वेध माझा ऑनलाईन।
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे.
कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांची यंदाच्या मानाच्या वारकऱ्यांमध्ये निवड करण्यात आली होती. या मानामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची अभूतपूर्व आणि विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून सुरक्षेसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
No comments:
Post a Comment