लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.
देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे सांगताना म्हटले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो.शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाले. त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही असेही ते म्हणाले .
No comments:
Post a Comment