Friday, August 21, 2026

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांचे कराडात स्वागत ; यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखेंनी केले स्वागत ; लोकशाही आघाडीतर्फे त्यांचे अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाईन।
 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी कराड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कराड शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरातील पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या वतीनेही विशाल वाकडकर यांचे स्वागत करून प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, विशाल वाकडकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत नतमस्तक होऊन अभिवादन केले. त्यानंतर आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची मोठी संघटनात्मक फळी उभी राहील. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळून पक्ष संघटना अधिक मजबूत आणि गतिमान होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र प्रदेश शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते कराड शहरात त्यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कराड शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी केले

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरच्या पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. 

दरम्यान कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन ते त्याठिकाणी नतमस्तक झाले त्यानंतर आदरणीय स्व पि डी पाटीलसाहेबांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांची मोठी फळी उभी राहून पक्ष संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळेल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या...

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

"राजमाता जिजाऊ’ या नावाने पाच बसेसचा लोकार्पण सोहळा कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पडला पार ; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून बसेस प्रवाश्यांच्या सेवेत दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कराड आगाराच्या ताफ्यात नव्या पाच आरामदायी बसेस दाखल झाल्या आहेत. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविण्यात आलेल्या या पाचही बसेसचा लोकार्पण सोहळा आज कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून व विधिवत पूजन करून या बसेस प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या.

कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्यामुळे आगाराच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. विशेषतः कराड शहरासह तालुक्यातील तसेच विविध मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यास मदत होणार असून, जुन्या बसेसवरील वाहतुकीचा ताणही काही प्रमाणात कमी होण्यास हातभार लागणार आहे.
नव्या बसेस आगारात दाखल होताच त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविलेल्या या बसेसने आगार परिसराचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे विधिवत पूजन करून प्रवासी सेवेसाठी त्या रवाना करण्यात आल्या.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असून, प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेसची भर पडल्याने या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

या लोकार्पण सोहळ्यास कराड नगरपरिषदेचे नगरसेवक जयवंतराव पाटील, गणेश पवार, आशुतोष डुबल, शिवाजी पवार अतुल शिंदे,  शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने... यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कराड आगाराचे आगारप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नव्या बसेस नियमित प्रवासी सेवेत दाखल झाल्याने कराड आगारातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. नव्या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, आगाराच्या ताफ्यात आधुनिक व आरामदायी बसेसची भर पडल्याने प्रवाशांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Thursday, August 20, 2026

कराडचे भाजपचे नगरसेवक धावून आले नागरीकांच्या सुरक्षेसाठी ; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ;कराड पालिकेला दिले निवेदन :

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कराड नगरपरिषदेतील गटनेते विजय वाटेगावकर व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देत भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण तसेच आक्रमक स्वभावाच्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये भटक्या व आक्रमक श्वानांचा वावर वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या हल्ल्याच्या तसेच नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने नगरपरिषदेने या विषयावर तातडीने प्रभावी व शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कराड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्याबाबत विषय मंजूर झालेला आहे. तसेच भटक्या श्वानांच्या नियंत्रणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.
शहरातील सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने अंतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. लसीकरण व निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटण्यासाठी आवश्यक मार्किंग करून त्याची प्रभागनिहाय नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे आक्रमक व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद तयार करून, अशा श्वानांबाबत लागू नियम व न्यायालयीन निर्देशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा अधिकृत संस्थेची नियुक्ती करावी. त्याचबरोबर अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी, निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
भटक्या व आक्रमक श्वानांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी व कार्यवाही प्रणाली निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची आणि न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी या विषयावर विलंब न करता कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर व भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.

Wednesday, August 19, 2026

नगरसेवक आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या सोडविणार : तेजश्री पाटसकर

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नवनिर्वाचित अपक्ष नगरसेविका सौ तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या पुढाकारातून ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या थेट भेटी घेऊन त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर या उपक्रमाद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान कार्ड, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘एक घर, एक योजना आणि प्रत्येक कुटुंब शासनाशी जोडले गेले पाहिजे’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे तेजश्री पाटसकर यांनी सांगितले. 
सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ यांसह कराड नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजप युवा मोर्चाचे नेते सुदर्शन पाटसकर यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, August 18, 2026

कराड पालिकेचे भाजपचे नेते गुंड्याभाऊ वाटेगावकर म्हणाले...पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद ;

वेध माझा ऑनलाईन।
पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी आज दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद आहे. शहरातील ज्या प्रश्नांकडे तुम्ही अथवा तुमच्या नेत्यांनी सातत्याने डोळेझाक केली, ते प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशावेळी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची उंची तपासावी, असा जोरदार टोला कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांना लगावला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी पाटण कॉलनी झोपडपट्टी प्रश्नाबाबतचे निवेदन वर्तमानपत्रांना प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात घेतलेल्या आक्षेपांवर सडेतोड प्रत्युत्तर देणारे निवेदन कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात श्री. वाटेगावकर यांनी म्हटले आहे, की नामदेव पाटील यांचे कराड शहराच्या विकासासाठी नेमके योगदान काय? शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी किती वेळा आवाज उठवला? किती प्रश्न मार्गी लावले? याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरालगत असलेल्या पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर अगदी विधानसभेत आवाज उठवून, या प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याशिवाय या प्रश्नातील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर प्रत्येक टप्प्यावर पत्रव्यवहार करुन, हा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल केली आहे. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने ११ डिसेंबर २०२४ रोजी पाटण कॉलनीतील जागेचा वापर बदलून बेघरांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पत्र दिले. १६ डिसेंबर २०२४ रोजी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसा प्रस्तावही पाठवला. तसेच नगररचना योजना क्रमांक १ मधील संबंधित जागेवरील ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतुदींनुसार परवानगी मागण्यात आली.

दरम्यान, १८ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाटण कॉलनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे व आ.डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या ५ महिन्यात म्हणजेच दि. ८ एप्रिल २०२५ रोजी नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर या प्रकरणाचा पुढील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय पाठपुरावा सुरू झाला. 

पुढे दिनांक ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले. संबंधित जागेचे स्थान, सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, पार्किंगची आवश्यकता आणि इतर बाबींचा विचार करून ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासंबंधी योग्य निर्णय घेऊन, ‘महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६’च्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर केल्यास शासनस्तरावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडी पाहता पूर्णपणे स्पष्ट होते, की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ठोस प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना नामदेव पाटील मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापायी व स्वत:च्या नेत्यांची निष्क्रीयता लपविण्यासाठी आमदारांकडेच कामाचा हिशोब मागत आहेत, हे हास्यास्पद आहे. 

खरंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या प्रश्नासाठी गेल्या दीड वर्षात केलेले प्रयत्न तारखेनिशी या निवेदनात आम्ही मांडले आहे. नामदेव पाटील यांनी हिम्मत असेल तर त्यांनी अथवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या ५० वर्षांत काय प्रयत्न केले? या प्रश्नावर यापूर्वी किती पत्रे दिली? किती वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला? किती प्रस्ताव शासनाकडे पाठवले? कोणते निर्णय घेतले? याचा हिशोब त्यांनीच जनतेसमोर द्यावा, असे आव्हान श्री. वाटेगावकर यांनी दिले आहे.

आ.डॉ. अतुलबाबांचा प्रत्यक्ष पाठपुरावा!
- १० डिसेंबर २०२४ : कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आरक्षण क्र. ४८ मधील पार्किंगचे नामांतर करून बेघरांसाठी घरे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
- १६ डिसेंबर २०२४ : नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून आरक्षण बदलास शासनाची परवानगी मागितली.
- १८ डिसेंबर २०२४ : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून उच्चस्तरावर पाठपुरावा केला.
- ८ एप्रिल २०२५ : नगररचना संचालक स्तरावर पुढील पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा सुरू
- ५ मे २०२६ : राज्य नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले

‘उलटा चोर कोतवाला को डाटे’
ज्या भागात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण राहतात, त्याच पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न ५० वर्षांत त्यांना सोडविता आलेला नाही. अशावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर योग्य व सकारात्मक पाठपुरावा करत असताना, त्यांनाच या कामाचा हिशोब मागण्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी कृती म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’, अशीच असल्याची टीका विजय वाटेगावकर यांनी केली आहे.

नदीत प्लास्टिक फेकणाऱ्यांना सौरभ पाटलांनी भररस्त्यात झापले; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या स्वच्छतेबाबतच्या भूमिकेची पुन्हा आली प्रचिती ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील राजकारणात अनेक नेते त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. मात्र, स्वच्छता हा केवळ प्रचाराचा विषय न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणाऱ्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते सौरभ पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती सोमवारी पुन्हा एकदा आली.

इस्लामपूर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सौरभ पाटील हे ताकारी मार्गे कराडकडे परतत होते. कारवे परिसरात आल्यानंतर त्यांच्या नजरेस एक धक्कादायक प्रकार पडला. मुंबई परिसरातील नोंदणी असलेल्या एका चारचाकी वाहनातून पुलावरून थेट नदीपात्रात प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्यात येत होत्या.
हा प्रकार पाहताच सौरभ पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित वाहनचालकाला थांबवले. नदीत प्लास्टिक फेकून प्रदूषण वाढवणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी चांगलेच सुनावले. 'निसर्गाबाबत कोणतीही जबाबदारी नाही का? सार्वजनिक ठिकाणी अशी बेजबाबदार कृती कशी करता?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संबंधित वाहनाच्या पुढील भागात स्टेअरिंगजवळ पोलिसांची टोपी ठेवलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरूनही त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. 'टोपी पुढे ठेवली म्हणजे नियम मोडण्याचा परवाना मिळतो का?' असा थेट प्रश्न करत त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या मुद्द्यावर सौरभ पाटील यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. शहरात असो किंवा बाहेरगावी, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या व्यक्तींना ते वेळोवेळी जाब विचारत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नदी, पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता याबाबतची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश त्यांनी या घटनेतून पुन्हा एकदा दिला. त्यामुळेच कराड आणि परिसरात स्वच्छतेचा कट्टर पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
निसर्गाचे रक्षण केवळ भाषणातून होत नाही, तर चुकीच्या कृतींना वेळीच रोखण्याच्या धाडसातून होते, हे सौरभ पाटील यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.