Sunday, August 16, 2026

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील 7 जणांनी सलग तीन निवडणुकीमध्ये दुबार मतदान केले; 70 वर्षे तुमच्या घरात राजकारणाची मोठी पदे असताना एखादा उद्योगतरी कराडात आणायचा होता, ; तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून लोकांनी तुम्हाला डावललय ; आमदार अतुलबाबांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार ;

वेध माझा ऑनलाईन। दुबार मतदान नोंदणीच्या मुद्द्यावरून कराडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कृष्णा हॉस्पिटल परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या मतदान नोंदणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुबार मतदानाच्या नोंदणीबाबत करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा करताना भोसले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सात जणांची विविध ठिकाणी मतदान नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अद्याप स्वीकारता आलेला नसल्याचे दिसत असल्याची टीका करत, लोकांनी त्यांना नाकारल्याचे वास्तव त्यांनी मान्य करावे, असा सल्लाही भोसले यांनी दिला.

'५८ हजार बोगस मतदारांचा आकडा कुठून आला?'
दुबार मतदानाच्या मुद्यावर भाष्य करताना भोसले यांनी ५८ हजार बोगस मतदारांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. स्थलांतरित, मृत आणि इतर मतदारांची आकडेवारी लक्षात घेतली तर एवढ्या मोठ्या संख्येचा आधार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने कोणताही आरोप करताना वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे सांगत, केवळ राजकीय आरोपांसाठी बिनबुडाचे दावे करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

'७० वर्षांच्या राजकीय वारशाचा हिशेब द्या'
चव्हाण कुटुंबाच्या अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना भोसले यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी कोणते उद्योग आणले, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
आपल्या दीड वर्षांच्या कामाचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीचे मूल्यांकन करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडे आणि अमित शाह यांच्यावरील वक्तव्यांवरही आक्षेप
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याबाबत चुकीची विधाने करणे योग्य नसल्याचे भोसले म्हणाले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी संयम बाळगावा, असेही त्यांनी सांगितले.

'कराडमध्ये नेकलेस रोड होणारच'
पत्रकार परिषदेत कराडमधील बहुचर्चित नेकलेस रोड प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. हा प्रकल्प कराडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार करत, या प्रकल्पाचे थ्री-डी सादरीकरण सत्ताधाऱ्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment