कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात श्री. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ साहित्यिक हरपला आहे. पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, डोह आणि सोन्याचा पिंपळ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी आपल्या वेगळ्या अनुभवविश्वाचा अत्यंत प्रभावी आविष्कार वाचकांसमोर मांडला. त्यांच्या लेखनाला चित्रदर्शी शब्दकलेची लाभलेली जोड, चित्रकलेतील संस्कारातून आलेली दृष्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून वर्णनात उतरलेला बारकावा आणि अनुभवाच्या तळाशी पोहोचणारी पारदर्शी लेखनशैली यामुळे त्यांच्या साहित्याने एक वेगळीच उंची गाठली."
"ललित लेखनाला नवे परिमाण देणारे लेखक म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव साहित्य क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे साहित्य मराठीपुरते मर्यादित न राहता कानडी, बंगाली तसेच इंग्रजी भाषेतही पोहोचले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्यरत्न पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' प्राप्त होणे ही त्यांच्या अर्धशतकाहून अधिक काळाच्या साहित्यसेवेची योग्य पावती होती. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा समस्त कराडकरांना नेहमीच सार्थ अभिमान राहिला आहे."
"श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.
No comments:
Post a Comment