Saturday, May 30, 2026

विधान परिषद निवडणूक ; सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ! माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी मिळणार ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधानपरिषद जागांसाठी महाविकास आघाडीचे  १५ जागांवर एकमत झाले असून काँग्रेस ८, ठाकरे गट ४ तर राष्ट्रवादी ३ जागांवर लढणार आहे; नांदेड आणि नाशिकाचा तिढा कायम आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादी च्या वाट्याला आला आहे असे समजते त्यामुळे माजी आमदार आणि राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना याठिकाणी संधी मिळणार असेही बोलले जात आहे काँग्रेसकडे यापूर्वी हा मतदारसंघ होता त्यावेळी मोहनराव कदम हे याठिकाणी निवडून आले होते 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकासआघाडीने या सर्व १७ जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १७ जागांपैकी १५ जागांवर जागावाटपाचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित
मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस 
(०८ जागा): 
चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूरची पोटनिवडणूक.

शिवसेना – 
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०४ जागा): रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर.

राष्ट्रवादी काँग्रेस –
 शरदचंद्र पवार गट (०३ जागा): पुणे, ठाणे, आणि सातारा-सांगली.

या १५ जागांवर एकमत झाले असले तरी नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवर मविआतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपला दावा ठोकला आहे. यामुळे या दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर पुन्हा एक बैठक घेऊन यावर सर्वसंमतीने अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

“विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. आजची जागावाटपाची चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन जागा वगळता इतर सर्व जागांवर एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आम्ही सर्व जण पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.




No comments:

Post a Comment