Saturday, April 13, 2024

दात पडलेला वाघ लोकांना नकोय; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

वेध माझा ऑनलाईन ।
 मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांच्याविरोधात रान उठवले आहे. राज ठाकरे हे भाजपच्या दबावासमोर झुकले, असा प्रचार मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे शक्तीहीन झालेला वाघ आहे. असा वाघ लोकांना नकोय, असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले. त्या शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय होती? राज ठाकरे म्हणतात, इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात, मग मी का बदलू नये? पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत. 2019 मध्ये त्यांची 'लाव रे तो व्हीडिओ' ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती. पण राज ठाकरे यांनी नंतर त्यांची भूमिका बदलली. एवढंच कशाला पक्ष झाल्यापासून राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही अनेकदा बदलला. आधी निळा, मग हिरवा, त्यानंतर थोडासा भगवा, असे करत राज ठाकरे यांनी अनेक झेंडे बदलले. त्यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला, शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment