वेध माझा ऑनलाईन - पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले.
...तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?
तुम्हाला या शपथविधीबाबत माहित होते का? असाही प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला.
ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. आता मी ही काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं सध्या मी न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
No comments:
Post a Comment