कराडची वाढती लोकसंख्या व नागरीकरण पाहता या 50 ते 60 वर्षांपूर्वीच्या भुयारी गटार योजनेचे अद्यावतीकरण होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने गेले वर्षभर नगरपालिकेच्या विकस कामांचे विविध प्रस्ताव घेऊन शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडची गरज ओळखून दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. या योजना येत्या पन्नास वर्षाचा विचार करून करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील दोन पिढ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कामे होणार असून मुख्यमंत्र्यांनी कराडमध्ये दिलेला शब्द खरा केला असे यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कराड शहरातील भुयरी गटर योजना व पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी 209 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर राजेंद्र यादव यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे व जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांची यावेळी उपस्थिति होती
राजेंद्र यादव म्हणाले, कराड शहरासाठी भुयरी गटर योजना व पाणी योजना या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून कराड फेज टु या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. स्व. पी.डी. पाटील यांनी 50 ते 60 वर्षांपूर्वी कराडच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना उभारली. वाढती लोकसंख्या व नागरीकरण पाहता या योजनेचे अद्यावतीकरण होणे गरजेचे होते. शहरावर वाढणारा ताण पाहता पाणी योजनेचे ही अद्ययातीकरण करणे गरजेचे होते. गेले वर्षभर शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडची गरज ओळखून दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे.
भुयारी गटर योजनेत मूळ शहरासह वाढीव भागात ५२ किलोमीटरची नवी पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यात येणार आहेत. बारा डबरेत नवीन एसटीपी बांधण्यात येणार आहे. पाण्याच्या पुनरवापराचा नवीन प्लांटही असणार आहे. पाणी योजनेत २०५६ साला पर्यंत लोकसंख्येला पुरेल, या पध्दतीने अद्ययावतीकरण होणार आहे. ही योजना सोलरवर चालणार असून जुन्या पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात येतील. एसडीआर ओझोनेशन पद्धतीने पाण्याचे फिल्टरेशन होणार असून कररडकरांना मिनरल वॉटर मिळणार आहे. सोलर बसवण्याने ही योजना नुकसानीतून फायद्यात येणार आहे.
कराडचे निर्माण झालेले पाणी संकट पाहता कोयना नदीतून हँगिंग ब्रिजवरून पाईपलाईन नवीन शुद्धीकरण केंद्रात आणण्याच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कराडमध्ये शब्द दिला व तो खरा केला. त्यामुळे एकनाथ शिंदे व नेहमी सहकार्य करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच संपर्कप्रमुख शरद कणसे व जयवंत शेलार यांचे आभार मानत असल्याचे यादव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment