Monday, February 7, 2022

काँग्रेसने आजपर्यंत एकसंघ विचार जपला ; आ पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस पक्षाने देशातील जनतेला एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीवेळी मोठा लढा उभारण्यासाठी देशातील सर्व जनता काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र आली होती. तोच एकसंघ विचार काँग्रेसने आजपर्यंत जपला; म्हणूनच आज आपला देश विविधतापूर्ण आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

देशभरामध्ये काँग्रेस पक्षाकडून आजपासून डिजिटल माध्यमाद्वारे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार कराड दक्षिण काँग्रेसमध्ये या अभियानाचा शुभारंभ व उदघाटन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पना यादव, माजी जिल्हा परिषद  सदस्या विद्याताई थोरवडे, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंग्रजांनी आपला संपूर्ण देश लुटून नेल्यानंतर तो समृद्ध करण्यासाठी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी धोरणात्मक निर्णय घेत प्रयत्न केले. त्यानंतरच्या काँग्रेसच्या सर्व नेतृत्वांनी आपल्या देशास समृद्ध करीत देशातील जनतेला एकसंघ ठेवले. परंतु, आता जातीयवादी पक्षांचा देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, या सदस्य नोंदणी अभियानाची व्याप्ती बूथ लेवलपासून केली जात आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या बूथमधील जनतेला काँग्रेसचा विचार पटवून देत सदस्य नोंदणी केल्यास त्याचा परिणाम कायम राहणार आहे. फक्त मोठे आकडे दाखविण्यासाठी ही नोंदणी नसून एक समृद्ध विचार वाढविण्यासाठी सदस्य नोंदणी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपल्या मतदारसंघात हे अभियान यशस्वी करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment