Wednesday, September 16, 2026

आशिष शेलार म्हणाले;..एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, ते सहन केलं जाणार नाही ; मनोज जरांगेना इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी शब्दात बोललं जात आहे. त्यांचा अपमान केला जात आहे. मनोजजी, हे मान्य केलं जाणार नाही. हे सहन केलं जाणार नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा. पण आमच्या नेत्यांवर अपमानस्पद बोललं तर आता खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, मनोज जी ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दात हल्ला चढवला. तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकार तुमच्या प्रश्नावर सकारात्मक आहे. आम्ही समाजासोबत आहोत. पण अपमानास्पद भाषा मान्य केली जाणार नाही. हे प्रकरण अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद पद्धतीने चाललंय ते बंद करा. सणासुदीला जनतेला त्रास होईल अशी भूमिका घेऊ नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असं आशिष शेलार म्हणाले.

शिवराळ भाषेचा निषेध
मराठा समाजाचे प्रश्न गंभीर आणि योग्य आहेत. आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण तुमची ही भाषा चालणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही भाषा योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ही भाषा योग्य नाही. आम्ही तुमच्या शिवराळ भाषेचा निषेध करतो आणि या पुढे ही भाषा सहन करणार नाही हेही स्पष्ट करतो, असा इशाराच शेलार यांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंनी समाजाबाबत भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी निर्णय घेतले आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
सरकारने मराठा समाजासाठी न्यायाची भूमिका घेतली. मराठा समाजाला अधिकार देण्याचं काम केलं. बोलघेवडेपणा करणाऱ्यांनी काही केलं नाही. मराठा समाज हे जाणतो आहे. जरांगेंना विनंती आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून असतील तर त्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सणांच्यावेळी आंदोलन आणि कूच करणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले.

अतर्क, अततायी आणि अपमानास्पद
जरांगे यांचं आंदोलन म्हणजे अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद शब्दांचं आहे. अतर्क यासाठी म्हणतो ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, ज्या न्यायिक प्रक्रियेत टिकल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे. तरीही आंदोलन करणं अतर्क आहे. अतातायीपणा यासाठी की, न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे. चर्चाही करत आहे. मंत्रिमंडळ गटाची स्थापना केली आहे. तरीही टोकाची भूमिका घेणं हा अततायीपणा आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, मनोज जी ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

No comments:

Post a Comment