Monday, February 17, 2025

दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली,स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण

वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतील अनेक सामान्य माणसांचे पैसे अडकून पडलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आला होता. राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याच्यावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने कर्ज द्यायला भाग पाडले. ही कर्जे भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली. या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही. तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांसाठी स्वत:च्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वा दराने भाड्याने दिले. या सगळ्यामुळे बँक डबघाईला आली, असा आरोप झाला होता. या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आमदार राम कदम यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला, अन्यथा कारवाईला तयार राहा. न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत. या बँकेचा मी सुद्धा एक खातेदार असून त्यामुळे माझे सुद्धा पैसे याच बँकेत अडकले आहेत. माझ्यासह माझ्या कुटुंबातीलही काही जणांचे खाते याच बँकेत आहे. त्यांचेही पैसे बँकेत अडकले आहेत. या परिस्थितीत, मी या प्रकरणातील पीडित व्यक्ती आहे, याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणामध्ये, माझ्यासह प्रत्येक खातेदाराला त्यांनी बँकेत ठेवलेला पैसा परत मिळावा यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील असल्याचे राम कदम यांनी सांगितले.कोणतीही सत्यता पडताळून न पाहता माझ्याविरोधात काहीजणांनी विनाकारण बडबड सुरू केली आहे. यावर, आधारित बातम्या सुद्धा प्रसिद्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही आणि उलट फसलेल्या हजारो लोकांना मदत करण्याची माझी भूमिका नेहमी आहे आणि भविष्यातही राहील. तरीसुद्धा विनाकारण या घोटाळ्याशी माझे नाव जोडले गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही.  न्यू इंडिया सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरू करत आहे. तरी कृपया " असत्य "  बातम्या  आणि तशी वक्तव्य सुद्धा करताना वरील बाब लक्षात असू द्यावी. माझी सरकारकडे आग्रही मागणी आहे की  सर्व पीडितांना न्याय मिळावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक पेक्षा अति कडक कारवाई व्हावी, असे राम कदम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment