निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे कराड दक्षिणचा गेली १० वर्षे विकास रखडला, अशी घणाघाती टीका शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते.
मलकापूर येथे विविध ठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, सरकारच्या माध्यमातून जी कामे होतात, अशा कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कराड दक्षिणच्या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून सुरु आहे. या कामाव्यतिरिक्त लोकांच्या उपयोगी पडेल असे एकही काम त्यांनी आत्तापर्यंत केलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत लोकं त्यांना याचा धडा नक्की शिकवतील. भाजपाचे उमेदवार डॉ. अतुलबाबांकडे सामाजिक कार्याचा वारसा आहे. आप्पासाहेब, डॉ. सुरेशबाबा आणि डॉ. अतुलबाबांनी विकासाच्या बाबतीत कधीही हयगय केलेली नाही. हजारो माणसांना रोजगार उपलब्ध करुन दिला.
मलकापुरात सत्तेवर असणाऱ्यांनी गेल्या २० वर्षांत हुकुमशाही निर्माण केली, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर नाव न घेता करत, श्री. थोरात म्हणाले, मलकापूरातील जनता यावेळी डॉ. अतुलबाबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मलकापूरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पण त्या प्रमाणात येथे नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही काही दिवसांपूर्वी २० कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करुन आणला. कराड दक्षिणेत सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून, बरीचशी विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. येत्या काळात मलकापूरसह कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे.
यावेळी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक अजित थोरात, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, शहाजी पाटील, सुहास कदम, सुहास जाधव, भीमराव माहूर, अमित थोरात, पी. पी. पाटील, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment