Wednesday, August 5, 2026

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकारचे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना) यांचे स्व जयवंतराव भोसले यांना अभिवादन । कराडचे माजी नगरसेवक हणमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांची उपस्थिती ।

वेध माझा ऑनलाईन।
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कृष्णा उद्योग समूहाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (भारत सरकार)चे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना), कराडचे माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत ग्रामीण विकासाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या विविध संस्था आणि उपक्रमांमुळे अनेकांना विकासाची संधी मिळाली.
आप्पासाहेबांनी जपलेली सहकाराची मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या विकासाची भूमिका आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा हा समृद्ध वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

विजय वडेट्टीवार यांची कराडमध्ये मोठी वक्तव्ये म्हणाले...सुनेत्रा वहिनींनी आपण लढवय्ये आहोत हे सिद्ध करावे...पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत..त्या दोन गुजराती नेत्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस हा मराठी माणूस पंतप्रधान म्हणून बरा...


वेध माझा ऑनलाइन।
कराड दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी इंदिरा गांधींच्या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही त्यांनी टीकेची झोड उठवली.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी "गुंगी गुडिया" असे संबोधले जात होते. हा काही अपमानास्पद शब्द नाही. त्याचे राजकारण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट करत, "त्या गुंगी गुडिया नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपण लढवय्या आहोत, दुर्गा आहोत, झाशीची राणी आहोत हे सिद्ध करावे," अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आल्याबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले की, "ज्यांना खरोखर जोडे मारायला हवेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत यांच्यात नाही. सत्तेची झुल पांघरून स्वतःला वाघ समजणाऱ्यांनी आधी ती झुल काढावी, मग ते वाघ आहेत की कोल्हे, हे जनतेला दिसेल."

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असूनही त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, अशी भावना व्यक्त करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करत त्यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. "त्या काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याची संधी देऊ," असे वक्तव्यही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. मात्र, त्यासाठी आधी दिल्लीतील दोन गुजराती नेत्यांना हटवावे लागेल, तेव्हा खरा आनंद होईल," असे म्हणत त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला.

विजय वडेट्टीवार यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज १३ वी पुण्यतिथी ; कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन; स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी १३ वी पुण्यतिथी आहे. 

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज बुधवारी कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीवेळी घेतलेला तो निर्णय ठरणार टर्निंग पॉइंट? शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू ;

वेध माझा ऑनलाईन।
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं. एकनाथ शिंदेंनंतर  अजय चौधरींची ठाकरेंनी विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. व्हिप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठकही बोलावली. निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.  बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली.  पक्षघटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा देखील उल्लेख करण्यात आला होता.  विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे, असा युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.

दरम्यान भरत गोगवले यांना एकनाथ शिंदे यांनी  पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याबाहेर झाला आहे. सर्व बंडखोर आमदार सुरत गोवाहाटीला असताना हा निर्णय झाला होता. जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा हे सर्व आमदार राज्यबाहेर होते. 2019 च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते, असा युक्तिवादही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे.

Tuesday, August 4, 2026

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. इंदिराजींप्रमाणे सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील, ; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया -

वेध माझा ऑनलाईन।एखादी महिला राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसने नेहमीच राजकारणाची पातळी सांभाळली आहे. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. इंदिराजींप्रमाणे सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरील 'गुंगी गुडिया' पोस्टवरून राजकीय वातावरण तापले. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला 'जोडे मारो' आंदोलन केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पत्रकारांना कधीही सामोरे गेलेले नाहीत. ‘५० करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा' किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलची त्यांची वक्तव्ये जगजाहीर आहेत. पण, काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने राजकारणाची पातळी सोडलेली नाही. राम मनोहर लोहियांनी इंदिराजींबद्दल जो शब्द प्रयोग केला होता. त्याला इंदिराजींनी कृतीतून उत्तर दिले होते. सुनेत्रा पवार या देखील सक्रिय राजकारणात कार्यरत असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल पातळी सोडून बोलणे योग्य नाही. त्या देखील कृतीने उत्तर देतील, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
बीडमधील कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'गुंगी गुडिया' अशी टिप्पणी करण्यात आली होती. 

दरम्यान, सुनेत्रा पवारांशी संबंधित पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आरोप आणि आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडीया असा केला ; हर्षवर्धन सपकाळ यांनी या विधानाचे केले समर्थन - राज्यातले राजकारण तापले ; हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी -

वेध माझा ऑनलाइन / गुंगी गुडिया प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी म्हटले की, ‘इतक्या घाण वृत्तीची काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही त्यांना काही बोललो तर चालेल का? त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही. माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी या अध्यक्षांना काढूण टाकले पाहिजे. काँग्रेसवाल्यांना लाज राहिली नाही.’

.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी ; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ;

वेध माझा ऑनलाइन।
"पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान कायम स्मरणात राहील. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांच्याशी आमच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिकरीत्याही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतेज पाटील, संजय पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे