वेध माझा ऑनलाइन। बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इशारा मेळावा घेण्यात आला आणि याच इशारा मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. येत्या 17 फेब्रुवारीला आरक्षणासाठी 50 लाख धनगर बांधव हे चौंडी येथून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत. तसा निर्णय बीड येथे झालेल्या इशारा मेळाव्यात घेण्यात आला आहे.
50 लाख धनगर बांधव मेंढ्यासह मुंबईला जाणार
अनेक वेळा आंदोलन मोर्चा काढून देखील सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे बीडमध्ये सरकारला इशारा देण्यासाठी धनगर समाज बांधवांनी मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये धनगर समाज बांधव 17 तारखेला चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांचा आशीर्वाद घेऊन मुंबईत मेंढ्यासह दाखल होणार आहेत असा इशारा यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सरकारला दिला. धनगर समाज बांधव मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांना नाही तर पंतप्रधानांना देखील आरक्षणाची घोषणा करावी लागेल असं दोडतले म्हणाले आहेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांनी जर 20 तारखेच्या आत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर ते जातीवादी आहेत असं आपण समजायचं आणि धनगर आरक्षण विरोधी सरकार असे बोर्ड गावागावात लावायचे. असे बाळासाहेब दोडकले म्हणाले आहेत
धनगर आरक्षणासाठी एमआयएम पक्ष रस्त्यावर उतरणार
धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं सांगितलं होतं. मात्र अद्याप देखील धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार इम्तेहाज जलील यांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे. बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत एमआयएम पक्ष देखील धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली असे ते म्हणतात. तर धनगर आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेतील का असा प्रश्न यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारला. 21 दिवस आंदोलन करून 50 दिवसाचा वेळ सरकारने घेतला तरी देखील अद्याप आरक्षण का दिले नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील धनगर आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी साद त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली.
येत्या 20 तारखेपर्यंत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण धनगर समाज हा बहिष्कार घालणार आहे. तर जो पक्ष धनगर समाजाच्या नेत्याला तिकीट देणार नाही त्या पक्षालादेखील मतदान करणार नसल्याचं या इशारा मेळाव्यातून सरकारला सांगण्यात आलं. आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन करून देखील राज्य सरकारने आपल्या तोंडावर काठी मारली आहे, आता मेंढपाळाची काठी राज्य सरकारच्या तोंडावर बसणार असल्याचं धनगर बांधवांकडून सांगण्यात आलंय.
No comments:
Post a Comment