Thursday, August 20, 2026

कराडचे भाजपचे नगरसेवक धावून आले नागरीकांच्या सुरक्षेसाठी ; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ;कराड पालिकेला दिले निवेदन :

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कराड नगरपरिषदेतील गटनेते विजय वाटेगावकर व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देत भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण तसेच आक्रमक स्वभावाच्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये भटक्या व आक्रमक श्वानांचा वावर वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या हल्ल्याच्या तसेच नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने नगरपरिषदेने या विषयावर तातडीने प्रभावी व शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कराड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्याबाबत विषय मंजूर झालेला आहे. तसेच भटक्या श्वानांच्या नियंत्रणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.
शहरातील सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने अंतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. लसीकरण व निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटण्यासाठी आवश्यक मार्किंग करून त्याची प्रभागनिहाय नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे आक्रमक व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद तयार करून, अशा श्वानांबाबत लागू नियम व न्यायालयीन निर्देशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा अधिकृत संस्थेची नियुक्ती करावी. त्याचबरोबर अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी, निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
भटक्या व आक्रमक श्वानांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी व कार्यवाही प्रणाली निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची आणि न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी या विषयावर विलंब न करता कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर व भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment