: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक आठवडे उलटले. या काळात नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, संबंधित विभागांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा विलंब नेमका कशामुळे होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?
त्या पाण्याचा तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,?
तो जनतेपासून का लपविला जात आहे?
आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार?
लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का?
या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.
दरम्यान या प्रकरणात संबंधित विभागांना नदीच्या पाण्याचे नमुने घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
मात्र, ती तपासणी करण्यात आली का?
आली असेल तर त्या नमुन्यांचे निष्कर्ष काय आले?
तपासणी पूर्ण झाली की नाही ?
कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली?
आणि अहवाल कोणाकडे प्रलंबित आहे? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांसमोर अद्यापही ठेवण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयात प्रशासनाची ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
सध्या पावसाळा सुरू असून नदीत विविध नाले, सांडपाणी आणि शेतीमधून वाहून येणारे पाणी मिसळत आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना अधिकृत माहितीचा अभाव चिंतेत भर घालत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नदीबाबत पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या काही नागरिकांनी अद्यापही काही ठिकाणी पाण्यावर हिरवट थर किंवा रंगातील बदल दिसत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची शासकीय स्तरावर पडताळणी झाली आहे का, याचाही खुलासा झालेला नसल्यामुळे रंगबदलाची कारणे नैसर्गिक आहेत की प्रदूषणाशी संबंधित आहेत?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कराड परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जीवन कृष्णा नदीवर अवलंबून असताना या विषयावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून संयुक्त पत्रकार परिषद किंवा अधिकृत निवेदनही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माहितीच्या अभावातून अफवा आणि संभ्रम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियमित परीक्षण करून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही पुढे येत आहे.
कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय, तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे, तो जनतेपासून का लपविला जात आहे आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.
No comments:
Post a Comment