Thursday, September 3, 2026

कराडच्या नवीन उड्डाणपुलाखाली प्रवेश-निर्गमन मार्गाची पाहणी ; प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग सुचवला; ‘ब्लॅक स्पॉट’ टाळण्यासाठी नियोजन करण्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे संकेत

वेध माझा ऑनलाईन।
 : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड शहरातील नवीन उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश आणि शहरातून बाहेर जाण्यासाठी प्रस्तावित मार्गाची कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी केली. वाहतुकीची सुरक्षितता आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरता मार्ग तयार करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला.

उड्डाणपुलाच्या कामामुळे कराड शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीत बदल होणार असून, प्रवेश व निर्गमनाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, तसेच वाहनचालकांना सुरक्षितपणे मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी नगराध्यक्ष यादव यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली.
दरम्यान, नवीन प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाचे नियोजन करताना या ठिकाणी पुन्हा ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. 
वाहतुकीचा प्रत्यक्ष प्रवाह लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात येतील, तसेच प्रायोगिक तत्त्वावर मार्गाची अंमलबजावणी करून त्याचा परिणाम पाहिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीला अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित दिशा मिळण्याची अपेक्षा असून, प्रवेश-निर्गमन मार्गाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या मार्गाची रचना करताना वाहनांची संख्या, वळणांची रचना, दृश्यमानता आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा विचार करून अंतिम आराखडा निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

कराड नगरपरिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून साहित्य चोरीस गेल्याची बातमी-

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून नगरपरिषदेच्या मालकीचे साहित्य चोरीस गेल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे कराड नगरपालिकेतील गटनेते विजय वाटेगावकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन चोरीस गेलेल्या साहित्याची सविस्तर माहिती, आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कराड नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी नवीन जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जिथे चोरी झाली आहे तेथील पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना भेटून वाटेगावकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीबाबत निवेदन दिले.

नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे वाटेगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून नेमके कोणते व किती साहित्य चोरीस गेले आहे, याची वस्तूनिहाय सविस्तर यादी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या प्रत्येक साहित्याची खरेदी किंमत, लेखा मूल्य आणि सद्य अंदाजे बाजारभाव याबाबत स्वतंत्र माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या साहित्याची नोंद नगरपरिषदेच्या मालमत्ता नोंदवही, स्टॉक रजिस्टर किंवा अन्य संबंधित अभिलेखांमध्ये करण्यात आली होती का, याची माहिती तसेच संबंधित नोंदींच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर साहित्य कधीपासून उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आणि चोरीची घटना कोणत्या कालावधीत घडली असण्याची शक्यता आहे, याचीही माहिती मागण्यात आली आहे
या घटनेबाबत नगरपरिषदेच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार अथवा FIR दाखल करण्यात आली आहे का, असल्यास त्याची प्रत, गुन्हा क्रमांक आणि दिनांक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय अथवा अंतर्गत चौकशी झाली असल्यास चौकशी अधिकारी कोण होते, चौकशीचा अहवाल काय आहे आणि त्यामध्ये कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील नगरपरिषदेच्या साहित्याच्या सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी कोणत्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अथवा सुरक्षा यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे, याची माहिती देण्याबरोबरच संबंधित कालावधीतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, ड्युटी चार्ट, हजेरीपत्रक आणि शिफ्टनिहाय नियुक्तीची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात CCTV कॅमेरे कार्यरत आहेत का, असल्यास संबंधित कालावधीतील CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात आले आहे का, याची माहितीही मागण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत आणि त्यामुळे नगरपरिषदेचे झालेले आर्थिक नुकसान याचा स्वतंत्र अहवाल देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, चोरीच्या घटनेबाबत प्राथमिकदृष्ट्या कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा कंत्राटदारावर कोणती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी वाटेगावकर यांनी केली आहे. भविष्यात नगरपरिषदेच्या मालमत्तेची अशा प्रकारे चोरी किंवा नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या अथवा प्रस्तावित आहेत, हेही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नगरपरिषदेची मालमत्ता ही सार्वजनिक मालमत्ता असून ती नागरिकांच्या करातून निर्माण झालेल्या निधीशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणतीही बाब दडपली जाऊ नये, चोरीस गेलेल्या साहित्याची वस्तुनिष्ठ तपासणी करून आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर यांनी केली आहे.

Wednesday, September 2, 2026

यामदर अतुलबाबा जिल्हा बँकेचे उमेदवार असणार? अतुलबाबांची उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; पण संकेत मात्र बोलके?

वेध माझा ऑनलाईन।
: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या एका रोखठोक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांना भाजपकडून निवडणूक लढवावी लागेल, असे सांगतानाच, “जर तसे झाले नाही तर भाजप जो उमेदवार देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट करून आमदार भोसले यांनी जिल्हा बँक निवडणुकीतील आपल्या भूमिकेबाबत नवा राजकीय संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, उदयसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असताना ते भाजपच्या चिन्हावर किंवा भाजपच्या माध्यमातून कसे निवडणूक लढवणार, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार भोसले यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, “उदयदादा भाजपमधून लढणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण?” या प्रश्नाभोवती आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण फिरू लागले आहे.

भाजप जो उमेदवार देईल त्याचे काम करू’... विधानात दडलेला संकेत?
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अतुलबाबांनी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचाही संदर्भ घेतला. भाजप ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटल्याचा अर्थ “आम्ही सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढणार” असा असल्याचे अतुलबाबांनी स्पष्ट केले.मात्र, याच चर्चेत ‘जर-तर’च्या भाषेत बोलताना त्यांनी उदयसिंह पाटील यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आणि भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करावे लागेल, असे सांगितले.याच एका वाक्याने राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
कारण, जर उदयसिंह पाटील भाजपकडून निवडणूक लढवणार नसतील, तर भाजपचा उमेदवार कोण? आणि त्या उमेदवारासाठी कराडसह जिल्ह्यातील भाजपची ताकद कोणाच्या मागे उभी राहणार? या प्रश्नांची उत्तरे 
शोधण्यास वेध माझा ने सुरुवात केली आहे.

उमेदवारीची इच्छा स्पष्ट नाही; 
पण संकेत मात्र बोलके!
आमदार अतुलबाबा भोसले यांनी मात्र अद्याप “मीच भाजपचा उमेदवार” अशी आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून होईपर्यंत स्वतःचे नाव पुढे न आणता योग्य वेळ साधण्याची ही रणनीती असू शकते. पक्षाने निर्णय जाहीर केल्यानंतरच स्वतःची उमेदवारी अधिकृतपणे समोर आणण्याचा त्यांचा मानस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे अतुलबाबांच्या या विधानाकडे केवळ एक साधे राजकीय वक्तव्य म्हणून न पाहता, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीबाबतचा सूचक संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.


बॉम्ब’ फुटला; 
आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही भाजपची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र, अतुलबाबांच्या एका विधानाने या निवडणुकीतील राजकीय गणितांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.उदयसिंह पाटील नसतील तर मग भाजपचा दुसरा उमेदवार कोण? का भाजपचा तो दुसरा उमेदवार अतुलबाबाच असणार का?या प्रश्नाचे उत्तर अद्याप अधिकृतपणे मिळालेले नसले, तरी अतुलबाबांच्या विधानाने त्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेला पुन्हा जोरदार हवा मिळाली आहे... पाहूया पुढे काय होते ते...


पुण्यात गणेशोत्सवा अगोदरच DJ वरून वाद पेटला!

वेध माझा ऑनलाईन।
पुण्यात आगामी गणेशोत्सवामध्ये डीजेच्या वापरावरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. सध्या काही जण डीजेच्या समर्थनात असले तरी, शहराच्या मोठ्या लोकसंख्येचा डीजेला तीव्र विरोध आहे. सरकारनं या संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यास, डीजे विरोधात मोठं आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी विद्यानंद बापट यांनी आवाज उचलला असून, गणेशोत्सव लाऊडस्पीकर आणि कर्कश्य वाद्यांशिवाय साजरा व्हावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पुणे शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते आणि अशा शहरांनी या अगोदरच हे पाऊल उचलणे अपेक्षित होते असे बापट यांचे म्हणणे आहे. डीजेसारखी कर्कश्य वाद्ये ही कोणत्याही संस्कृतीचा किंवा धर्माचा भाग नाहीत, असे ते स्पष्ट करतात.

बापट यांच्या मते, संसदेने केलेल्या कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे आणि उच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या ५५ आणि ४५ डेसिबलच्या ध्वनी मर्यादेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जर याची अंमलबजावणी झाली नाही, तर पोलीस प्रशासनच याला जबाबदार असेल. लाखो लोकांना या घातक आवाजांमुळे वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतो आहे, तर काही जणांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे, रणकर्कश आवाज बंद करून सामान्य नागरिकांना सुखाने जगता यावे यासाठी ही लढाई आवश्यक असल्याचे बापट यांनी नमूद केले.


कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक व्यवस्थेचा ‘खेळ’ कोणाच्या जीवावर? मुख्य क्रॉसिंग बंद, गरज नसलेला मार्ग खुला;सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व नगरसेवक दादा शिंगण यांचा आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
एकीकडे वाहतुकीच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था उभारली जात असताना, कराडच्या कोल्हापूर नाक्यावर मात्र वाहतूक नियोजनाचा सावळागोंधळ नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व मलकापुचे नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

कोल्हापूर नाका हा कराड-मलकापूरला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या मार्गावर विद्यार्थी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहने, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी वाहतुकीच्या दिशांमध्ये बदल करताना सुरक्षितता, वाहनांची संख्या, पादचारी व विद्यार्थ्यांची हालचाल आणि संभाव्य अपघातस्थळांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निर्णयामुळे हे सर्व निकष तपासले गेले आहेत का, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

P87-P88 बंद... मग P86-P87 का खुला आहे हाच मुख्य प्रश्न आहे एक महत्त्वाचा क्रॉसिंग बंद करण्याची गरज निर्माण झाली असेल, तर त्याच परिसरातील दुसरा क्रॉसिंग खुला ठेवण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न विचारत P87 ते P88 दरम्यानचा मुख्य क्रॉसिंग बंद झाल्यानंतर वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह बदलणार आहे. अशा परिस्थितीत P86 ते P87 दरम्यानचा खुला क्रॉसिंग वाहनचालकांसाठी संघर्षबिंदू ठरू शकतो, 
विशेषतः विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याठिकाणी गंभीर असल्याचे भोंगाळे व शिंगण यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

मलकापूर नगरपरिषदेने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी डी. पी. जैन कंपनीला मुख्य रस्ता बंद करण्याबाबत पत्र दिले होते. या पत्राचा आधार घेत सध्याचा मुख्य क्रॉसिंग बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, २०२४ आणि २०२६ या दोन वर्षांतील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला का?
वाहनांची संख्या वाढली आहे. नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विद्यार्थ्यांची ये-जा वाढली आहे. परिसरातील वाहतूक पद्धती बदलली आहे. मग दोन वर्षांपूर्वीच्या पत्राच्या आधारे आजचा वाहतूक निर्णय घेणे कितपत योग्य आहे? हाही प्रश्न  उपस्थित केला जात आहे.जुन्या पत्राचा संदर्भ देणे सोपे आहे; परंतु आजच्या परिस्थितीचा नव्याने वाहतूक अभ्यास करून निर्णय घेणे प्रशासनाचे कर्तव्य नाही का? असा सवाल भोंगाळे व दादा शिंगण यांनी यावेळी केला

इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य क्रॉसिंग बंद करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करण्यात आली होती का?या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर अद्याप समोर आलेले नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
वाहतूक व्यवस्थेचा निर्णय काही मोजक्या कार्यालयीन कागदपत्रांपुरता मर्यादित राहणार असेल, तर रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचा विचार कोण करणार? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित केला गेला.

दादा शिंगण व सतीश भोंगाळे थेट पोलिसांच्या दारात

या संपूर्ण प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व नगरसेवक दादा शिंगण यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतुकीची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची ये-जा आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.उद्या अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा आजच उपाययोजना करा’अशी भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दुर्लक्ष झाल्यास आंदोलन...

या प्रश्नाबाबत NHAI अधिकारी तसेच अदाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने फेरआढावा घेऊन सुरक्षित पर्याय निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दादा शिंगण व सतीश भोंगाळे यांनी दिला आहे.


Tuesday, September 1, 2026

वेध- माझा च्या प्रश्नावर अतुल भोसलेंचा ‘बॉम्ब’; अतुलबाबा म्हणाले... तर...उदयसिह पाटलांना भाजपकडून लढावे लागेल...अतुल भोसलेंच्या या बोलण्याचा अर्थ काय? कराड तालुक्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच कराड दक्षिणेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारीच्या चर्चेला आता थेट पक्षीय समीकरणांचा तडका मिळाला असून, आमदार अतुल भोसले यांनी आज कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अतुल भोसले?
‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तुमचे आणि ॲड. उदयसिह पाटील यांचे नाव चर्चेत आहे ’ असे वेध- माझा कडून विचारण्यात आले असता डॉ अतुल भोसले यांनी अत्यंत सूचक उत्तर देत “भाजप स्वतंत्रपणे लढणार असेल, तर उदयसिह पाटील यांना भाजपमधून उभे राहून निवडणूक लढवावी लागेल. अन्यथा पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याचे आम्हाला काम करावे लागेल,” असे स्पष्ट केले. त्यांच्या या बोलण्यामागचा अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे...

अतुल भोसले यांच्या या विधानाने अनेक राजकीय अर्थ काढले जात असून, भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या चौकटीबाहेर जाऊन स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या ॲड. उदय पाटील यांना भाजपमधून निवडणूक लढवावी लागेल, असे अतुल भोसले यांनी स्पष्टपणे सांगितल्याने महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीच्या समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला आहे.

दरम्यान ॲड. उदयसिह पाटील हे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडमधील नेते म्हणून परिचित आहेत. त्यांनी स्वतः अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदय पाटील यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले पॅनेलला मदत केली होती. त्यानंतर या राजकीय सहकार्याच्या बदल्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ऍड उदय पाटील यांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचीही राजकीय चर्चा रंगली होती.
मात्र आता अतुल भोसले यांनी उदय पाटील यांनी भाजपमधून निवडणूक लढवावी, असे सूचक विधान केल्याने आता पुढे काय होणार? हाच सवाल निर्माण झाला आहे

अतुल भोसले यांनी टाकलेला हा ‘बॉम्ब’ आता केवळ कराड दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, उदयसिह पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात आणि भाजप-राष्ट्रवादीतील स्थानिक समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जयकुमार गोरे, यांच्यानंतर आता अतुल भोसले यांचा ‘सिग्नल’?
काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती.
त्यातच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही या राजकीय हालचालींवर भाष्य करत, “आम्ही तुम्हाला या निवडणुकीत तुमच्याबरोबर का चालत नाही, असे दोन्ही मंत्र्यांना विचारू; मग आम्हीही गप्प बसणार नाही,” असा इशारा दिला होता.
आता अतुल भोसले यांनी उदयसिह पाटील यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखी धार आली आहे.

वेध माझा ओनलाईन।
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा सध्या जोरदार सुरू असताना अतुल भोसले यांनी याबाबत एक बाँब टाकला आहे... तुम्ही आणि ऍड उदय पाटील यांच्या नावाची होणाऱ्या जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे या वेध-माझा च्या प्रश्नावर बोलताना आमदार अतुल भोसले यांनी हा बाँब टाकला आहे...

ते म्हणाले...या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असेल तर...उदय पाटील यांना भाजपमधून उभे राहून ही निवडणूक लढवावी लागेल... अन्यथा पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्हाला काम करावे लागेल...असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत दिले का?...शिवाय 
ऍड उदय पाटील हे अजितदादा पवार राष्ट्रवादी पार्टीचे कराड दक्षिण चे नेते आहेत मात्र यांनी भाजप मधून ही निवडणूक लढावी लागेल असेही त्यांनी सांगीतले... म्हणजेच...उदय दादा महायुतीच्या माध्यमातून या आमदार अतुलबाबांनी मोठा बॉम्ब टाकून या विषयाची चर्चा घडवून आणली आहे

ऍड उदय पाटील हे राष्ट्रवादी चे कराडचे नेते आहेत त्यांनी स्व अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता 
नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान उदयदादा यांनी डॉ सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले पॅनेलला मदत केली होती...त्याबदल्यात त्यांना जिल्हा बँकेत निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासन भोसलेंनी दिले होते अशीही चर्चा होती
मात्र आज अतुलबाबांनी आज उदय दादांनी भाजपमधून या निवडणुकीत उभं रहावं अस बोलून या विषयी मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे त्यांनी टाकलेला हा बॉम्ब कराड परिसरात जोरदार चर्चेत आला आहे
दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप कडून सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगत भाजप ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत दिले होते
त्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यानीही याबाबत आपले मत व्यक्त करताना ,आम्ही या दोन्ही मंत्र्यांना विचारू... की... आम्ही तुम्हाला  या निवडणुकीत तुमच्या बरोबर का चालत नाही ? मग आम्ही पण गप्प बसणार नाही...असे सांगत त्यांनीही स्वतंत्र लढण्याचा विचार करू असे संकेत दिले होते...
या पार्श्वभूमीवर आज अतुल भोसले यांना विचारले असता त्यांनी वरील विधान करून बॉम्ब टाकून दिला आहे त्यामुळे याची जोरदार चर्चा कराड दक्षिणमध्ये सुरू झाली आहे...