कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवसांपासून हिरवा-निळा होत असल्याच्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर वेध माझाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनाची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा प्रश्न थेट राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा-निळा का झाला? त्यामागील नेमके कारण काय आहे? नदीचे पाणी सुरक्षित आहे का? प्रदूषणामुळे हा बदल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वेध माझाने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती.
या वृत्तांची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.
याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आणि सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा-निळा होण्यामागील नेमके वैज्ञानिक कारण आता अधिकृतपणे स्पष्ट होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ रंगबदल म्हणून न पाहता पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय शासन स्तरावर पोहोचवल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आता अधिकृत तपासणी अहवालातून वस्तुस्थिती समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.
वेध माझाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे अखेर शासन यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, आता तपासणी अहवालात काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment