वेध माझा ऑनलाइन
कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या न्याय व हक्कासाठी मी कारखान्याच्या निवडणुकीत उतरलो आहे. यशवंतराव मोहिते व पतंगराव कदम या गुरु व शिष्याचे नाते सर्वांना माहिती आहे. भाऊंचे विचार कुठेतरी डावलले जात असल्याची लोकभावना ऐकल्यानंतर मी त्यांचे विचार पुन्हा कारखान्यात रुजवण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहे. असे सांगून सत्ताधारी मंडळींवर लोकांची तीव्र नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांचे ऊस तोडीचे राजकारण, मयत सभासदांच्या वारसांना डावलण्याची भूमिका सभासदांना पसंत नाही. त्यामुळे त्यांची सत्ताच येणार नाही. त्याच धर्तीवर ऊसतोड देणार नाही. कामावरून कमी करतो या त्यांच्या भीतीला घाबरु नका. असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचारार्थ मालखेड, बेलवडे बुद्रुक व कालवडे (ता. कराड) येथील दौऱ्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जखिणवाडी गावचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे पाटील, उमेदवार मनोहर थोरात, गणेश पाटील, प्रशांत पाटील, बापूसाहेब पाटील, शंकरराव रणदिवे, मालखेडचे सरपंच इंद्रजित ठोंबरे, उपसरपंच युवराज पवार, बेलवडे बुद्रुकचे भारत मोहिते, विकास मोहिते, कालवडेचे सरपंच सुदाम मोटे, बाबुराव मोटे, संताजी थोरात, भानुदास थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी कृष्णाकाठी सहकारास जन्म दिला. शेती ही जात व शेतकरी हा धर्म मानून कृष्णाकाठी त्यांनी नंदनवन फुलवले. एकेकाळी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कराड तालुक्यातील अर्थकारण चालायचे. परंतु गेल्या दहा वर्षात ही आर्थिक घडी विस्कटली आहे. भाऊंच्या घरच्या मंडळींनी भाऊंच्या विचारांशी फारकत घेतली. हे मान्य करता येईल. परंतु दुसऱ्या काही शक्तींनी भाऊंचा विचार संपवला. हे चित्र बदलले पाहिजे. सभासदांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे. यासाठी रयत पॅनेलच्या प्रचारात मी उतरलो आहे.
ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात पक्ष आणि व्यक्ती बघून कृष्णा कारखान्यात कारभार झाला आहे. त्यातून सभासदांना ऊसतोड न देणे, मयत सभासदांच्या वारसांना शेअर्स देताना दुजाभाव केला जात आहे. गेल्या पाच वर्षात 8 हजार सभासदांना सभासदत्व देण्यापासून डावलले गेले. यामागे सत्ताधारी मंडळींचा वेगळा डाव आहे. भाऊंचे विचार पुन्हा कारखान्यात आणण्याची लढाई लढायची आहे. व ती जिंकायची आहे, त्यासाठी सज्ज रहा. असेही ते शेवटी म्हणाले. गीतांजली थोरात यांनी प्रास्ताविक केले. बी. वाय. थोरात यांनी आभार मानले.
-----------------------
कालवडे : येथील प्रचार बैठकीत बोलताना ना. विश्वजित कदम, बाजूस उमेदवार व पदाधिकारी.
----------------------
No comments:
Post a Comment