राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.
मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ आणि उदय सामंत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आता लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे, असे संकेत दिले आहेत. गेल्या 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक निर्बंध लावले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यानंतर 22 एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाग्रस्तांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली पण तिसरी लाट येण्याआधी सरकारला राज्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम लसीकरण, आयसीयू बेड्सची संख्या, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याचा समावेश आहे. त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं मत महाविकास आघाडीतले नेते करत आहेत.
कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढवायचा की नाही याची प्राथमिक चर्चा केली जाईल. यामध्ये शहरनिहाय कोरोनाग्रस्तांची आकडेवारी समोर मांडली जाईल, लॅाकडाऊनचा किती परिणाम सध्या होतोय आणि वाढवला तर किती परिणाम होईल यावर सगळं अवलंबून आहे
लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडतोय. पण रुग्णसंख्या कमी करण्यात मोठी मदत होत आहे. 1 मे पासून लसीकरण सुरु करायचं आहे, राज्यात सध्या 4 हजार लसीकरण केद्र आहेत ते दुप्पटीनं वाढवायचे आहेत, 18 ते 44 पर्यंत साधारणत: साडेपाच कोटींच्या घरात संख्या आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सरकारला नियोजन करायचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर नक्कीच याचा परिणाम राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारण्यावर होईल असे मंत्री बोलतात.दुसऱ्या लाटेतून जाताना महाराष्ट्राला चांगलेच चटके बसले आहेत. राज्य आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करतंय, लॉकडाऊन वाढवला तर कोरोनाग्रस्तांची आकडेवारीसह कोरोनासाठी लागणारी साधनसामुग्री वाढवतां येईल. यासाठी हा लॉकडाऊन महत्वाचा मानला जातोय त्यामुळे राज्याचे नेते आता कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
No comments:
Post a Comment