Tuesday, August 18, 2026

नदीत प्लास्टिक फेकणाऱ्यांना सौरभ पाटलांनी भररस्त्यात झापले; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या स्वच्छतेबाबतच्या भूमिकेची पुन्हा आली प्रचिती ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील राजकारणात अनेक नेते त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. मात्र, स्वच्छता हा केवळ प्रचाराचा विषय न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणाऱ्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते सौरभ पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती सोमवारी पुन्हा एकदा आली.

इस्लामपूर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सौरभ पाटील हे ताकारी मार्गे कराडकडे परतत होते. कारवे परिसरात आल्यानंतर त्यांच्या नजरेस एक धक्कादायक प्रकार पडला. मुंबई परिसरातील नोंदणी असलेल्या एका चारचाकी वाहनातून पुलावरून थेट नदीपात्रात प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्यात येत होत्या.
हा प्रकार पाहताच सौरभ पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित वाहनचालकाला थांबवले. नदीत प्लास्टिक फेकून प्रदूषण वाढवणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी चांगलेच सुनावले. 'निसर्गाबाबत कोणतीही जबाबदारी नाही का? सार्वजनिक ठिकाणी अशी बेजबाबदार कृती कशी करता?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संबंधित वाहनाच्या पुढील भागात स्टेअरिंगजवळ पोलिसांची टोपी ठेवलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरूनही त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. 'टोपी पुढे ठेवली म्हणजे नियम मोडण्याचा परवाना मिळतो का?' असा थेट प्रश्न करत त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या मुद्द्यावर सौरभ पाटील यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. शहरात असो किंवा बाहेरगावी, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या व्यक्तींना ते वेळोवेळी जाब विचारत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नदी, पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता याबाबतची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश त्यांनी या घटनेतून पुन्हा एकदा दिला. त्यामुळेच कराड आणि परिसरात स्वच्छतेचा कट्टर पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
निसर्गाचे रक्षण केवळ भाषणातून होत नाही, तर चुकीच्या कृतींना वेळीच रोखण्याच्या धाडसातून होते, हे सौरभ पाटील यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.

No comments:

Post a Comment