Thursday, August 6, 2026

मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला - आमदार डॉ अतुल भोसले यांची लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठी साहित्यविश्वातील ख्यातनाम ललित लेखक, संवेदनशील शब्दशिल्पकार आणि 'डोह'कार म्हणून सर्वदूर परिचित असलेले कराडचे ज्येष्ठ साहित्यिक मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला आहे अशा शब्दात आमदार अतुलबाबा भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या अजरामर साहित्यकृतींमधून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि निसर्गाशी असलेले नाते अत्यंत प्रभावीपणे उभे राहिले. त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचले आणि इंग्रजीसह अन्य भाषांमध्येही अनुवादित झाले, ही मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्र शासनाचा २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी अखंड साहित्यसाधना करत मराठी वाङ्मयाला मोलाचे योगदान दिले.

मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य साहित्यप्रेमींना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment