महाराष्ट्र म्हटलं की यशवंतराव चव्हाण,यशवंतराव चव्हाण म्हटलं की कराड अन् कराड म्हटलं की पी डी पाटील असे समीकरण तयार झाले आहे. आणि आज यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत दिवंगत पी डी पाटील यांच्या नावाने सुरू असणारा प्रतिष्ठानचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' मला प्रदान करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन सिनेकलाकार सयाजी शिंदे यांनी केले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात गुरुवारी आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सयाजी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते.कवी, लेखक अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांची उपस्थिती होती.
सयाजी शिंदे म्हणाले मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण हे पुरस्कार घेताना मला नेहमी प्रश्न पडतो की हा पुरस्कार घेऊन करायचं काय त्याप्रमाणेच हा पुरस्कार घेताना देखील मला तो प्रश्न पडला त्यावेळी याच कराड तालुक्यातील वसंतगड येथे वृक्षारोपण चळवळ राबवणाऱ्या मुलांना मदत करायची आणि वसंतगड पुन्हा एकदा हिरवा करण्याचा मानस मी मनाशी बाळगून असून तो संकल्प पुढे नेण्यासाठीच हा पुरस्कार मला बळ देणार आहे.
अरविंद जगताप म्हणाले,अनेक कार्यक्रमांमध्ये एखाद्या व्यक्तीला भेट काय द्यावं असा प्रश्न मला पडतो पण आज सयाजी शिंदेंना भेटल्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने झाडे भेट देऊन ती जतन करण्याचा संकल्प करायला लावावा अशी नवी प्रेरणा मला यामधून मिळाली आहे.अन् चांगल्या लोकांनी चांगले विचार,चांगली कामे नव्या पिढीसमोर जावेत म्हणून पुरस्कार स्विकारले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment