महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर माझ्यावर सहकार मंत्री पदाची जबाबदारी पवारांनी सोपवली. मात्र अडीच वर्षांत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे सहकारी पवार साहेबांना सोडून गेले. त्या काळातही पवार साहेब स्थितप्रज्ञ राहिले. दुसऱ्या दिवशी कराडला आले. त्यावेळी त्यांचे जनतेने विशेषत: जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी मलाही फोन येत होते. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना स्वर्गीय पी. डी पाटील यांनी साथ केली. त्याप्रमाणे मी ही शरद पवार यांना शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थित्यंतरात उत्तरचा एकही माणूस आम्हाला , पक्षाला सोडून गेला नाही. मंत्री पद असतानाही उत्तरसह जिल्ह्याचे व राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे असे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले याचवेळी आम्ही शांततामय सहजीवनासाठी आग्रही आहोत मात्र संघर्ष करायची वेळ आल्यास संघर्षाला आम्ही घाबरत नसल्याचे त्यांनी विरोधकांना सुचवले
कराड उत्तरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर येथे शुक्रवारी विराट सभा झाली. यावेळी खासदार शरद पवार यांनी मोबाईल वरून मतदारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे अजितराव पाटील चिखलीकर, तालुकाध्यक्ष निवास थोरात, जितेंद्र पवार, देवराज पाटील , चंद्रकांत जाधव, संगीता साळुंखे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार ऑनस्क्रीन भाषणात
म्हणाले की, गत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. कोवडीच्या काळामध्ये या सरकारने प्रभावी कामगिरी केली होती मात्र कोविड महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्राधान्य दिल्याने विकास कामावर काही प्रमाणात मर्यादा आल्या होत्या मात्र नंतरच्या काळात मात्र मोदी शहांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. महायुती सत्तेवर आली मात्र राज्यातील जनतेने भाजप महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केला. लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देणार असून एसटी प्रवास महिलांना मोफत करणार आहोत. यावेळची निवडणूक राज्यात कोणत्या विचाराचे सरकार येणार, हे निश्चित करणारी आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करावे.
पवार सभेस्थळी पोचलेच नाहीत...
रहिमतपूरमध्ये शरद पवार यांची सातारा जिल्ह्यातील पहिली सभा होणार असल्याने कराड उत्तरच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सभेपूर्वी पवारांच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा होत्या. पाऊस पडल्याने शरद पवारांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर मर्यादा आल्या. चंदगडची सभा संपवून पवार यांनी कारने कराडच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र ते रात्री दहापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पवार यांनी फोनवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
No comments:
Post a Comment