Thursday, September 17, 2026

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे- पाटील यांचे आंदोलन सुरू आहे, यासंदर्भात तुमची भूमिका काय ? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दौलतनाना शितोळे म्हणाले, मराठा समाजात अनेक गोरगरीब कुटुंबं आहेत. त्यामधील ज्यांच्या नोंदी सापडतील, त्यांना दाखले मिळावेत, आरक्षण मिळावे. त्याला आमचा विरोध नाही. मनोज जरांगे-पाटील यांना यासाठी आंदोलन करण्याचा सरकार बरोबर भांडण्याचा, जाब विचारण्याचा लोकशाहीत संविधानाने अधिकार दिला आहे. ते त्यांनी करावे आणि त्यांना आरक्षण देताना इतरांवर कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. तसेच राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलताना जरांगे-पाटील यांनी खालच्या पातळीवर जावून शिवराळ भाषा वापरू नये. त्यांची शिवराळ भाषा  यापुढे सहन केली जाणार नाही असे रामोशी समाजाचे नेते दौलतनाना
शितोळे यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेत इशारा देत आपली भूमिका स्पष्ट केली

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक संवाद यात्रेच्या निमित्ताने भाजपा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या विविध मागण्या महायुती सरकारने मान्य केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

ते म्हणाले
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक साकारण्यात येणार असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याची माहितीही  शितोळे यांनी यावेळी दिली. या स्मारकाच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाज ज्या-ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे, त्या गावांमधील माती आणि पाणी आणण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेने केला आहे. भूमिपूजनाच्या वेळी राज्यातील समाजबांधव, बहुजन बांधव आणि संघटनेचे पदाधिकारी ही माती-पाणी घेऊन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संघटनेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या विविध मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले. उर्वरित मागण्यांसह राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यासाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

समाजाच्या मान्य झालेल्या मागण्यांमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी आर्थिक तरतूद करणे, उमाजी नाईक यांची शासकीय जयंती सुरू करणे, त्यांच्या नावाने भारत आणि आंतरराष्ट्रीय पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणे, तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार जाहीर करणे यांचा समावेश असल्याचे शितोळे यांनी नमूद केले.महामंडळाच्या माध्यमातून रामोशी समाजातील युवकांसाठी विविध कर्ज योजना उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय खानापूर येथील आयटीआय कॉलेजला शिवनेत्र बहिर्जी नाईक, पुरंदर येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, जत येथील आयटीआय कॉलेजला क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण, गडचिरोली येथील आयटीआय कॉलेजला व्यंकाप्पा नाईक, तर राहता-अकोले येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव राज्यशासनाकडून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच धर्तीवर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली होती. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दरवर्षी भिवडी (पुरंदर) येथील जयंती सोहळ्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

रामोशी, बेरड, बेडर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस शिफारस करण्याचे आश्वासन यापूर्वी राज्यशासनाने दिले आहे. ही समाजाची प्रमुख मागणी असून त्यासाठी यापुढील काळात लढा उभारून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची घोषणा शितोळे यांनी केली.

रामोशी, बेरड, बेडर समाजासाठी सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर शासनाने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली. समाजातील युवकांना शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाचे १८ आमदार आणि ६ खासदार असल्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या समाजाला विधान भवनात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे नमूद करून शितोळे यांनी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या लाखो हेक्टर वतनी जमिनींपैकी काही जमिनींची लूट झाल्याचा, तर काही जमिनी शासनाकडे जमा असल्याचा दावा शितोळे यांनी केला. अशा जमिनी समाजबांधवांना राज्य शासनाकडून परत मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या माध्यमातून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचतील, असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक रामोशी, बेरड, बेडर समाजबांधव गावकुसालगतच्या वस्त्यांमध्ये राहत असून त्यांच्या वास्तव्याची अधिकृत नोंद नसली तरी ते त्या गावचे मतदार आहेत. मात्र नोंदीअभावी त्यांना घरकुले आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा शितोळे यांनी मांडला. अशा वस्त्यांमधील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आदेश कार्यान्वित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये रामोशी, बेरड, बेडर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून हातावर पोट असल्याने मुलांना बाहेरगावी पाठवून शिक्षण देणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षणातील अडथळ्यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे या किमान सहा जिल्ह्यांमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशासनाकडून वसतिगृहे स्थापन करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
 
मान्य झालेल्या मागण्यांबद्दल शासनाचे आभार मानतानाच समाजाच्या उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच राहील. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 याप्रसंगी संघटनेचे राज्याचे युवक अध्यक्ष सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष दादासो मंडले, ज्येष्ठ सल्लागार सुरेश मंडले, आनंदराव जाधव, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष मल्हारी गुजले, अरूण गुजले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment