Monday, February 2, 2026

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार!

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची पुनर्रचना सुरू असून आता त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. 

राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांचे नाव :
अजित पवार  यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. 31 जानेवारी रोजी झालेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, ज्यामुळे उच्च सभागृहातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर आता त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे बाकी असून त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, त्या जागेवर पाठवण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी असलेल्या दुसऱ्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. लवकरच ही जागा भरली जाणार असून त्या दृष्टीने पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण ; बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली ;

वेध माझा ऑनलाइन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्याआधीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले असून त्या आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 

उड्डाणाआधीच आढळला तांत्रिक दोष :
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टरने आकाशात झेपावण्यापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक बिघाड आला.
तत्काळ सुरक्षेचा विचार करून उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही समस्या उड्डाणाच्या आधीच लक्षात आल्यामुळे प्रवास सुरू होण्याआधीच आवश्यक खबरदारी घेण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानात ५ लोक होते की ६ ? उज्ज्वल निकम यांचा सर्वात मोठा खुलासा!

वेध माझा ऑनलाईन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी या चर्चांना थेट आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अशा गंभीर घटनेला वेगळी कलाटणी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

उज्ज्वल निकम यांनी अजित पवार  यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 

त्या विमानात नेमके किती प्रवासी होते? :
विमानात 5 की 6 लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही,

भुजबळ म्हणाले ; सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही ;

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह सर्वत महत्त्वाच्या नेत्यांनी येत्या 12 तारखेला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते अशी माहिती दिली आहे. या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र आधी नगरपंचायत त्यानंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे हे विलिनीकरण होऊ शकले नव्हते. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. दरम्यान सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही असेही भुजबळ म्हणाले...

नाशिकच्या येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु अशा काही चर्चा झाल्या का याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत. जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे आहे. असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपच्या काही ज्येष्ठ मंडळींना विचारावं लागेल. कारण काय बोलणं झालं होतं हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाही.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ज्यांच्या सोबत यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. सरकार मधून बाहेर पडायचे असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली. आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील ना, आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असे काही नाही. राजकारणाच्या गोष्टी कधी होतात कधी नाही होत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची शपथ घेत एकत्रि‍करणाची चर्चा झाली होती अशी माहिती दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, बोलणं झालं असेल, परंतु आता परिस्थिती बदलली, नेते बदलले आहेत. सुनेत्रा ताईंना माहिती होती का ? आता त्यांच्या नेतृत्वाखालील बाकी नेते देखील चर्चा करतील. शेवटी हा निर्णय सामुदायिक रीतीने घ्यावे लागेल. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागे भाजपला सुद्धा उभे राहणे आवश्यक आहे.

कराडात सुनील तटकरेंच्या "त्या' वक्तव्यामुळे राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तर्कवितर्कांना मिळाला अखेरचा पूर्णविराम ; तटकरे म्हणाले...आम्ही एन डी ए सोबतच राहणार...आणखी काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट उत्तर देत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली असून पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे.” त्यामुळे आता तटकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यात सुरु असलेल्या तर्कवितर्कांना अखेरचा पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान आम्ही एनडीएमध्येच आहोत आणि तिथेच राहणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर कराड येथील प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी चव्हाण साहेबांच्या विचारांचा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करत राहणार आहे.

विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका :
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केल्यानंतर या मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “विलिनीकरणाबाबत साहेबांनी जे काही म्हटलं आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, जनतेने विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.”

तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, “प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. मात्र, एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत राहण्याची आमची भूमिका ठाम आहे.”

 “आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि राहणार” :
याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, या थेट प्रश्नावर सुनील तटकरे  म्हणाले, “आम्ही भाजपप्रणीत एनडीएमध्ये आहोत आणि सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देश गतिमान करण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली असून, ती दादांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं आमचं कर्तव्य आहे.”

तसेच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना तटकरे यांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटलं की, “काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार, याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावं.” 

दरम्यान आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का, या प्रश्नावर तटकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटलं की, “दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत, म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा.” मात्र आता तटकरेंच्या या सर्व रोखठोक वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली ;

वेध माझा ऑनलाइन।
आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 
सन्मानीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट देत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केला. 

तटकरे यांची पोस्ट व्हायरल; 
आमचे नेते तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार  यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेरणादायी होते. अजितदादा अनेक वेळा कराड येथे येऊन समाधीस्थळी दर्शन घेत, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यासमोर नतमस्तक होत आणि त्यांच्या विचारांतून समाजाभिमुख कार्यासाठी नवी ऊर्जा घेत असत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली.

यावेळी  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील  खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील  उपस्थित होते.तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते

Sunday, February 1, 2026

फडणवीस म्हणाले...विलीनीकरण ठरलंच नाही!...तर, अजित पवारांनी आम्हाला कळवले असते,;

वेध माझा ऑनलाइन।
राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा तीव्र झाली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावा केला होता. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला. विलीनीकरणाबाबत कोणतीही तारीख निश्चित झाली असती किंवा चर्चा झाली असती, तर अजित पवारांनी आम्हाला कळवले असते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात शशिकांत शिंदे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. दादांनी भाजप नेतृत्वाशी चर्चा केली होती आणि फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विलीनीकरणाचा निर्णय घेण्याचे सुचवले होते, असा गौप्यस्फोट शिंदेंनी केला. शिंदेंनी दादांची शपथ घेऊन आपला दावा खरा असल्याचे सांगितले.
सध्या अजित पवारांच्या गटाचे नेतृत्व सुनेत्रा पवार करत आहेत. फडणवीस यांनी असेही स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, परंतु कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी महायुतीशी चर्चा करावी. या विषयावर वेगवेगळी विधाने येत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम कायम आहे.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार उद्या (सोमवारी)तातडीने कराड दौऱ्यावर ;

वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार सोमवारी तातडीने कराड दौऱ्यावर येणार आहेत. स्व यशवन्तराव चव्हाणसाहेब यांच्या समधीस्थळी नतमस्तक होऊन राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या नव्या इनिंगची सुरूवात करणार आहेत. त्या प्रथमच यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी येत आहेत. सुनेत्रा ताईंच्या या दौऱ्यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या प्रीतिसंगमावरील आठवणींना उजाळा मिळणार आहे.



उंब्रजच्या विकासाचा फैसला करणारी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे.

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लाडकी बहीण योजना ही देशातील पहिली आणि महत्त्वाची योजना ठरली असून लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम दिले आहे. येणाऱ्या काळात रस्ते, पिण्याचे पाणी, पर्यटन आणि नागरी सुविधांसाठी शिवसेना विकासकामांना गती देईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उंब्रजच्या भविष्याचा फैसला करणारी हीच निवडणूक असल्याचे त्यांनी  सांगितले.
   कराड तालुक्यातील उंब्रज येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन संबोधीत केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, सभेला सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार ॲड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, हजारो शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले उंब्रजला नगरपंचायत दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या सुविधा आणि उड्डाणपूल या प्रश्नांना वर्षभरात न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सभेला प्रत्यक्ष येणार होतो; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने मनात प्रचंड वेदना आहेत. मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे. कर्मभूमी ठाणे-मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा आहे. या मातीशी माझी नाळ कायम जुळलेली असून सातारा जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. छत्रपतींचा भगवा हाती असलेल्या शिवसेनेला मतदान करून जिल्हा परिषदेत भगवा फडकवा.मी गरिबी जवळून पाहिली आहे, आईची काटकसर अनुभवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कोणालाही बंद करता येणार नाही. शब्द द्यायचा नाही आणि दिला तर मागे घ्यायचा नाही—हीच मला बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. 

उद्योगमंत्री उदय सामंत  म्हणाले, 
ही स्व. यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. याच भूमीचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी देशातील पहिली लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे दर महिन्याला भाऊबीज साजरी होते. महाराष्ट्राच्या विकासात शिवसेनेचा मोठा वाटा असून विकासकामे वेगाने सुरू आहेत.
उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या ५० लाखांनंतर उर्वरित १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले. तसेच नगरपंचायत व्यापारी संकुल, घनकचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न व इतर नागरी सुविधा या सर्व प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वर्षभरात पूर्णविराम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले...
उंब्रज परिसरातील समस्या उद्योग मंत्र्यांसमोर मांडताना उंब्रजच्या गावाच्या वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत बदल होणे आवश्यक आहे.याची फाईलही नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. उंब्रज गावात घनकचर्‍याची गंभीर समस्या आहे तातडीने इथे घनकचरा निर्मुलन प्रकल्प होणे आवश्यक आहे. शिवाजीनगर व लगतच्या चार गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो तातडीने मार्गी लागावा. छ.शिवाजी महाराज स्मारकासाठी वाढीव निधी देण्यात यावा.उंब्रजमधील व्यापार्‍यांसाठी व्यापारी संकुल  व्हावे तसेच तासवडे औधोगिक वसाहतीत स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य मिळावे अशा प्रकारच्या अनेक मागण्या मांडल्या.यावर उद्योगमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्यावतीने हे सर्व नागरी प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी जाहीर घोषणा केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे ग्रामीण भागातील महत्व अधोरेखित करताना यादव म्हणाले या माध्यमातुन केंद्र व राज्य सरकार विविध योजना व विकास तळागाळात पोहोचवत असते.ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या ना.एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन गट व गणातील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे अवाहन केले.
अॅड. महादेव साळुंखे यांनी आभार मानले.