Tuesday, August 18, 2026

कराड पालिकेचे भाजपचे नेते गुंड्याभाऊ वाटेगावकर म्हणाले...पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद ;

वेध माझा ऑनलाईन।
पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी आज दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद आहे. शहरातील ज्या प्रश्नांकडे तुम्ही अथवा तुमच्या नेत्यांनी सातत्याने डोळेझाक केली, ते प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशावेळी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची उंची तपासावी, असा जोरदार टोला कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांना लगावला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी पाटण कॉलनी झोपडपट्टी प्रश्नाबाबतचे निवेदन वर्तमानपत्रांना प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात घेतलेल्या आक्षेपांवर सडेतोड प्रत्युत्तर देणारे निवेदन कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात श्री. वाटेगावकर यांनी म्हटले आहे, की नामदेव पाटील यांचे कराड शहराच्या विकासासाठी नेमके योगदान काय? शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी किती वेळा आवाज उठवला? किती प्रश्न मार्गी लावले? याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरालगत असलेल्या पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर अगदी विधानसभेत आवाज उठवून, या प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याशिवाय या प्रश्नातील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर प्रत्येक टप्प्यावर पत्रव्यवहार करुन, हा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल केली आहे. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने ११ डिसेंबर २०२४ रोजी पाटण कॉलनीतील जागेचा वापर बदलून बेघरांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पत्र दिले. १६ डिसेंबर २०२४ रोजी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसा प्रस्तावही पाठवला. तसेच नगररचना योजना क्रमांक १ मधील संबंधित जागेवरील ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतुदींनुसार परवानगी मागण्यात आली.

दरम्यान, १८ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाटण कॉलनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे व आ.डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या ५ महिन्यात म्हणजेच दि. ८ एप्रिल २०२५ रोजी नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर या प्रकरणाचा पुढील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय पाठपुरावा सुरू झाला. 

पुढे दिनांक ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले. संबंधित जागेचे स्थान, सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, पार्किंगची आवश्यकता आणि इतर बाबींचा विचार करून ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासंबंधी योग्य निर्णय घेऊन, ‘महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६’च्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर केल्यास शासनस्तरावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडी पाहता पूर्णपणे स्पष्ट होते, की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ठोस प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना नामदेव पाटील मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापायी व स्वत:च्या नेत्यांची निष्क्रीयता लपविण्यासाठी आमदारांकडेच कामाचा हिशोब मागत आहेत, हे हास्यास्पद आहे. 

खरंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या प्रश्नासाठी गेल्या दीड वर्षात केलेले प्रयत्न तारखेनिशी या निवेदनात आम्ही मांडले आहे. नामदेव पाटील यांनी हिम्मत असेल तर त्यांनी अथवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या ५० वर्षांत काय प्रयत्न केले? या प्रश्नावर यापूर्वी किती पत्रे दिली? किती वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला? किती प्रस्ताव शासनाकडे पाठवले? कोणते निर्णय घेतले? याचा हिशोब त्यांनीच जनतेसमोर द्यावा, असे आव्हान श्री. वाटेगावकर यांनी दिले आहे.

आ.डॉ. अतुलबाबांचा प्रत्यक्ष पाठपुरावा!
- १० डिसेंबर २०२४ : कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आरक्षण क्र. ४८ मधील पार्किंगचे नामांतर करून बेघरांसाठी घरे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
- १६ डिसेंबर २०२४ : नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून आरक्षण बदलास शासनाची परवानगी मागितली.
- १८ डिसेंबर २०२४ : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून उच्चस्तरावर पाठपुरावा केला.
- ८ एप्रिल २०२५ : नगररचना संचालक स्तरावर पुढील पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा सुरू
- ५ मे २०२६ : राज्य नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले

‘उलटा चोर कोतवाला को डाटे’
ज्या भागात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण राहतात, त्याच पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न ५० वर्षांत त्यांना सोडविता आलेला नाही. अशावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर योग्य व सकारात्मक पाठपुरावा करत असताना, त्यांनाच या कामाचा हिशोब मागण्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी कृती म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’, अशीच असल्याची टीका विजय वाटेगावकर यांनी केली आहे.

नदीत प्लास्टिक फेकणाऱ्यांना सौरभ पाटलांनी भररस्त्यात झापले; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या स्वच्छतेबाबतच्या भूमिकेची पुन्हा आली प्रचिती ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील राजकारणात अनेक नेते त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. मात्र, स्वच्छता हा केवळ प्रचाराचा विषय न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणाऱ्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते सौरभ पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती सोमवारी पुन्हा एकदा आली.

इस्लामपूर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सौरभ पाटील हे ताकारी मार्गे कराडकडे परतत होते. कारवे परिसरात आल्यानंतर त्यांच्या नजरेस एक धक्कादायक प्रकार पडला. मुंबई परिसरातील नोंदणी असलेल्या एका चारचाकी वाहनातून पुलावरून थेट नदीपात्रात प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्यात येत होत्या.
हा प्रकार पाहताच सौरभ पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित वाहनचालकाला थांबवले. नदीत प्लास्टिक फेकून प्रदूषण वाढवणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी चांगलेच सुनावले. 'निसर्गाबाबत कोणतीही जबाबदारी नाही का? सार्वजनिक ठिकाणी अशी बेजबाबदार कृती कशी करता?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संबंधित वाहनाच्या पुढील भागात स्टेअरिंगजवळ पोलिसांची टोपी ठेवलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरूनही त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. 'टोपी पुढे ठेवली म्हणजे नियम मोडण्याचा परवाना मिळतो का?' असा थेट प्रश्न करत त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या मुद्द्यावर सौरभ पाटील यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. शहरात असो किंवा बाहेरगावी, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या व्यक्तींना ते वेळोवेळी जाब विचारत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नदी, पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता याबाबतची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश त्यांनी या घटनेतून पुन्हा एकदा दिला. त्यामुळेच कराड आणि परिसरात स्वच्छतेचा कट्टर पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
निसर्गाचे रक्षण केवळ भाषणातून होत नाही, तर चुकीच्या कृतींना वेळीच रोखण्याच्या धाडसातून होते, हे सौरभ पाटील यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.

Monday, August 17, 2026

कराडच्या सोमवार पेठेत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवती जखमी; ऍड विराज जांभळे व बाळासाहेब उमराणी यांनी युवतीची कुत्र्याच्या तावडीतून केली सुटका ; याबाबत पालिका प्रशासनाला कळवून देखील दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
सोमवार पेठेतील शिखरे वाड्यासमोर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन युवतीला दुखापत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याच कुत्र्याने एका वृद्ध महिलेवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील अनिल कुलकर्णी यांची कन्या तिच्या आईसोबत घरी जात असताना शिखरे वाड्यासमोर अचानक तेथील भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात युवतीच्या हाताला व पायाला दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेले ॲड. विराज जांभळे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी यांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवतीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्याचवेळी एका वृद्ध महिलेवरही त्या कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी चार दिवसांपूर्वीच सोमवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची माहिती कराड पालिका प्रशासनाला दिली होती. तसेच, या कुत्र्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उंडाळकर यांनी केला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे वडील अनिल कुलकर्णी यांनीही भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 'आज माझ्या मुलीला कुत्र्याने चावा घेतला आहे. उद्या आणखी कोणालाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे सोमवार पेठ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काँग्रेस नेते नामदेवराव पाटील यांचा आमदार अतुलबाबांना प्रश्नांचा भडिमार ;काय म्हणाले...? निवडणुकीपूर्वी १५ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते तुम्ही दोन वर्षांत काय केले, याचा हिशोब द्या...

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीच्या प्रश्नावर दक्षिण कराडचे आमदार आज पत्रकार परिषद घेऊन चव्हाण कुटुंबावर आरोप करीत आहेत. मात्र, इतरांवर आरोप करण्यापूर्वी निवडणुकीपूर्वी पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर आमदारांनी जनतेला द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नादेवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

कराडच्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्ती चा नसून जमिनीच्या मालकीचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा कायदेशीर प्रश्न आहे. संबंधित जमिनीच्या मालकीबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असल्याने या प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यास कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सरकारांच्या काळात हा प्रश्न का सुटला नाही, यावर राजकीय आरोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी स्वतः दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी काय केले, हे सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.

निवडणुकीपूर्वी १५ दिवसांचे आश्वासन; आता दोन वर्षे झाली!
दक्षिण कराड विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत आमदारांनी निवडून आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनी झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावू आणि झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी जमिनीचे हक्क मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते.

आज त्या आश्वासनाला जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मग या दोन वर्षांत नेमके काय झाले? प्रश्न किती पुढे गेला? कोणते प्रस्ताव तयार झाले? कोणत्या विभागांशी बैठक झाली? न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले? याची माहिती आमदारांनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्वरित कारवाई’ नंतर पुढे काय झाले?
या प्रश्नासंदर्भात आमदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते आणि त्यावर ‘त्वरित कारवाई करा’ असा शेरा देण्यात आल्याचे सांगितले जाते. जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले असतील, तर त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही दोन वर्षांत प्रश्न सुटला नसेल, तर त्यामागील कारण काय? संबंधित विभागांकडून कोणती माहिती मागविण्यात आली? किती बैठका घेण्यात आल्या?  कोणते प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झोपडपट्टी धारकांच्या कायम स्वरूपी पुनर्वसन अथवा जमिनीच्या हक्काबाबत आजची स्थिती काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदारांनी द्यावीत.

आश्वासन पूर्ण झाले तर स्वागतच!
पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन जर प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर त्याचे निश्चितच स्वागत केले जाईल. कारण हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्नआहे.

आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कामाचा लेखाजोखा द्या
कुणाच्या काळात हा प्रश्न प्रलंबित राहिला, कुणाला जमिनीच्या व्यवहाराची किती माहिती आहे, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर त्यांनी किती काम केले, हा जनतेचा मूलभूत प्रश्न आहे.

त्यामुळे दक्षिण कराडच्या आमदारांनी इतरांवर आरोप करण्याऐवजी प्रथम पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या आश्वासनाचा दोन वर्षांचा कृती अहवाल जनतेसमोर सादर करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे




Sunday, August 16, 2026

कराडची कन्या... सई थिटे भेदक गोलंदाजीमुळे युएई संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र

वेध माझा ऑनलाईन।
मूळची कराडची आणि सध्या दुबईत वास्तव्य करणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या सई थिटे हिने युएईच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघातील निवडीचे सोने केले. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे युएईचा संघ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी- २० विश्वचषक आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  संघातील सर्वात युवा खेळाडू म्हणून ती संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
 
मलेशियातील स्पर्धेत सईने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्वचषक पात्रता फेरीत सईने अत्यंत निर्णायक क्षणी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवून दिले!  "युएई संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी शेवटच्या षटकात ६ धावांचा बचाव करायचा होता आणि ही महत्त्वपूर्ण शेवटची ओव्हर सईने टाकली; मलेशियाला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज असताना, तिने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. शेवटच्या दोन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना, तिने केवळ एक धाव दिली आणि युएईच्या संघाने आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक आशिया कप २०२७' मधील आपले स्थान पक्के केले. संपूर्ण सामन्यातील तिची गोलंदाजी अतिशय किफायती ठरली; तिने ४ षटकांत १ बळी घेत २५ धावा दिल्या.
दहावीच्या परीक्षांच्या काळातही सईने अभ्यासासोबत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट समतोल साधला. पाचवीत असतानाच युएईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने दुबईमध्ये राहून गेली पाच वर्षे सातत्याने कठोर सराव, अथक मेहनत करून  स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. या यशामागे आई प्राजक्ता व वडील निखिल थिटे यांचे क्रिकेटवरील अपार प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा सिंहाचा वाटा आहे. 

कराडचे विशाल थिटे यांची ती पुतणी असून  पूजा साहित्यचे नारायण कुलकर्णी यांची ती नात आहे.

सामन्याचा सारांश
२९ जुलै, २०२६ स्थळ: क्वालालंपूर, मलेशिया
नाणेफेक: युएई संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई धावसंख्या: १९.३ षटकांत सर्वबाद ९५ (अल मसीरा जहांगीर ३१)
मलेशियाची धावसंख्या: २० षटकांत ९४/६
निकाल: युएई  संघ एक धावेने विजयी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील 7 जणांनी सलग तीन निवडणुकीमध्ये दुबार मतदान केले; 70 वर्षे तुमच्या घरात राजकारणाची मोठी पदे असताना एखादा उद्योगतरी कराडात आणायचा होता, ; तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून लोकांनी तुम्हाला डावललय ; आमदार अतुलबाबांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार ;

वेध माझा ऑनलाईन। दुबार मतदान नोंदणीच्या मुद्द्यावरून कराडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कृष्णा हॉस्पिटल परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या मतदान नोंदणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुबार मतदानाच्या नोंदणीबाबत करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा करताना भोसले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सात जणांची विविध ठिकाणी मतदान नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अद्याप स्वीकारता आलेला नसल्याचे दिसत असल्याची टीका करत, लोकांनी त्यांना नाकारल्याचे वास्तव त्यांनी मान्य करावे, असा सल्लाही भोसले यांनी दिला.

'५८ हजार बोगस मतदारांचा आकडा कुठून आला?'
दुबार मतदानाच्या मुद्यावर भाष्य करताना भोसले यांनी ५८ हजार बोगस मतदारांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. स्थलांतरित, मृत आणि इतर मतदारांची आकडेवारी लक्षात घेतली तर एवढ्या मोठ्या संख्येचा आधार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने कोणताही आरोप करताना वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे सांगत, केवळ राजकीय आरोपांसाठी बिनबुडाचे दावे करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

'७० वर्षांच्या राजकीय वारशाचा हिशेब द्या'
चव्हाण कुटुंबाच्या अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना भोसले यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी कोणते उद्योग आणले, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
आपल्या दीड वर्षांच्या कामाचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीचे मूल्यांकन करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडे आणि अमित शाह यांच्यावरील वक्तव्यांवरही आक्षेप
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याबाबत चुकीची विधाने करणे योग्य नसल्याचे भोसले म्हणाले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी संयम बाळगावा, असेही त्यांनी सांगितले.

'कराडमध्ये नेकलेस रोड होणारच'
पत्रकार परिषदेत कराडमधील बहुचर्चित नेकलेस रोड प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. हा प्रकल्प कराडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार करत, या प्रकल्पाचे थ्री-डी सादरीकरण सत्ताधाऱ्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.

Saturday, August 15, 2026

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या... पृथ्वीराजबाबांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया -

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. "मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मान्यता दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नकार दिला होता. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी केंद्रात मंत्रिपदाची अट ठेवली होती. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. तसेच केंद्रात मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते", असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या विषयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या...
" आता त्यांच्याविषयी आम्ही वक्तव्य करणं उचित नाही. कारण त्यावेळी राजकारणात आम्ही  नव्हतो. याशिवाय त्याचं आता औचित्यही नाही. पृथ्वीराज चव्हाण काही म्हणाले असतील. माझी त्यावेळी उपस्थिती नसेल. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय उपस्थित असले तरी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सगळ्यांसमोर बोलणं उचित नाही. त्या काळाबद्दल टिप्पणी मला करता येणार नाही. कारण त्यावेळी मी नव्हते. ज्या संघटनेला गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्यांनी संघटनेला भरभरून दिलं, त्यानंतर मला असं वाटत नाही की, अशा पद्धतीने त्यांच्या विषयी विचार करण्याची आवश्यकता आहे."

"राजकारणात आजच्या परिस्थितीत अजूनही त्यांचं नाव लोकं घेतात. मग ते कोणत्याही अर्थाने घेत असतील. मी नाही म्हणत की, पृथ्वीराज बाबांनी गोपीनाथ मुंडे यांचं काम अनादराने घेतलं आहे. आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयीदेखील परवा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टिप्पणी केली. ते देखील अनादर करत नाहीत. मीडिया काय करतो, कुठल्यातरी एका कार्यक्रमाचं स्टेटमेंट काढतो आणि पंकजा मुंडे नाराज आहे, असा प्रश्न विचारतो."असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया थांबवली

'