वेध माझा ऑनलाइन
पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीचा मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. यशवंत मोहन ठाकरे असे या मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे. तिने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने हत्येचे गूढ आणखी वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत ठाकरे हे 14 एप्रिल 2025 पासून घरातून बेपत्ता होते. दोन महिने उलटूनही यशवंत घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी पत्नी प्रभा ठाकरे हिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी यशवंत हे गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेल्याचे पत्नीने आई-वडिलांना सांगितले. मात्र, पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली.
यानंतर त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा पतीला शोधण्याचे प्रयत्न करत नसल्याने यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला. त्यातच घराची ओसरी खड्डा करून शेण आणि मातीने सारवलेला कुटुंबियांना दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणीकरिता सुरगाणा पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी महसूल विभागासमवेत पंचनामा करीत घरातील ओसरीवरील खड्डा खोदला. मात्र तिथे मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आणि ती काही झालेच नाही, अशी वावरत होती. लहान भावाच्या पत्नीला संशय आला अन्...दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवली. त्यामुळे उत्तमच्या पत्नीला संशय आला आणि तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला असता आपणच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून पुरले व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली दिली.
No comments:
Post a Comment