कराड
ऊसाची पहिली उचल एक रकमी एफआरपीने मिळावी, या मागणीसाठी रयत क्रांति संघटना उद्या राज्याचे सहकारमंत्री चेअरमन असलेल्या सह्याद्रि सहकारी कारखान्यावर धडकणार असून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती रयत क्रांतिचे नेते सचिन नलवडे यांनी दिली आहे.
रयत क्रांति संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी मंगळवारी 16 रोजी याबाबतचे निवेदन तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल एक रकमी एफआरपीने द्यावी. यासाठी रयत क्रांतिच्या वतीने तहसील कार्यालयावर ट्रँक्टर मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, प्रशासन व साखर कारखानदारांनी अद्यापही पहिली उचलीचा निर्णय घेतलेला नाही. सह्याद्रि साखर कारखान्याचे चेअरमन हे राज्याचे सहकारमंत्री असल्याने या कारखान्याने पहिल्यांदा एक रकमी एफआरपी जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, कारखाना सुरु होवून वीस दिवस होऊनही दर जाहीर केलेला नाही.
ऊस दर नियंत्रण कायदा 1966 च्या तरतूदीनुसार ऊस गाळप झाल्यापासुन चौदा दिवसात शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपीची रक्कम दिली पाहिजे, असा कायदा आहे. तरीही त्याची अंमलबजावणी न करता जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा सर्व साखर कारखान्यांच्या प्रशासन, संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही नलवडे यांनी संघटनेच्या वतीने सदर निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment