Friday, September 18, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा' ; लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इतिहास घडला आणि लोकप्रिय, तरुण तडफदार व धडाडीचे नेतृत्व असणारे राजेंद्रसिंह यादव यांनी थेट नगराध्यक्षपदी विजय मिळवला. लोकप्रिय नेता ते लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी झेप घेणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांच्या रूपाने कराडकरांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीतून आपला नेता निवडला आहे. कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प घेऊन राजेंद्रसिंह यादव विकासाची फेज टू ही संकल्पना राबवत आहेत.
कराड शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन विकासाची नवी संकल्पना आखण्याची गरज होती. गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराची गरज ओळखून ‘कराड फेज टू’ या कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प सोडला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हजारो कराडकरांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कराडच्या विकासासाठी 100 कोटींपेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द दिला. प्रत्यक्षात यादव यांनी जिद्दीने प्रयत्न करून 325 कोटी रूपयांचा निधी कराडसाठी खेचून आणला. यातून कराडच्या भुयारी गटर योजनेचे अद्ययावतीकरण व पाणी योजनेचे अद्ययावतीकरण अशी महत्वाची कामे मार्गी लागली. याबरोबरच शहरात स्मारक सुशोभीकरण, रस्ते, गटर्स अशा विविध कामांच्या माध्यमातून शहराचा मेकओव्हर होऊ लागला.
या दरम्यानच्या काळात नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुमारे 10 हजारांच्या मताधिक्याने राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले. याबरोबरच त्यांच्या यशवंत आघाडी व लोकशाही आघाडीची नगरपालिकेमध्ये बहुमताने सत्ता आली. नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना राजेंद्रसिंह यादव यांनी आर्थिक शिस्तीचा धडा घालून देत नगराध्यक्ष पदाचे मानधन, जनरल मिटींगचे भत्ते न स्वीकारता ते जनरल फंडात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षांचे वाहनही न वापरण्याचा निर्णय घेतला.
गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना राजेंद्रसिंह यादव यांना पालिका कामकाजाची खडान्खडा माहिती झाली आहे. याविषयावर ते तासन्तास बोलतात. त्यावेळी त्यांच्या अभ्यासूपणाची झलकही नागरिकांना दिसते. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमितपणे मिळावे, यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणात हे बदल दिसणार आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलावा, शहर सुशोभित दिसावे, यासाठी स्मारक सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, स्वच्छता या विषयांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. शहर विकासाच्या त्यांच्या स्वत:च्या संकल्पना असून त्या राबवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलध व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत.
वडील शिक्षणतज्ञ, शाहीर आत्माराम यादव यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे  नेताना त्यांनी आपल्या प्रभागातील कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 साठी स्वत:च्या खिशातून दहा लाखांहून अधिक रुपये खर्च करून संगणक कक्ष, विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेचे बांधकाम आणि संपूर्ण रंगरंगोटी करून दिली. आज ही शाळा त्यांच्या छत्रछायेखाली देशभर नावलौकिक मिळवू शकली. आज या शाळेला पीएम श्री मानांकन, नवीन इमारतीसाठी 10.55 कोटीचा निधी मिळाला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर पालिकेच्या दहाही शाळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सुविधांमुळे पालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा गरीब घरचा विद्यार्थी देखील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यां समोर स्पर्धा करू लागला आहे.

No comments:

Post a Comment