Thursday, March 18, 2021

वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार!...केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत मोठी घोषणा...

 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी लोकसभेत  मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके  हटवण्यात येतील. टोलच्या जागी यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं.

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं.
गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
जेव्हढा रस्ता वापराल, तेव्हढाच टोल
नितीन गडकरी म्हणाले, “जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे”

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

No comments:

Post a Comment