वेध माझा ऑनलाइन
कराड
शहराच्या राजकारणाची एकूणच झालेली विचित्र अवस्था पाहता यावर्षीची होणारी निवडणूक आता पक्षीय विचारधारेशी बांधील असणे अपेक्षित असल्याने ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे... माझे इतके-इतके नगरसेवक असे म्हणत ऐनवेळी सत्तेत सामील होण्याचे संधीसाधू राजकारण या पक्षचिन्हाच्या फॉर्म्युल्यामुळे हद्दपार होणार असल्याने व सध्या इथल्या राजकारणात कोणी-कोणाशीही जुळवून घेताना दिसतय त्यामुळे शहराचे भविष्य काय ? याबाबतची चिंताही यानिमित्ताने दूर होणार आहे
येथील पालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणूका याच धर्तीवर पार पडल्या व निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले.काही महिन्याने कराड नगरपरिषदेची निवडणुक होईल.येथील परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली येथे इतर कामाना तितकेसे महत्व दिले गेले नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत.त्यामुळे येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील इतर कामे होण्यासाठीचे प्रयत्न ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू ठेवली आहेत असे दिसते. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसुन आले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.
कराड शहरातील लोकांनादेखील पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते, म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत असेही समजते त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील का ? असा प्रश्न आहेच आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे. शहराच्या राजकारणात सोयीपुरता आमचाही वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेदेखील करताना दिसत आहेत.दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत येथील भाजपाच्या भोसलें गटाने राष्ट्रवादीच्या उत्तरच्या आमदारांना मदत करत कराड शहराच्या राजकारणाची समीकरणे बदलण्यासाठी प्रयत्न केला असला तरी सहकारात व ग्रामीण राजकारणात चाललेला हा फॉर्म्युला शहराच्या राजकारणात कितपत चालेल ? हा प्रश्नच आहे... कोणाची तरी जिरवायची म्हणून ठराविक मर्यादेपुरते केलेले असले राजकारण शहरात फारसे चाललेले नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे...
दरम्यान,शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत आहेत. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून कार्यरत आहेत. नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली आहे.नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला आहे.याहीवेळी पुन्हा पूर्ण ताकदीने भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता आहे असे समजते तर,राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच लढेल असे संकेत जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिले आहेत मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे पण पक्ष म्हणून लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे कदाचित ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतील का ? असाही प्रश्न आहेच...
दरम्यान या निवडणुकीतील राजकीय पक्ष जनतेचा विश्वास गमावून बसलेल्या शहरातील काही "पुढार्यांना' या निवडणुकीत "एकट" पाडतील...अशी शक्यता आहे... संधीसाधू राजकारणाला दूर ठेवणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे...आणि,माझे इतके-इतके नगरसेवक असे म्हणत ऐनवेळी सत्तेसाठी आवश्यक असणारी नगरसेवकांची बेरीज घडवून आणत सत्तेत सामील होण्यासाठी केले जाणारे राजकारणही त्यामुळे थांबेल... त्यामुळे शहराला आता ही निवडणुक पक्षचिन्हावर हवी आहे... त्यानंतर जनतेने निवडुन दिलेल्या "पक्ष' विचारधारेचे राजकारण शहरात होण्यास मदत होईल आणि राजकारणाच्या नावाखाली सुरू असलेले थोतांडही संपुष्टात येईल अशी यानिमित्ताने चर्चा आहे
No comments:
Post a Comment