कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कथित दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्वतःला यापूर्वीपेक्षा अधिक मते मिळाल्याचा दावा करत, दुबार मतदारांची नावे वेळेत कमी करण्यात आली असती, तर या मतदारसंघात आमदार म्हणून कोण दिसले असते, असा थेट सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
आज कराड येथे पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ४० हजारांहून अधिक मतदारांची बोगस नोंद झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. यापूर्वीही त्यांनी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मतदार यादीची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांची दुबार मतदार नोंदणी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले.
भाजपच्या वतीने यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन चव्हाण यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची मतदार नोंदणी दुबार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण, स्वीय सहाय्यक श्री. आवळकर तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या विषयावर स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी कराड शहरात सध्या चर्चेत असलेल्या 'नेकलेस रोड' प्रकल्पाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले. तसेच, माहिती घेतल्यानंतरच आपण याबाबतची भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कराड दक्षिण मतदारसंघातील दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याने आगामी काळात भाजपकडून याविषयी काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
No comments:
Post a Comment