वेध माझा ऑनलाईन - आपण बाजारातून किंवा रेशन कार्डद्वारे आणलेल्या धान्यामध्ये खडे किंवा कचऱ्याची भेसळ पाहतो. धान्य शेतातून येत असल्याचं आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. मात्र, तांदळात प्लास्टिकची भेसळ होत आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण असा प्रकार प्रत्यक्षात सोलापुरात घडला आहे. सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळला आहे. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
सांगोला तालुक्यातील घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यासह भेसळयुक्त तांदळाचा प्रकार उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्लास्टिकच्या तांदळाच्या मुद्द्यावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा आक्रमक झाले आहेत.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेसळयुक्त प्लास्टिकच्या तांदळाबाबत तहसीलदारांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या तांदळाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अन्न व भेसळ विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भेसळयुक्त तांदळाबाबत ठोस निर्णय होण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.
सरपंचांनी नेमका आरोप काय केला?
“रेशनमधला तांदूळ जेव्हा बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची भेसळ केलेली आहे. त्यामुळे मी गावातील दोन-तीन शाळांतील तांदूळ तपासला. त्यावेळीदेखील मला तांदूळमध्ये प्लास्टिकची भेसळ केल्याचं आढळून आलं. आपण म्हणतो की, प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे. कारण प्लास्टिक हानिकारक आहे. प्लास्टिक कुजायला हजारो वर्ष लागतात. तेच प्लास्टिक आपल्या सरकारचा पुरवठा विभाग तांदळात मिक्स करतं”, असा आरोप सरपंच सुरेखा पुकळे यांनी केला आहे
No comments:
Post a Comment