदांसाठी टिकला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही हे दोन्ही आमदार म्हणाले