वेध माझा ऑनलाइन।
सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते, संघर्ष करते आणि सत्ताधाऱ्यांचे गद्दारी, मलिदा, टक्केवारी, कमिशन हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते, त्यावेळी विजय हा नैतिकतेचा आणि चांगल्या उमेदवाराचाच होतो. १९८३ साली माझ्या बाबतीत जे घडलं तेच आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाबतही घडणार असून २३ नोव्हेंबरला सत्यजितसिंह पाटणकर हेच पाटण विधानसभेचे आमदार होतील आणि तुम्हा आम्हा सर्वांचेच स्वप्न साकार होऊन हुकूमशाहीतून पाटणची कायमची सुटका होईल, असा विश्वास माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला. पाटणमध्ये आज सत्यजित पाटणकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले की, हल्ली राजकारण घाणेरडं बनलं किंवा बिघडलं आहे. अशी सगळ्यांचीच तक्रार असते, मात्र जर आपणच चांगले उमेदवार निवडून दिले नाही तर हीच वेळ येते. त्यामुळे आता पक्ष कोणता याही पेक्षा व्यक्ती कोणती बघा संस्कार, चारित्र्य, कर्तृत्व आणि समाजासाठीचे योगदान हे बघा. दहा वर्षात पाटण मतदारसंघ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. ज्यांनी विकास थांबवला त्यांना आता जाब विचारा, आणि नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा उर्वरित वीस दिवसात तुमचा हक्काचा आमदार करा आणि आपल्या सर्वांचं आदर्श भवितव्य घडवा. प्रत्येक मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचा, मतदारांना दडपण, आमिष येतील मात्र त्यांना एक सांगा गुप्त मतदान असल्याने कोणालाही घाबरायचं कारण नाही. आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या, विजय आपलाच आहे अपक्ष म्हणून चिन्ह काय ते येणाऱ्या काळात कळेल पण प्रत्येक जण मीच उमेदवार या भावनेने कार्यरत राहिला तर निश्चित विजयाचा गुलाल आपल्याच अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले खोके, भ्रष्टाचार, मलिदा,टक्केवारी, कमिशन, बार दारूची दुकाने, गद्दारी, बेरोजगारी, सत्तेची मस्ती, पैसा अशा अपपप्रवृत्तीं विरोधात आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे. समोरचा उमेदवार आपल्यासाठी बंदूक ठासून उभा आहे आणि शिकार करणार असं जरी सांगत असेल तरी देखील शिकार करणे हा आपला धर्म आहे. आता तर माझ्या हजारो बंधू-भगिनींनी गद्दारांची शिकार करण्याचा निर्धार केला असून हा जोश बघितल्यानंतर समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वाभिमानाचा बार कधीही फुसका जात नाही त्यामुळे आता शिकार्याचीच शिकार केल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही.
आपल्याला मिळणारी सहानुभूती, वैचारिक पाठिंबा लक्षात घेता या मंडळींनी पैसे वाटायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत. आपल्याच खिशात हात घालून मिळवलेला पैसा, मलिदा गॅंगच्या माध्यमातून टक्केवारी, कमिशन, बुरशीचे लाडू, साखर, पैसे, टी-शर्ट, पेढे आदी अमिषं वाटली जात असतील वेळप्रसंगी पैसा घ्या कारण तो त्यांच्या हरामीचा पैसा आहे. त्यांनी आता वाट्टेल की आमिष देत दबाव, दडपण आणले तरीही स्वाभिमानाचा गुलाल आपलाच झाला पाहिजे याची खूणगाठ बाळगा. इथून जाताना एकच लक्षात घ्या तुम्हीच सत्यजित, तुम्हीच उमेदवार आणि तुम्हीच उद्याचे आमदार या भावनेने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा.फाजील आत्मविश्वास नको, रात्रीचा दिवस करा २२ दिवसात नव्याने मतदार संघ पिंजून काढा. मी पाच वर्षे तुमच्या पाठीशी रात्रंदिवस राहीन याची खात्री देतो. निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्याने आपापसातील राजकारण, भांडण, मतभेद, नाराजी विसरा. पुढचा काळ आपलाच आहे त्यामुळे प्रत्येकाशी संवाद साधा, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्याचा प्रचार होईल मात्र आपल्याच खिशातून त्यांनी हजारो रुपये काढलेत याचाही विचार पोहोचवा. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या चुरशीने मतदान होते तीच चुरस या निवडणुकीतही दाखवा. हीच वेळ आहे या गद्दारांना उलथून लावण्याची त्यामुळे १९८३ प्रमाणेच स्वाभिमानी जनता येथे क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पाठीशी टायगर अभी जिंदा है हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या भूमिका चोख पार पाडा.
No comments:
Post a Comment