Tuesday, July 8, 2025

पुढील २४ तासांत कोयना धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता !

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. दिवसाला सरासरी २ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या धरणात ७१.०० टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी स्थितीत निर्माण झाली असून त्या अनुषंगाने आज पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देशी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या आवाहन करावे, अशा सूचना दिल्या कोयना धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. दरम्यान, धरणाची गेट लेव्हल ७३.५० टीएमसी आहे. अवघ्या २.५० टीएमसी अंतरावर ही मर्यादा गाठली जाणार असल्याने पुढील २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदारयाद्यांतील गैरप्रकार काँग्रेस रोखणार !!काँग्रेसची समिती गठित - समितीच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड ; निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली ; काँग्रेसचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन
मतदार याद्यांतील गैरप्रकार कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नुकतीच एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परीक्षित वीरेंद्र जगताप हे सदस्य आहेत, तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत. मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यावर आयोगाने समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहे.
निवडणूक आयोगाला हाताशी धरुन भाजपानं चोरीच्या मार्गानं सत्ता मिळवली पण यापुढं असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील, यावर उपाय सूचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.

डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाईन।
शिक्षण, सहकार, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडतर्फे यंदाचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुवार (दि. 10) जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे होणाऱ्या ‘गुरुगौरव’ समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समूहाने प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय, नर्सिंग, औषध निर्माण, कृषी व पशुवैद्यकीय शिक्षणसंस्था उभारून ज्ञानप्रसारात महत्त्वाचे योगदान दिले आहे. करोना काळात त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

या गौरवसमारंभात अन्य नामांकित व्यक्ती आणि संस्था यांचाही सन्मान केला जाणार असून, खालील पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत:
विद्यारत्न पुरस्कार : रयत शिक्षण संस्था, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त) कराड, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद संकपाळ, कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह कराड, आदर्श शिक्षिका पुरस्कार : डॉ. स्नेहल मकरंद राजहंस, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार : सुषमा इंदुलकर, पी.के. सावंत माध्यमिक विद्यालय, अडरे (चिपळूण), आदर्श प्राचार्य पुरस्कार : डॉ. सतीश भिसे, निवृत्त प्राचार्य, औषध निर्माण महाविद्यालय कराड, उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार : प्रकाश पागनीस, प्रवचनकार व रंगकर्मी पुणे, उत्तम शिक्षक पुरस्कार : उदय कुंभार, टिळक हायस्कूल कराड,
उत्तम शिक्षक (प्राथमिक विभाग) पुरस्कार : ज्योती ननवरे, टिळक हायस्कूल कराड, उत्तम सेवक पुरस्कार : शारदा चव्हाण, शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम शाळा कराड, आदर्श विद्यार्थी पुरस्कार : सानिका रामचंद्र गरूड, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड, सेवाव्रती पुरस्कार : अशोक रंगराव पवार, निवृत्त अभियंता, कराड नगरपरिषद, विज्ञान शिक्षक पुरस्कार : जीवन थोरात, विज्ञान शिक्षक, टिळक हायस्कूल कराड यांना जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे आणि सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले आहे.

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर ; कराडमध्ये होणार पुरस्काराचे वितरण

वेध माझा ऑनलाइन।
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्यावतीने 2025 वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, नवनियुक्त अध्यक्ष राम दाभाडे, प्रमोद तोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले की, डॉ. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठी लोक बिरादरी प्रकल्प शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरू केले आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासींमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.

कोयना धरणात किती पाणीसाठा ? जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट ! कोयना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यासह सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. आज दिवसभरात पाटण तालुक्यात पावसाने कमी हजेरी लावली. कोयना धरणात 69.04 TMC इतका पाणीसाठा झाला असून धरण 65.60 टक्के भरलं आहे. पावसाची स्थिती पाहता हवामान विभागाने आज आणि उद्या सातारा जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’ दिलेला आहे. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी काल रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे दुसरे युनिट सुरू करून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला होता. दरम्यान, आज सरासरी प्रतिसेकंद 23 हजार 415 क्यूसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत होती.

परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. सध्या कोयना धरणातील पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2128’10” तर जलपातळी 648.868 मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयनेला 17 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला 24 आणि महाबळेश्वरला सर्वाधिक 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची विधानसभेत शेतकऱ्यांसाठी जोरदार मागणी ; म्हणाले...सरकारने सहकारी पाणीपुरवठा योजनांना वीजबिल माफी देऊन अनुदान पुन्हा सुरु करावे; सरकारने वेळ दिल्यास याबाबतचे अभ्यासपूर्ण सादरीकरण आम्ही करू ;

वेध माझा ऑनलाईन
 राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजना सध्या संकटात सापडल्या आहेत. सरकारने १ एप्रिल २०२५ पासून या योजनांना दिले जाणारे ७५ टक्के अनुदान थांबवल्याने, ग्रामीण भागातील बागायती शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेऊन या सहकारी पाणीपुरवठा योजनांना वीजबिल माफी देऊन पुन्हा अनुदान सुरु करावे, अशी जोरदार मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. 

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना आ.डॉ. भोसले म्हणाले, १९६० ते १९९० या कालखंडात ग्रामीण भागात शेकडो पाणीपुरवठा योजना सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. त्या काळातील सामाजिक नेतृत्व, स्थानिक संघटनशक्ती आणि हजारो शेतकऱ्यांच्या श्रमातून या योजना साकार झाल्या. परंतु सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर टिकून असलेल्या या योजना आता आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

सध्या सरकारने ७.५ एच.पी.पर्यंतच्या कृषीपंपांसाठी वीजबिल माफीचा निर्णय घेतला आहे. परंतु अनेक सहकारी योजना १०० ते २५० एच.पी. क्षमतेच्या मोटरवर आधारित असल्याने त्या या लाभापासून वंचित आहेत. जरी एखाद्या योजनेत २५० एच.पी.ची मोटर असली, तरी ती योजना २००० शेतकऱ्यांची असते. त्यामुळे प्रत्यक्षात एका शेतकऱ्यावर केवळ ०.१२ एच.पी. इतकाच लोड येतो. या योजनांवर सध्या वीजबिलाचे मोठे ओझे आहे. त्यातच अनुदान बंद झाल्यामुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च करणे शक्य होत नाही. जुन्या योजनांमध्ये गळती, पंपांची कार्यक्षमता कमी होणे, वितरण यंत्रणेतील अडचणी यामुळे केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रालाच पाणी देता येते. त्यामुळे शासनाने या योजनांसाठीदेखील वीजबिल माफीचा निर्णय घेतल्यास, वाचवलेला निधी योजनांच्या  सुधारणांसाठी वापरता येईल. परिणामी जास्त क्षेत्र बागायतीत येईल आणि राज्यातील ऊस उत्पादनही वाढेल, असे आ.डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

आ.डॉ. भोसले पुढे म्हणाले, की एक टन उसावर सरकारला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून सुमारे ४११ रुपये महसूल मिळतो. जर पाणी योजना टिकली, तर शेती टिकेल आणि शेती टिकली, तर सरकारच्या तिजोरीतच भर पडेल. त्यामुळे ही योजना अनुदान किंवा माफी नव्हे, तर सरकारसाठीही गुंतवणूक आहे. या योजना व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी व्हाव्यात, यासाठी त्या कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची मागणीही आ.डॉ. भोसले यांनी केली. महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून या योजना वर्ग केल्यास, त्यांची देखभाल, अंमलबजावणी आणि कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी सांगितले.


अतुलबाबा विधानसभेत म्हणाले...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की सरकारने वेळ दिल्यास याबाबतचे अभ्यासपूर्ण सादरीकरण आम्ही करू, ज्यातून सिद्ध होईल की वीजबिल माफ करूनही राज्याच्या तिजोरीवर भार पडणार नाही, उलट महसूलवाढीचा मार्गच खुला होईल. ठिबक सिंचन, सोलर फिडर यांसारख्या योजनांवर सरकार भर देत आहे, हे चांगले आहे. पण सामूहिक पाणीपुरवठा योजनांकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार राजेंद्रसिंह यादव यांचा निर्धार ;

वेध माझा ऑनलाईन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवली अनेक सुख सुविधांचा लाभ गोरगरीब गरजूंना दिला त्यामुळे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व सर्वसामान्य माणसाला भावलं त्यामुळे अनेक जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत येणाऱ्या भावी काळात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक  जण शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील त्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होईल असा आत्मविश्वास शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांनी व्यक्त केला तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येईल तसेच कराड उत्तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल अशाप्रकारचा आत्मविश्वास कराड उत्तरचे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांनी व्यक्त केला

यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेकानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला पालकमंत्री शंभूराजे देसाई संपर्कप्रमुख शरद कणसे कराड उत्तर चे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश करण्यात आला
यावेळी सर्वांचे आभार महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष सुलोचना पवार यांनी मानले गुलाबराव पवार यांनी प्रास्ताविक केले

कृष्णा हॉस्पिटलतर्फे राबविण्यात आली ‘आरोग्य वारी’ ; सदर उपक्रमांतर्गत हजारो वारकऱ्यांनी घेतला वैद्यकीय सेवेचा लाभ ;

वेध माझा ऑनलाईन
येथील कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली २४ वर्षे अव्याहतपणे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी मार्गावर सुमारे १० हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार देण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा जनसागर पंढरपूरकडे जात आहे. या अध्यात्मिक यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने गेली २४ वर्षे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जात आहे. 
दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथील वारीमार्गावर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, माणगंगा कारखाना, एनकूळ, कणसेवाडी, झरे, सुपली आणि पंढरपूर याठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाकडून मोफत आरोग्य तपासणी करुन, औषधे देण्यात आली. यावेळी पायी चालण्यामुळे वारकऱ्यांना होणारे स्नायू विकार, ताप, थकवा, डोकेदुखी, पायांची सूज अशा तक्रारींसाठी तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच गरजेनुसार औषधे, मलमपट्टी व फिजिओथेरपी सुविधादेखील मोफत देण्यात आली. 
या आरोग्य वारी उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात कृष्णा हॉस्पिटलचे कॅम्प सुपरवायझर सुनील यादव, डॉ. प्रद्युम्न पोवाळकर, डॉ. निखिल पटेल, डॉ. महेश देशमुख, डॉ. अथर्व रायकर, डॉ. मयूर धामणीकर, संध्या मोरे, भाग्यश्री शिर्के, इंद्रजीत हणबर, गणपत नलवडे, शोभा दलबारे, दीपाली येडगे, रिमा मोहिते आदींसह वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 


Monday, July 7, 2025

इनरव्हील क्लब ऑफ कराडचा 36 वा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

वेध माझा ऑनलाईन।
इनरव्हील क्लब ऑफ कराडचा  2025 - 26 मधील नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नूतन अध्यक्षपदाचा कार्यभार आदिती पावसकर यांनी स्विकारला. तसेच उपाध्यक्षपदी ऋता चाफेकर ,आय पी पी नम्रता कंटक, सेक्रेटरी श्रावणी घळसासी, ट्रेझरर सीमा पाटील, आय एस ओ राजश्री रामदुर्गकर, एडिटर वैष्णवी कुंभार ,सीसी नीता सपकाळ ,सी एल सी सी संगीता पालकर व सी पी सी सी सीमा पुरोहित तसेच एक्झिक्यूटिव्ह  कमिटी मध्ये लक्ष्मी सिकची, अलका गोखले, पद्मजा इंगळे,  शितल शहा यांची निवड करण्यात आली. 

याप्रसंगी चार्टर प्रेसिडेंट रेखा काशीद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कराड क्लबच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.
ऋता चाफेकर ,नीता सपकाळ व रूपाली डांगे यांनी सूत्रसंचालन केले वैशाली पालकर यांनी नवोदित अध्यक्षा अदिती पावसकर यांची ओळख करून दिली.उपाध्यक्षा ऋता चाफेकर यांनी आभार मानले. 
याप्रसंगी कराड मधील रोटरी क्लब ऑफ कराड, इनर व्हील  क्लब ऑफ कराड संगम तसेच इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइजचे पदाधिकारी, इनरव्हील क्लब ऑफ कराडचे सर्व सभासद व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व सदस्यांचे कुटुंबीय
 उपस्थित होते.

Saturday, July 5, 2025

उद्या (गुरुवारी) साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव ; मोठ्या संख्येने भक्त- भाविकांनी उपस्थित रहावे- जयंत गुजर व समस्त गुजर कुटुंबियांच्या वतीने आवाहन -

वेध माझा ऑनलाईन
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरुवर्णिमा उत्सव  उद्या 10 जून रोजी (गुरुवारी) साजरा होणार असल्याची माहिती साईभक्त जयंत गुजर यांनी दिली सर्व भक्त-भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंत गुजर व समस्त गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम जुने कृष्णामाई कार्यालय येथे होणार आहे

उद्या गुरुवार दिनांक 10 रोजी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी श्रींची आरती होणार आहे, 6 वाजता अभिषेक होईल, त्यानंतर  7 वाजता सत्यनारायण पूजा होईल, 9 वाजता श्री साई स्तवनमंजिरीचे वाचन होईल, 

दुपारी 12 वाजता माध्यान आरती होईल, त्यानंतर तिर्थप्रसादाचे वाटप होईल, 
12.30 वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल तसेच संध्याकाळी 6 वाजता धुपारती आणि रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे 

दुपारी 12.30 ते 4.30 या वेळेपर्यंत  महाप्रसादाचे वाटप होणार आहे.अशी माहिती देखील जयंत गुजर यांनी दिली आहे

तरी सर्व भक्त - भाविकांनी या भक्तिमय कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित रहावे व आरती आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंत गुजर व समस्त गुजर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे

ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत साजरा - राज आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली ; संपूर्ण महाराष्ट्र झाला भावुक ;

वेध माझा ऑनलाईन।
संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा  आज मुंबईत साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे  आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.

आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं ; राज ठाकरेंचा फडणवीसांवर थेट वार ;

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी मार्मिक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचे मनोमिलन होताना दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली. यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? कोणाला विचारायचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार. पण तुमच्या हातात सत्ता असेल तरी विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्रं लिहली. नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय, ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्रं कुठून आणलं? ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं. हायकोर्टात आणि इतर सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, मग त्रिभाषा सूत्राची गरज काय? दक्षिणेत  हे त्रिभाषा सूत्र नाही, मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. पण महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं, हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, - उद्धव ठाकरेंचं मोठं विधान ; राज-उद्धव आले 18 वर्षांनी एकत्र ;

वेध माझा ऑनलाईन।आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी, असं मोठं विधान राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या विषयावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आज हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून वरळी डोम येथे विजय मेळावा घेण्यात येत आहे. यावेळी ठाकरे बंधु तबवळ 18 वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले आहे.

यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मला कल्पना आहे. अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत. राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी त्यांनी मला सन्मानिय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना सन्मानिय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो. अप्रतिम मांडणी राजने केलीय. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वजण समोर बसले. पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो, अशीही भावना यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

सरकारने तब्बल २,२८९ महिलांना या योजनेतून वगळल्याची माहिती आली समोर ;

वेध माझा ऑनलाईन; विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का बसला आहे. कारण सरकारने तब्बल २,२८९ महिलांना या योजनेतून वगळल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व महिला लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या. तसेच या सर्व महिला सरकारी कर्मचारी असल्याची माहिती छाननी दरम्यान समोर आली आहे. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी

वेध माझा ऑनलाईन।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातारा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींना आजही लाभ मिळत आहे. या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “खरं तर जून महिन्याचे १५०० रुपये कधी येणार याकडे मागील अनेक दिवसापासून राज्यातील महिला वर्ग वाट बघत आहे. महिना उलटूनही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होते. अखेर आजपासून जून महिन्याचे १५०० रुपये जमा होणार असून यामुळे सातारा जिल्ह्यातीलही लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला आहे अशा महिलांना वगळण्याचे काम सरकार कडून सुरु आहे. आत्तापर्यंत लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा घरी चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. अशावेळी तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आधार लिंक्ड बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलेंस चेक करायचा आहे. किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.
लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेची अत्यंत जलद गतीने यशस्वीरित्या अंमलबजावणी करत जुलै 2024 पासून अर्ज सुरू करण्यात आले. ही योजना सरकारच्या पद्धतीने योग्यरित्या अंमलबजावणी होत असली तरी या योजनेवर वेळोवेळी टीका करण्यात आली आणि ही योजना वादाच्या भवऱ्यात देखील सापडली. अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आले.
आदिती तटकरे यांनी याबाबत काल रात्री ट्विट करत म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. 

कोयना धरणात किती पाणीसाठा ?

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा 60.04 टक्क्यांवर पोहोचला असून जुलै महिन्यापर्यंत सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

कोयना धरणात पाणीपातळी 646.28 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 56.410 टीएमसी असून 56.34 टक्के पाणी पातळी आहे तर धरणात 32 हजार 437 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 37.17 टक्के पाणी जास्त आहे. धोम धरणात पाणीपातळी 741.43 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 7.100 टीएमसी असून 60.74 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 308 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 36.83 टक्के पाणी जास्त आहे.धोम बलकवडी धरणात पाणीपातळी 794.53 मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा 1.540 टीएमसी असून 38.89 टक्के पाणी पातळी आहे.
वेध माझा ऑनलाईन।

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच असून शुक्रवार आणि शनिवार कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

कोयनानगर येथे १०७, नवजा १२९ आणि महाबळेश्वरला ४९ मिलीमीटरची नोंद झाली तर एक जूनपासून कोयनेला १ हजार ८०६, नवजा १ हजार ५९६ आणि महाबळेश्वरला १ हजार ६८५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणीसाठा आहे तर धरणात ५८.४५ इतकी टक्केवारी झाली आहे.

Friday, July 4, 2025

भाजपवाले अवाक; मुनगंटीवारांनी केली फडणवीसांकडे असलेल्या उर्जा खात्यावर टीका ;

सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारच्या कारभाराचे बाभडे काढले. कृषी पंपाच्या धोरणावरून मुनगंटीवारांनी फडणवीसांकडे असलेल्या उर्जा खात्यावर टीकास्त्र डागलं. कृषीपंप द्या म्हणून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज सरकारकडे आले आहेत. मात्र सरकार त्यांना बळजबरीने सोलार पंप थोपवत असल्याचा मुनगंटीवार म्हणाले. कृषी पंप हवेत म्हणून महाराष्ट्रामधल्या 47 हजार 197 शेतकऱ्यांनी चेक भरले. पण सरकारने आता फक्त सोलार पंप घ्या असं म्हणत त्यापैकी तब्बल 45 हजरा 114 चेक परत केले आहेत. शिवाय ज्या कंपन्यांचे सोलार पंप सरकारने दिलेत, त्यापैकी अनेक नादुरुस्त आहेत.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिथे भूजल पातळी खोल आहे तिथे सोलार पंपाला मर्यादा येतात. मोठ्या शेतीसाठी सोलार पंपाची कार्यक्षमता अपुरी पडते. मात्र दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना सोलार पंपच देण्यासाठी आग्रही आहे. याशिवाय डीपी कनेक्शन सुद्धा लवकर मिळत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत असेही मुनगंटीवार म्हणाले.

मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का ? राऊतांचे संकेत काय ?

वेध माझा ऑनलाइन :
होणार विजयी मेळावा ठाकरे बंधूंचा असला तरी त्यात इतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हजर राहणार असल्याची माहिती आहे. मुंबईतल्या वरळी डोंबच्या सभागृहात जवळपास सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉल बाहेर रस्त्यावर सुद्धा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. हिंदी सक्तीच्या जीआर विरोधात आधी ठाकरे बंधूंनी मोर्चांची घोषणा केली होती. पण सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याच आयोजन करत एकत्र येण्याच ठरवलं. म्हणजेच दोघांनीही एकत्र यायचं हे यातनं सिद्ध होतं आणि संजय राऊतांनी पाच तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या गोष्टी घडतील असंही म्हटलंय. म्हणजेच वरळीतला मेळावा दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे.मेळाव्यासंदर्भात एक टीझर सुद्धा जारी करण्यात आलाय. ज्यामध्ये दोन सिंह दाखवले असून एका सिंहाच्या मदतीला दुसरा सिंह जातो त्यावरून नेमकं अडचणीत कोण आहे हे टीझरमधून स्पष्ट होत नाही, असं म्हणत शिंदेंचे मंत्री शिरसाठ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.

धक्कादायक… महिला डॉक्टरने दवाखान्यात जाते सांगितलं अन्… सांगलीत खळबळ

वेध माझा ऑनलाइन :
रक्ताच्या थारोळ्यात एक डॉक्टर महिला आढळून आल्याने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. हाताच्या नसा कापून या डॉक्टर महिलेने आपल्याच गाडीत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडली. या धक्कादायक प्रकरणावर बोलताना निलम गोऱ्हेंनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर शुंभागी समीर वानखडे यांनी सांगली जिल्ह्यात आत्महत्या करून आपला जीव संपवला. वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत या महिलेने गाडीतच आत्महत्या केली. या डॉक्टर महिलेने हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आपला जीव संपवल्याची माहिती आहे. दवाखान्यात जाते असं सांगून ही महिला घरातून निघाली अन् हा सगळा प्रकार नंतर उघडकीस आला.यामागच कारण अद्याप समजले नाही

अमित शाह पुण्यात म्हणाले -पेशवे 100 वर्ष लढले नसते, तर …

वेध माझा ऑनलाइन :
“पूर्ण दक्षिण भारत मोगलांमुळे पीडित होता. उत्तर मुगलांच्या आधीन होता. त्यावेळी 12 वर्षाच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा अकल्पनीय पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचीच केवळ स्थापना केली नाही. तर राज्यभरातील तरुणांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली. त्यांच्यानंतर संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी संताजी यांनी शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेली” असं अमित शाह म्हणाले. “स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. पण जेव्हा शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून आले. तेव्हा मराठी साम्राज्याचे दोन तुकडे झालेले. तेव्हा बालाजी विश्वनाथ त्यानंतर श्रीमंत बाजीरावांनी पेशवा बनून शिवाजी महाराजांची मशाल पुढे नेली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर 10 वर्षातच तंजावूर पासून कटकपर्यंत विराट हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ही स्वातंत्र्याची लढाई शिवाजी महाराजांनी सुरू केली. पेशव्यांनी 100 वर्ष चालवली. ती लढली नसती तर आज भारताचं मूळ स्वरुप राहिलं नसतं” असं अमित शाह म्हणाले.

नगरसेवक’ हा शब्द देशभरात नेण्याची मागणी - शिंदेंच्या शिंदेसेनेची रणनीती

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंची शिवसेनाही रणनीती आखत असून आता दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ‘नगरसेवक’ हा शब्द देशभरात नेण्याची शिंदेसेनेची रणनीती असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, नगरसवेक या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. सन 1967 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी महापालिकेत निवडून जाणाऱ्या सदस्यांना नगरसेवक म्हणण्याचा आदेश दिला, तेव्हापासून नगरपालिका सदस्यांना नगरसेवक म्हटले जात आहे. आता, देशभरात हाच पॅटर्न राबविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून येत आहेत.

कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर

वेध माझा ऑनलाईन-कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये रेठरे बुद्रुक, तारूख, मसूर, बनवडी, हजारमाचीसह या मोठ्या ग्रामपंचायतींसह 60 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आरक्षण पडले आहे.

तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये शुक्रवार, दि. 4 रोजी ही सोडत काढण्यात आली.
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत शांततेत पार पडली. कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज काटे, युवराज पाटील, आनंदराव पोळ, सुनील काळेल, प्रसाद देशपांडे, सुरज लोकरे, अभिजीत रावते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या ग्रामपंचायतींसाठींचे सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे; अनुसूचित जाती प्रवर्ग महिला – शिंगणवाडी, माळवाडी, आणे, चोरजवाडी, घोणशी, वाण्याचीवाडी, भोसलेवाडी, वनवासमाची स.गड, पवारवाडी, आरेवाडी, मेरवेवाडी, बेलवाडी, अनुसूचित जाती प्रवर्ग – बाबरमाची, विठोबाचीवाडी, सयापूर, वराडे, नारायणवाडी, येवती, विरवडे, भोळेवाडी, शेळकेवाडी म्हासोली, बामणवाडी, हवेलवाडी, हनुमानवाडी, अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला – सुपने, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – नडशी, राजमाची, कोरेगाव, शेणोली, सैदापूर, साकुर्डी, नांदगाव, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, कुसूर, मस्करवाडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, लोहारवाडी, करंजोशी, सावरघर, कालगाव, किरपे, कोळेवाडी, डिचोली मुनावळे, घोगाव, संजयनगर शेरे, भुरभुशी, कोर्टी, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग – संजयनगर काले, कोयना वसाहत, येळगाव, कोरीवळे, खराडे, खालकरवाडी, तुळसण, रेठरे खुर्द, येरवळे, पाडळी केसे, वडगाव उंब्रज, तासवडे, शिंदेवाडी विंग, तळबीड, धनकवडी,मांगवाडी, करवडी, निगडी, नाणेगाव, टेंभू, मरळी, कापील, पाचुपतेवाडी, हरपळवाडी, विंग, वाठार, आदर्शनगर या गावाचा समावेश आहे.

तर सर्वसाधारण महिला – तारूख, वहागाव, चिखली, मसूर, शिरवडे, गोडवाडी, अकाईचीवाडी, महारूगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, शेवाळेवाडी उंडाळे, बनवडी, मालखेड, कालवडे, कामथी, शेवाळेवाडी, म्हासोली, वडोली निळेश्वर, पोतळे, गोळेश्वर, किवळ, जुळेवाडी, इंदोली, कार्वे, शहापूर, जिंती, पाचुंद, शितळवाडी, यादववाडी, शेळकेवाडी येवती, घोलपवाडी, खोडशी, हजारमाची, कालेटेक, बेलवडे बुद्रुक, जखिणवाडी, वस्ती साकुर्डी, काले, गोवारे, शामगाव, हणबरवाडी, पश्चिम सुपने, मुनावळे, दुशेरे, गोंदी, उत्तर कोपर्डे यादववाडी, नांदलापूर, बाबरमाची पु., डिचोली, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनू, उंब्रज, हेळगाव, गणेशवाडी, बानुगडेवाडी, धावरवाडी, यशवंतनगर, खोडजाईवाडी, कोडोली, सवादे या गावांचा समावेश आहे.

तसेच सर्वसाधारण खुला वर्ग – गायकवाडवाडी, वाघेश्वर, अंबवडे, अभयचीवाडी,खुबी, भुयाचीवाडी, अंतवडी, पेरले, वनवासमाची खोडशी, ओंड, उत्तर तांबवे, चोरे, कचरेवाडी, वडगाव हवेली, भांबे, कासारशिरंबे, भवानवाडी, पिंपरी, पाडळी हेळगाव, साळशिरंबे, गोटे, घराळवाडी, केसे, लटकेवाडी, येणके, येणपे, आटके, कांबिरवाडी, डेळेवाडी, म्होप्रे, वारूंजी, मुंढे, म्हासोली, शेरे, जुजारवाडी, हिंगणोळे, चौगुलेमळा भैरवनाथनगर, हणमंतवाडी, शिवडे, साजूर, धोंडेवाडी, ओंडोशी, कोळे, टाळगाव, गमेवाडी, गोसावेवाडी, वाघेरी, शिरगाव, बेलवडे हवेली, रिसवड, घारेवाडी, वानरवाडी, वडोली भिकेश्वर, बेलदरे, पार्ले, पाल, विजयनगर, तांबवे,जुने कवठे, नवीन कवठे, उंडाळे या गावांचा समावेश आहे.

Thursday, July 3, 2025

अजय ओझा यांनी घेतली अध्यक्ष पदाची शपथसचीव पदी श्रीपाल ओसवाल, तर खजिनदारपदी गिरीश शाह यांची निवड;लायन्स क्लब ऑफ कराड मेन चा पदग्रहण सोहळा संपन्न ;

वेध माझा ऑनलाईन
 कराड येथील लायन्स क्लब ऑफ कराड मेन चा पद्ग्रहण सोहळा नुकताच पार पडला यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून अजय ओझा यांनी शपथ घेतली तर  सचीव पदी श्रीपाल ओसवाल, तर खजिनदारपदी गिरीश शाह यांची निवड करण्यात आली येथील हॉटेल पंकज येथे बुधवारी हा सोहळा पार पडला 

या सोहळ्यास ला. राजेंद्र मोहिते, ला. बाळासाहेब शिरकांडे, ला.नरेंद्र रोकडे, ला.ॲड. विजय जमदग्नी, ला.महेंद्र कदम, ला.अनिल कदम,ला. गौरी चव्हाण, ला. विद्या मोरे  यांचेसह लायन्स परिवारातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते...

यावेळी नूतन अध्यक्ष अजय ओझा बोलताना म्हणाले
लायन्स क्लब ऑफ कराड मेन या सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या क्लबचा अध्यक्ष होण्याची संधी आपण दिली त्याबद्दल सर्व सदस्यांचा मी ऋणी आहे. हा क्लब जरी नवीन असला तरी यातील बहुतांश सदस्य हे 40 वर्षापेक्षा जास्त काळ लायनिझममध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने येत्या वर्षामध्ये मोठे सेवा कार्य उभारण्याचा माझा मानस आहे.त्यासाठी येत्या वर्षांमध्ये प्रांतपाल लायन डॉ .वीरेंद्र चिखले सर यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करणार आहे. हे करत असताना नीड बेस ऍक्टिव्हिटी वर आमचा जास्त फोकस असणार आहे.

पद प्रदान अधिकारी म्हणून उपस्थित असलेले राज मुछल म्हणाले लायन्स इंटरनॅशनल ही संस्था 214 देशात काम करत असून  जगातील 14 लाख सदस्यांपैकी तीन लाख सदस्य भारतातील आहेत.ही सदस्य संख्या आणखी वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच यावेळी त्यांनी संचालक मंडळातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती दिली. व क्लबच्या सेवा कार्याच्या वाटचालीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडावी असे आवाहन  केले.

दरम्यान यावेळी माजी प्रांतपाल ला.राज मुछाल, तसेच शपथविधी अधिकारी ला.मंगेश दोशी,रिजन चेअरपर्सन ला.निलम पाटील,झोन चेअरपर्सन ला. वृषाली गायकवाड, माजी प्रांतपाल ला.सुनील सुतार,क्लबचे अध्यक्ष ला.संजय पवार यांचे उपस्थितीत नुतन अध्यक्ष ला.अजय ओझा सेक्रेटरी ला. श्रीपाल ओसवाल खजिनदार ला. गिरीश शहा यांनाही पद प्रदान करण्यात आले.

यादरम्यान क्लबमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या चार  सदस्यांचा देखील शपथविधी   यावेळी करण्यात आला.

Tuesday, July 1, 2025

हिंदी सक्ती रद्द ; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल


वेध माझा ऑनलाईन
राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा सरकारने केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता त्रिभाषा सूत्राअंतर्गत कोणत्या भाषेचा समावेश करायचा? हे ठरवले जाणार आहे. दरम्यान, सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोऱणाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष संयुक्तपणे मुंबईत मोर्चा काढणार होते. मात्र हा मोर्चा काढण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

राज ठाकरे यांनी काय पोस्ट केला आहे?
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

हिंदी सक्तीचा जीआर रद्द ; आता ठाकरे बंधूंची एकत्र विजयी सभा होणार का?

वेध माझा ऑनलाईन
हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हिंदी धोरणाचा जीआर रद्द झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंची एकत्र विजयी सभा होणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. तर हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषा सक्ती विरोधात एकत्रित रस्त्यावर उतरणार होते. मात्र आता सरकारने एक पाऊल मागे घेत हा जीआर रद्द केल्यानंतर आता ५ तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दुसरीकडे मनसेची आज सकाळी दहा वाजता यासंदर्भात एक बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरे आता नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून आहे. 

नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप / नाना पटोले निलंबित -

वेध माझा ऑनलाईन
विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. “या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे” असं नाना पटोले म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. “तुमच्याकडून अससंसदीय भाषेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही” असं राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.

उद्धव ठाकरेंचं ते वाक्य कोणते...? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र काल (29 जून) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केल्यानंतर तातडीने उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.

पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाने एकजूट दाखवली. त्याच्या दबावामुळेच सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली. हा मराठी एकजुटीचा विजय असून, 5 जुलै रोजी होणार विरोधाचा मोर्चा आता विजयी मोर्चा निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. मराठी माणूस एकत्र न येण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. पण, मराठी माणसांच्या एकजुटीची शक्ती पाहून सरकारने माघार घेतली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं ते वाक्य...
उद्धव ठाकरेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एका वाक्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. संकट आल्यावर पुन्हा जागे व्हायचे असे नको म्हणून ही एकजूट कायम राहावी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सर्व नेते पक्षभेद विसरून एकत्र आले होते, तेव्हा तो डाव उधळला आणि आताही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मनसेशी मोर्चापलिकडे युती ठेवण्याचे संकेतही दिले आहेत.

Friday, June 27, 2025

51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

वेध माझा ऑनलाईन
 राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या  होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई  नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये, पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचा जाहीर पाठिंबा,;

वेध माझा ऑनलाईन
हिंदी सक्ती विरोधाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधुंकडून येत्या ५ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंकडून एकत्रितपणे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला आता शरद पवार यांच्याकडून जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शरद पवार यांचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. ‘महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)’ अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी, आणि प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतूनच व्हावे ह्या मागणीसाठी येत्या शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत पुकारण्यात आलेल्या मोर्चाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा जाहीर पाठिंबा… सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊयात !’, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात आलंय.

भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी

वेध माझा ऑनलाईन
 पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याने 40 हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुरी येथील श्री नहर (राजाचा राजवाडा) जवळ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चेंगराचेंगरीनंतर अनेक भाविक बेशुद्ध पडले होते. यातील काहींना पुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रथयात्रेतील ‘पहाडी’ सोहळ्यादरम्यान गजपती दिव्य संघदेवाच्या राजवाड्याजवळ लोकांची गर्दी जमली होती. ही गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अडचण येत होती. यात गर्दीदरम्यान भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे भाविकांनी अचानक धावपळ केली, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले.

Thursday, June 26, 2025

खंडू इंगळे यांची स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड

वेध माझा ऑनलाईन 
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र प्रदेश शाखेच्यावतीने सातारा जिल्हा अध्यक्षपदी दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक खंडू नागू इंगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली असून राज्याध्यक्ष प्रदीप  कुलकर्णी यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र दिले असून सदरचे पत्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे यांनी खंडू इंगळे यांना दिले. तसेच त्यांचा येथोचित सत्कार केला.

खंडू इंगळे हे गेल्या २४ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असून २००५ सालापासून दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची पत्रकारिता सातारा जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न, विकासाच्या संधी आणि लोकशाही मूल्यांना चालना देणारी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली संघटना सातारा जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.

या नियुक्तीच्या अनुषंगाने खंडू इंगळे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन बळकट करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी ठोस काम करण्यावर भर राहील. नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करून जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तसेच, संघटनेच्या शिस्त व तत्वांचे पालन करून पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न राहील, असेही सांगितले.

असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष गोरख तावरे, सचिव संतोष शिंदे, सुलतान फकीर, उद्धव बाबर, प्रमोद तोडकर, शंकर शिंदे, धनंजय सिंहासने, रोहित अहिवळे, शैलेश धुमाळ यांनी खंडू इंगळे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन संघटनेस सहकार्य करण्याचे आवाहन खंडू इंगळे यांनी केले आहे.

कराडच्या वाढीव भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित राजेंद्रसिंह यादव यांची माहिती; दौलत, रेव्हिन्यू कॉलनीत फेज टू कामांचा शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाईन
कराड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न आगामी काळात शिल्लक ठेवणार नाही. पाणी पुरवठा, भुयारी गटार योजनेसह सुमारे १९४ कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केले.

कराड शहर वाढीव भागामध्ये असणारी ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेऊन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव  यांनी लक्ष घालून दौलत आणि  रेव्हीन्यू कॉलनी येथे  भुयारी गटार योजनेच्या फेज २ कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, शहराच्या हद्दवाढ भागात घरे अगोदर झाली. नंतर मागणीप्रमाणे मुलभूत सुविधा होत आहेत. मात्र यात एकसुत्रीपणा नसल्याने   पाणी पुरवठा व ड्रेनेजच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कराडला ३२५ कोटींचा निधी निधी मंजूर झाला आहे. यात सुमारे दोनशे कोटी हद्दवाढ भागासाठी आहेत. त्यामुळे या भागाचा भविष्यात कायापालट होणार आहे.
हद्दवाढ भागात घनकचरा प्रकल्पाशेजारी अकरा लाख लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाण्याची समस्या संपुष्टात येईल. हद्दवाढ भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार असणार आहेत. २०५६ साली शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना, भुयारी गटार योजनेची कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात वेगाने नागरीकरण होईल, असेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
 यावेळी माजी नगरसेवक निशांत ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज इंगवले, विनोद भोसले, अनिस भालदार,प्रवीण पवार, मुसा मुजावर,फैजल बागवान, इस्माईल मुल्ला, कादर नाईकवाडी,टिपू मुल्ला,गाडे सर, कांबळे साहेब,आसिफ शेख,शाहरुख मुल्ला,समीर दिवाण, रियाज मोमीन,अयान शेख, सैफ मुजावर, विक्रम मोहिते,अदनान शेख, व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Tuesday, June 24, 2025

कोयना धरण पायथा विद्युतगृह जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ; ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद;मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता ;

वेध माझा ऑनलाईन
कोयना धरण पायथा विद्युतगृह या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.
सुधारित मान्यतेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प धरणाच्या पायथ्याशी उभारला जाऊन डाव्या तीरावर वीजनिर्मिती केली जाणार आहे. कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड सचिव ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदार ला.गिरीश शहा ; 2 जुलै रोजी होणार पदग्रहण समारंभ


वेध माझा ऑनलाइन
लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबच्या सन 2025 - 26 या वर्षासाठी अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदारपदी ला.गिरीश एम. शहा यांची निवड करण्यात आली आहे. 
लायन्स क्लब ऑफ कराड मेन क्लबच्या संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेत ला.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या. 
समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल ही संघटना जागतिक पातळीवर काम करत आहे. या संघटनेचा विस्तार 214 देशात असून याची सदस्य संख्या 14 लाखापेक्षा अधिक आहे. लायन्स इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून गरजूंना अनेक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संघटनेच्या या कार्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळतो आहे.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत असलेल्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबची वाटचाल सुरू आहे.
कराड मेन क्लबच्या माध्यमातून कराड पाटणसह परिसरात अनेक सामाजिक उपक्रम व वैद्यकीय सेवा पुरवल्या जात आहेत.
लायन्स इंटरनॅशनलच्या रिवाजाप्रमाणे बुधवार दि.2जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ कराड येथील हॉटेल पंकज येथे होणार आहे.  या कार्यक्रमास पदप्रदान अधिकारी म्हणून पुणे प्रांताचे माजी प्रांतपाल MJF ला.राज मुछाल तर शपथ प्रदान अधिकारी फलटणचे MJF ला.मंगेश दोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच रिजन चेअरमन ला.नीलम लोंढे पाटील व झोन चेअरमन ला. वृषाली गायकवाड यांचे सह लायन्स परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे का ?

वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतल्या मंत्रालयात आज (24 जून) मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांनी निधीवाटपावरून शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील आक्रमक पवित्रा धारण केल्याचं बोललं जातंय. अजित पवार यांच्या खात्यावर वॉच ठेवा असं शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे संघर्ष चालू झाला आहे का? असं विचारलं जात आहे

आज मंत्रालयात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांत बैठक पार पडली. या बैठकीत जे आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला मिळालंच पाहिजे, अशी भूमिका घेत शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना अजित पवार यांच्या अर्थखात्यावर नजर ठेवण्याचं सांगितल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता शिवसेनेचा अजित पवार यांच्या अर्थखात्यावर वॉच राहणारा का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार स्वत: एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे
दुसरीकडे या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. याआधीही शिंदे यांचे मंत्री तसेच आमदार यांच्यात आणि अजित पवार यांच्यात निधिवाटपावरून अनेकदा संघर्ष झालेला आहे. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का? असे अजित पवार या आधी म्हणाले होते. भाजपाच्या आमदारांनीही निधीवाटपावरून अजित पवार यांची तक्रार थेट केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाहा यांच्याकडे केली होती. त्यामुळे निधीवाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात संघर्ष चालू आहे, अशी चर्चा रंगली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ;

वेध माझा ऑनलाईन
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक होतील, असे दिसून येते. तसेच, राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णयही या बैठकी घेण्यात आला आहे. 

राज्य सरकारने घेतलेले निर्णय
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग  आणि  पंढरपूर  अंबेजोगाई सहित  १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा  शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार  कोटी  रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ. दरमहा मिळणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ. (आदिवासी विकास विभाग)
• कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग) 
• महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून, आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार. (वित्त विभाग)
• सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार. (वित्त विभाग)
• वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे ३१ कोटी ७५ लाख रुपयांचे शुल्क माफ. याठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी व निवासी गाळे सार्वजनिक बांधकाम विभागास निशुल्क हस्तांतरीत होणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• पिंपरी - चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मौ. चिखली येथील “दफनभुमी” च्या १ हेक्टर ७५ आर क्षेत्रापैकी ४०% क्षेत्र (७००० चौ.मी.) मैला शुध्दीकरण केंद्रासाठी (STP) वापरण्यास मंजुरी. (नगर विकास विभाग)
• महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्य पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीचे ८२२ कोटी २२ लाख, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिःसारण प्रकल्पासाठी २६८ कोटी ८४ लाख रुपये व मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीच्या ११६ कोटी २८ लाख रुपयांच्या मागणीचा समावेश. (नगरविकास विभाग)

राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गेल्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे.

यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले. म्हणजेच लोकसभेनंतर विधानसभेसाठी 8 टक्के मतदार वाढले. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले. काही अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आली आहे, असा आरोप करत निवडणूक आयोग यावर गप्प का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांचा अजित पवारांवर निशाणा : माळेगाव कारखान्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य ;

वेध माझाऑनलाईन
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा आहे. बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच माळेगाव कारखान्यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय? हे आता समोर आलं आहे. 
गेल्या ४० वर्षांपासून माळेगाव कारखाना माझ्या विचारांवर चालणारा होता. तर सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये हे मत व्यक्त केलंय. कारण सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटाने एखादा मुद्दा उपस्थित केला तर कारखान्यातील सत्तेतील लोकं त्यांना न्याय देऊ शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार देवदास मुळे यांना जाहीर ;


वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली यात 2021 सालचा राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक तरुण भारत संवाद चे कराड कार्यालय प्रमुख देवदास प्रल्हाद मुळे यांना जाहीर झाला आहे.
रोख 51 हजार रुपये, प्रशस्तीपत्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हा राज्यस्तरीय आहे. या पुरस्कारासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेतून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे एका वर्षातील लिखाणाचे प्रस्ताव मागवण्यात येतात. या प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची निवड करण्यात येते. २०२१ या वर्षात कोरोना महामारीचे संकट होते. त्यावेळी स्वच्छता मोहिमेसही महत्व होते. त्या वर्षात स्वच्छता विषयक केलेल्या लिखाणाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
देवदास मुळे यांनी २०१८ सालापासून कराड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणातील उपक्रमांना प्रसिद्धी देऊन कराडकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे. कराड नगरपालिकेच्या अभ्यास दौऱ्यातून देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर इंदूर (मध्य प्रदेश), अंबिकापूर (छत्तीसगड) लोणावळा आदी शहरांना भेटी देऊन त्याविषयी लिखाण केले आहे. कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी पालिका प्रशासनाला मदत केली आहे.
 
कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे, रमाकांत डाके, तत्कालीन आरोग्य समिती सभापती विजय वाटेगावकर, तत्कालीन नगर अभियंता एम. एच. पाटील, ए. आर. पवार, रफिक भालदार यांचे मार्गदर्शन लाभले. तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमूख दीपक प्रभावळकर, जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, डेस्क इन्चार्ज राजेंद्र वारागडे, सुरेश दळवी, उपसंपादक प्रदीप कुंभार, मिलिंद पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोक चव्हाण, गोरख तावरे, शशिकांत पाटील, सतीश मोरे, सचिन शिंदे, प्रमोद सुकरे, सचिन देशमुख, हेमंत पवार, सुरेश डुबल यांचेही सहकार्य लाभले.

Monday, June 23, 2025

अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांची उपस्थिती : पवारांचं नेमकं चाललंय काय?राज्यात चर्चा;

वेध माझा ऑनलाईन।
अजित पवार गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या उरळी कांचनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे दादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात ताईंनी उपस्थिती दर्शवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेल्या काही सूचक विधानांनी या चर्चांना आणखी बळ मिळालं होतं. तर शरद पवार यांनी लबाड्या करणाऱ्यांना सोबत घेणार नाही अस म्हणत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र आता सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात हजर राहिल्याने पवारांचं नेमकं चाललंय काय ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232  उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे.

संजय राऊत आणि दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत बड्या नेत्याने शिवसेना सोडली-

वेध माझा ऑनलाईन
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लाखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. मात्र ती  तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही,  संजय राऊतांनी सांगलीत संजय पाटलांशी समझोता केला, त्यामुळे सांगतील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू;

वेध माझा ऑनलाईन
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागत करायला आलेल्या गर्दीत एका 70 वर्षीय वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी सत्तेनपल्ली येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, त्यांच्या कारच्या ताफ्यासमोरच कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेला देखील ही गर्दी नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे, जगमोहन रेड्डी ज्या कारमधून तिथं पोहोचले, त्याच कारच्या चाकाखाली एका 53 वर्षीय व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला आहे. चिल्ली सिंगा असं मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.

कराड-चिपळूण महामार्ग उद्यापासून बंद राहणार :

वेध माझा ऑनलाईन।
गुहागर-विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ई वर रुंदीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यानच, सहा दिवसापूर्वी दि. १६ जूनला जोरदार पावसात या मार्गावरील पर्यायी रस्ताच वाहून गेला होता. यानंतर मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून दि. १७ जुन रोजी हलक्या वाहनांना खुला करण्यात आला होता. मात्र, कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवण्यात येणार आहे. आता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.
संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच राहणार आहे. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. अवजड वाहतुकीसाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसानी केले आहे.

 

शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलेल्या आमदाराची निष्ठा एकनाथ शिंदे आणि अजितदादांशी...!

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊन केवळ 8 महिने उलटले आहेत. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला जवळपास 230 जागा मिळाल्या, तर विरोधकांना फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे बडे नेते देखील पराभूत झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा निवडून आल्या आहेत. त्यातही शरद पवारांना केवळ सोलापूर जिल्ह्यानेच साथ दिल्याचं पाहायला मिळालंय. शरद पवारांचे 10 पैकी 4 आमदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यातीलच सोलापुरातील मोहोळचे आमदार राजू खरे हे आहेत... 

राजू खरे 8 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या पक्षातून निवडून आले. मात्र, राजू खरे हे शरद पवारांचा पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक साधताना दिसले आहेत.

राजू खरे हे सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच "मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली", असं वक्तव्य राजू खरे यांनी केलं. इतकंच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंच्या अनेक कार्यक्रमात राजू खरे यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. एवढचं नाही तर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मूहुर्त देखील काढला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजू खरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं भरत गोगावले म्हणाले होते. आता राजू खरे यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे.  यामध्ये राजू खरे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते.

शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, ; शिवसेनेचे नेते मंत्रीवगुलाबराव पाटील यांचा खळबळजनक दावा : राजकारणात खळबळ :

वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या 3 वर्षात दोन्ही शिवसेना पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत निवडणुकांनाही ते सामोर गेले आहेत. आधी लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तसाच सामना रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

कराड इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी आदिती पावसकर, सचिव पदी श्रावणी घळसासी


वेध माझा ऑनलाइन।
इनरव्हील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था आहे. या संस्थेला यावर्षी 101 वर्ष पूर्ण होत आहेत. इनरव्हील क्लब ऑफ कराड ही या संस्थेचा एक भाग आहे.इनरव्हील क्लब ऑफ कराडला यावर्षी 36 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 करिता इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी आदिती पावसकर तर सचिव पदी श्रावणी घळसासी यांची निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारी मंडळ ही नियुक्त करण्यात आले आहे. 
यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्ष ऋता चाफेकर ,आयपीपी नम्रता कंटक, खजिनदार सीमा पाटील, आयएसओ राजश्री रामदुर्गकर, संपादक वैष्णवी कुंभार ,सीसी निता सपकाळ यांची निवड करण्यात आली .तर चार्टर् प्रेसिडेंट रेखा काशीद ,लक्ष्मी सिकची ,अलका गोखले ,शितल शहा, पद्मजा इंगळे यांची एक्झिक्यूटिव्ह सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .सन 2025-26 करिता इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन पुण्याच्या आशा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लब मधील सर्व सभासदांच्या सहकार्याने वृक्षारोपण ,महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य तसेच शैक्षणिक संवर्धन असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा अध्यक्ष आदिती पावसकर व सचिव श्रावणी घळसासी आणि त्यांचे कार्यकारी मंडळ यांचा मानस आहे. 

इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीत कराड शहरातील व पंचक्रोशीतील अनेकांचे सहकार्य मिळते ते यापुढेही मिळेल अशी खात्री इनरव्हील क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वेध- माझाच्या प्रश्नावर...राजू शेट्टींचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना टोला... म्हणाले "ते' घाबरणार नसतील तर आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी होतील ;

वेध माझा ऑनलाइन
सध्या मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुराचा धोका भविष्यात दिसून येत आहे म्हणूनच अल्लमट्टी धरणाचा धोका सांगली, कोल्हापूरच्या सामान्य जनतेला भविष्यात होऊ नये म्हणून त्याबद्दलचा योग्य तो तोडगा राज्य सरकारने काढायचा आहे...
15 ऑगस्ट नंतर त्याठिकाणी पाणी अडवले तरी चालेल... मात्र जुलै महिन्यात होणारा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यापूर्वी पाणी अडवू नये... अशी आमची या प्रश्नावर मुख्य मागणी आहे...याविषयी माझी प्राथमिक बोलणी राज्य शासनाबरोबर झाली आहेत त्याबाबत आवश्यक त्या आणखी काही मागण्याबाबत आम्ही आग्रही आहोत... जर आमच्या या भूमिकेकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत... असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला 
त्याच विषयाचा धागा पकडत, सांगली जिल्ह्यातील शासनाच्या विरोधातील इतर राजकीय नेत्यांना तुम्ही बरोबर घेणार का... या वेध माझाच्या प्रश्नाचे उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले जे कोणी आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊ पण सरकारला ते नेते घाबरले नाही पाहिजेत...
हा तुमचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आहे का असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले ते तुम्हीच ठरवा...मी कोणाचे नाव घेतले नाही ...तुम्ही काय काढायचा तो अर्थ काढा...अस म्हणत  हा टोला त्यांनी जयंत पाटील यांनाच लगावल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष पत्रकारांना सुचवले...

दरम्यान राजू शेट्टी यांनी यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अलमट्टी धरणाचा सांगली जिल्ह्याला धोका होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात असे सांगत त्यापैकी काही उपाययोजना त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सुचवल्या...
याबाबत राज्य शासनाशी प्राथमिक चर्चा केली आहे, पण कर्नाटक सरकारशी चर्चा झाली नाही असेही ते म्हणाले... 



Saturday, June 21, 2025

मलकापरचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे भाजप किंवा सेनेत जाणार का?...वेध माझ्याच्या प्रश्नावर मनोहर भाऊ झाले निरुत्तर... हाताने खूण करून म्हणाले...इथंच आहे...वेध माझाने विचारले...इथे म्हणजे आतातरी इथे... उद्या कुठे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? भाऊ काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्ह्यात काँग्रेस ची काहीप्रमाणात पडझड झाली आहे याची कबुली देत यापुढे जिल्ह्यात काँग्रेस बळकट करणार असल्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रणजित देशमुख यांनी सांगितले 
दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे भाजप किंवा शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना रणजित देशमुख म्हणाले ते कुठेही जाणार नाहीत...ते काँग्रेसमध्ये च राहणार आहेत...अफवांवर विश्वास ठेवू नका...
याबाबत मनोहर शिंदेंना वेध माझाने प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही...यावरून ते आता काही दिवसच काँग्रेसमध्ये दिसतील अशी चर्चा सुरू झाली आहे... यावेळी  मनोहर शिंदे यांना वेध माझाचे पत्रकार म्हणाले, भाऊ तुम्ही बोला की,  त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही...त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे...असे सांगितले त्यानंतर वेध माझाने विचारले... इथे म्हणजे आतातरी इथे आहे... उद्या कुठे हे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगून वेळ मारून नेली 

दरम्यान यावेळी रणजित देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आज त्यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली
ते म्हणाले सातारा जिल्हा कोग्रेसचा बालेकिल्ला होता तेच दिवस पुन्हा काँग्रेसला आणण्यासाठी  जिल्ह्यात पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत करणार आहे
जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस पक्षचिन्हावर लढणार असून महाआघाडी करण्यासाठी आवश्यक तेथे चर्चा करून निर्णय घेणार आहोत

दरम्यान तालुक्यात मनोहर शिंदे हे भाजप-किंवा सेनेत जाणार अशी चर्चा सुरू आहे त्याबाबत मनोहर शिंदे यांनी कोणतेच उत्तर दिले नाही...मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही...मी काँग्रेसमध्येच राहणार...असेही ठामपणे ते म्हणाले नाहीत...आणि भाजप किंवा सेनेत जाणार असेही त्यांनी म्हटलेले नाही...शेवटी रणजित देशमुख यांनी ते कुठेही जाणार नाहीत असे म्हणत या प्रश्नाचे उत्तर दिले
दरम्यान  मनोहर शिंदे यांना वेध माझाचे पत्रकार म्हणाले, भाऊ तुम्ही बोला...  त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही...त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे...असे सांगितले त्यानंतर वेध माझाने विचारले... इथे म्हणजे आतातरी इथे आहे उद्या कुठे हे माहीत नाही... असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगून वेळ मारून नेली पण उत्तर दिले नाहीच...
त्यामुळे मनोहर शिंदे यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे...

Friday, June 20, 2025

माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीवर नियुक्ती /

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असलेल्या उच्चाधिकार समितीची राज्य सरकारने पुनर्रचना केली आहे. त्या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्यांचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (१९ जून) रोजी जारी केला. 

या समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, आ. जयंत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रोहित आर पाटील, आ. राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्षनेता, विधानपरिषद विरोधी पक्षनेता, माजी मंत्री प्रकाश आवाडे अशा १८ सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कराडच्या विमानतळाचा आढावा ; दिल्या सूचना /

वेध माझा ऑनलाईन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उच्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाची स्थिती तसेच कराड विमानतळासह कोल्हापूर, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांसाठी भूसंपादन स्थितीबाबत व नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड (पूर्व, पश्चिम आणि विस्तार), भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाचा आढावा घेतला. 

यावेळी “राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे तातडीने भूसंपादन करा, कोणतेही प्रकल्प हे लांबणीवर पडू नये यावर भर द्या, भूसंपादनाची कामे निर्धारित वेळेनुसार पूर्ण करा,” असे महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले ...कोणत्याही प्रकल्पाला विलंब होऊ नये. याची सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. प्रकल्प विलंबनामुळे प्रकल्पाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्व विभागांना विशिष्ट वेळापत्रके देण्यात आली आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत म्हंटले. अधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याच्या आणि भूसंपादन तातडीने, गांभीर्याने आणि कार्यक्षमतेने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडे निधी देण्याची शिफारस देखील केली 

कोयना धरणात पाणीसाठा किती झाला आहे?

वेध माझा ऑनलाइन।
आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने कमी हजेरी लावली. दरम्यान, कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 33.56 TMC इतका पाणीसाठा झाला आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून आठवडाभरात धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. 

उद्धव ठाकरेंनी विधानसभेत 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार केला असता का? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल /

वेध माझा ऑनलाईन।
मनसेची स्थापना होऊन 19 वर्षे झाली, पण या आधी आमच्याशी कधीही युतीचं सूचलं नाही. मग आताच का उत्साह वाढलाय? असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. विधानसभेत जर 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार तरी केला असता का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आता बिकट आहे म्हणून त्यांना युतीचं सूचलं असा टोलाही त्यांनी लगावला. 

राज्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे जाहीर संकेत दिले. त्यानंतर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाशी संभाव्य युतीवरून उद्धव ठाकरेंना कठोर सवाल विचारले आहेत. 

मनसेसोबत जायचं का असं उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. त्यावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली. या आधी कधी विचारले का शरद पवारांसोबत जाऊ का? काँग्रेससोबत जाऊ का? तेव्हा बैठका घेतल्या का आमदारांच्या बैठका? 
तुमच्या पक्षावर वाईट वेळ आली आहे मान्य आहे. पक्ष वाचविण्यासाठी हे सर्व करत आहात.  पण युतीसाठी आमच्यावर दबाव टाकू नका. या युतीसाठी दोन वर्षांपूर्वी उत्साह का दाखवला नाही. आम्ही दोन वेळा युतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी शिवसैनिकांनी उत्साह का दाखवला नाही. या आधीही मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावेत असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी युतीसाठी पुढे का आला नाही? आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक;

वेध माझा ऑनलाईन।
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक घेतली. राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे

दरम्यान मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल.

Wednesday, June 18, 2025

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत फायदाच होईल ; मुंबईत या युतीला अनुकूल वातावरण ; उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची कबुली ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना व मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याने दोन्ही बाजुने कार्यकर्ते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. माजी नगरसेवकांसोबत आज झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, मनसेसोबत युती करायची का नाही याबाबतही उद्धव ठाकरेंनी विचारणा केली असून, युती केली तर फायदाच होईल, अशी कबुली नगरसेवकांनी दिल्याचे समजते. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी बोलताना म्हटले. त्यामुळे, पुढील काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का ते पाहायचे आहे

अनाथ मुलांना दप्तर, वह्या, युनिफॉर्मचे वाटप - श्री व सौ संदीप पवार या दाम्पत्याची दानत मोठी ; सर्वत्र होतय कौतुक ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडची आस्था सामाजिक संस्था ही दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू मुलांना करत असते..यावर्षीदेखील नगरपालिकेच्या शाळेमध्ये दप्तराचं वाटप करण्यात आले.. महिला मर्चंट च्या चेअरमन सौ कविता संदीप पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले.. समाजकार्याचा वसा आणि वारसा चालवणारे संदीपदादा पवार आणि सौ. कविताताई पवार या दोघांचे समाजकार्य खूप महान आहे.. समाजासाठी द्यायची पण दानत असावी लागते आणि ती आज या दांपत्याकडे आहे..

सौ कविता पवार यांनी शिक्षक हे गुरु आहेत आणि मुलांना घडवण्याचे काम ते करत असतात..आणि इथून पुढे शाळेला काही मदत लागल्यास आम्ही नक्की करू असे आश्वासन दिले. मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय शिक्षणाचे साहित्य बऱ्याच संस्था वाटप करत असते. आज आईवडील नसलेली 35 मुलामुलींना दफ्तर वाटण्यात आले..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटले..लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात आणि त्यांना आकार द्यायचं काम शिक्षक करत असतात..आज शाळेकडून छोट्या मुलींना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले.. लक्ष्मीचे पावले कागदावरती उमटवून त्याची पूजा करून मुलींना लक्ष्मीचा मान दिला..शालेय पुस्तके वाटण्यात आली.. तसेच शेंगदाण्याची चिक्की खाऊ म्हणून वाटण्यात आली..कराड नगरपालिका शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थींना लागेल ते सहकार्य करण्यास त्या तत्पर असतात. 
कविताताई म्हणाल्या, सामाजिक कार्य करताना आमच्या हातून जे घडतेय ते अनेकांच्या जगण्यात आनंद निर्माण करते. कै. समीर पवार हे आमच्या कुटूंबातील प्रत्येकाच्या मनातील भावनिक नाव आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जे करत आहोत ते यापुढेही करत राहू.
सुनीता पवार यांनीही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नात्याचं कौतुक केले..मुख्याध्यापक संकपाळ सर यांनी आभार मानले.. अंगणवाडी शिक्षिका सौ सुचिता सोनावणे, अश्विनी भोसले,अविनाश भोसले सर, आलेकरी सर, आणि पूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभले..

एसटी बँकचे 18 पैकी 12 संचालक आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार ; गुणरत्न सदावर्ते याना शह देण्याचा प्रयत्न , भाजप शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता !

वेध माझा ऑनलाईन।
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना शह देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून होतोय का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण एसटी बँकचे 12 संचालक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 18 पैकी 12 संचालक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे चर्चेनं शिंदे गटानं ऑपरेशन लोटस राबवत एकप्रकारे  गुणरत्न सदावर्तेंना झटका दिल्याचे बोललं जात आहे.  गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संचालक फोडाफोडीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची शक्यता ही वर्तवली जात आहे. गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता लक्षात घेता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

राज ठाकरेंचा राज्यातील शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध ; म्हणाले ... मोदी-शाह यांच्या राज्यात हिंदी सक्तीची नाही, मग महाराष्ट्रात का?

वेध माझा ऑनलाईन।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. 
लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. हे मराठी संपवून टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का? असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत

शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. अशातच हिंदी भाषा सक्तीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर भाष्य केलं. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारला हिंदी भाषेबाबत लिहिलेली दोन पत्र वाचून दाखवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "मी एकाच विषयावर बोलेल जो अत्यंत महत्तवाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारनं शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली आहे. 17 तारखेला मी पत्र लिहलं होतं. शैक्षणिक धोरणाविषयी आजची पत्रकार परिषद घेत आहे. हिंदी भाषेबाबत राज्य सरकारला 2 पत्र लिहली आहेत.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले...
आजची तातडीने पत्रकार परिषद बोलवली कारण राज्याचे शिक्षण धोरण हा आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे पहिली पासून हिंदी सक्तीची करणे. मी दोन पत्र काढली आहेत. उजळणी म्हणून पुन्हा ते पत्र वाचत आहे. १७ एप्रिलचं पहिलं पत्र… हिंदी सक्ती महाराष्ट्र निर्माण सेना खपवून घेणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. आम्ही पहिलीपासून का शिकायची?
हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे.
जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू.  आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का?
गुजरात सरकारचा जीआर आहे पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही.
महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. हे मराठी संपवून टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू… सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?

ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; त्या नेत्यावर अगोदर भाजपकडून गंभीर आरोप ,प्रवेश केल्यानंतर भाजपकडून त्या नेत्याला क्लीन चिट ??

वेध माझा ऑनलाईन।
ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून सुधाकर बडगुजर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. सलीम कुत्ता याच्यासोबतचे सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन देखील भाजपने समोर आणले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पनाच नव्हती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे ऐनवेळी सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला हजर झाले. त्यामुळे काल दिवसभर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात गाजला. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की, त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणे यांनी रिलीज केला होता. पण, त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की, जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ते शिवसेनेत असताना ते तेव्हा या पक्षात आले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरुद्धचे उमेदवार ते होते. शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली.शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांना क्लीन चीट दिली आहे.

Monday, June 16, 2025

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार ; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे.  अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यासाठी, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे  ४ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीतून कराड दक्षिणमधील बेलवडे बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर व कसे वस्तीमध्ये सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करणे (४५ लाख), चचेगाव येथील सिद्धार्थनगर, संत रोहिदास नगर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर (५० लाख), गोटे (३० लाख), गोळेश्वर येथील गणेश नगर, थोरात वस्ती, दुपटे वस्ती, झिमरे वस्ती व झिमरे-साळुंखे वस्ती (६५ लाख), गोवारे (३५ लाख), घोणशी येथील जय मल्हार कॉलनी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (२० लाख), कार्वे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर, संत रोहिदास नगर (५५ लाख), वारुंजी येथील लक्ष्मी वॉर्ड, जिजामाता नगर व सिद्धनाथ कॉलनी (५० लाख), विंग येथील समता नगर, संत रोहिदास नगर व पंचशील नगर (४५ लाख), ओंड (२५ लाख), वहागाव येथील पंचशील नगर, जय मल्हार नगर, संत रोहिदास नगर, अहिल्यानगर (५० लाख) येथे सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.

याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, या विकासकामांसाठी तातडीने आराखडा सादर करुन, निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मूलभूत सोयीसुविधांचे काम मार्गी लागून, कराड दक्षिणमधील ११ गावांमधील विविध अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहती हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहेत. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Sunday, June 15, 2025

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मोठा गौप्यस्फोट ; ...म्हणाले...आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. ..महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते,...

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी ही झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.   

भरत गोगावले म्हणाले की, मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.  मविआतील काही आमदार एअरपोर्टला गेले होते, त्यांना घेऊन आले होते, असा दावा त्यांनी केलाय. 
बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नाही, ते देखील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्यावेळी पद घेऊ शकले असते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव साहेब हे पद घेणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी पद स्वीकारले, त्यासोबतच आदित्य ठाकरेंना देखील मंत्रिपद दिले. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर केंद्रात आता श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिले असते, आम्ही देखील बोललो द्या. पण, त्यांनी तसे केले नाही, असे देखील गोगावले यांनी स्पष्ट केले.

मालवणमधील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली ; पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाडही पडले! ; चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट झाल्याचं स्पष्ट

वेध माझा ऑनलाइन।
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला तरी चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या  चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. त्या ठिकाणची जमीन खचल्याने मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपला साथ देणार ? गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांची घेतली भेट.

वेध माझा ऑनलाइन
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे अरुण गवळींचा पक्ष महापालिका निवडणुकीत भाजपची साथ देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

गीता गवळी या अरुण गवळीची कन्या असून त्या 2017 ला मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीला गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाने त्यांना तिकीट न दिल्याने गीता गवळी निवडणूक लढल्या नाहीत.

भाजपच्या एका आमदाराच्या निवासस्थानावर शेतकऱ्याचा पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानावर एका शेतकऱ्याने पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेवर प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील विशाल मुरुड या शेतकऱ्याने हातात पेट्रोलचा कॅन घेऊन कुटे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो ओरडत होता की, "माझ्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला पेटवतो."
यावेळी आ. कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने तत्काळ हस्तक्षेप करून मुरुड याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी BNS 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारकडून मदतीचा मोबदला वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे, आणि याचेच परिणाम म्हणून लोक आता थेट
लोकप्रतिनिधींवर तुटून पडताना दिसत आहेत.
संजय कुटे हे 2004 पासून सलग विधानसभेवर निवडून येत असून, भाजपचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  

पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीने हत्या ; मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केला...

वेध माझा ऑनलाइन
पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीचा मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. यशवंत मोहन ठाकरे असे या मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत ठाकरे हे 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होते. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी पत्नी प्रभा ठाकरे हिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी यशवंत हे गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे पत्नीने आई-वडिलांना सांगितले. मात्र, पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली.
यानंतर त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराची ओसरी खड्डा करून शेण आणि मातीने सारवलेला कुटुंबियांना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली.  पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी महसूल विभागासमवेत पंचनामा करीत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. मात्र तिथे मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आणि ती काही झालेच नाही, अशी वावरत होती. लहान भावाच्या पत्नीला संशय आला अन्...दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवली. त्यामुळे उत्तमच्या पत्नीला संशय आला आणि तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली दिली.  




तळेगाव दाभाडे जवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला ; 25 जण वाहून गेल्याची भीती ;

वेध माझा ऑनलाइन
मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Friday, June 13, 2025

गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील मुलगी व जावयाचा दुर्दैवी मृत्यू ; सर्वत्र हळहळ व्यक्त ;

वेध माझा ऑनलाइन।
लंडनला जाणाऱ्या विमानाला गुरुवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण देश या बातमीने हादरून गेला या अपघातात कराडच्या सोमवार पेठेतील ढवळीकर कुटुंबातील एक विवाहिता व तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे 

गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात एकूण मिळून 242 जण प्रवासी होते. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बचावला गेला आहे  
दरम्यान कराडमधील सोमवार पेठेतील प्रकाश ढवळीकर यांची कन्या कल्याणी व त्यांचा जावई गौरव या दोघांचाही या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे दाम्पत्य कम्पनी कामानिमित्त लंडनला निघाले होते
कल्याणी ही लंडनला काही वर्षांपूर्वी शिक्षण घेत होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह गुजरात अहमदाबाद येथील गौरव ब्रम्हभट याच्याशी झाला या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत
कल्याणीचा पती गौरव हा लंडनमधील एका कंपनीचा ब्रँड आंबेसेडर म्हणून कार्यरत होता  दरम्यान हे दोघेही लंडनला गौरव काम करत असलेल्या कम्पनीच्या कॉन्फरन्ससाठी सदर विमानाने लंडनला  जाण्यासाठी चालले होते दरम्यान त्यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला 
सुरुवातीला हे दोघेही जखमी झाले आहेत असे प्रथमदर्शनी सांगण्यात आले त्यानंतर कराडमधून ढवळीकर कुटुंबीय गुजरातला रवाना झाले त्यावेळी मृतांच्या जाहीर केलेल्या नावांच्या लिस्टमध्ये त्यांची मुलगी व जावई यांच्या नावांचा उल्लेख केला गेला त्यादरम्यान या उभयतांचे मृतदेह ताब्यात दिले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही