Monday, February 17, 2025

नवी मुंबईच्या भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत काय म्हणाला...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन
नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.  माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या  माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भरत जाधव यांनी काय म्हटलंय?

मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे  त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे.  निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे.  जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.असे जाधव यांनी म्हटले आहे

No comments:

Post a Comment