वेध माझा ऑनलाईन - राज्याच्या राजकारणात दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी एक महत्वाची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनात जात पहाटेच शपथविधी केला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणाची राज्यात खूप चर्चा झाली. त्यातच त्या प्रसंगावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक विधान केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा शरद पवार यांचीच खेळी असल्याचे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण परत एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही.’ असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगली खळबळ उडाली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असतानाच अचानक अजित पवार यांनी सध्याचे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज भवनावर जात शपथ घेतली होती याची कुणालाही खबरबात लागली नव्हती. इतकी गुप्तता या प्रकरणात पाळण्यात आली होती.
मात्र फक्त साडेतीन दिवसचं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चालू शकले.
त्यानंतर हे सरकार कोसळले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
No comments:
Post a Comment