Monday, August 31, 2026

कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटींचा निधी मंजूर

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; चार तालुक्यांतील शेतीला होणार मोठा लाभ

कराड, ता. ३१ : कराड तालुक्यासह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील तब्बल १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या कृष्णा कालव्याची सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी भाजपा-महायुती सरकारने १२५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीतून कृष्णा कालव्याची आवश्यक सुधारणा, बंदिस्तीकरण तसेच काँक्रीट लायनिंगची कामे करण्यात येणार आहेत.

कृष्णा कालव्याच्या दुरावस्थेचा प्रश्न कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून, त्यांनी कृष्णा कालव्याच्या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कालव्याच्या सुधारणेसाठी २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. 

विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जलसंपदा मंत्री ना. विखे-पाटील यांच्या कराड दौऱ्यादरम्यान आमदार डॉ. भोसले यांनी त्यांच्यासमवेत कृष्णा कॅनॉलची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कृष्णा कालव्याचे सिंचनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व, त्यावर अवलंबून असलेली चार तालुक्यांतील शेती, पाण्याची गळती व शेतीचे नुकसान तसेच कालवा बंदिस्त करण्यासाठी व त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या निधीची सविस्तर माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याची गांभीर्याने दखल घेत, जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, तसेच १९३ पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी १५,००० कोटींच्या दीर्घ मुदतीच्या कर्जास मान्यता दिली आहे. या माध्यमातून सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे व वितरिकांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करणे आदी कामांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत कृष्णा कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी मंजूर झालेला १२५ कोटींचा निधी कराडसह ४ तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी व नागरिकांमधून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत. 
-------------------------

चौकट

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा

कृष्णा कालव्याच्या सुधारणा व बंदिस्तीकरणामुळे पाण्याची गळती कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यांतील शेतीला अधिक नियमित व कार्यक्षम पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. 
----------------------------

प्रतिक्रिया

भाजपा-महायुती शासनाने कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा मनापासून आनंद आहे. या निधीतून कालव्याची सुधारणा, बंदिस्तीकरण आणि काँक्रीट लायनिंगची कामे होऊन पाण्याची गळती कमी होईल आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल. या निर्णयामुळे चार तालुक्यांतील १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला मोठा लाभ मिळणार असून, हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनकडून घोषणा; १२ सप्टेंबरला होणार वितरण

वेध माझा ऑनलाइन।
ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या, कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, १२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

राज्यातील सहकारी नागरी बँकांचा महासंघ असलेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांच्या कार्याची दखल घेत, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो. सन २०२५-२६ या वर्षासाठी कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०१ कोटींपेक्षा अधिक आणि १००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठा विस्तार केला आहे. बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २७ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यविस्तारास मंजुरी मिळाली आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत कृष्णा बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.

या पुरस्काराचे वितरण १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’ येथे होणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा ; सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री आणि आमदार घाबरलेत: ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा :

वेध माझा ऑनलाइन :
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरूच आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत आले होते. मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवादावरून उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली. सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ असून सर्व मंत्री आणि आमदार घाबरले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अमित शहांना सांगितलं की, साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले आहेत. सर्व जण धक्क्यात आहेत. त्यांचे साहेब म्हणाले, काय झालं? त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अस्वस्थ आहेत’. त्यावर अमित शहा म्हणाले, ‘मी आहे, टेन्शन घेऊ नका’. गेल्या महिन्यात संसदेचं अधिवेशन सुरू असताना गद्दार खासदार हे शिंदे पुत्रांसोबत अमित शहांना भेटले. तेव्हाही दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी देखील अमित शहा यांनी सर्व काही ठिक होईल, असे सांगितले. त्याची चिंता करू नका. सर्व माझ्यावर सोपवा’. देशाचं सुप्रीम कोर्ट यांच्या खिशात आहे का? उघडपणे सुप्रीम कोर्टावर भाष्य केले जात आहे. अशामुळे देशावरील न्यायव्यवस्थेचा विश्वास नष्ट होतो’.
‘अमित शहा मुंबईत येतात किंवा दिल्लीत बसतात. त्यावेळी गद्दार जाऊन भेटतात. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका, असं म्हणतात. फडणवीसही तसंच म्हणतात. राहुल नार्वेकरही सांगतात, मी जे सांगितलं, तोच निकाल. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तेच सांगत आहे. आता न्यायालयांना कळवणं, हेच आमचं कर्तव्य आहे, असे राऊतांनी पुढे सांगितले.

संजय राऊत यांनी आमचा न्यायालय आणि संविधानावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सत्य आणि धर्माचा विजय होणार असून न्यायव्यवस्था ही अधर्माच्या बाजूने जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बुडत्याचा पाय खोलात, असं काल त्यांच्याबाबतीत झाल्याची टीका राऊतांनी केली.

‘चांगभलं’चे संपादक हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ९ मान्यवरांचा मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यावतीने विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. यावेळी ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २९) येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, नासिरभाई इनामदार, दिग्विजय सूर्यवंशी, जगन्नाथ कुंभार, देवदास माने, राहुल काळोखे, सुरेश बडेकर, भास्कर तडाके, चंद्रकांत साठे, रामभाऊ दाभाडे, माणिक अवघडे, आनंदी अवघडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कारार्थींचा शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, तर प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’, एनआयएस राष्ट्रीय कोच व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, तर ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ तर 'राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार - नितीनभाऊ आवळे यांना आणि
'राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार - जगन्नाथ कुंभार यांना प्रदान करण्यात आला.

Saturday, August 29, 2026

नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारले ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ ;

वेध माझा ऑनलाईन।
भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण कराड येथील रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी यंदा आगळ्यावेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. कराड नगरपरिषदेचे नगरसेवक व भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनी एकमेकींना औक्षण करून राख्या बांधल्या आणि सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

रक्षाबंधन म्हटले की बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, अशी आपली पारंपरिक भावना आहे. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक कुटुंबांतील सदस्य नोकरी, व्यवसाय, शिक्षण अथवा अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या शहरांत किंवा परदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहीण प्रत्यक्ष भेटू शकतीलच असे नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही परिस्थिती अधिक जाणवते.
याच भावनेतून रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक स्नेहाचा नवा अर्थ देण्याचा प्रयत्न रामकृष्ण गीता मंडळाच्या महिलांनी केला. ‘आपणच एकमेकींच्या बहिणी आणि एकमेकींच्या आधारस्तंभ’ अशी भावना व्यक्त करत ज्येष्ठ महिलांनी एकमेकींना राखी बांधली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. एकमेकींना शुभेच्छा देत आनंद, समाधान आणि आपुलकीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
नात्यांच्या पलीकडे जपला माणुसकीचा धागा
रक्षाबंधनाचा धागा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता मैत्री, स्नेह, आपुलकी आणि परस्पर सहकार्याशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ज्येष्ठावस्थेत एकटेपणा जाणवू नये, महिलांना एकमेकांचा भावनिक आधार मिळावा आणि सामाजिक जीवनातील त्यांचा सहभाग कायम राहावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
 रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारलेले हे ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ कराडकरांसाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Friday, August 28, 2026

आता दूध महागणार...!;


वेध माझा ऑनलाइन
मुंबईत 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 9 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार आहे. जनावरांच्या वाढत्या किमती आणि पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. यामुळे दुग्ध उत्पादक संघाला दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे संघाने स्पष्ट केले आहे.

सध्या मुंबईत दुधाचा घाऊक दर प्रति लिटर 93 रुपये आहे. 1 सप्टेंबरपासून ही वाढ लागू झाल्यानंतर, तो 102 रुपये प्रति लिटर इतका होईल. ही दरवाढ 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होऊन 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत वैध राहील. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागतील, हे निश्चित आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आशियाई पदकविजेत्या श्रीशा जाधवचे कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन।
आशियाई स्तरावर कांस्यपदक पटकावत कराड, सातारा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारी कु. श्रीशा सागर जाधव ही राज्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या श्रीशाने आपल्या कुटुंबीयांसह आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्यासमवेत कराड येथील निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीशाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडसारख्या शहरातील एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा नसतानाही श्रीशाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा खेळाडूंना शासन, क्रीडा संस्था आणि समाजाने अधिकाधिक पाठबळ देण्याची गरज आहे. भविष्यात श्रीशा आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा उंचावेल, असा मला विश्वास आहे.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात केलेल्या श्रीशाने कराड येथील योगेश स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. रोलर स्केटिंग आणि रोलबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर तिची वाटचाल आईस स्केटिंगकडे वळली. महाराष्ट्रात या खेळासाठी आवश्यक सुविधा नसतानाही तिने देहरादून येथे प्रशिक्षण घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

श्रीशाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. नियमित सरावाचे मैदान बंद झाल्यानंतर तिने कराडमधील डांबरी रस्त्यांवर सराव सुरू ठेवला. कब्रस्तान परिसरातील रस्ता आणि वॉटर हाऊस परिसरातील रस्त्यांवर दररोज तासन्तास सराव करत तिने आपली तयारी कायम ठेवली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले आणि त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले.

१७ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत ११ वर्षांखालील ३३३ मीटर गटात कांस्यपदक पटकावत श्रीशाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या यशामागे आई कल्याणी जाधव, वडील सागर जाधव, आजी अरुणाताई जाधव यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
डांबरी रस्त्यावरच्या सरावातून आशियाई पदकापर्यंत पोहोचलेली श्रीशा जाधव आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.