वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते छगन भुजबळांनी एल्गार सभा घेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात दाखल न करून घेण्याची सरकारकडे मागणी केली आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ( १७ नोव्हेंबर) दिवशी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्याबाबत आणि ७० वर्षे मराठ्यांचे वाटोळं कोणी केलं? आतापर्यंत आम्हाला खेळवत आलात. मात्र आता आम्ही फसणार नाही. एक इंचही मागे हटणार नसल्याचे व्यक्तव्य जरांगेंनी केलं आहे यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि ७० वर्षांमधील नोंदींबाबत वक्तव्य केलं.
जरांगे म्हणाले की, ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडल्या नव्हत्या. त्या आता सापडल्या आहेत. २४ डिसेंबरला कायदा पारित होणार आणि आरक्षण मिळणार. हे आरक्षण जर ७० वर्षांपूर्वी असते, तर जगातली सर्वात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती. आजपर्यंत या नोंदी कोणी दडवून ठेवलेल्या. ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, याचं उत्तर मिळायला हवं.
आरक्षणासाठी सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ घेतला असून कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जर आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आणि गावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं, असे जरांगे म्हणाले. २४ डिसेंबरला आरक्षण न मिळाल्यास समाजाला पुढील दिशा काय? हे विचारूनच ठरवणार आहे. आपलं लपून-छापून काही नसतं थेट असतं. गावोगावी साखळी आंदोलन शांततेत करायचं आहे, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाज आता एकत्र आला आहे. मराठा समाजाने आरक्षण समजून घ्यायला वेळ लागला. यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे. आरक्षण समजून घेऊन समाजात जागृती करा. तुमच्यात षडयंत्र रचून मतभेद तयार केले जातील. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आम्ही एकत्रित राहणार असल्याचे ठासून सांगा. हा संदेश संपूर्ण राज्यात गेला पाहिजे. लोकांच्या घराघरातील वेदना घेऊन लोकं इथे आली आहेत. त्यांची वेदना सरकारने समजून घेण्याची गरज आहे. एक दोन टक्क्यांनी पोरांचं अॅडमिशन हुकतंय. तेव्हा आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. ७० वर्षात पुरावे नाहीत, म्हणून आरक्षण डावलण्यात आले. जसे आंदोलन करण्यात आले, तशी सरकारला जाग आली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात लाखोंनी नोंदी सापडत आहेत. ७० वर्षे नोंदी कोणी बुडाखाली दडवून ठेवली. ७० वर्षे तुम्ही आम्हाला खेळवत आलात. मात्र आता आम्ही फसणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. ७० वर्षे सत्तेत असणाऱ्या नेत्यांना समाजाने खूप काही दिले आहे. आता समाजासाठी काम करण्याची वेळ आली आहे. आज आमच्या लेकरांना तुमची गरज असल्याचे जरांगेंनी भरसभेत मराठा नेत्यांना साद घातली आहे.
मनोज जरांगेंनी मांडलेले मुद्दे –
मराठ्यांनो, विजयाचा क्षण जवळ आला
आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरून देणार?
एकजुटीमुळे मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात
आरक्षण असताना आम्हाला का मिळाले नाही ? याचे उत्तर पाहिजे.
इथून पुढे एकानेही आत्महत्या करू नका
मेलो तरीही मराठा आरक्षणासाठी एक इंच ही मागे हटणार नाही
No comments:
Post a Comment