वेध माझा ऑनलाईन।
मनसेची स्थापना होऊन 19 वर्षे झाली, पण या आधी आमच्याशी कधीही युतीचं सूचलं नाही. मग आताच का उत्साह वाढलाय? असा प्रश्न मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. विधानसभेत जर 20 ऐवजी 60 जागा आल्या असत्या तर आमच्याशी युती करण्याचा विचार तरी केला असता का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आता बिकट आहे म्हणून त्यांना युतीचं सूचलं असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे जाहीर संकेत दिले. त्यानंतर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाशी संभाव्य युतीवरून उद्धव ठाकरेंना कठोर सवाल विचारले आहेत.
मनसेसोबत जायचं का असं उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारत आहेत. त्यावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली. या आधी कधी विचारले का शरद पवारांसोबत जाऊ का? काँग्रेससोबत जाऊ का? तेव्हा बैठका घेतल्या का आमदारांच्या बैठका?
तुमच्या पक्षावर वाईट वेळ आली आहे मान्य आहे. पक्ष वाचविण्यासाठी हे सर्व करत आहात. पण युतीसाठी आमच्यावर दबाव टाकू नका. या युतीसाठी दोन वर्षांपूर्वी उत्साह का दाखवला नाही. आम्ही दोन वेळा युतीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावेळी शिवसैनिकांनी उत्साह का दाखवला नाही. या आधीही मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावेत असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी युतीसाठी पुढे का आला नाही? आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
No comments:
Post a Comment