Friday, August 15, 2025

रोहित पवार म्हणाले ...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील!

वेध माझा ऑनलाइन।
सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा बेरोजगारांचे प्रश्न घेऊन आपण भंडाऱ्यात शेतकरी मोर्चा तथा मंडल यात्रा काढत आहे. मतांची चोरी पकडी गई, राहुल गांधींनी उघड उघड पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचं प्रेस कॉन्फरन्समधून जाहीर केलं आहे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी आहे. लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच, अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. 

राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. सध्या ते आमदार सत्तेत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडत आहेत. त्यातच, रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपाच्या विरोधात अहो, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे, जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार साहेबांसोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर आम्ही त्यांचा विचार करू. मात्र, अजित पवार भाजपसोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही. जर त्यांनी भाजपला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं तो विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात रोहित पवारांनी भाष्य केलं.

No comments:

Post a Comment