ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटीची चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप करत होते. त्यामुळे याप्रकरणाला संशियत वळण मिळालेलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी थेट एसआटीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.
CBI नं दिलेली क्लिन चीट
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment