Thursday, January 5, 2023

ताई नको दादा हवे ; शरद पवारांसमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद बाहेर ;

वेध माझा ऑनलाइन - पुण्यामध्ये आज बऱ्याच दिवसांनी शरद पवारांनी राष्ट्रवादीची तालुका निहाय बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पण याच बैठकीत कार्यकर्त्यांमधली गटबाजी तर उघड झालीच पण वेल्ह्यातील एका कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंऐवजी चक्क अजितदादांनाच तालुक्यात लक्ष घालण्याची थेट मागणी केली, यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद बाहेर आली आहे.असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढा पदाधिकाऱ्यांनी यावेळी थेट शरद पवारांसमोरच वाचला. 

वेल्हे तालुक्यात खासदार सुप्रियाताई सुळे या समजुतदारपणे कुणाला दुखावत नसल्यामुळेच गटबाजी फोफावली आहे. तालुक्यातली गटबाजी संपवायची असेल तर अजितदादांनाच वेल्हे तालुक्यात लक्ष घालायला सांगा, अशी मागणी आपण पवार साहेबांकडे केल्याचं राष्ट्रवादीचे वेल्ह्याचे माजी तालुकाध्यक्ष शंकर भरूक यांनी केली आहे. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पक्षात गटबाजी असल्याचं प्रांजळपणे कबूल केलं आहे.पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये अनेकता राष्ट्रवादीचेच गटतट समोरासमोर लढताना दिसतात आणि विरोधकांना याच दुहीचा अप्रत्यक्ष फायदा झाला आहे. विशेषत: भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातही कदाचित यामुळेच काँग्रेसची सत्ता येत असल्याची खंत पक्ष कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. म्हणूनच या पक्षांतर्गत गटबाजीवर पवार कुटुंबिय ठोस तोडगा काढणार का तसंच भिजत घोंगडं ठेवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment