वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. यासाठी आतापासूनच राज्यातील नेते तयारीला लागले आहेत. लोकसभेत अजित पवार गटाने निराशादायक कामगिरी केली. यामुळे विरोधी गटाकडून प्रचंड टीका करण्यात आली. अशात अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात सध्या कोल्हापूरमधील एक नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा होते आहे. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे मविआच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातंय.
कोल्हापुरात अजित पवारांना धक्का?
त्यांनी अलीकडेच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. त्यांचा एकूण रागरंग पाहता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आघाडीतील एका पक्षात प्रवेश करु शकतात,अशी जोरदार चर्चा आहे. के.पी. पाटील हे अजित पवार गटातील मोठे नेते आहेत.
हसन मुश्रीफ यांच्यानंतर के.पी. पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांची सध्या मविआशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ते अजित पवारांची साथ सोडत मविआमध्ये प्रवेश करतील, याची दाट संभावना व्यक्त केली जात आहे.
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात जर के.पी. पाटील यांना आमदारकी लढवायची असेल तर ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय. या चर्चेला हवा देणारी काही कारणे देखील आहेत
दोनच दिवसांपुर्वी मविआकडून कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता, यामध्ये के.पी. पाटील सहभागी झाले होते. शाहू महाराज आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात गेले होते, तेव्हा के.पी. पाटील यांनी शाहू महाराजांचे स्वागत केले. त्यामुळे के.पी. पाटील यांची मविआच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment